Friday, February 22, 2013

आप कतार में हैं ?

वीस - पंचवीस वर्षांपूर्वी मुंबईत आजच्या इतक्या टेलीफोन कंपन्या नव्हत्या. एकुलती एक MTNL होती आणि त्यांनी रेकॉर्डेड मेसेजची सेवा नुकतीच सुरु केली होती.

एकदा माझ्या आईनं कोणाला तरी फोन केला तर पलीकडून एका बाईचा आवाज आला, "आप कतार में है."  मम्मी गोंधळली. मोठ्या संकटांसमोर ती डगमगत नसे पण एखादया लहानशा गोष्टींनी उगीच घाबरुन जायची तिला सवय होती. तसं तिनं थोडं घाबरूनही घेतलं.

माझे वडील कामानिमित्त काही वर्ष कतार ह्या आखाती देशातल्या दोहा शहरात रहात होते. आम्ही सगळेजण नुकतेच तिकडे जाऊन आलो होत.  मम्मीला वाटलं, मी तर कतारहून केंव्हाच परत आले आणि नुसता इथल्या इथे दादर टी टीला मावशीला फोन लावला तर हि बाई मला अस का म्हणतेय कि आप कतार में है.

"कृपया प्रतीक्षा किजिये" हे त्या मेसेज मधलं पुढचं वाक्य ऐकल्यावर सगळा  खुलासा झाला.

हि आठवण सांगायचा हेतू हा कि टेलिफोन कंपनीनं जबरदस्ती आपल्याला व्हर्च्युअल लाईनीत उभं केलं तर आपण ते नाईलाजास्तव चालवून घेतो, नाहीतर एरवी लाईनीत उभं राहून आपला नंबर लागायची वाट बघण्यापेक्षा लाईन मोडून पुढे घुसणे किंवा कुठल्याही काउंटर भोवती कोंडाळ करून उभे रहाणे ह्याकडेच आपला कल जास्त.

भारतीयांना लाईन लावायच एवढ वावडं का ह्यावर सध्या मी विचार करतेय. आणि त्यातून मी अशा प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोहोचलेय कि एक कारण कदाचित असं असू शकेल कि पूर्वी आपल्याकडे सगळ्या गोष्टींची टंचाई असायची- मधूनच साखर दुकानातून गडप व्हायची नाहीतर रॉकेल गायब व्हायचं. लाईनीत मागे नंबर असेल तर आपला नंबर लागे पर्यन्त सगळं संपेल आणि आपल्याला रिकामी हातानी घरी परतावं लागेल ह्या भीतीपोटी तर आपल्याला लाईन मोडायची सवय लागली नसेल. आणि एकदा लागलेल्या सवयी सहजासहजी थोड्याच सुटतात.

मी असं ऐकलय कि जपान हा फार शिस्तप्रिय देश आहे. त्या देशात सरकारनी एखादा नियम केला कि तो मोडायचं जपानी नागरिकांच्या स्वप्नातही येत नाही.  म्हणजे ' येथे कचरा टाकू नये' ह्या पाटीखाली कचऱ्याचा ढीग करून ठेवणे, 'येथे थुंकू नये' असं लिहिलं असेल तिथेच थुंकून ठेवणे असले उद्योग जपानी लोक करत नसावेत.

काही वर्षांपूर्वी माझ्या मुलाच्या वर्गात एक जपानी मुलगा होता. शाळा सुटली कि घरी जाताना तो आणि त्याची आई आणि मी आणि माझा मुलगा एकाच बस/ ट्रेन मध्ये असायचो.  इथे सगळ्या सीटी बसेसमध्ये अधूनमधून अनाउन्समेंट चालू असते कि बसमधून उतरताना मागच्या दरवाजांनी उतरा (म्हणजे पुढचा दरवाजा चढणाऱ्या लोकांसाठी मोकळा रहिल). बहुतेक लोकं त्या सुचनेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात आणि जो जवळ असेल त्या दरवाजानी उतरतात. पण युमिको- ती जपानी आई मात्र दररोज न चुकता त्या सूचनेच तंतोतंत पालन करायची. ती अगदी पुढे, पुढच्या दरवाजाच्या जवळ उभी असो, मागे बस खचाखच भरलेली असो, ती त्या गर्दीतून वाट काढत मागे जाऊन, मागच्या दरवाजांनीच खाली उतरायची.

एकदा आमची मुलं बर्थ डे पार्टीला गेली होती. पार्टी संपल्यावर ती आणी मी बरोबरच मुलांना घेऊन बाहेर पडलो. सबवेच स्टेशन अगदी समोरच, रस्त्याच्या पलीकडे होतं. रस्ता एकदम रिकामी होता. रविवारची सकाळची वेळ होती. जवळपास एकही गाडी दिसत नव्हती. मी मुलाला घेऊन पटकन रस्ता क्रोस केला. मला वाटलं युमिकोनही केला असेल.
बघते तर ती लांब कोपऱ्यावर असलेल्या सिग्नलकडे जाऊन उभी होती. रस्ता रिकामा असूनही ती सिग्नल हिरवा होई पर्यंत थांबली. आणि हिरवा सिग्नल झाल्यावरच तिनं झीब्रा क्रॉसिंग वर रस्ता क्रॉस केला.

न्यूयॉर्कर्स रस्ता क्रॉस करणाच्या बाबतीत जपानी लोकांइतके काटेकोर नसतील पण लाईनीत उभं रहाण्याच्या  बाबतीत असतात. किबहुना लाईनची शिस्त पाळणं / लोकांना पाळायला लावण हे दैनंदिन आयुष्य सोप्प, स्ट्रेस-फ्री, होण्यासाठी आवश्यक आहे असं इथल्या लोकांना वाटत असावं.  नाहीतर एअरपोर्टवर किंवा सुपरमार्केटमध्ये रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास माणसं का नेमत असावेत.

न्यूयॉर्कमध्ये तुम्ही व्होल फुड्स किंवा फ़ेअरवे सारख्या मोठ्या सुपरमार्केटमध्ये जा, गर्दिची वेळ असो नसो, लाईनच्या तोंडाशी कोण ना कोणतरी उभं असतं, तुम्ही कुठच्या लाईनीत किंवा किती नंबरच्या कॅशिअरकडे जायचं ते सांगायला.  काही ठिकाणी नंबर दिले जातात. तुमचा नंबर पुकारला गेल्यावर तुम्ही काउंटरकडे जाऊन आपली ऑर्डर देऊ शकता.

त्याउलट आपल्याकडे सणाच्या दिवशी मिठाईच्या दुकानात खरतर किती गर्दी असते. पण तरीही लोकांनी एका लाईनीत उभं रहावं ह्या दृष्टिन कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही.  गिऱ्हाईकं काउंटर समोर गर्दी करून उभी असतात आणि आपल्याला एक किलो श्रीखंड हवं कि अर्धा किलो बासुंदी हे ओरडून काउंटर पलीकडच्या माणसाला सांगत असतात. ज्याचा आवाज मोठा त्याचं पार्सल अर्थातच आधी तयार होतं. त्यातून आपल्याला अर्धा किलो शुगर- फ्री बासुंदी हवीय हे सगळ्या गर्दीसमोर ओरडून सांगायला तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुमच्या कितीतरी नंतर आलेले, नि:संकोच ओरडू शकणारे लोक आपली ऑर्डर घेऊन परत जातायत हे बघत तुम्हाला तिथे उभं राहावं लागतं.

तीच गोष्ट एअरपोर्टची. न्यूयॉर्कला तुमची फ्लाईट भल्या पहाटे जरी आली, आणि एअरपोर्ट रिकामा असेल, तुमच्या खेरीज दुसरी कुठलीही फ्लाईट त्यावेळी आली नसेल, इमिग्रेशनसाठी बिलकुल लाईन नसेल, तरीहि तिथले कर्मचारी  तुम्ही कुठल्या काउंटरकडे जायचं ते सांगायला तिथे हजर असतात.

याउलट आपल्या एअरपोर्टवर सगळा आनंदच असतो.  मागच्यावेळी मी मुंबईला गेले तर दोन -तीन फ्लाईट एकदम आल्या होत्या. आणि सामान स्कॅन करणारं एकच मशीन चालु होतं. अर्थातच कस्टम्स क्लिअरन्ससाठी त्या मशीन समोर भरपूर लांब लाईन लागली. तेवढ्यात एक सूट -बूटधारी, परदेश प्रवास करून आलेले महाशय आले, लाईनच्या अगदी पुढे गेले आणि त्या लाईनला त्यांनी आपलं स्वतःच एक नवीनच शेपूट जोडलं.

मूळ लाईनीच्या शेवटी एक माणूस होता, तो पूढे आला आणि त्यांना म्हणाला - सर, लाईनचा शेवट खूप पाठीमागे आहे. तुम्ही चुकीच्या जागी उभे आहात.  प्लीज, मागे लाईनीत उभे रहा. तर ते महाशय त्या माणसाला म्हणतात, मला नाही माहिती तुम्ही कुठल्या लाईनीत उभे आहात. माझी लाईन तर हि इथेच आहे.  मग त्या मूळ लाईनला आणखी दोन -तीन शेपट फुटली. आणि तीहि वाढत गेली.

अशा प्रकारचा उद्दामपणा जो आपल्याकडे बराच बघायला मिळतो- आपल्या सार्वजनिक आयुष्यात आणि कधीकधी आपल्या पारिवारिक संबंधातही-  मी इतक्या वर्षात न्यूयॉर्कमध्ये कधी नाही बघितला. न्यूयॉर्कमधेही क्वचित कधीतरी, एखादं कोणतरी लाईन आहे कि नाही ते न बघता पुढे जाताना दिसतं. पण तुम्ही त्यांना हटकलं आणि लाईनीत या म्हंटल, तर ते तुमचं ऐकतील आणि मागे जाऊन उभे रहातील. कोणी नको म्हंटल तर मुद्दाम ती गोष्ट करायची, कोणी आपली चूक दाखवून दिली तरी ती मान्य न करता आपलच घोडं पुढे दामटत बसायचं हे मला वाटत गरीब, अशिक्षित समाजाचं द्योतक असावं.

बरं मुंबईच्या विमानतळावर आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची विजार असा गणवेश घातलेले अनेक लोक जागोजागी घोळक्यानी गप्पा छाटत उभे असतात. त्यांना कुठल्या कामासाठी तिथे नेमलेलं असतं हे तो छत्रपति शिवाजी विमानतळच जाणे. मधूनच ते तुमच्या जवळ येऊन हळूच तुम्हाला सामानासाठी काही मदत हवी आहे का असं विचारतात. पण गर्दीच्यावेळीही त्यातले सगळेच काम करतायत असं तर कधी दिसत नाही. त्यातल्या काहींना लाईनचं  नियंत्रण करण्याच काम का देत नाहीत कुणास ठाऊक. सांगायचा मुद्दा हा कि माणसांची कमतरता तर आपल्याकडे निश्चीतच नाही.

नियम मोडायचे किंवा त्यातून पळवाट शोधत बसायची हे आपल्याकडे किती रुटीन झालाय ह्याच दुसरं एक उदाहरण मला विमानतळावर बघायला मिळालं. न्यूयॉर्कला परत येताना मी इमिग्रेशनसाठी उभी होते. फर्स्ट क्लासच्या लाईनीत एक माणूस येऊन उभा राहिला. त्यानं आपल्या पुढे दुसऱ्या एका माणसाला उभं केलं. जेंव्हा त्या पुढच्या माणसाचा नंबर लागला तेंव्हा त्याचं तिकीट बघून इमिग्रेशन ऑफिसर त्याला म्हणाला, तुझं तिकिट इकोनॉमी क्लासचं आहे. तू त्या लाईनीत जा. तर तो मागे उभा असलेला माणूस अतिशय गुर्मीत, तुच्छतेनं त्या ऑफिसरला म्हणतो, आम्ही दोघं  बरोबर आहोत म्हणून तो ह्या लाईनीत आलाय. बिचारा इमिग्रेशन ऑफिसर त्या माणसाच्या मगरुरीला घाबरला असावा त्यानं त्या पहिल्या माणसाला आत जाऊ दिलं. जेंव्हा ह्या मागच्या माणसाची टर्न आली, तेंव्हा त्याचं तिकीट बघितल्यावर तो ऑफिसर त्याला  म्हणाला, तू एका ठिकाणी चाललायस, तो दुसरीकडे कुठेतरी चाललाय, तुम्ही दोघं एका कुटुंबातलेहि नाही आणि तू मला सांगतोस आम्ही दोघं बरोबर आहोत.  पण ते ऐकल्यावरही त्या माणसाला, आपण सगळ्या लोकांसमोर चक्क खोटं बोललो, ह्याबद्दल ना खंत, ना खेद, ना लाज, लज्जा, शरम. त्याची गुर्मी तशीच कायम. उपकार केल्यासारखं तो त्या ऑफिसरला थातूर मातुर सॉरी म्हणाला. ऑफिसरनहि त्याच्या मगरुरीपुढे काही करायला आपण असहाय, असमर्थ असल्यासारखं त्यालाही आत जाऊ दिलं.

मी शेजारी उभी राहून सगळ बघत होते. वाटलं हे सगळ कशासाठी. केवळ आपल्या कोणालातरी इकोनॉमी क्लासच्या लांब लाईनीत उभं राहायला लागू नये म्हणून.

असले प्रकार आपल्याकडे पावलोपावली बघायला मिळतात.  विमानतळावरचे परदेश प्रवास केलेले, इंग्लिश बोलू शकणारे लोक चार इयत्ता शिकलेले असतील, गरीब नसतील म्हणून ते वेगळं वागतील हा समज चुकीचा आहे.  तसच भारतीय लोक भारतात कसेही वागोत परदेशी गेले कि तिथले नियम चुपचाप पाळतात हि समजूतही साफ खोटी आहे. नायाग्रा  फोल्सच्या लाईनीत तरुण, शिकलेली दिसणारी देशी कंपनी, अमेरिका बघायला आलेल्या आपल्या आईवडिलांसकट पुढे घुसताना मी बघितलय.

थोडक्यात काय रांग अमेरिकेत नायाग्राच्या दर्शनासाठी असो नाहीतर शिरडीत साईबाबांच्या, मंडळी शोर्टस/ जीन्स मधली असो नाहीतर लुगडं/ धोतरातली, लाईनीत पुढे घुसणे हा आमचा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच ह्या तालावर देशी कंपनीचं आगे बढो चालू असतं.

साईबाबांच्या दर्शनाला आजकाल लांब लाईन असते हे मला माहित नव्हतं. काही वर्षांपूर्वी आम्ही गेलो तर पटकन  दर्शन झालं होतं. ह्यावेळी मात्र लांबच्या लांब रांगेत उभं राहावं लागलं. खोली क्रमांक चार मधून खोली क्रमांक तीन मग दोन अशी हळू हळू रांग पुढे सरकत होति. मंडळी आपआपल्यापरीनं पूढे घुसत होती. दीड -दोन तास रांगेत उभं राहिल्यावर आम्ही शेवटच्या टप्प्यावर येउन पोहोचलो. मंडपात पोहोचल्यावर सगळे साईबाबांच्या दर्शनाने भारावले असावेत. रांग शांतपणे पुढे सरकू लागली. घुसखोरीही थांबली. इतक्यात खेडवळ दिसणाऱ्या मंडळींचा एक घोळका आपापसात धक्काबुक्की करत मागून पुढे गेला आणि थेट मुर्तीपाशी जाऊन दर्शनासाठी आपसातच चेंगराचेंगरी करू लागला. मूर्तीजवळ गोंधळ माजला तेंव्हा सिक्युरिटी गार्डसनि त्यांना घाईत बाहेर काढलं. मला ते बघून वाईट वाटलं, कि त्यांना नीट दर्शन घेत आलं नाही. थोडा संयम दाखवला असता, शांतपणे रांगेत थांबले असते तर त्यांना व्यवस्थित, जास्तवेळ दर्शन मिळालं असतं. त्यांचा नंबर लागतच होता. आमच्या फार मागे नव्हते ते लोक.  दर्शन इतकं जवळ आल्यावर शेवटच्या क्षणी त्यांनी अशी घाई गडबड का केली मला समजलं नाही.

देव-दर्शनाच्या रांगेत पुढे घुसणाऱ्या भक्तांच मला नेहमी आश्चर्यं वाटतं. त्यानां काळजी नाही वाटत कि देव त्यांना पुढे घुसताना बघेल आणि थोडे कमी आशीर्वाद देईल. जे लोक लहान मुलाबाळांना घेऊन उन्हातान्हात तापत आपला नंबर लागायची वाट पहात थांबलेत त्यांना जास्त पूण्य लाभेल. का देवाच्या दरबारात सगळे गुन्हे माफ असतात, आणि देव आशीर्वाद देताना कुठलाच भेदभाव करत नाही अशी त्या घुसखोरांची गाढ श्रद्धा असते.

ग्लोबलायझेशनमुळे  मला लाईन ह्या विषयावर तुलनात्मक अभ्यास करायची संधी मिळाली.  न्यूयॉर्कमध्ये माझ्या घराजवळ सबवे सन्डवीचच दुकान आहे आणि मुंबईतही घराजवळ एक सबवेच दुकान आहे. न्यूयॉर्कच्या सबवेत काउंटरपलीकडे सगळे बांगलादेशी लोक असतात तर मुबईत तरुण मराठी मुलं असतात.

मला वाटलं कंपनी एकच असल्यामुळे काम करणाऱ्या लोकांच ट्रेनिंगहि सारखच असेल. न्यूयॉर्कमध्ये एका गिऱ्हाईकाची ऑर्डर पूर्ण झाली कि काउंटरपलीकडचा माणूस नेक्स्ट म्हणून पुकरतो. मग ज्याचा नंबर असेल त्यानं  पुढे होऊन आपली ऑर्डर द्यायची. प्रभादेवीच्या सबवेत मी गेले तर माझ्यापुढे एक बाई होती. मी वाट पाहत थांबले कि तीचं झाल कि ऑर्डर घेणारा मुलगा नेक्स्ट म्हणेल. तर तो मागे वळून आपल्या मित्रांशी गप्पा मारत उभा राहिला. म्हंटल कदाचित तिची ऑर्डर पूर्ण झाली नसेल. अजून थोडावेळ थांबावं.  तेवढ्यात साहेबी पोशाख केलेले दोघेजण मागून आले आणि लाईन आहे कि नाही हे न बघता सरळ काउंटर कडे जाऊन, ए पोऱ्या चाय लावच्या थाटात आपली ऑर्डर देऊन मोकळे झाले. तो मुलगाही तत्परतेने त्यांच sandwich करायला धावला. मी सांगतेय त्याला कि मी त्या लोकांच्या आधी आलेय. तरीही सॉरी म्हणून, माझी ऑर्डर आधी घ्यायचं त्याला सुचलं नाही. मग मी त्या सगळ्यांच्यावर तोंडसुख घेतलं. त्याचाही कोणावर काही परिणाम झाला नाही.

शाळा-कॉलेजात असताना मनावर ठसलं होतं कि इंडिया इज अ थर्ड वर्ल्ड कंट्री. मग मध्ये खुप वर्ष गेली. बरेच बदल झाले. मोठमोठ्या अंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या पॉश शोरूम्स मुंबईत सगळीकडे उघडल्या. न्यूयॉर्कच्या तुलनेत सरस ठरतील अशा टोलेजंग इमारती रोज नव्या ठिकाणी उभ्या राहू लागल्या. पेपरवाले भारत आणि चीनच्या प्रगतीची तुलना करू लागले. लिंकन टनेल मध्ये शिरताना भारतीय पर्यटन विभागाच्या मोठ्ठ्या बोर्डवरची India Shining हि जाहिरात वाचून मला वाटायला लागलं कि खरंच 'इंडिया इज अ थर्ड वर्ल्ड कंट्री' चे दिवस मागे पडलेले दिसतात.

पण आजही मुंबईला गेलं कि कोपऱ्या-कोपऱ्यावर कचऱ्याचे ढीग वाहताना दिसतात. बेवारशी कुत्री, गाई तो कचरा हुंगत असतात. वाहतुकीचे नियम कोणी पाळत नाही. मग गाड्यांची टक्कर झाली कि चालवणारे खाली उतरून आपसात मारामारी सुरु करतात. गजबजलेल्या भर चौकात एकमेकाला लाथा मारतात, गुददा गुददी करतात. आजुबाजुला बघ्यांची गर्दी जमते. पोलिस जवळ फिरकतही नहित. थोड्यावेळानी मारामारी संपते. जो तो आपल्या मार्गी लागतो. कोणालाच त्यात काही विशेष वाटत नाही. लाल सिग्नलला न जुमानता एखादी गाडी निघून जाते आणि हवालदार बिचारा शिट्टी वाजवत तिच्या मागे पळत तिला थांबवायचा केविलवाणा प्रयत्न करतो. तोपर्यंत ती गाडी पुढच्या सिग्नलच्याही पलीकडे गेलेली असते.

हे आणि असं सगळं बघितलं कि वाटतं, we are still very much a Third World country.


PS:

प्रेसिडेंट केनडींच्या भाषणातील एक प्रसिद्ध वाक्य आहे- जे अमेरिकन टी व्ही वर बरेचदा दाखवतात - "Ask not what your country can do for you. Ask what you can do for your country".

भारताबाहेर राहून भारताला नावं ठेवणं केव्हाही चूकच. आजपर्यंत भारतानी जी प्रगती केली ती अर्थातच जे लोक तिथे राहतात त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्याच कष्टांमुळे. काही एन-आर-आय मंडळींनी जाऊन- येउन, आपल्या उद्योगधंद्यांच्या शाखा तिकडे उघडून वगैरे हातभार लावायचा प्रयत्न केला असेल - नाही असं नाही. पण फार थोडा. मुख्य योगदान अर्थातच तिकडे रहाणाऱ्या लोकांच.

आणि तरीही पन्नास-साठ वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरूंच्या मनाला भावलेल्या रॉबर्ट फ्रोस्टच्या कवितेच्या ओळी देशातल्या आणि देशाबाहेरच्या भारतीयांना आजही तितक्याच लागू होतात असं वाटतं… 

The woods are lovely, dark and deep, 
But I have promises to keep, 
And miles to go before I sleep, 

And miles to go before I sleep.                                             

                                                   
                                                   























1 comment:

  1. अगदी बरोबर ! कारण आपण सुशिक्षित झालो तरी सुसंस्कृत नाही झालो . यासाठी अजून काही पिढ्या जाव्या लागतील

    ReplyDelete