Sunday, March 17, 2019

काही आठवणी



                        



बार्बरा बुश जेंव्हा व्हाईट हाऊस मध्ये रहात होत्या तेंव्हा त्यांचे कपडे, हेअर स्टाईल यांची कधी चर्चा होत नसे. त्यांनीही अमेरिकेची फर्स्ट लेडी झाल्यावर आपल्या आधीच्या केश - वेशभूषेत काही बदल केले नाहीत. त्या जशा आधी होत्या तशाच त्यांचे पती राष्ट्राध्यक्ष झाल्यावरही राहिल्या. त्यांच्या सूनबाईं लॉरा बुश यांचीही तीच गोष्ट. त्यांनीही व्हाईट हाऊस मध्ये रहायला गेल्यावर आपल्या स्टाईल मध्ये काही बदल केला नाही. एखाद वेळेस हेअर कट थोडा बदलला असेल. पण बहुतेक नाहीच. त्यांच्या सासूबाईं प्रमाणेच त्यांचीही  केश - वेशभूषा पारंपारिक पाश्चिमात्य पद्धतीची राहिली.

परंपरे नुसार राष्ट्राध्यक्षांच्या पत्नींनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात समाज कार्य करायचं असतं. सार्वजनिक वाचनालय हा लॉरा बुश यांच्या आवडीचा विषय होता, त्यात त्यांनी काम केलं. बुश कुटुंब पिढीजात श्रीमंत आहे. बार्बरा आणि लॉरा आपल्या कुटुंबाच्या इतमामाने व्हाईट हाऊस मध्ये राहिल्या. आपला, आपल्या पदाचा आणि देशाच्या राष्ट्रगृहाचा मान राखत आपली फर्स्ट लेडीची कारकीर्द त्यांनी पार पाडली. 

हिलरी क्लिंटन व्हाईट हाऊस मध्ये रहायला जायच्या आधी पासूनच चर्चेत होत्या. "मी काही कुकीज बेक करत घरात बसणार नाही," अशा प्रकारचं  वादग्रस्त विधान त्यांनी आपल्या नवऱ्याच्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान केलं (त्यामुळे घरात बसून कुकीज बेक करण्याचा अभिमान बाळगणाऱ्या महिला भडकल्या ).  तेंव्हापासून जे सुरु झालं ते व्हाईट हाऊस मध्ये राहायला गेल्यावर त्यांनी केलेले केशरचनांचे वेगवेगळे प्रयोग, त्यांनी निवडलेलं हेल्थ केअर बिल हे काम आणि इतरही अनेक सर्वज्ञात कारणांसाठी त्यांच्या पतीं इतकीच प्रकाश झोताची तोफ कायम त्यांच्यावर डागलेली राहिली. आपण आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून व्हाईट हाऊस मध्ये वावरणार हे त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केलेलं आसल्यामुळे त्या तिथे रहात असे पर्यंत तो प्रकाश झोत त्यांच्यावर रोखलेला होता.

लॉरा बुश व्हाईट हाऊस मधून बाहेर पडल्यावर तिकडे रहायला गेल्या मिशेल ओबामा. त्या खूप लोकप्रिय फर्स्ट लेडी होत्या. सुरवातीलाच जे क्रू या सर्वसामान्य लोक वापरतात त्या ब्रँडचे कपडे घालून टीव्ही वर मुलाखत द्यायला गेल्या पासून मिशेल ओबामांच जे कौतुक सुरु झालं ते त्या व्हाईट हाऊस मधून बाहेर पडेपर्यंत चालूच राहिलं. त्या शिकागोच्या साऊथ साईड या भागात एका सामान्य कुटुंबात जन्मल्या आणि वाढल्या. त्यांच्याकडे पिढीजात पैशाची श्रीमंती नव्हती पण स्वतः कमावलेली शिक्षणाची श्रीमंती भरपूर आहे. नवरा  -बायको दोघांकडेही. देशाच्या राष्ट्रसदनात रहाणाऱ्या लोकांची आदर्श वागणूक कशी असावी याचा धडाचं जणू ओबामा कुटुंबांनी व्हाईट हाऊस मध्ये रहात असताना आपल्या वागण्याने घालून दिला. मिशेल ओबामांनी औपचारिक कार्यक्रमांसाठी ड्रेस निवडताना बहुतांशी अमेरिकन डिझाईनर्सना प्राधान्य दिलं याचीही बरीच प्रशंसा झाली. श्री ओबामा राष्ट्राध्यक्ष होण्या आधी सौ. ओबामा एका विद्यापीठात पदाधिकारी होत्या. फर्स्ट लेडी झाल्यावर त्यांनी ती नोकरी सोडली आणि सरकारी शाळांमधून मुलांना मिळणारं जेवण जास्त पौष्टिक व्हावं, ताजी आणि स्थानिक फळं, भाज्या यांचा त्या जेवणात समावेष असावा म्हणून काम करायला सुरवात केली.

सौ. ओबामांच्या नंतर व्हाईट हाऊस मध्ये रहायला आल्या सध्याच्या फर्स्ट लेडी मलानिया ट्रम्प. त्या न्यूयॉर्क सिटीत फीफ्थ  ऍव्हेन्यू वर रहाणाऱ्या. फीफ्थ ऍव्हेन्यू म्हणजे अमेरिकतलं फॅशनच माहेर घर, मक्का सगळं काय ते. विशेषतः जिथे ट्रम्प टॉवर आहे - ५७ वी स्ट्रीट आणि फिफथ ऍव्हेन्यू च्या कोपऱ्यावर - त्या भागात जगभरच्या सगळ्या मोठ्या फॅशन डिझाईनर्सच्या शोरुम्स आहेत. जगातलं असं एकही मोठं डिझाईनर लेबल नसेल ज्यांची शाखा किंवा "ग्लोबल फ्लॅगशिप स्टोअर", मॅनहॅटनच्या ५० ते ६० स्ट्रीट आणि फीफ्थ ते मॅडिसन ऍव्हेन्यू या भागात नाही. तसंच बर्गडॉर्फ गुडमन, सॅक्स सारखी उंची डिपार्टमेंटल स्टोअर्स ट्रम्प टॉवर मधून खाली अवतरलं कि लगेच पायथ्याशीच आहेत. त्यातून मलानिया लग्नाआधी मॉडेलिंग करायच्या त्यामुळे फॅशनमध्ये त्यांना गती असणं स्वाभाविक आहे. त्यांच्या पोशाखात बरीच विविधता असते. ते लेटेस्ट फॅशनचे असतात आणि कोणाला भेटायला जाताना त्यानीं काय परिधान केलं याची पेपरात "बातमी" होऊ शकते. आपल्या यजमानांच्या शपथ विधीच्या दिवशी त्यांनी परिधान केलेल्या फिक्कट आकाशी रंगाच्या ड्रेसचं बरंच कौतुक झालं. राल्फ लॉरेन या डिझाईनरचा तो ड्रेस खूप सुंदर होता आणि त्यांना शोभतही होता.

व्हाईट हाऊस मध्ये रहायला गेल्यावर मलानियानी सायबर बुलिइंग या सध्या फार गहन झालेल्या समस्येवर काम करायचं ठरवलं. फॅशनच्या जाणकारांचं मत असं कि मलानिया पूर्वाश्रमीच्या मॉडेल असल्यामुळे त्या नेहमी पोषाखाची निवड विचारपूर्वक करत असणार - केवळ काहीतरी घालायचं म्हणून घालायचं अशी नाही. काही महिन्यां पूर्वी टेक्सस मध्ये लहान मुलांच्या शेल्टरला भेट द्यायला जाताना, विमानात चढता - उतरताना त्यांनी झारा या ब्रँडचा ऑलिव्ह ग्रीन रंगाचा कोट घातला होता. त्या कोटाच्या पाठीवर ठळक मोठ्या पांढऱ्या अक्षरात एक वाक्य लिहिलेलं होतं - आय रिअली डोन्ट केअर, डू यु.?  झालं...!!! दुसऱ्या दिवशी लगेच वर्तमानपत्रातून चर्चा झाली कि तो मजकूर कोणाला उद्देशून असावा. मलानिया लहान मुलांना भेटल्या तेंव्हा त्यांनी तो कोट घातला नव्हता म्हणजे मुलांना उद्देशून 'आय डोन्ट केअर' असं त्यांना म्हणायचं नसावं. फक्त विमानात चढता - उतरतानाच तो कोट घातला होता. म्हणजे मग कोणाला उद्देशून त्यांना "आय डोन्ट केअर" असं म्हणायचं होतं याची चर्चा काही दिवस रंगली.

अमेरिकन पत्रकार निवडून आलेल्या लोंकांवर कडी नजर ठेऊन असतात. सत्तेत असणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्याचं काम ते अमेरिकन जनतेच्या वतीने करतात. देशवासियांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी केवळ देशाच्या आणि जनतेच्या हिताचच काम करतायत ना, स्वतःच्या हिताचं तर नाही यावर ते डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवतात.  

तसेच मेघना आणि हरीच्या विवाह सोहोळ्यापासून आपण ऐकत आलो कि इंग्रज राजघराण्यातील लोंकांना काय करायची परवानगी आहे आणि काय नाही याचेही नियम आहेत. ते त्या कुटुंबातल्या लोकांना पाळावे लागतात. लग्नाआधी कॅलिफोर्नियात अभिनेत्री असलेली मेघना बी बी सीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती, "अभिनय सोडावा लागतोय म्हणजे माझं करिअर संपलं असं मी मानत नाही. मला ज्या समाजकार्या बद्दल तळमळ आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला  आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हरीला साथ द्यायला मी उत्सुक आहे". थोडक्यात काय तर निवडणूक जिंकलेले लोकप्रतिनिघी असोत किंवा राजघराण्यातील लोक असोत - जेंव्हा ते त्या पदावर असतात तेंव्हा त्यांना सर्वसामान्य नागरिकां प्रमाणे आपल्याला हवं तसं वागण्याची मुभा नसते.

 

                       
                                           




आम्ही मुंबईला जातो तेंव्हा मुंबईच्या रस्त्यांवरून बरंच फिरतो. माझ्या पेक्षाही माझ्या मुलाला दक्षिण मुंबईचे काही भाग आता जास्त माहीत झालेत. एखादं ठिकाण नक्की कुठे आहे हे माझ्यापेक्षा त्याच्या चांगलं लक्षात असतं. एखाद दिवशी रात्री कुलाब्याच्या लिओपोल्ड मध्ये जेवलो तर घरी परत येताना मरीन ड्राईव्ह वरून उजवीकडे वळून बाबुलनाथ, पेडर रोड मार्गे प्रभादेवीला यायच्या ऐवजी, सरळ जाऊन वाळकेश्वर, मलबार हील करत थोडं लांबच्या मार्गानी घरी यायला आम्हाला आवडतं. गाडीतल्या रेडिओवर सदाबहार हिंदी गाणी चालू असतात - कधी जुनी, कधी नवीन, पण मुलामुळे आता बहुतेक नवीनच. खूप छान वाटतं मरिन ड्राईव्ह - हाजी अली -वरळी सी फेस करत समुद्राच्या काठानी घरी परत यायला. अशा साध्या तरीही अनमोल आनंदा साठीच बहुतेक आम्हांला पुन्हा पुन्हा मुंबईला जावंसं वाटतं. 

मलबार हिल हा मुंबईचा सुंदर, जुना आणि पॉश भाग आहे. एक वर्षा आणि सह्याद्री या महाराष्ट्र राज्याच्या वास्तू सोडल्या तर मराठीला तिथे स्थान दिसत नाही. पण आपल्या शहराची हि अवस्था आपणच होऊ दिलीय त्याला कोण काय करणार. दक्षिण मुंबईतलं मलबार हील असो किंवा वांद्रा - पश्चिमचं पाली हील - मुंबईच्या श्रीमंत भागातून नाहीशी झालेली मराठी इथे कधी परत येऊ शकेल का हा प्रश्न त्या भागात गेलं कि नेहमी मनात येतो. 

भारतात पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनी काय करावं आणि काय करू नये याविषयी काही गाईड लाईन्स - मार्गदर्शक सीमारेखा असतात कि नाही माहित माही. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या संकल्पनेच्या बाबतीत पाश्चिमात्त्य लोक जितके जागरूक असतात - खास करून पत्रकार  - तेवढी जागरूकता आपल्याकडे दिसत नाही. आज पर्यत त्या बाबतीत विचार करायची गरज भासली नाही. आजवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निवासस्थानात राहून गेलेल्या महिलांनी बहुधा आपल्या संस्कारातून मिळालेल्या, अनुभवातून शिकलेल्या मर्यादा पाळल्या असाव्यात. पण आता इंटरनेटच्या युगात हे प्रश्न उभे रहातील.

सध्याच्या सौ. मुख्यमंत्रींच्या बऱ्याच व्हिडीओ इंटरनेटवर आहेत: म्युझिक व्हिडीओ, त्यांनी म्हंटलेली बरीचशी हिंदी गाणी आणि नृत्य - त्यात एका पत्रकाराच्या विनंती वरून दाव्होस मध्ये रस्त्यात म्हंटलेलं गाणं, एखाद- दोन मराठी गाणी, न्यूयॉर्क फॅशन वीक मध्ये रॅम्प वॉक केल्यांनतर एका मराठी वहिनीला दिलेली मुलाखत वगैरे. वर्षात रहायला आल्यापासून सौ मुख्यमंत्री आपला गाण्याचा "छंद"  हिंदी सिनेसृष्टितील लोकांच्या मदतीनं जोमाने जोपासतायत असं दिसतं. 

हिंदी सिनेमात काम मिळवायला अधीर झालेली, ज्युनियर कॉलेज मध्ये शिकणारी एखादी मुलगी आपल्याला काय करता येतं ते दिगदर्शक, कास्टिंग एजंटना दाखवण्यासाठी ज्या प्रकारची व्हिडीओ बनवेल तशी ती म्युझिक व्हिडिओ आहे. त्यात महानायक असल्यामुळे ती व्हिडिओ बऱ्याच लोकांनीं बघितली आहे. जितक्या लोकांनी ती बघितली आहे त्या प्रमाणात कोणालातरी त्याचे पैसे मिळत असतील. अशी आशा करूया की त्या व्हिडिओतून मिळणाऱ्या पैशांचा निधी बनवून त्याचा उपयोग महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी केला जात असेल किंवा किमान मराठीच्या प्रसारासाठी तरी. कारण वर्षा शिवाय महानायक किंवा कमी -महा नायकही व्हिडीओत आले नसते. 

हिंदी सिनेमा सृष्टीत अशी काही मंडळी आहेत ज्यांना मराठीशी जवळीक साधण्या ऐवजी शेजारी राष्ट्रांशी जवळीक साधणं जास्त महत्वाचं वाटतं. तिथल्या लोकांना आपल्या सिनेमात काम द्यायचं, स्वतः त्या देशात जाऊन कार्यक्रम सादर करायचे अशा रितीने शेजारी राष्ट्राशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी ते आतुर असतात. खरतर ही मंडळी आज दोन -तीन पिढ्या मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात रहातायत. पण मराठीचा गंधही त्यांनी स्वतःला लागू दिलेला नाही. यापैकी कित्येकांची  महाराष्ट्र हि केवळ कर्मभूमीच नाही तर जन्मभूमीही आहे. पण ज्या राज्यानी त्यांच आयुष्य समृद्ध केलं त्या राज्याबद्दल कृतज्ञता, इथल्या भाषेबद्दल, लोकांबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी त्यांना वाटते की नाही अशी शंका यावी इतके ते लोक आपल्याच धंद्यात मश्गुल असतात. या लोकांची तिसरी - चवथी पिढी आता मुंबईत वाढत आहे. म्युझिक व्हिडीओच्या कमाईतून उभारण्यात आलेल्या निधीचा उपयोग या मंडळींना मराठीची विनाशुल्क म्हणजे मोफत शिकवणी लावण्यासाठी होऊ शकला तर  फार  बरं होईल.  

दुसरं म्हणजे शिवाजी मंदिरच्या नूतनी करणासाठीही त्यातल्या थोड्या निधीचा वापर करता आला तर बरं. दादर मधलं ते जुनं नाट्यगृह आहे. तिथे काही सुंदर नाटकं बघितल्याची आठवण मज जवळ आहे. खास करून दोन आठवतात  - महासागर आणि ती फुलराणीदोन्ही ओरिजिनल संचातली बघितली होती मी. नीना जोशी, भारती आचरेकर, नाना पाटेकर आणि मोहन भंडारींचं महासागर आणि भक्ती बर्वे आणि सतीश दुभाषींच्या भूमिका असलेलं ती फुलराणी. त्या नाटकात चांगलं काय होतं  - अभिनय कि इतर काही हे तेंव्हा समजलं नव्हतं. पण एक छान नाट्य प्रयोग आपण आत्ता बघितला हे ती दोन्ही नाटकं बघितल्यावर जाणवलं होतं.

त्या नाटकांतील काही दृश्य आजही आठवतात: स्टेजवरच्या दिव्यांच्या प्रखर प्रकाशात गोड गुलाबी दिसणारी, "तुला शिकवीन चांगला धडा" म्हणत काठ-पदराच्या हिरव्या साडीत वाऱ्याच्या मंद झुळकी प्रमाणे स्टेजवर वावरणारी; राणीसाहेबांनी, "आपले वडील दारू पण पितात?" असं विचारल्यावर "दारूचं पितात!" म्हणणारी भक्ती बर्वे अजून डोळ्यांसमोर दिसते. मूळ संचात हि दोन्ही नाटकं बघायला मिळाली या माझ्या भाग्याचा मलाच अभिमान वाटतो. आई बरोबर बघितली होती हि नाटकं मी. मुंबईला गेल्यावर दरवेळी मी शिवाजी मंदिराला जाते. त्या रस्त्यावर वाहनांचा, माणसांचा, दुकानांचा, उपहारगृहांचा, फेरीवाल्या विक्रेत्यांचा भयंकर कलकलाट असतो. तरीही न चुकता जाते. तिथे तळमजल्यावर एक पुस्तकांचं दुकान आहे. त्या दुकानाबाहेर नाटकांच्या जहिरातींचे मोठे फलक लावलेले असतात. पण लॉबीची अवकळा बघून एखाद्या नाटकाचं तिकीट काढावं असं मनापासून वाटत नाही.

किंवा कदाचित माझी नाटकांची आवड आता बदलली असेल. कित्येक वर्षात शिवाजी मंदिर मध्ये नाटक बघितलं नाही. शेवटचं दुर्गा झाली गौरी बघितलं होतं. त्यांनतर नाही. अलीकडे नाटकं बघितली ती -  शिवाजी पार्कच्या सावरकर सभागृहात शाहा कुटुंबीयांनी सादर केलेलं हिंदी नाटक - इस्मत आपा के नाम - ते मला बऱ्याच दिवसांपासून बघायचं होतं आणि दुसरं - इंग्रजी नाटक, ते मरीन ड्राईव्ह वरच्या एन सी पी ए त बघितलं. इंग्रजी नाटकात चार पात्र होती...  म्हणजे पाचवं पात्रही होतं पण ते जाऊदे.  चार पात्रांपैकी - एक पारशी - दक्षिण मुंबईत रहाणारा, एक मुसलमान - तो हि दक्षिण मुंबईत भेंडी बाजार मध्ये रहाणारा, एक गोव्याचा ख्रिश्चन - त्याचंही घर मुंबईतच कुठेतरी. चवथं पात्र होतं- ठाण्याला रहाणारा, पहाटे चारला उठून रेल्वेतील आपल्या तिकिटं चेकरच्या नोकरीवर जाणारा मराठी माणूस. .. हे चित्रण वास्तवापासून फार दूर नसेल.

मध्यंतरी एका टॉप टेन कि ट्वेन्टी कि फिफ्टी लिस्ट मध्ये भारतातील सर्वात जास्त रहाण्यायोग्य शहरात - मोस्ट लिव्हेबल सिटीज इन इंडिया मध्ये - मुंबई आणि पुण्या बरोबरच ठाण्याचं नाव होतं. ठाण्यातला बदल माझ्या डोळ्यांसमोर झालाय. गडकरी रंगायतन, सार्वजनिक स्विमिंग पूलसह मासुंदा तलाव परिसराचं सुशोभीकरण इथुन सुरवात झाली. त्या पलीकडे ठाणं आता पुष्कळ विस्तारलंय. हे सगळं मराठी माणसांनीच घडवून आणलं. म्हणजे मराठी माणसांना हि सवयच जडून गेलेली दिसते. गावं सुधारायची, त्यांचा दर्जा उंचावायचा. मग बाहेरून लोक येणार आणि आपणच उभारलेल्या गावातून आपली भाषा आणि आपणही हळूहळू नाहीसे होत जाणार. अगदी संत, निरिच्छ वृत्तीने आपली गावं आपण सोडतो. ते मुंबईत झालं, पुण्यात होतंय अशी चिन्ह दिसतायत, ठाण्यातहीं तेच झालं तर आपण दुसऱ्या कोणाला दोष नाही देऊ शकणार. दोन -तीन वर्षांपूर्वी ठाण्याच्या एका हाऊसिंग सोसायटीत नवीन वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम थोडा बघितला. तो मराठीत नव्हताच.

समजा ठाण्यातूनही आपण बाहेर पडलो तर मजल दरमजल करत एक दिवस बडोद्याला पोहचु. मग आपल्याला गुजराती शिकावं लागेल.  मुंबईत रहाणाऱ्या लोकांना गुजराती ऐकायची सवय आसते. मी असं ऐकलंय कि बडोद्यात नोकरी हवी असेल तर गुजरातीची परीक्षा द्यावी लागते. हे खरं आहे कि खोटं देव जाणे. परंतु थोडा लिहण्या- वाचण्याचा अभ्यास केला तर आपण त्या परीक्षेत पास  होऊ शकू .

न्यूयॉर्क फॅशन वीक मधील आपल्या रॅम्प वॉक संबंधी एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सौभाग्यवती मुख्यमंत्री म्हणाल्या कि त्या रॅम्प वॉकच्या, "प्रमोटर्स आणि डायरेकटर्स कडे इंटिरियर आणि डिझाईन शिकायला येणाऱ्या मुलांमध्ये ५० टक्के मुले शेतकरी कुटुंबातुन येतात." शेतकरी कुटुंबातील मुलं इंटिरियर आणि डिझाईन शिकायला येत असतील तर ही फारच चांगली गोष्ट आहे. 

तरीही मुंबईत घडणाऱ्या घडामोडी बघून मला चित्र - विचित्र स्वप्न पडतच रहातात. परवा महानायक स्वप्नात आले. आपल्या गाडीतून कुठेतरी निघाले होते. जरा थकलेले वाटले. त्यांनी त्यांच्या हातातल्या सेलफोनवर एक दृष्टिक्षेप टाकला. अपॉईंटमेंट्स चेक केल्या. त्यांची पहिली अपॉइंटमेंट एका लग्नाच्या पंक्तीत पाहुण्यांना जेवण वाढण्याची होती. दुसरी एका म्युझिक व्हिडिओच्या चित्रीकरणाची. महानायकांनी एक दीर्घ श्वास घेतला. खिडकीतुन बाहेर बघत ते स्वतःशीच गुणगुणु लागले.. असा मी काय गुन्हा केला....