Sunday, January 31, 2021

प्रेम पुरेसं आहे का ?


ग्राउंड हॉग डे नावाचा अमेरिकन सिनेमा ९० च्या दशकात येऊन गेला. त्याचा विषय खूप वेगळा होता. हवामान विषयक बातमी रिपोर्ट करायला गेलेला एका वृत्त वाहिनीचा वार्ताहार टाईम लूप मध्ये अडकतो आणि तोच एक दिवस पुन्हा पुन्हा जगत रहातो- अशी काहीशी गोंधळात टाकणारी कथा आहे. तो सिनेमा बघून बरीच वर्ष झाली पण एवढं आठवतंय कि त्यामध्ये तीच ती दृश्य पुन्हा पुन्हा पडद्यावर दिसत रहातात: बिल मरी - ज्यानं वार्ताहाराची भूमिका केली आहे तो त्याच एका हॉटेल मधील खोलीत रोज झोपतो, सकाळी ठराविक वेळी त्याच्या उशाशी असलेल्या घडाळ्याचा गजर होतो, गजर म्हणून ते एकच गाणं रोज वाजतं, तो रोजच्या पद्धतीनं तयार होतो आणि ग्राउंड हॉगची बातमी कव्हर करायला रोज त्याच ठिकाणी जातो. 

(उत्तर अमेरिकेत असा समज आहे (मूळ जर्मनीतुन आलेला) कि २ फेब्रुवारी या दिवशी पेनसिल्व्हेनिया राज्यातील पंक्सटावनी गावात फिल्ल नावाचा ग्राउंड हॉग ( खारी सारखा प्राणी ) आपल्या बिळातून बाहेर आला आणि त्यावेळेस आकाश निरभ्र असेल तर त्याला त्याची सावली दिसते आणि तो परत  आपल्या बिळात शिरतो. याचा अर्थ असा कि हिंवाळा अजून सहा आठवडे तरी कुठं जात नाही. जर त्यादिवशी आकाश ढगाळलेले असेल आणि ग्राउंड हॉगला त्याची सावली दिसली नाही तर याच अर्थ हिंवाळा लवकरच संपून चार आठवड्यात वसंत ऋतुच आगमन होणार आह.)  

Is love enough, Sir या नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या हिंदी चित्रपटाचा विषय नेहमीचाच आहे. ती एक  प्रेमकथा आहे - श्रीमंत मुलगा आणि गरीब मुलगी  - "सर" आणि त्याची कामवाली यांच्या मधली. पण तो बघताना ग्राउंड हॉग डे सिनेमाची ची आठवण होते कारण मुंबईत रहाणाऱ्या लोकांच्य आयुष्यात रोज घडणारी दृश्य पुन्हा पुन्हा पडद्यावर दिसतात.  

रोज सकाळी ड्रायव्हर घराची बेल वाजवून गाडीची चावी घ्यायला येतो. संध्याकाळी तो चावी परत करायला येतो. कामवाली रत्ना रोज ठराविक पद्धतीनं "सर" अश्विनला त्याचा नाष्टा, जेवण आणून देते. तो रोज सकाळी आपल्या खोलीतुन बाहेर येतो आणि पुढचा दरवाजा उघडून कामाला जातो. संध्याकाळी कामावरून आल्यावर उलट प्रवास  - पुढचा दरवाजा उघडून घरात येतो आणि सकाळच्याच मार्गानी आपल्या खोलीत जातो. रोज दुपारी रत्ना वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) ला जाणारी १७४ नंबरची बस घेऊन शिवणकाम शिकायला जाते. ( चित्रपटामध्ये १७४ क्रमांकाची प्लाझाला जाणारी बस गुरुद्वारा रोड - जो गुगल नुसार मालाड मध्ये आहे -तिथेही थांबते).   

चित्रपटाचं कथानक मध्य मुंबईतल्या एका टोलेजंग इमारतीत वरच्या मजल्यावर सुबक सजवलेल्या फ्लॅट मध्ये घडतं. अश्विन आणि रत्ना यांच्या बरोबर चित्रपटात तिसरी महत्वाची भूमिका मुंबईची आहे. शहराचं इतकं सुंदर चित्रण आजवर कुठल्या चित्रपटात पाहिल्याचं आठवत नाही -  हिंदी नाही आणि मराठीही नाही.   

नायक आणि नायिकेच्या व्यक्तिमत्वाचे जितके पैलू पडद्यावर दिसत नाहीत त्या पेक्षा जास्त मुंबईचे विविध पैलू चित्रपटात पहायला मिळतात : प्रामुख्याने गगनचुंबी इमारती आणि त्यात रहाणाऱ्या लोकांच आयुष्य; त्याबरोबरच त्या इमारतींचं बांधकाम करणाऱ्या कामगारांची वस्ती; चाळ आणि तिथल्या स्वच्छतागृहा बाहेर- आपल्याला कधी एकदा आत जायला मिळतंय ह्याची आतुरतेनं वाट बघत - रांगेत उभे असलेले चाळकरी (यातला गंमतीचा भाग असा कि आधुनिक तंत्रज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी शुभवार्ता घेऊन येणारा फोन कॉलही त्या रांगेत उभं असताना येऊ शकतो); शहरातील रस्त्यांवरची गर्दी, बाहेरून खूप सुखासीन दिसणाऱ्या गाडीच्या आत जाणवणारे रस्त्यावरील खड्डे आणि मुंबई जर भारताच्या डोक्यावरील मुगुट असेल तर त्यातला कोहिनूर हिरा - jewel in the crown  - म्हणजे इथला गणपती उत्सव. प्रभादेवी मटण शॉपचं दर्शनही पडद्यावर घडतं. चित्रपटाची लेखिका आणि दिग्दर्शिका रोहीना गेरा हिनं खूप प्रेमानं आणि मानानं मुंबईला पडद्यावर सादर केलंय.

रत्नाची भूमिका केलेल्या तिलोत्तमा शोमनी एका मुलाखतीत म्हंटल आहे कि दिग्दर्शिकेनं तिला सांगितलं होतं कि कामवालीच्या व्यक्तिमत्वाची महत्वाची बाजू म्हणजे तिची डिग्नीटी, स्वतःचा मान ठेऊन रहाण्याची तिची वृत्ती पडद्यावर दिसायला हवी. शोमनी ते आणि कामवालीचे मराठी शब्दोच्चार दोन्ही बरोबर जमवलय. मुंबईला यायला मिळावं म्हणून लग्न करायची घाई झालेल्या धाकट्या बहिणीला रत्ना विचारते, ".. आणि अभ्यास?  ... गेला उडत?" कित्यके वर्षात मी "गेला उडत" कोणी म्हण्टलेलं ऐकलं नव्हतं.   

संधी मिळालीय म्हणून श्रीमंत मुलाला जाळ्यात अडकवू पहाणारी ती तरुणी नाही. साहेबा कडे ती स्वतःहून काही मागत नाही. त्यानी देऊ केलेली मदत नाकारते. आपल्या आणि त्याच्या आर्थिक आणि सामाजिक स्तरा मधली तफावत ती विसरत नाही. त्यानं सांगूनही ती त्याला "सर"च म्हणत रहाते. त्याला त्याच्या नावानी हाक मारणं तिला जमत नाही.   

रत्नाची वेशभूषा आणि केशभूषा अगदी हुबेहूब प्रभादेवीत आमच्या इमारतीत कामाला येणाऱ्या बायकांसारखी नीटनेटकी दाखवलीय : भरपूर अंगमेहनत होत असल्यामुळे सडपातळ शरीरयष्टी, तेल लावून घातलेली केसांची घट्ट वेणी किंवा आंबाडा, कामावर येतानाचा पोशाख म्हणजे कुठल्यातरी प्रकारची सिंथेटिक साडी - जी रोज वापरण्या साठी स्वस्तही असते आणि धुतल्यावर किंवा भांडी घासताना, बाथरूम धुताना ओली झाली तर लगेच वाळू शकते पण इतरत्र बाहेर जायच्या वेळी काठ -पदराची साधी सुती साडी, त्यावर तोकड्या बाह्यांचा ब्लाऊज.  

मुंबईची कहाणी तिथे घराघरात काम करणाऱ्या मराठी - त्यातही कोकणी बायकांना वगळून लिहिली जाऊच शकत नाही. सुदैवानी दादर - प्रभादेवी भागात त्या अजूनही कामाला मिळू शकतात परंतु त्यांची संख्या आता कामी होत चाललीय. इमारतीतील माझ्या शेजारणीं म्हणतात कि घरकामात मदतीला कोणतरी मिळण्याच सुख उपभोगलेली आपली बहुतेक शेवटची पिढी ठरणार आहे. आपल्या मुलांना हे सुख मिळेल असं वाटत नाही. नवीन पिढीची मूल्य आता बदलली आहेत तसेच त्यांचा पोशाखही: घरकाम करणाऱ्या तरुण मुली आता पंजाबी ड्रेस घालतात. पण ज्या थोड्याफार जुन्या बायका उरल्यात, ज्या गेली वीस - पंचवीस वर्ष इमारतीत कामं करतायत त्यांना "मान", त्यांची डिग्निटी हाच त्यांचा अमूल्य ठेवा वाटतो. पैशाच्या पाठीमागे त्या फारशा नसतात. 

माझी कामवाली एकदा म्हणाली होती- तिनं एका घरात थोडे दिवस काम केलं, मग तिथल्या मालकिणी बरोबर काहीतरी बिनसलं. म्हणाली, "जितके दिवस काम केलं त्याचे पैसे घ्यायला साहेबांनी बोलावलं तर जाईन. मी नाही जाऊन मागणार." 

जणू आर्थिक बाजू कमकुवत असल्याने त्यांना ज्या कठीण परिस्थितीतून जावं लागत त्यातून त्या नकळत आयुष्यातील काही महत्वाची मूल्य शिकत असाव्यात : कि भले मी गाडी -घोड्यातून फिरले नसेन, मुला - नातवंडासाठी फार मोठं बँक बॅलन्स साठवून ठेवणं मला जमलं नसेल पण मी फसवून, लबाडी करून कोणाचं काही घेतलं नाही, मी कधी कोणाला दुखावलं नाही. त्यांच्यातील प्रेम त्याच्या कुटुंबाला आवडणार नाही याची जाणीव ठेऊन रत्ना अश्विनला म्हणते, " तुमच्या आईनं (आधीच) एक मुलगा गमावलाय. मी त्यांना हे (दुःख) देऊ शकत नाही".  

शाळा - कॉलेजच्या दिवसात ज्यांनी मिल्स आणि बूनच्या कादंबऱ्या वाचल्या असतील त्यांना हा सिनेमा ओळखीचा वाटेल. त्या सगळ्या रोमॅन्स नॉव्हेल्सच असायच्या - पाश्चिमात्य नायक आणि नायिका असलेल्या: बँकेत कारकुनी करणारी अमेरिकन तरुणी ऑस्ट्रेलियात एका रँचवर नोकरी साठी जाते आणि रँच मालकाच्या प्रेमात पडते वगैरे. हा चित्रपट थोडा तसाच आहे: खेडेगावातून मुंबईला आलेली गरीब विधवा रत्ना शहरातील श्रीमंत आर्किटेक्ट्च्या प्रेमात पडते आणि तो तिच्या. मिल्स अँड बून मधल्या नायकांना स्ट्रॉंग आणि सायलेंट असण अनिवार्य असायचं. विवेक गॉम्बरने त्या पद्धतीचा अश्विन चांगला साकारलाय - त्याला एक मजबूत संवेदनशिलता जोडून. 

अश्विन सुसंस्कृत आहे असंही दाखवलय. जगात कित्येक लोकांना जे शब्द म्हणणं जमत नाही असं म्हणतात ते दोन शब्द  - थँक यू आणि सॉरी - म्हणायला तो जराही कचरत नाही. कामवाली असो किंवा मित्र तो त्यांच्यावर थँक्यू आणि सॉरीची खैरात करतो. एक दिवस त्याची आई त्याला भेटायला येते तीही रत्नाला प्लिज आणि थँक यू म्हणून जाते. 

जाड पानांची पिक्चर बुक्स असतात - रंगीत पानावर एक मोठं चित्र असत त्या खाली दोन -तीन वाक्यांचा मजुकर असतो... आपण एक एक पान उलगडत जातो आणि त्यातुन गॊष्ट पुढे सरकत जाते तशी अश्विनच्या घरातील दृश्य पडद्यावर येतात. मुख्य खोलीचा रंगही पिक्चर बुकला शोभेल असा हलका हिरवा आहे. घरात इनमीन दोन माणसं. त्यांचं नातंही असं कि जेवणखाण टेबल वर आणून ठेवण्या पुरतच त्यांचं आपसात संभाषण. घरातील एकाही दृश्यात एक किंवा दोन किंवा तीन या पेक्षा जास्त व्यक्ती दिसत नाही. त्यांच्यातील संवाद हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच वाक्यांचे आहेत. एकामागून एक शब्द जंजाळ वाक्य भरलेल्या संवादाचं एकही दृश्य चित्रपटात नाही. 

घरातील दृश्यांमागचं पार्श्वसंगीत घरातील मुड प्रमाणे शांत, हळुवार तर कधी उदास आहे. घरा बाहेरील संगीत मुंबईच्या उर्जेप्रमाणे जोशपूर्ण आहे. लहानशी खटकण्यासारखी गोष्ट म्हणजे रत्नाच्या बोलण्यात पुन्हा पुन्हा येणारे इंग्रजी शब्द: खेडेगावातून आलेली रत्ना आयुष्य या अर्थाचा हिंदी शब्द वापरण्या ऐवजी life म्हणते, स्वतःला नोकर म्हणायच्या ऐवजी servant म्हणते, अश्विनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना birthday या शब्दाचा उच्चार तर ती इतका व्यवस्थित करते कि शहरात रहाणाऱ्या शिकलेल्या कित्येक भारतीयांना तो शब्द तसा उच्चारता येत नाही. 

प्रेमात पडलेल्या दोन व्यक्तीमधील आर्थिक आणि सामाजिक दरी बुजवण्यासाठी प्रेम पुरेसं आहे का असा प्रश्न चित्रपट विचारतो.  




प्रश्न तुमचे उत्तरं आमची (३)


लॉकडाऊन मुळे एकत्र कुटुंबात रहाणाऱ्या सुनेला घरातील माणसांच्या काही सवयी जास्त तीव्रतेने जाणवू लागल्या. एका नवीन सुनेनी सासुच्या बोलण्याचा अर्थ समजुन घेण्यासाठी सवाल जवाबदारांचा सल्ला मागितला. 

नी विचारलं: लॉकडाऊन सुरु होण्याच्या थोडे दिवस आधी माझं लग्न झालं. गेले काही महिने मी घरातुन काम करतेय. सासुशी माझी हळूहळू ओळख होत आहे. ती सारखी मला म्हणते, "पप्पूचा हात खूप सढळ आहे. ज्योतिषांनी सांगितलंय कि तुमच्या मुलाच्या हातातून पैसा सारखा जात रहाणार. गेलेला पैसा त्याला परत मिळणार पण तो जात रहाणार."  हे म्हणताना लक्ष्मीच्या चित्रात तिच्या हातातून नाणी पडत असतात तशी हाताची ऍक्शन असते. 

आमच्या इमारतीत एक कुटुंब रहातं. त्यातील महिलेचा भाऊ श्रीमंत आहे. तो बहिणीला काही मदत करत नाही असं सासु मला सांगते. त्या महिलेस भावाच्या मदतीची गरज असावी असं तिची परिस्थिती पाहुन वाटत नाही. तिनं माझ्या सासुकडे आपल्या भावाविषयी तक्रार केली असण्याची शक्यता नाही. बहिण सधन असली तरी भावानं तिला "मदत" करावी ही माझ्या सासुची आयडिया दिसतेय.

माझा नवरा भावंडांच्यात सर्वात धाकटा आहे शिवाय त्याच्याकडे सध्या काही पैसे नाहीत. सासु मला हे सहज सांगत असेल कि त्यामागे काही उद्देश असावा? 

सवाल जवाबदार :, नक्कीच काहीतरी उद्देश असणार. कदाचित लॉकडाऊन मुळे ज्या लोकांना हालअपेष्टातून जावं लागतंय त्यांना आपल्या मुलानं आर्थिक मदत करावी अशी तिची इच्छा असेल.

किंवा ती तुला सावध करू इच्छित असेल कि तिच्या मुलाचा स्वभाव खर्चिक आहे. तो पैशांच्या बाबतीत बेजबादारपणे वागतोय असं तुला वाटण्याची शक्यता आहे पण तू काळजी करू नकोस कारण ज्योतिषानी सांगितलंय की खर्च केलेला पैसा तो परत मिळवेल. 

आणखी एक हेतू हा असु शकतो कि सासू आडवळणाने तुला सांगू इच्छिते की लग्नानंतर तिचा मुलगा सढळ हाताने आईवडिलांना आणि भावंडांना पैसे देत राहील पण तूला काळजी वाटण्याचं कारण नाही कारण गेलेला पैसा तो परत मिळवेल असं ज्योतिषानी सांगितलंय. 

मला दुसरी आणि तिसरी शक्यता जास्त वाटतेय. मुलाने गरजूंना मदत करावी असं तिला वाटत असतं तर तिनं  स्पष्टपणे त्याला तसं सांगितलं असतं. पण ती आडवळणाने तुला काहीतरी सुचवू पहातेय. मला तुझ्या बद्दल सहानुभूती वाटते. मुलांकडून अपेक्षा ठेवणारे आईवडील असतात आणि ते समजण्यासारखं आहे. पण आपल्या मुलानं त्याच्या मोठ्या भावंडांना - त्यांची परिस्थिती चांगली असुनही पैसे द्यावेत - असं सुचवत रहाणं  - विशेषतः मुलाचा स्वतःचा संसार अजुन नीट चालू झालेला नसताना  - बरोबर वाटत नाही. 

सासुच्या बोलण्यामागे काही उद्देश नाही असं धरून चालू नकोस. ह्याचा तुला पुढे त्रास होऊ शकतो. विशेषतः आज सासु तुला जे सांगतेय ते जर आयुष्यभर तिनं तिच्या मुलाला सांगितलं असेल तर तुझा नवरा तेच धरून चालण्याची शक्यता आहे - 'आईनी सांगितलंय माझा हात सढळ आहे म्हणजे माझ्या हातातून कायम पैसा जात राहिला पाहिजे'.' तुझ्या संसाराचं आर्थिक आरोग्य जपण्यासाठी पैसा कुठे आणी किती जातोय ह्यावर डोळस पणे लक्ष ठेवण्याचं काम तुला करावं लागेल.    

असमाधानी कीं स्वार्थी स्वभाव? 

: लॉकडाऊन सुरु होण्याच्या काही महिने आधी माझी नणंद आपलं घर सोडून आमच्या घरी रहायला आली. तिची मुलं मोठी आहेत: मुलगा इंजिनिअर आहे. अमेरिकेला जाऊन उच्च शिक्षण घेऊन आलाय. मुलगी डॉकटर आहे. नणंदेच्या नवऱ्याने निवृत्त झाल्यावर मोठं घर बांधलंय. त्याला भरपूर पेन्शन मिळते. कशालाच काही कमी नाही. बऱ्याच लोकांना आयुष्यात जे  मिळत नाही ते सर्व नणंदेकडे आहे. तरीही ती स्वतःच्या घरात असमाधानी का होती ते मला माहित नाही. कारण काहीही असू देत मला वाटत नणंदेनं तिचे प्रॉब्लेम्स तिच्या मुलांच्या मदतीने स्वतःच्या घरी सोडवावेत कारण मुलं मोठी आहेत. असं असू शकेल का की तिच्या मुलांना आपल्या आईची जबाबदारी नको आहे. त्यापेक्षा आजोळी येऊन रहाणं त्यांना जास्त सोयीचं पडतय? 

सवाल जवाबदार: म, पूर्वीच्या काळी आपल्याकडे पद्धत होती कि एखाद्या मुलीचं लग्न झालं नसेल किंवा ती बालविधवा असेल तर तिचा सांभाळ तिचे माहेरचे किंवा सासरचे लोक करायचे. एखाद्या स्त्रीचा नवरा लवकर गेला आणि तिची मुलं लहान असली तर तिचा भाऊ किंवा नवऱ्याचा भाऊ त्या स्त्रीला आपल्या घरी घेऊन येत. तिचा व तिच्या मुलांचा सांभाळ करीत. पण ते कुठपर्यंत? - मुलं स्वावलंबी होईपर्यंत. मुलगा एकदा कमवता झाला कि आपल्या आईची आणि बहिणीच्या लग्नाची वगैरे जबाबदारी त्यानं उचलावि अशी पद्धत होती. त्यामुळे तू म्हणतेस ते खरं आहे. मुलं मिळवती असतील तर त्यांनी आईची जबाबदारी घ्यायला हवी. 

मला तुझ्या प्रश्नाचा दुसरा भाग चिंताजनक वाटतो. आयुष्यात सगळं असुनही असमाधानी रहाण्याची वृत्ती घातक ठरू शकते. स्वतःकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता न बाळगता कायम  स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करण्याचा अतिरेक झाला कि असमाधानी वृत्ती बळावते. इंग्रजी मध्ये म्हणतात life is not fair. सगळ्यांना सगळं एकसारखं मिळत नाही. तुमच्या कडे एखादी गोष्ट जास्त असेल तर दुसऱ्यांकडे दुसरी कुठलीतरी गोष्ट जास्त असते जी तुमच्याकडे नसेल. देवानी सगळं दुःख फक्त आपल्याच पदरात टाकलं आहे आणि बाकी सगळे मजा मारतायत असं धरून चालणं हे अपरिपक्वतेचं (immaturity) चिन्ह आहे. पण बरेच लोक तो मूर्खपण करतात. आपापल्या वाट्याचं दुःख सगळ्यांना भोगावं लागतं. काही लोक त्याचा बाऊ करतात आणि दुसऱ्यांच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडत बसतात तर काही लोक ते चुपचाप झेलतात - कोणीतरी आपल्या दुःख्खाची भरपाई करायला हवी अशी अपेक्षा ते ठेवत नाहीत. 

नणंदेला एखाद्या चांगल्या समुपदेशकाला भेटण्याचा सल्ला दे. भक्ती, प्रार्थना आणि साधनेत मन रमवायला सांग. असमाधानी वृत्तीचं मुळ कशात आहे हे ती जितक्या लवकर शोधून काढेल आणि त्यावर मात करेल तितकं चांगलं नाहीतर तिचा असंतुष्ट स्वभाव अख्ख्या कुटुंबाला त्रासदायक होऊ शकतो. 

या महिन्याच्या सदरात माहेरी आलेल्या नणंदांनी सवाल जवाबदारांचा पाठपुरावा केल्याच दिसलं. त्यावरचा आणखी एक प्रश्न:

नी विचारलं:  माझ्या सासुबाई त्यांच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होत्या. लग्नानंतर त्या सारख्या माहेरी जायच्या. त्यांच्या आईवडिलांचा त्या आधार होत्या. माझ्या नणंदांनी आपल्या आईला सारखं माहेरी जाऊन राहिलेलं बघितलंय. आता त्याही तेच करतात. माहेरी आल्या कि महिनोन महिने, वर्षन वर्ष इथेच रहातात. कित्येकदा सुचवूनही आपल्या घरी जात नाहीत. 

सासुला भाऊ नसल्याने तिच्या आणि तिच्या मुलींच्या लक्षातच येत नाही की जेंव्हा भाऊ असती तेंव्हा भावजय एका वेगळ्या कुटुंबातून आलेली असते. तिचे संस्कार, विचार, मूल्य वेगळी असु शकतात. नणंदांनी आपल्या सीमारेषा पाळल्या नाहीत, माहेरी येऊन मनमानी केली, आपलंच खरं करत बसल्या तर त्यामुळे त्यांचा स्वार्थ साधला जात असेल पण माहेरच सुख विचलित होतं. 

मी सासुला म्हंटलं , "तुम्ही मुलींवर मूलभूत संस्कार कसे केले नाहीत कि लग्न झाल्यावर त्यांनी स्वतःच्या घरी जास्त रहायला हवं आणि माहेरी फार कमी. मुली कायम तुमच्या जवळ असल्याने तुमच्यावर सतत त्यांचा प्रभाव पडतोय."  तर सासु मला म्हणाली, "हि सगळी तुझ्या संशयाची भुतं आहेत." नणंद तिचा घटस्फोट झाल्यावर आज कितीतरी वर्ष आमच्याकडे आहे. २४/७ तिला आईच्या कानांना ऍक्सेस असतो. ते मला सासूच्या बोलण्यात स्पष्ट जाणवतंय तरीही ही माझ्या संशयाची भुतं कशी असू शकतात?

सवाल जवाबदार: आजकाल आपल्याकडे पाश्चिमात्य लोकांचं अनुकरण करण्याचा मोह लोकांना आवरत नाही. पण ते अनुकरण अर्धवट असतं. वाढत्या संख्येने मोडणारे संसार हे त्याच एक उदाहरण आहे. लग्न झालेल्या मुलीनीं घर सोडून माहेरी येण्याचे प्रकार वाढलेत. या बाबतीत पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करताना एक गोष्ट विसरली जाते ती म्हणजे त्यांची समाजव्यवस्था एकटं रहाणाऱ्या लोकांसाठी अनुकूल आहे. त्या देशात घटस्फोट घेणारी व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष घटस्फोटानंतर आईवडिलांकडे येऊन रहात नाही. आईवडील किंवा भावंडं मानसिक आधार देत असतीलl पण घटस्फोटा नंतरची वाटचाल घटस्फोट घेणाऱ्या व्यक्तीला स्वतःहून करावी लागते. आपल्या निर्णयाचा इतरांना त्रास देण्याची तिथे पद्धत नाही. 

, मी तुला याहून जास्त चांगलं मार्गदर्शन करू शकलो असतो तर मला बरं वाटल असतं. आपल्या बहिणींना समजावून सांगण्याचं  काम तुझ्या नवऱ्यानं करायला हवं. पण त्या जर भावाचं किंवा आईच ऐकत नसतील तर तु त्यांना काही सांगितलंस तरी त्याचा उपयोग होणार नाही. सध्याच्या परिस्थितीत तुला जर नणंदांची माहेरी ढवळाढवळ त्रासदायक वाटत असेल तर तु त्या घरापासुन लांब रहाणं एवढा एकच पर्याय तुझ्यासमोर उरतो. त्यामुळे तुझ्या मुलांना त्यांच्या आज्जीचा सहवास मिळणार नाही पण नणंदा जर समजूतदारपणे वागायला तयार नसतील काळजावर दगड ठेऊन तो निर्णय तुला घ्यावा लागेल. 

 



अर्थशून्य भासे मज हा...








शेवटी घरभर शोधुनही मला ते पुस्तक सापडलं नाही. मला पक्क आठवतंय की मी ते विकत घेतलं होतं आणि वाचलंही होतं. पुस्तक प्रकाशित झालं तेंव्हा मी मुंबईत होते. पुस्तकाला इंग्रजी माध्यमांनी बरीच प्रसिद्धी दिली होती. प्रसिद्धी मध्ये ट्विंकल खन्नाचा आय क्यू किती हाय आहे, ती अभ्यासात किती हुशार होती ते पुन्हा पुन्हा सांगितलं जात होतं. 

येताना माझ्या बॅगेत बरीच पुस्तकं असतात. ती सगळी मी वाचतेच असं नाही पण त्यात आणखी एका पुस्तकाच्या वजनाची भर पडायला नको म्हणून बरेच दिवस मी ते विकत घ्यायचं टाळलं. पण निघायच्या दिवशी असं वाटलं की एवढा उच्च बौद्धयांक असलेल्या महिलेनी लिहिलेलं पुस्तक आपण वाचायला हवं होतं अशी न्यूयॉर्कला गेल्यावर चुटपुट वाटत राहिली तर ते ऑर्डर करून मागवायला जास्त किंमत मोजावी लागेल. त्यापेक्षा इथेच ते विकत घेतलेलं पत्करलं. शिवाजी पार्कच्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे एक छोटं क्रॉसवर्ड आहे. (पेट्रोल पंपाच्या मागे पुस्तकाचं दुकान का लपलंय माहित नाही.) विमानतळावर जाताना वाटेत तिथे थांबून मी ते पुस्तक विकत घेतल. 

वाचून झाल्यावर बरेच दिवस ते घरात इथेतिथे ठेवलेलं होतं. पण आत ते सापडत नाहीय. एखाद दिवशी मराठी -प्रेम उफाळून आल्याने मी ते टाकून दिल कि काय अशी शंका वाटते.  



                                       

                                                             (गाणं १:३० मिनिटांनी सुरु होतं)


सौभाग्यवती हाडाची विनोदी या नावाचं इंग्रजीत भाषांतर केलं कि जे नाव तयार होईल ते पुस्तकाचं शिर्षक आहे. त्यात तिच्या नोकरावर एक लेख आहे. लेखात असं म्हंटलंय कि नोकर खूप धांदरट आहे पण मनानी चांगला आहे. तो त्याच्या गावी जातो तेंव्हा परत येताना वाकडी वाट करून सोलापूर स्टेशनवर उतरतो आणि ट्विंकल बाईंना आवडते म्हणून तिथली सुप्रसिद्ध शेंगा चटणी आठवणीनं त्यांच्यासाठी घेऊन येतो. लेखात असही म्हंटलंय कि तो काय बोलतो ते तिला समजत नाही कारण तिला मराठी येत नाही. 

बाई गं, मुंबईत तुझा जन्म झाला, इथेच तू वाढलीस, पाचगणीच्या शाळेत शिकलीस तरी मराठी येत नाही असं छातीठोक पणे कसं म्हणू शकतेस? शाळेत थोडंफार शिकली असशीलच की - हा विचार ते वाक्य वाचताना मनात डोकावला होता. मुद्दामहुन ते वाक्य आपल्या पहिल्या पुस्तकात घालण्या मागे काही उद्देश असेल की काय असंही वाटलं होतं. अशा प्रकारची वाक्य मनात नेहमीच घर करून बसतात. अमेरिकेतही असे लोक असतात जे सारं आयुष्य इथे काढतात तरीही कधी इंग्रजी बोलायला शिकत नाहीत. पण ते इंग्रजी न बोलणाऱ्या देशातून इथे आलेले असतात आणि अशिक्षित किंवा कमी शिकलेले असतात. नवीन काही शिकण्याची कुवत त्यांच्यात एकूणच कमी असते. पण उच्च बौद्धयांक असलेल्या व्यक्तीला मनात आणलं तर एखादी भाषा शिकणं कठीण जाऊ नये. असो. त्या वाक्याच्या निषेधार्थ मी पुढे कधीतरी ते पुस्तक टाकून दिलं असण्याची शक्यता आहे. 

पुस्तक टाकलं नसत तर व्हिडिओत म्हंटलेल्या उपदेशाचं - एकदा आपली मुल मोठी झाली कि आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना करून द्यायला काय हरकत आहे  - मूळ इंग्रजी वाक्य मी जसच्या तसं इथे उद्घृत करू शकले असते. यातुन बोध एवढाच निघतो की पुस्तक शक्यतो टाकू नये. ते कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही. 


Web version मध्ये व्हिडिओ दिसतात.