Friday, December 20, 2019

२०१९ - लेख, कथा आणि गाणी



ह्या वर्षी वाचलेले काही लेख आणि कथा आणि ऐकलेली गाणी:







गुरुवारी माझ्या विशीचं ब्रुकलीन मधल्या तिच्या रहात्या घरी निधन झालं. ती दहा वर्षांची होती .
तिशीत पदार्पण करताना आपल्या गेलेल्या विशीबद्दल लिहिलेला मृत्युलेख.







काही वर्षांपूर्वी माझी बहीण नाहीशी झाली. मी हवं तेंव्हा तिला बघु शकते.
घरातली जवळची व्यक्ती गेल्यावर ती समाज माध्यमांमध्ये जिवंत असण्याचा अनुभव काय असोत  -दुःखद तरीही थोडा दिलासा देणारा  - यावर एका कॉलेज वयीन तरुणीने लिहिलेला लेख.







“Cream,” by Haruki Murakami | The New Yorker


ही कथा मला प्रचंड आवडली. एखाद्या सुंदर गाण्यासाखी वाटली. चांगल्या गाण्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याला त्या गाण्याचे सगळे शब्द किंवा संपूर्ण अर्थ समजावा लागतोच असं नाही. अर्थाकडे फारसं लक्ष न देताही त्या गाण्यातील भाव अंतर्मनाला भिडु शकतो. तसंच काहीसं या कथेचं आहे. एका मागून एक नेहमीच्या आयुष्यातले तरीही काहीसे गूढ वाटणाऱ्या प्रसांगाचं वर्णन कथेत येत रहातं - मग ते बसमध्ये बसून टेकडीच्या माथ्या पर्यंत पोहोचणं असो, टॆडीवरच्या बागेतल्या बाकावर बसुन खालच्या समुद्राकडे बघणं असो -   ते का लिहिलं असेल, त्याचा उद्देश काय, लेखकाला काय सांगायचंय हयाचा विचार न करताही सोप्या वाक्यरचनेतुन सांगितलेली गोष्ट रागदारीच्या गाण्यातील सुरावटी प्रमाणे आपल्या पुढे उलगडत जाते आणि मनाला गण्या प्रमाणे -ऐकण्याचा नाही पण  वाचण्याचा शांत आनंद देऊन जाते




              
“The Little King,” by Salman Rushdie | The New Yorker
या कथे विषयी मागे एका पोस्ट मध्ये लिहिलं होतं. रश्दींची संवाद लिहिण्याची खास शैली आहे ती नेहमीच गमतीची वाटते. 
              


                              


Wednesday, December 11, 2019

सिनेमातील न -विसरलेले संवाद








काही सिनेमातले संवाद खूप लोकप्रिय होतात. पुन्हा पुन्हा आठवले आणि बोलले जातात. जसं कि दिवार मधला "मेरे पास माँ है ". आणि शोले मधला "अरे ओ सांबा, कितने आदमी थे?" हे संवाद.

तसच हॉलिवूडच्या गॉडफादर या सिनेमातलं, "लीव्ह द गन, टेक द कनोली" आणि अरनॉल्ड श्वात्झनेगरच टर्मिनेटर सिनेमातलं "आय वील बी बॅक" या वाक्यांची पुन्हा पुन्हा आठवण काढली जाते. "आय वील बी बॅक" हे वाक्य रोजच्या आयुष्यात वापरण्याजोगं असल्याने एखादा शाळकरी मुलगा कोपऱ्यावरच्या दुकानातुन कुकीज आणायला निघाला तरी टर्मिनेटर स्टाईल मध्ये आईला "आय वील बी बॅक" असं बजावून घराबाहेर पडू शकतो. आणि लोक आपसात गमतीनं तसं करतातही. या वाक्याचं मराठी रूपांतर मध्यंतरी आपल्याला खूप ऐकायला मिळालं. त्यावरून कोणावर कुठल्या सिनेमाचा आणि हिरोचा किती प्रभाव पडलेला असेल असा संभ्रम निर्माण झाला.

सांस्कृतिक संदर्भांच्या बाहेर अंधानुकरण केलं कि ते हास्यास्पद दिसतं. शिवाय ते वाक्य आपल्या संस्कृतीशी तसं विसंगत आहे. आपण सहसा कधी कुणाला, "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" असं सुनावत नाही. आपण एखाद्याकडे गेलो, आपल्याला ते ठिकाणं फार आवडलं, पुन्हा तिथे जावंसं वाटलं तर आपण फारतर काय म्हणू - ' फार आवडलं बुवा मला तुमच्या कडे. मला परत बोलवा. मी नक्की येईन'. "आय वील बी बॅक" हा डायलॉग तर नाही ना मारणार आपण भाषांतर करून.

मूळ सिनेमात ते धमकीवजा इशारा देणारं वाक्य आहे. अमेरिकन लोक जेंव्हा गंमत म्हणून श्वात्झनेगर स्टाईल मध्ये "आय वील बी बॅक" हा डायलॉग मारतात तेंव्हा त्यातही खोटाखोटा धमकीवजा सुर असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी ते वाक्य भाषांतर करून वापरताना खरतर काळजी घ्यायला हवी. शिवाय ते वाक्य कशा अर्थानी, कोणाला उद्देशून म्हंटलं जात होतं हे ही तितकंसं स्पष्ट नव्हतं. म्हणजे आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांना दिलेली ती धमकी होती, आपल्या मतदारांना दिलेला तो दिलासा होता, स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेचं पुन्हापुन्हा मंत्रोच्चारण होतं की ती जनतेला दिलेली धमकी होती? गंम्मत म्हणजे हे सगळं मतदारांच्या जीवावर चाललं होतं.

या आधी बिच्चाऱ्या सर्वसामान्य जनतेचा असा गैरसमज होता की कोण परत येणार आणि कोण नाही हे ठरविण्याचा अधिकार फक्त मतदारांचा आहे. 'मतदान ही घटनेनं तुम्हांला दिलेली फार मोठी ताकद आहे' वगैरे वाक्य मतदारांना नेहमी ऐकवली जातात. एव्हांना त्यांचा तो गैरसमज दूर झाला असेल. गेले काही दिवस अत्यंत असहाय्य, हतबल, हताश होऊन जे काय चाललंय ते निमुटपणे बघत बसण्या शिवाय दुसरं काही करू न शकलेलं जर कुणी असेल तर ते म्हणजे मतदार.

काही उत्साही, आशावादी मंडळींना असं वाटतं कि लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं कि सगळं ठीक होणार. मतदान केलं तरचं आपल्याला हवे ते लोकप्रतिनिधी आपण निवडून आणू शकू. मग ते आपल्याला हव्या त्या सुधारणा घडवून आणतील आणि सगळीकडे आबादी आबाद होईल - अशी त्यांची समजूत असते. म्हणून ही मंडळी माध्यमातून लोकांना सारखं आव्हान करत बसतात कि, "मत द्या, मत द्या, तुमचं मत फुकट घालवू नका" वगैरे. त्यांनी ते आव्हान करू नये असं नाही पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही कि स्वप्नातले राजकुमार किंवा राजकुमारी कोणाला मिळत नाहीत तसंच स्वप्नातले नेतेही मिळत नाहीत.

आयुष्यात तुम्हांला जे हवं असतं ते मिळत नाही- मग ते नवरा असो, बायको असो कि आणखी काही - you don't get what you desire, you get what you deserve - आपल्या लायकी प्रमाणे जे मिळायचं ते मिळतं. लोकप्रतिनिधींचही तसच आहे. ते आकाशातून पडत नाहीत. आपल्यातूनच तयार होतात. आपली जशी लायकी असते तसे लोकप्रतिनिधी आपल्याला मिळतात. आपण आपली लायकी कुठल्या थराला नेऊन ठेवली आहे याची प्रचिती निवडणूकी नंतर अचानक आली आणि सगळेजण एकमेकांकडे बघून आपसात आश्चर्य व्यक्त करू लागले - हे असं कसं झालं?

दुसऱ्या कोणाचीही आणि कशाचीही पर्वा न करता, अत्यंत स्वार्थीपणाने स्वतःची महत्वाकांक्षा पूर्ण करून घेण्याची वृत्ती समाजात बोकाळली कि त्यातून कसे लोकप्रतिनिधी तयार होतात ते आपण बघतोय. आज परिस्थिती अशी आहे कि सकाळी पेपर उघडला आणि कुठलातरी नेता दुसऱ्या नेत्याच्या शेजारच्या खुर्चीत बसलेला आहे असा फोटो बघितला की आपल्या काळजात धस्स होतं - काय खलबतं चालली असतील माहित नाही...सरकार पडतय कि काय असा विचार मानत येतो. दुसऱ्या दिवशी दुसरा एखादा नेता तिसऱ्या नेत्याच्या घरी गेला की पुन्हा आपल्या काळजात धडधड सुरु - सरकार पडतय कि काय. लैला - मजनुनी एकमेकांच्या काळजाची कधी वाढवली नसेल एवढी आपल्या काळजाची धडधड ही तथाकथित नेतेमंडळी नुसतं कोणाच्या तरी शेजारी बसून किंवा कोणाच्या तरी घरी जाऊन वाढवतात. आपली अशी क्रूर कुचेष्टा करण्याचा अधिकार आपण त्यांना कधी, का, आणि कसा दिला माहित नाही. समाज माध्यमात वापरण्यात येणारे अपशब्द तर आता सगळे धरूनच चालतात. त्याबद्दल कोणी विरोध दर्शवतानाही दिसत नाही. राजकाणात हे असच चालतं या नावाखाली आपल्या असुसंस्कृतपणचं समर्थन करण्याचीही गरज कोणाला भासत नाही.






भ्रष्टाचार हा भारतातला एक फार आवडीचा विषय आहे.  भ्रष्ट +आचार = भ्रष्टाचार अशी खरतर ती अगदी साधी सोप्पी शब्दफोड आहे. पण आपण त्याला इतकं कार्यालयीन स्वरूप देऊन ठेवलंय कि जणू भ्रष्टाचार ही मलेरिया सारखी एक सार्वजनिक साथ आहे जिची लागण लोक घराबाहेर पडले कि त्यांना होते. आणि या साथीचं एक खास वेगळेपण असं कि तिची लागण झालेले रुग्ण बाहेरून घरी येताना आपला भ्रष्टाचाराचा मलेरिया अगदी सहजपणे घराबाहेर ठेऊन येउ शकतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामाला बाहेर पडले कि त्यांना भ्रष्टाचाराची लागण सुरु. परत संध्याकाळी घरी जाताना भ्रष्टाचाराचा मलेरिया घराबाहेर आणि भ्रष्टाचार विरहित माणूस घरात. हे इतकं सहज शक्य होऊ शकतं?

ज्या देशात बाउंड्री फक्त क्रिकेटच्या मैदानातच असते अशी लोकांची ठाम समजुत असावी असं वाटतं, एकूण एक सगळया गोष्टींची एकमेकात सरमिसळ करणं हा जनतेचा स्वभाव धर्म वाटतो त्या देशात फक्त भ्रष्टाचाराच्या बाबतीत एवढं कम्पार्टमेंटलायझेशन शक्य होत असेल असं वाटत नाही. एखादी व्यक्ती घराबाहेर भ्रष्टाचारी पण कौटुंबिक जीवनात त्या व्यक्तीचं चारित्र्य धुतल्या तांदळासारखं स्वच्छ - हे कसं शक्य आहे? आपले संस्कार आणि संस्कृती कुटुंब-केंद्रीत असल्याचा आपण फार अभिमान बाळगतो आणि पश्चिमात्य देश व्यक्ती- केंद्रित आहेत म्हणून त्यांना हिणवतो पण शाळा -शिक्षक -समाज -टीव्ही - सिनेमा याबरोबरच घरातील "संस्कार" जबाबदार असतीलच की  लोकांची घराबाहेरील वर्तणूक ठरवण्यास.

साथीच्या मलेरियाची आणखी एक सोय अशी असते कि सरकारनी येऊन डासांवर फवारा मारल्या खेरीज ती साथ जात नाही. म्हणजे त्यात वैयक्तिक जबाबदारी काही घ्यायची नसते. फक्त फवारा मारायला येणाऱ्यांची वाट बघत बसायचं, बस. अशा या भ्रष्टाचाराच्या साथीचं सोयिस्कर गाणं आपण वर्षानुवर्षे गात आलोय आणि ऐकत आलोय. त्यामुळे साथी हात बढाना सारखी ती साथ पसरतच चालली आहे. कमी व्हायची काही चिन्ह दिसत नाहीत.

तर हा एक प्रवास आहे किंवा धडा आहे असं म्हणूया हवं तर. "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन", आय वील बी बॅक असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींना -'प्लीज मला परत बोलवा' असं म्हणायला शिकवण्याचा. गेल्या काही दिवसात मतदारांना जितकं असहाय्य, हतबल, हताश वाटलं तितकं या आधी कधी वाटलं नसेल. ते पुरेसं होतं का कि ज्याची आठवणही पुन्हा नको असं म्हणत काही बदल घडून येतील. शक्यता कमी वाटतेय.

या सगळ्या राजकीय अंदाधुंदीत मधाचं बोट जर काही असेल तर ते म्हणजे रश्मी ठाकरेंचा वर्षातील गृहप्रवेश. त्यांच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत. महाराष्ट्राच्या निवासस्थानात रहाणं सोप्प काम नाही. मुंबई नावाच्या महाअजगराच्या विळख्यातलं ते सिंहासन आहे. हे मी त्यांना सांगण्याची गरज नाही. तरीही सर्वप्रथम त्यांना एक प्रेमाचा सल्ला: चिरंजीव अदित्य आता लग्नाळू झालेला आहे. उद्या समजा त्याचं लग्न ठरलं तर राज्यासाठी एक काम करा. सौ नीताताईंच्या प्रमाणे आपल्या मुलाच्या लग्नात स्टेजवर जाऊन रेकॉर्ड डान्स करू नका आणि ती चित्रफित समाज माध्यमांमध्ये तर बिल्कुल चिटकवू नका. तुम्ही तसं करणार नाही असं वाटतंय. तरीपण आपलं सांगावंसं वाटलं. गेले काही वर्ष मुंबईत सौ श्रीमंत आणि सौ मुख्यमंत्री यांच्या मध्ये आपापल्या रेकॉर्ड डान्सच्या चित्रफिती काढून त्या सोशल मीडियावर चिटकवायची चढाओढ चालली आहे कि काय असं वाटू लागलं होतं. तर तेवढं करू नका.

पूर्वी शाळकरी मुलं शाळेच्या गॅदरिंग मध्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात रेकॉर्ड डान्स बसवीत असत. ते करण्याचं एक वय असतं. उगीच कुठल्याही वयात, कुठल्याही पदावर असताना ते केलं तर शोभत नाही. शिवाय मागे मी न्यूयॉर्क मधल्या एका प्रसिद्ध वेडिंग प्लॅनरची मुलाखत पाहिली होती. तो वेडिंग प्लॅनर असं म्हणाला कि लग्नाचा दिवस हा वधू आणि वरासाठी खास दिवस असतो. त्या दिवशी इतर कोणीही मग ती वरमाई असो, वधूमाई असो, मावस सासरे किंवा चुलत वहिनी असो - कोणीही पाहुण्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करू नये. ते वाईट दिसतं. सौ नीताताई काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या एका हिंदी चित्रपटातील शावा शावा कुटुंबाचं अनुकरण करतायत की अशी कधीकधी शंका येते. मुंबईचं बॉलिवूडायझेशन  -फिल्मीकरण हि चिंतेची बाब आहे. ती गांभीर्याने घ्यायला हवी. वर्षात रहात असताना तुम्ही ते कराल अशी आशा आहे.

टीव्ही आणि चित्रपटांचा लोकांच्या मनावरील प्रभाव बघता अख्खा देश आता थिल्लर हिंदी सिनेमा आणि सिरीयल्सना आदर्श मानून वागू लागलाय कि काय अशी काळजी वाटते. सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये कर्कश्श, आक्रस्ताळेपणानी भांडण घडवून आणणारे टीव्ही वरचे कार्यक्रमही समाजाचं प्रतिनिधित्वच करत असतात. लोक बघतात म्हणून ते कार्यक्रम चालतात. सध्याचा राजकीय गोंधळ हा त्या प्रभावाचा परिणाम नसेल कशावरून? वर्षात रहात असताना याबाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतलात तर बरं होईल.

हिंदी सिनेमासृष्टीचं मुंबईतील वर्चस्व - त्याचे मराठी संस्कृतीवर, मराठी चित्रपट सृष्टीवर झालेले बरेवाईट परिणाम तज्ञांच्या द्वारे तपासून बघण्याची गरज आहे. एकेकाळी दादासाहेब फाळके, व्ही शांताराम यांच्या सारखे मातब्बर लोक आपल्याकडे होऊन गेले. फाळणी नंतर स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी सिनेमा सृष्टीच्या मुंबईत वाढलेल्या प्रस्थामुळे मराठी सिनेमा आणि नाट्य सृष्टी मागे पडली का यावर विचार व्हायला हवा. मोठ्या वृक्षांच्या छायेत लहान वृक्षांची वाढ खुंटते -तसं तर झालं नाही ना हे तपासून बघायला हवं. विशेषतः तमिळ आणि तेलगू सिनेमांच्या तुलनेत - ज्यांना हिंदी सिनेमाचं अतिक्रमण सहन करावं लागलं नाही. आज त्या दोन्ही सिनेसृष्टी मराठी चित्रपट सृष्टीच्या फार पुढे गेलेल्या दिसतात. सगळेच हिंदी सिनेमा थिल्लर नसतीलही कदाचित पण ज्या प्रदेशात हिंदीचा प्रभाव आहे ते प्रदेश प्रगतिशील आहेत का? - किमान  हा विचार तरी ती भाषा कवटाळण्या आधी व्हायला हवा कारण भाषा आपल्या बरोबर स्वतःची संस्कृती घेऊन येईल  - आलेलीच आहे.

महाराष्ट्राच्या प्रथम स्त्रीची भूमिका काळानुसार बदलायला हवी असं तुम्हांला वाटत असेल तर जरून बदल करा. पण तुमची स्वतःची एक नैसर्गिक स्टाईल आहे. ती तशीच राहू दे. आणि ती राहीलही अशी आशा आहे. मुंबई तुम्ही खालपासुन वरपर्यंत बघितलेली आहे. कधी न पाहिलेलं अनपेक्षितपणे मिळाल्यामुळे डोळे विस्फारले आणि like a kid in Disney Land -हे करू का ते करू, इथे जाऊ का तिथे जाऊ, हे घालू कि ते घालू अशी सैरभैर अवस्था झाली - असं तुमच्या बाबतीत होण्याची शक्यता जवळपास नाही असा विश्वास वाटतोय. त्यामुळे वर्षात झालेला हा बदल स्वागतार्ह आहे. असो, सध्या एवढच. ऊतू नका मातु नका घेतला वसा टाकू नका हि विनंती.

माजी मुख्यमंत्र्यांनाही एक मित्रत्वाचा सल्ला: ते इंग्रजीतील भाषांतरित वाक्य आता मोडीत काढलं तर फार बरं होईल. "मी पुन्हा येईन" असं पुन्हा कधी म्हणू नका. त्याऐवजी म्हणण्यासाठी मराठी भाषेतलं एक खास वाक्य आहे जे तुमच्या सध्याच्या पदाल योग्य होईल. विरोधी पक्ष नेते असताना जनते तर्फे सभागृहात वेळोवेळी फक्त एकच डायलॉग मारा, "आता माझी सटकली".






Sunday, October 13, 2019

ये दिन क्या आये




      
                                                                   


निवडणूक संपली. मग त्यावर उलट सुलट चर्चा झाली. पत्रकारांनी विचारलं कि प्रचार आणि निवडणूक यातील असा एखादा प्रसंग सांगा जो कायम तुमच्या स्मरणात राहील. कोणी म्हणालं की श्रीयुत अक्षय कुमारनी गुलाबी रंगाची विजार घालूंन पंतप्रधानांची मुलाखत घेतली तो प्रसंग सर्वात अविस्मरणिय होता. कोणी दुसरा कुठलातरी प्रसंग कायम लक्षात राहिलं असं सांगितलं. मी ही मग या प्रश्नावर विचार केला आणि राहून राहून एक दृश्य डोळ्यांसमोर येत राहीलं. निवडणूक आणि प्रचाराच्या तापलेल्या वातावरणात, नजरेला गारवा देणाऱ्या हिरवळीवर टाकलेल्या खुर्च्यात बसुन, जुन्या वृक्षांच्या छायेत, हलक्या फुलक्या रंगाचे कपडे घालून तितकेच हलके फुलके प्रश्न पंतप्रधानांना विचारत, अक्षय कुमारनी आपल्या देशबांधवांच्या मनावरचा ताण हलका करण्याची फार बहुमोल कामगिरी बजावली यात शंका नाही पण तरीही मी त्या दृश्याला निवडणूक - प्रचार दृश्य क्रमांक १ चा दर्जा देऊ शकत नाही. माझ्या मते निवडणूक - प्रचार दृश्य क्रमांक १ चा बहुमान दुसऱ्याच एका मुलाखतीला मिळायला हवा.



  



ती मुलाखत म्हणजे स्वतःला साध्वी म्हणवुन घेणाऱ्या एका महिला उमेदवाराची एका वार्ताहराने बागेत उभं राहुन घ्यावी तशी एका गोठ्यात उभं राहुन घेतलेली मुलाखत. फारच वेगळी मुलाखत होती ती. अशा अर्थानी कि भगव्या पेहरावातील स्वयंघोषित साध्वी एका गायी जवळ थांबुन तिला चारा भरवित होती. तिच्या पाठीवरून मायेनी हात फिरवत होती. कुठल्या दिशेनी हात फिरवला कि आपला रक्तदाब (गायीचा नव्हे) नियंत्रित व्हायला मदत होते ते दाखवत होती. पत्रकार आवश्यक ते गांभिर्य चेहऱ्यावर ठेऊन अधून मधून शंका उपस्थित करत होता. ती त्यांला गोमातांची महती विषद करून सांगत होती. मध्येच ती म्हणाली कि तिनं तिचा कर्करोग गोमूत्र उपचारांनी बरा केला. सहज चालता चालता तिनं उपचारांची पाककृती सांगितली - गोमूत्र  + तूप + असच काहीतरी. असेलही. तिला त्या उपचारांचा उपयोग झाला असेलही कदाचित. कुणास ठाऊक. कोणी कुठली उपचार पद्धती वापरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुद्दा तो नाही.  (स्वयं ---) साध्वी असंही म्हणाली कि गोठा हि साधना आणि तपस्या करण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे. तिच्या पाठीमागे उभं असलेल्यांनी मान डोलावत तिची री ओढली.



                                     



ती मुलाखत बघताना सारखं असं मनात येत होतं कि हे दोघे बगिच्यात उभे असल्या सारखे गायींच्या मध्ये उभे आहेत, त्यांच्या मागे लोकांचा मोठा जमाव दिसतोय पण गोठ्यात गोमुत्राचा आणि शेणाचा वास येत नसेल?  सतत चालू असलेल्या मलमूत्र विसर्जन प्रक्रियेमुळे गोठ्यातील जमीन कायम दमट असते. तिथे माशा घोंघावत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कितीही स्वच्छता राखली, शेण खाली पडताच लगोलग साफ केलं तरी गोमूत्र कसं साफ करणार?  कॅमेरे आणि मुलाखतीचा लवाजमा गोठ्यात येण्याआधी जमिनीवर गुलाबजल किंवा अत्तर शिंपडलं तरी गोठ्यातला शेण -गोमुत्राचा वास झाकला गेला असेल असं वाटत नाही. पण यातलं काहीच कॅमेऱ्यावर दिसलं नाही. कोणी नाक मुरडताना दिसलं नाही कि घोंघावणाऱ्या माशांनी त्रस्त झालेलं दिसलं नाही. पडद्यावर स्वयं(---) साध्वी आणि वार्ताहार ऍमस्टरडॅम मध्ये ट्युलिप्सच्या ताटव्यांच्या मध्ये उभं असावं इतक्या सहज गोठ्यात बांधलेल्या गायींच्या मध्ये उभे होते (वार्ताहराच्या मनात तेंव्हा ये कहाँ आ गये हम युंही साथ साथ चलते घोळत होतं का ते हि कळायला मार्ग नाही). म्हणून त्या दृश्याला निवडणूक प्रचार  क्रमांक १ चा दर्जा द्यावासा वाटतो.



                                        



वरील प्रश्न महाराष्ट्रातील निवडणूकांच्या नंतर विचारण्यात आला तर एका वाक्याला वरचं स्थानं मिळेल. राज्यातील निवडणूक प्रचाराला आत्ताच कुठे सुरवात होतेय, परंतु कायम स्मरणात राहील असं वाक्य पत्रकार वागळे अगदी सुरवातीलाच म्हणून गेले जेंव्हा ते म्हणाले कि "कमळाबाईंनी वाघोबाला शेंडी लावली." सद्य परिस्थितीच वर्णन, त्यावर भाष्य सगळं त्यात आलं. त्याहीपेक्षा संस्मरणीय वाक्य आता कुणी पत्रकार किंवा उमेदवाराकडून ऐकायला मिळतं का हे दिसेलच. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईत रहाणाऱ्या सचिननी मुंबईत रहाणाऱ्या लताबाईंना (सध्या त्या कुठे राहतात माहीत नाही पण पूर्वी तरी मुंबईतच रहायच्या) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या - हिंदीतून. मराठीतून दिल्या असत्या तरी बाईंना समजल्या असत्या. पण मला तरी एकही मराठी वाक्य ऐकू आलं नाही. तेंव्हा वरील वाक्याची आणि खालील गाण्याची आठवण झाली आणि यमक जुळून आलं:                              
                                                        या चिमण्यांनो परत फिरा रे भाषेकडे अपुल्या
                                                             लावल्या वाघोबाला शेंड्या लावल्या
(खरतर शेंड्या लावल्या असं म्हणत नाहीत शेंडी लावली हा वाक्प्रचार आहे. पण शेंडी लावली च आपुल्याशी यमक जुळलं नसतं).



                                          



बाकी बाईंचा वाढदिवस मानानी साजरा झाला हे फार बरं झालं. नाहीतर आजकाल काही ठिकाणी लताबाई बॅशिंगची फॅशन आलेली आहे. बाईंनी अमुक केलं, तमुक केलं, त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी गायिकांना पुढे येऊ दिलं नाही असे आरोप मुलाखतीं मध्ये अधून मधून ऐकू येतात. राज्यसभा टीव्हीच्या मुलाखतींच्या कार्यक्रमात एरवी चांगल्या मुलाखती घेणारा मुलाखतकारही या फॅशन ट्रेंडला बळी पडलाय असं वाटतं. महिला गायिकांच्या मुलाखती घेताना तो हा मुद्दा आवर्जुन उपस्थित करतो. उषा उथुप यांची मुलाखत घेताना त्यांना म्हणाला कि "लताबाईंच्या आवाजानी भारतीय स्त्रीला स्वयंपाकघराकडे लोटलं असं संगीतातले स्कॉलर्स म्हणतात..."  संगीतातले स्कॉलर्स असं का म्हणतात माहित नाही. सर्वसामान्य लोकांना बाईंच्या आयुष्या बद्दल जे माहित आहे ते असं कि त्यांचे वडील त्या लहान असताना वारले. त्यानंतर लगेच त्या सिनेमात काम करु लागल्या. आपल्या कुटुंबाची आणि लहान भावंडांची जबाबदारी त्यांनी उचलली. जी स्त्री स्वतः लहान वयात नोकरी साठी घराबाहेर पडली आणि आयुष्यभर व्यवसायिक स्वरूपात गात राहीली ती इतर महिलांना स्वयंपाक घराकडे कशी ढकलू शकते?  हळुवार, रोमँटिक गाणी गायली म्हणून? तसं असेल तर त्यात ती गाणी लिहणाऱ्यांचा आणि ज्या सिनेमासाठी ती गाणी लिहिली गेली त्या सिनेमांचाही  हात असणार. आणि हे सगळं त्या काळा नुरूपच घडत असणार. त्यासाठी एकट्या बाईंना दोष देण्यात काय अर्थ. नंतर हेमलता. मला काही त्यांना नावं ठेवण्याचं कारण नाही. त्यांचं ते अखियोंके झरोखोंसे गाणं एकेकाळी फार गाजलं होतं. पण जवळपास चाळीस वर्षांपूर्वी आलेल्या चित्तचोर सिनेमातल्या गाण्यांमध्ये त्यांना वरच्या पट्टीत सुरात गायला कष्ट पडतायत असं वाटलं होतं. त्या सिनेमातली गाणी अविस्मरणीय झाली ती येसूदासमुळे. राज्यसभा टीव्ही वरील मुलाखतीत हेमलतानी काही गाणी सादर केली. तेंव्हा त्यांना वरच्या पट्टीत गाण्यासाठी चाळीस वर्षांपूर्वी पडले होते त्याच्या चाळीस पट जास्त कष्ट आज पडतायत असं वाटलं. तरीही मुलाखतकार त्यांना लताबाई बॅशिंगची पुन्हा पुन्हा संधी देऊ पहात होता.



                                          



इतर गायिकांना बाईं इतकी गाणी गायला मिळू शकली नाहीत याची कारण निरनिराळी असू शकतात. एक कारण असंही असू शकतं कि बाकीच्या गायिकांनी आपलं घर, संसार, मुलंबाळं सांभाळून पार्श्वगायन करण्याचा प्रयत्न केला असेल तर बाईंनी आपलं सर्वस्व गायनाला वाहिलं. आशा वेळी जे इतर कुठल्याही क्षेत्रात महिलांच्या बाबतीत होतं तेच इतर गायिकांच्या  बाबतीत झालं असण्याची शक्यता आहे.



        
               
                     

या ठिकाणी बार्बरा वॉल्टर्स या प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही पत्रकार महिलेचं एक वाक्य आठवतं. त्या एकदा म्हणाल्या होत्या की कुठलीही स्त्री आयुष्यात दोन गोष्टी उत्तम रित्या करू शकते  - ती एक चांगली आई होऊ शकते आणि आपल्या व्यवसायात खूप यशस्वी होऊ शकते पण मग तिचं तिच्या घराकडे आणि नवऱ्याकडे दुर्लक्ष होतं; तिनं मुलं आणि नवरा यावर आपलं लक्ष केंद्रित केलं तर तिला तिच्या नोकरीत किंवा व्यवसायात हवं तितकं यश मिळू शकत नाही; आणि जर एखादया स्त्रीनं आपला नवरा आणि करिअर यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर तिचं तिच्या मुलांकडे दुर्लक्ष होणं अपरिहार्य असतं. पण तीन गोष्टी एकत्र - एखादी स्त्री करिअर मध्ये अत्युच्च स्थानावर पोहोचली आहे आणि घर, मुलं आणि नवरा यांच्याकडेही तिचं अजिबात दुर्लक्ष झालेलं नाही असं होऊ शकत नाही. हे वॉल्टर्स अर्थतच त्यांच्या काळाबद्दल म्हणाल्या होत्या. त्या लताबाईंच्या समकालीन. इतक्या समकालीन कि बाईंचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ चा आणि बार्बरा वॉल्टर्स यांचा जन्म २५ सप्टेंबर, १९२९.



       



अर्थात लोकांची मतं आणि गाण्यांची आवडनिवड वेगवेगळी असू शकते. त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली तर त्यात वावगं काहीं नाही. तसच बाईंचा आवाज आणि त्याची मोहिनी म्हणजे काय phenomenon आहे, आजही भारतात महिला गायिकांच्या  आवाजाचा तो मानदंड का मानला जातो हे संगीत तज्ञांनी उलट सुलट विश्लेषण करून जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यातही काही चूक नाही. पण The proof of the pudding is in the eating. - पुडिंग किती चांगलं झालं आहे हे ते किती खाल्लं जातं त्यावरून ठरतं. तसं बाईंच्या गाण्यांचं श्रेष्ठत्व त्यांची गाणी किती ऐकली जातात त्यात आहे. आणि ऐकली तर ती आजही जातातच. अनेक वेगवेगळ्या प्रकारची तरुण गायकांनी गायलेली गाणी आज हिट होत असतानाही बाईंची गाणी ऐकली जातात हे विशेष. किंबहुना ती इतकी ऐकली जातात कि एखादा आजचा संगितकार, कोणी तरी रस्त्यात म्हंटलेलं बाईंचं एक जून गाणं शोधून आपल्या नविन गाण्याच्या प्रसिद्धी साठी ते पुरेपूर वापरण्याचा केविलवाणा प्रयत्न आज करताना दिसतो - तेही  त्यांच्या येऊ घातलेल्या मोठ्या वाढदिवसाची संधी साधून. अशा प्रकारांमुळे बाईंच्या आवाजाची चिरकाल टिकलेली लोकप्रियता सिद्ध व्हायला मदतच होते.



       
                                     


बाईंचं तुम्हांला सर्वात जास्त आवडलेलं एक गाणं निवडा असं सांगितलं तर निवडता येणार नाही. कुठलं आणि कसं निवडणार. पण माझ्यासाठी एक गोष्ट फार सोप्पी आहे. मला जर त्यांचं सर्वात न आवडलेलं क्रमांक एकचं गाणं निवडायला सांगितलं तर मी एका फटक्यात उत्तर देऊ शकेन  -  बिंदिया चमकेगी चुडी खनकेगी. खूप लोकप्रिय गाणं आहे ते. मला वाटतं बिनाका गीत माला चालूं होती तेंव्हा ते प्रथम क्रमांकावरही आलं होतं. मला ते पूर्वी आवडलं नाही आणि आजही आवडत नाही. आणि नावडत्या गाण्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर - क्लोज सेकंड - बागो में बहार है कलियों पे निखारे है आणि तिसऱ्या क्रमांकावर आजकल पांव जमी पर नाही पडते मेरे. नावडत्या गाण्याची यादी तशी तोकडी आहे.



       








yesheeandmommy@gmail.com
अश्र्विन (कोजागरी) पौर्णिमा 

                                     

Monday, September 2, 2019

मुंबईकर (१)

 

मे महिन्यातल्या एका रणरणत्या दुपारी बिंदुनी घर सोडलं. दुपारची जेवणं झाल्यावर तिनं स्वयंपाकघर आवरलं, उरलेलं जेवण फ्रिजमध्ये ठेवलं, तिरमिरीत बॅग भरली आणि मुक्काम आईच्या घरात हलवला. कुलदीप पवारांबरोबर रहायचा आता तिला कंटाळा आला होता. आईचं घर बंद असायचं. आईवडील कधीतरी जायचे. पण ते तिथे नसतील तेंव्हा घराची किल्ली बिंदुकडे असायची. आईची परवानगी घ्यायची तिला गरज पडली नाही.

शेवटचं भांडण कशावरून झालं याची इतकी वेगवेगळी कारण तिनं वेगवेगळ्या लोकांना सांगितली आहेत कि नेमकं कारण काय घडलं हे आता तिलाही आठवत नाही. भांडणं तशी रोजचीच होती. पवार निवृत्त होण्या आधीपासून ती त्यांना सांगत होती, "आपण मुंबईत घर बघूया. तुम्ही निवृत्त झाल्यावर माझी काही तुमच्या गावी जाऊन रहायची इच्छा नाही. मला माझ्या आई जवळ आणि भावंडांच्या जवळ रहायला आवडेल. इतकी वर्ष तुमच्या फिरतीच्या नोकरीमुळे मला माझ्या माणसांपासून लांब रहावं लागलं. माझी आई आणि भावंडं मुंबईत एकत्र जमून मज्जा करतात आणि मी मात्र दर वेळी त्यातून वगळली जाते. निदान आता तरी मला माझ्या माणसांच्या जवळ रहायला मिळुदे. तुमच्या मावशीचं एवढं छान घर आहे मुंबईत. जुना भाड्याचा फ्लॅट असला तरी चांगला प्रशस्त आहे. मध्यवर्ती ठिकाणी आहे. शिवाय मावशींना मुलबाळ नाही. त्याही आता थकल्यात. जरा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. तो फ्लॅट आपल्याला मिळाला तर बरच होईल."

पण पवारांनी बिंदुचं ऐकलं नाही. मावशीचं घर तिच्या पश्चात आपल्याला मिळावं म्हणून त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत. त्यांची काही तत्व होती ती सोडायला ते तयार नव्हते. स्वेच्छा निवृत्ती स्विकारल्यावर त्यांनी आपल्या इच्छे प्रमाणे गावात घर बांधलं. या निर्णयाची फार मोठी किंमत त्यांना पुढे चुकवावी लागली...पण ते पुढचं पुढे.

बिंदुचा चडफडाट झाला. आता गावी रहायला गेलं कि हे त्या फटफटीवरून शेतावर जाणार, मग शेतात मित्रांबरोबर दारूच्या पार्ट्या रंगणार...या विचारांनी तिला अस्वस्थ केलं. तिनं धाकटी बहीण टुणटुण जवळ आपली मनोव्यथा व्यक्त केली, "इतकी वर्ष सैन्याच्या कृपेनी दिल्लीत रहायला मिळालं आणि आता काय गं हे माझ्या नशिबी आलय. कशी जाऊन राहू मी कोल्हापूरात."

टुणटुण नेहमी सल्ला द्यायला टपलेली असे. सगळ्या भावंडांच्यात आपणच सर्वात हुशार अहोत, आई आणि भावंडांना योग्य मार्गदर्शन करणं आपलं कर्तव्य आहे असा तिचा ठाम विश्वास होता. तिनं तत्परतेनं बिंदूला सल्ला दिला, " त्यांना सांग ना, मुंबई नको तर नको निदान पुण्यात तरी फ्लॅट घेऊन ठेवा. पुणं कसं मुंबई आणि कोल्हापूरच्या मध्ये आहे. कोल्हापूर पासून पुणं आता फार लांब राहिलेलं नाही. त्यांना राहू दे कोल्हापूरात. तू पुण्यात रहा. मी अधुनमधुन माँ ला घेऊन येईन. मावशी पुण्यात आहे. ती भेटेल. आपण धम्माल करू. हव्या तेवढ्या गप्पा मारू."

दोघी बहिणींच्या या प्लॅनचा सुगावा पवारांना लागणं शक्य नव्हतं पण त्यांना त्याचा अंदाज असावा. त्यांनी पुण्यात घर घ्यायलाही नकार दिला. त्यांना कोल्हापूर सोडायचं नव्हतं. निवृत्ती नंतरचं आयुष्य आपल्या गावी, आपल्या आई जवळ जावं अशी त्यांची इच्छा होती. मगाशी म्हंटल तसं या निर्णयाची फार मोठी किंमत त्यांना पुढे चुकवावी लागली. कोणी असंही म्हणतील कि बिंदु आणि टुणटुणनी मिळून त्यांच्यवर सूड उगवला... पण ते पुढंच पुढे. कोल्हापूरला रहायला गेल्यावर काही वर्षांत बिंदुनी घर सोडलं. तिची मुलं मोठी झाली होती. दुसऱ्या गावात शिकत होती. तसंही तिला आता पवारांबरोबर रहायची काही जरूर उरली नव्हती. 
                                                                        *****

मुंबईत आई लीला चिटणीसला कल्पनाच नव्हती कि मुलगी कोल्हापुरातल्या आपल्या घरात येऊन राहिली आहे. बिंदु नियमित आईला आणि बहिणीला फोन करत असे. बहिणी जवळ ती मनातलं सगळं बोलून दाखवायची, पण आईला मात्र काही पत्ता लागू देत नसे. सगळं पूर्वी प्रमाणेच चाललंय असं भासवायची. लीला चिटणीस न चुकता जावयांची चवकशी करत. त्यांची आणि नातवंडांची खुशाली विचारत. पण आई पासून फार काळ काही लपून राहू शकत नाही असं म्हणतात. एक दिवस त्यांना शंका आली. त्यांनी बिंदुला नाही पण टुणटुणला विचारलं, "बिंदु घराबाहेर पडलीय का ग?"

लीला चिटणीस स्वतः या विषयी बिंदुशी काही बोलल्या कि नाही - माहित नाही. एवढं काय झालं, तू घर का सोडलंस, अशी माहेरी किती दिवस राहशील तू, हे प्रश्न त्यांनी मुलीला विचारले का?  एक वडीलधारी अनुभवी स्त्री आणि आई म्हणून मुलीला आपल्या नवऱ्याकडे परत जाण्याचा पोक्त सल्ला दिला का, मुलीचा संसार मोडू नये म्हणून काही प्रयत्न केले का -काहीच माहित नाही. त्यांचे पती सूर्यकांत वारल्यानंतर लीला चिटणीसच्या हातात काही उरलं नव्हतं. वडील गेल्यापासून आईचे सगळे निर्णय टुणटुणनी स्वतःकडे घेतले होते. आईची काळजी फक्त आपल्यालाच आहे, आईसाठी काय योग्य किंवा अयोग्य आहे, आईनी काय करावं किंवा काय करू नये  हे ठरविण्याचा अधिकार फक्त आपल्याला आहे असा तिचा दावा होता आणि तो दावा खोडुन काढण्याची कोणाची हिंमत नव्हती. टुणटुणच्या अंगात कायम कोणाविरुद्ध तरी आवेष संचारलेला असे आणि त्या आवेषापुढे कोणाच काही चालत नसे, अगदी तिचे यजमान निळू फुलेंच सुद्धा नाही मग लीला चिटणीसचा काय निभाव लागणार. पवारांना सोडण्यासाठी टुणटुणनी बिंदुला पाठिंबा दिला. " परत पवारांकडे जाशील तर बघ!" तिनं बहिणीला बजावलं. टुणटुणच्या आवेषाचं आता पवार एक लक्ष्य बनले होते.

कोल्हापूरात बिंदुनी आईच्या घरात आपलं बस्तान बसवायला सुरवात केली. तिला जवळच्या एका प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. तिचा दिनक्रम सुरळीत सुरु झाला. आता पवारांची कटकट मागे नव्हती. तिला खूप हलकं, मोकळं वाटू लागलं. रोजच्या भांडणां पासून सुटका झाली. बिंदुनी घर सोडल्याचा परिणाम पवारांवर काय झाला, झाला कि नाही हे नंतर पाहू. मुंबईत दोन व्यक्ती मात्र सावध झाल्या.

"माझा जुना फ्रिज कोल्हापूरच्या घरात आहे. बिंदुआक्कांना तो फ्रिज चांगलं गिऱ्हाईक पाहुन विकायला सांगा. आणि त्यांना म्हणावं शाळेत सांगून ठेवा, एखादया शिक्षिकेला जर दोन खोल्या भाड्यानी हव्या असतील तर...बिंदुआक्कांना एकटीला चार खोल्या लागणार नाहीत. दोन पुरतील. शिवाय त्यांना शेजारी कोणाची तरी सोबत असेल तर बरं होईल", लीला चिटणीसची सून शशिकलानी एक दिवस भाईंदरहून फोन करून सासूला फर्मान सोडलं. बिंदुला आपला जुना फ्रिज फुकट वापरता येऊ नये आणि अख्ख घरही रहायला मिळू नये याची सोय शशिकलानी बिंदुच्याच मार्फत केली. शशिकलाचं  हे कौशल्य बघून दुसरं कोणतरी चाट पडलं असतं पण चिटणीसांना आता त्याची सवय झाली होती.

सासूसासऱ्यांकडून आपल्याला काहीतरी मिळावं अशी निळू फुलेंचीही अपेक्षा होती. "मुलांना जे काही द्यायची आईवडिलांची इच्छा असते ते त्यांनी मुलं तरुण असतानाच दयायला हवं ",  चिटणीस कुटुंबातील कोणाच्यातरी कानावर पडेल अशा बेतानं ते हे वाक्य बोलून घेत असत. सासूबाईंचा विश्वास संपादन करण्यात त्यांनी यश मिळवलं होतं. लीला चिटणीस फुलेंना आपला मुलगा मानू  लागल्या होत्या. पण फुलेंची प्रतिक्रिया शशिकला इतकी उघड आणि तडकाफडकी नव्हती.

बिंदु पवारांना सोडून कोल्हापूरच्या घरात रहात आहे, शशिकलाचा फ्रिज विकण्यासाठी फोन आला होता या गोष्टी आईच्या बोलण्यातुन जयश्रीच्या कानावर पडत होत्या पण तिनं तिकडे फारसं लक्ष दिलं नाही. आपल्याशी त्याचा काही संबंध आहे असं तेंव्हा तिला वाटलं नाही. सूर्यकांत आणि लीला चिटणीसची ती सर्वात घाकटी मुलगी. तिच्यात आणि मोठ्या भावंडांच्या वयात बरच अंतर होतं. जयश्री वयात आली तेंव्हा बिंदु आणि टुणटुण सासरी गेलेल्या होत्या आणि चंद्रकांतच लग्न शशिकला बरोबर झालं होतं.

सूर्यकांत होते तोपर्यंत सर्व सुरळीत चाललं. बिंदु उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना घेऊन माहेरी यायची. सुट्टी संपत आली कि परत जायची. पवारांच्या नोकरीमुळे तीचं वास्तव्य महाराष्ट्रा बाहेर जास्त होतं. टुणटुण मात्र कायम आईला चिकटलेली होती. आई शिवाय तिचं पान हलत नसे. बारीक सारीक गोष्टीत तिला आईच्या आधाराची गरज भासे. स्वतःच्या जबाबदारीवर काही करायची तिला सवय नव्हती. वडिल असेपर्यंत त्यांच्या धाकामुळे ती माहेरी फारशी येत नसे पण आईशी रोज फोनवर बोलणं होई. सूर्यकांत बाहेर गेले कि लीला चिटणीस लेकीला फोन करित आणि मग मायलेकींच्या मनसोक्त गप्पा रंगत. सल्ला मसलत चाले. कधी टुणटुणला किंवा तिच्या मुलांना बरं नसलं तर लीला चिटणीस सकाळी लवकर उठुन, दोन्ही वेळचा स्वयंपाक करून, नवऱ्यासाठी दुपारचं जेवण टेबलवर ठेऊन कांदिवलीला टुणटुणच्या घरी जात. तिला काय हवं नको ते बघून सूर्यकांतना रात्रीचं जेवण वाढायला वेळेत घरी परत येत.

सूर्यकांतचा टुणटुणनी माहेरी यायला विरोध होता असं नाही. पण दुसऱ्यांच्या उठाठेवी करायच्या, लोकांच्या आयुष्यात नाक खुपसायचं, त्यांच्याविषयी गॉसिप करायचं हा तिचा स्वभाव त्यांना आवडत नसे. माहेरी आली की आतल्या खोलीत बसून आईशी हलक्या आवाजत कुजबुज करायची टुणटुणची सवय त्यांना फार खटकायची. अशावेळी सूर्यकांतचा मुक्काम एकतर बाहेरच्या खोलीत किंवा बाल्कनीत असायचा. पण जर ते बाथरूमला किंवा आपल्या बेडरूम मध्ये जायला उठले आणि पलीकडच्या खोलीतुन काही उठाठेवी कानावर पडतायत असं वाटलं तर ते रागात मोठ्ठ्यानी "लीला" अशी हाक मारून पत्नीला बाहेर बोलावून घेत. उगीचच "चहा कर...  पाणी दे", असे हुकूम सोडत. अशावेळी काहीतरी करून आई आणि मुलीच्या गप्पात खंड पाडण्याचा त्यांचा उद्देश असे.

अशीच एक दिवस दुपारी माहेरी आलेली टुणटुण संध्याकाळी घरी परत गेल्यावर रात्री जेवताना सूर्यकांतनी पत्नीला विचारलं,
 " मग...  काय म्हणत होती बच्ची?". टुणटुणला ते लाडानी बच्ची म्हणत.

"काही खास नाही. हेच आपलं इकडचं तिकडचं".

"दुपारभर इकडचं तिकडचं बोलत होती?"

"तसं नाही, म्हणजे तिला आपलं वाटतं कि आपल्या माहेरी सगळ्यांनी एकत्र रहावं. कुटुंबाची एकी कायम टिकुन रहावी. वाटणारच ना. सहाजिकच आहे ते,"  लीला चिटणीस मुलीची बाजू घेत म्हणाल्या.

बायको आणि मुलगी दुपारभर कुजबुज करत आतल्या खोलीत बसल्यामुळे आधीच वैतागलेल्या सूर्यकांतचा पारा हे उत्तर ऐकून आणखी वर चढला. "तुला मी कितीदा सांगितलंय मला दोन गोष्टी या घरात नकोयत. तू तिच्या संसारात लक्ष घालायचं नाही आणि तिला आपल्या घरात ढवळाढवळ करू द्यायची नाही." त्यांनी पत्नीला सुनावलं.

"कोणी कोणाच्याही संसारात ढवळाढवळ करत नाहीय. तुम्ही उगीच त्रागा करू नका." लीला चिटणीसनी नवऱ्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण शांतपणे संभाषण करणं चिटणीस दांपत्याला जमत नसे. प्रश्नोत्तरांच रूपांतर लगेच खटक्यात होई.

"किती वर्ष झाली आता तिच्या लग्नाला - दहा... बारा कि जास्तच?" सूर्यकांत गर्जले. "इतक्या वर्षात तिच्या सासरची एकी जपण्यासाठी काय केलं तिनं? आज पर्यंत कितीदा कोल्हापूरला सासरी जाऊन राहिलीय ती? तिला म्हणावं आम्ही तुला फुलेंच्या घरात दिलेली आहे. तू आता फुलेंच्या एकीची काळजी कर. चिटणीसांच्या एकीचं आम्ही काय ते बघून घेऊ." सूर्यकांत खवळून म्हणाले.

कोणी "त्या" प्रसंगाची आठवण करून दिलेली त्यांना आवडत नसे. चंद्रकांतच शशिकलाशी लग्न झाल्यावर सुरवातीला सगळे एकत्र रहात होते. एक दिवस घरात काहीतरी बिनसलं. सूर्यकांतनी मुलाला वेगळं रहायला सांगितलं. कोणाच्या तरी ओळखीनं चाळीत दोन खोल्या घेऊन चंद्रकांत आणि शशिकला भाईंदरला रहायला गेले.

त्यालाही पुष्कळ वर्ष होऊन गेली आणि एक दिवस अचानक अर्धांग वायूच्या झटक्याने सूर्यकांत गेले. तेंव्हा शिक्षण संपवून जयश्री नोकरीला लागली होती. माटुंग्याच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधून व्यवस्थापनाची पदवी घेतल्यावर तिला एका आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार कंपनीत नोकरी मिळाली. घरात तिच्या लग्नाचे विचार गेली काही वर्ष चालू होते. तेही जास्त करून टुणटुणच्या आग्रहामुळे.

आजकाल टुणटुण घरी येऊन गेल्याच आईनी न सांगताही जयश्रीला समजत असे. ती संध्याकाळी उशिरा ऑफिस मधून घरी आली कि लीला चिटणीस डायनिंग टेबलवर तिचं ताट वाढून देत आणि तिच्या शेजारी बसून सहज गप्पांच्या ओघात बोलावं तसं  कुठल्यातरी लांबच्या नातेवाईकांच नाव घेऊन म्हणत, " शकूमावशीच्या मुलीला इतक्या मोठ्या स्थळा कडून मागणी आलीय. एकुलता एक मुलगा आहे. बी ए , एल एल बी झालाय. जमीनदार लोक आहेत. पुण्यात फर्ग्युसन रोडवर खूप मोठ्ठा बंगला आहे त्या लोकांचा. आपल्या इथल्या नाना - नानी पार्क एवढा त्यांच्या घराचा बगीचा आहे असं म्हणतात", किंवा "बाळु मामाच्या मुलीचं लग्न ठरलं. अमेरिकेहून आलाय मुलगा. ग्रीन कार्ड की काय ते आहे म्हणे त्याच्याकडे. आठ दिवसात लग्न करून जाणार आहे. ती मागाहून जाईल." 

आई या बातम्या सांगू लागली कि जयश्रीला कानात वेगळंच काही तरी ऐकू येई आणि अपराधी वाटे - "बघ, या दोन्ही मुली तुझ्या पेक्षा वयानी कितीतरी लहान आहेत. तुझी तिशी जवळ आलीय. त्यांचं तर अजून शिक्षणही पूर्ण झालेलं नाही. विशीच्या आत लग्न ठरली दोघींची. तुझ्या वयाची कोणी चांगली मुलं आता उरलेली नाहीत. बहुतेकांची लग्न झालीत."

लांबच्या नात्यातली शकूमावशी काय किंवा बाळुमामा काय - या लोकांशी आपली माँ अजिबात संपर्कात नाही. आबांच्या धाकामुळे हे लोक फारसे आपल्या घरी येत नाहीत आणि माँ फोनवरही कधी त्यांच्याशी बोलत नाही. या सगळ्या टुणटुण फुले अखिल पश्चिम महाराष्ट्र (मुंबई सह) उठाठेवी नेटवर्क मधून आईपर्यंत पोहोचलेल्या बातम्या आहेत हे जयश्रीला अनुभवांनी माहित झालं होतं.

खरी परिस्थिती अशी होती कि तीन मुलांची लग्न करून सूर्यकांत आणि लीला चिटणीस थकले होते. मोठ्या उत्साहानी त्यांनी जयश्रीसाठी वरसंशोधन कधी केलं नाही. शिवाय जयश्रीच्या काही ठराविक अपेक्षा होत्या: शक्यतो मुंबईतलाच हवा, पश्चिम उपनगरातला असेल तर उत्तम, आय टी मधला असेल तर चांगलं. आपल्या या अटी कमी करण्याची वेळ अजून आली आहे असं तिला वाटत नव्हतं. जयश्रीला लग्नाची घाई नव्हती. ऑफिस मध्ये कामासाठी परदेशातून येणाऱ्या बायका ती बघत होती. तिशी - चाळीशीच्या वाटतात. काहींच्या लग्नाचा पत्ता नसतो. अतिशय प्रोफेशनल असतात. आपल्या करिअरच्या बाबतीत खूप जागरूक असतात. जे बघत होती त्याचा परिणाम तिच्यावर होत होता.

कसही करून लवकरात लवकर एकदाचं आपलं लग्न व्हावं असं तिला कधी वाटलंच नव्हतं. नोकरीत जम बसे पर्यंत लग्नाचा विचार करायचीही तिची इच्छा नव्हती. ऑफिसमधले तिचे  सहकारी कामासाठी नियमित परदेशी जात. एक ना एक दिवस आपल्यालाही परदेशी जायची संधी मिळेल असं स्वप्न आता ती बघू लागली होती. आपलं लग्न जमवण्याची बच्चीदिदीची धडपड म्हणजे स्वतःचा रिकामपणा घालवण्याचा आणि आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा एक उद्योग आहे असं जयश्रीला वाटू लागलं होतं. पण त्याविरुद्ध काही बोलायची सोय नव्हती. तो तिचा स्वभाव नव्हता.
                                                         
                                                                           *****

सूर्यकांत गेल्यावर काही दिवसांनी निळू फुलेंना वाटू लागलं कि बिंदुची मुलं शिक्षणासाठी मुंबईत येतील तर बरं होईल. मुंबईत त्यांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने जास्त सोयी आहेत. इथे त्यांना जास्त चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यांनी टुणटुणला तसं सुचवुन बघितलं. तिला ते पटलं. तिनं बिंदुशी याविषयी बोलायचं ठरवलं. दोघी बहिणींमध्ये फोनाफोनी झाली. मुलं आज्जीकडे येऊन राहिली तर लीला चिटणीसना त्यांचं करायला जमेल का.. जयश्री तर दिवसभर कामावर असणार. शेवटी विचारविनिमय करून दोघींनी ठरवलं की मुलांना तर आणायचंच मुंबईत आणि त्यांच्याबरोबर बिंदुनीही यायचं म्हणजे मग आज्जीला नातवंडांचं काही करावं लागणार नाही. बिंदु फार खुश झाली या निर्णयावर. तिची जुनी तक्रार - आई आणि भावंड एकत्र जमून मज्जा करतात आणि मी दरवेळी त्यातून वगळली जाते - आता संपणार होती.

नेहमी प्रमाणे या वेळीही टुणटुण आणि बिंदुनी आपसात काय ठरवलं त्याचा लीला चिटणीसना पत्ता नव्हता. वडील गेल्यापासून दोन्ही मुली आईला गृहीत धरू लागल्या होत्या. तशा सूर्यकांत असतानाही त्या आईला गृहीत धरत होत्या. पंरंतु वडील गेल्यानंतर बिंदु आणि टुणटुणवर कोणाचा अंकुश उरला नाही.

बिंदुनी नोकरी सोडली आणि लीला चिटणीस आणि जयश्री बरोबर मुंबईत रहायला आली. आधी ती आली मग तिची मुलं आली. बिंदुच्या मुलांना मुंबईत आणण्यासाठी फुलेंनी पुढाकार घेतला. आई बरोबर आजोळी जाऊन रहाण्या विषयी कुलदीप पवारांच आपल्या मुलांशी काही संभाषण झालं का  -माहीत नाही. मुलं नियमित वडिलांना भेटत होती का  - कुणास ठाऊक.

बिंदु मुंबईत रहायला आल्यावर टुणटुणचं आईकडे येणं वाढलं. सूर्यकांत नसल्यामुळे आता ती बाहेरच्या खोलीत बसून आई आणि बहिणीशी हितगुज करू शकत असे. त्यात नातेवाईकांच्या गॉसिप बरोबर जयश्रीच्या लग्नाचा विषयही निघे. कुठल्या पेपरमध्ये जाहीरात द्यायची, वेबसाईट वर नोंद करायची कि वधुवर सूचक मंडळात नाव घालायचं यावर चर्चा होई. आठवडा संपताना यायचं, जयश्री ऑफिस मधून आली कि तिला प्रश्न विचारून भंडावून सोडायचं - "उशीर का झाला? इतका वेळ कुठे होतीस? बरोबर कोण होतं? ऑफिस मधुन किती वाजता निघालीस? घरी पोहोचायला इतका वेळ का लागला? मध्ये कुठं गेली होतीस क?" अशा प्रश्नांचा तिच्यावर भडीमार करायचा असा परिपाठ तिनं सुरु केला.

एकदा दुपारी जयश्री घरी नसताना आली. आईला म्हणाली, "हे परवा कोल्हापूरला चाललेत. मोठे दीर पाय घसरून पडले. त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय. त्यांना बघायला जातायत. जयूची माहिती लिहून देते त्यांना. ते धनवटेबाईंच्या घरी जाऊन त्यांना देऊन येतील. ताराबाई पार्कात रहातात त्या. त्यांना बरीच स्थळं माहित आहेत. मागे मी फोनवर बोलले होते त्यांच्याशी. श्रीमंत शेतकऱ्यांची, साखर कारखानदारांच्या मुलांची स्थळं आहेत म्हणत होत्या . एक मुलगा सुचवला होता त्यांनी. छान होता. सर्वात धाकटा होता. मोठ्या दोन भावांची लग्न झालेली आहेत. मोठे बागायतदार लोक आहेत. म्हणजे सगळे जण गावात रहातात पण सासू आणि सुनांसाठी स्वतंत्र गाड्या आणि ड्रायव्हर आहेत त्यामुळे त्या हवं तेंव्हा कुठेही जाऊ येऊ शकतात. मी तुला सांगणार होते पण तेंव्हाच आबांचं आजारपण झालं मग त्या गडबडीत राहून गेलं. त्या मुलाचं तर लग्न झालं असं वाटतं. पण तेंव्हा त्या बाई म्हणाल्या होत्या कि मुलीची सविस्तर माहिती दया मग आणखी स्थळं सांगिन. हे जातातच आहेत तर त्यांना भेटून येतील. राजरामपुरीत जाऊन घरही बघून येतील. आक्का इथे रहायला आल्यापासून आपण कोणी फिरकलोच नाही तिकडे.

टुणटुण सासरी जात नसे पण बहिणीवर लक्ष ठेवण्याचं काम तिनं स्वतःकडे घेतलं होतं. जयश्रीला टुणटुणच्या उलट तपासणीचा फार राग यायचा. तो मनातल्या मनात गिळून सरळ उत्तर दयावी तर वधू-वर परीक्षेच्या सूचना सुरु होत. अमका मुलगा चांगला वाटतो त्याला घरी बोलवूया, तमका मुलगा अमेरिकेहून दोन आठवड्यांसाठी आलाय त्याला त्याच्या घरी जाऊन भेटूया.. सगळं नको झालं जयश्रीला. माँ बरोबरच बच्चीदीदी आता आपलंही आयुष्य कंट्रोल करू पाहतेय असं तिला वाटू लागलं.  त्यातच ऑफिस मधली तिची जवळची मैत्रीण बदली होऊन बंगळूरला गेली. जयश्रीलाही मग बंगळूरला जावंसं वाटू लागलं. तिनं आईकडे बोलून बघितलं. लीला चिटणीस खुशीत, "हो, का, बंगळूरला बदली होतेय का तुझी?" एवढंच म्हणाल्या. त्यावरून आईचा तरी बदलीला विरोध दिसत नाही असं ती धरून चालली.

                                                                        *****

मध्ये काही दिवस गेले. एका रविवारी सकाळी दारात रिक्षा उभी राहिली. टुणटुण मुलांना घेऊन आली होती. हातातल्या पिशवीत मसाला लावून मुरवलेल्या मटणाचा मोठ्ठा डब्बा होता. "हल्लीच मी हैद्राबादी बिर्यानी बनवायचा क्लास केला, आज बिर्यानीचा बेत करूया", म्हणाली. कामवाल्या काशीला लाकडी उंच स्टुलावर चढवून आईच जुनं पितळेचं मोठ्ठ भांड माळ्यावरून खाली काढायला लावलं. तिलाच ते घासायला दिलं. बिंदु आणि टुणटुण मग बाकीच्या तयारीत गुंतल्या.

ओट्या लगतच्या सिंक मध्ये भांडी घासताना काशीच्या गप्पा चालू होत्या, "वैनी नाय येणार बिर्याणी खायला"? तिनं विचारलं.

" छे, ते लोक कुठे एवढ्या लांबून येणार. मुलांचे  क्लास असतात. अभ्यास असतो. इथे यायचं तर जाण्यायेण्यातच सारा वेळ मोडतो त्यांचा",  लीला चिटणिसनी चहाचा कप तिच्या शेजारी ठेवत म्हंटलं.

"तुमच्या लेकी नशिबवान हायेत, माँ. तुमचा लई जीव आहे त्यांच्यावर. माझ्या आईचा माझ्या पेक्षा आपल्या सुनांवरच जास्त जीव. मला चार दिवसाच्यावर म्हायेरी ऱ्हाऊ देत नाही. म्हणते जा बाई आता तू तुझ्या घरी. जास्त दिवस ऱ्हाशील तर उगीच माझ्या सुनांच्या संसारात जहर कालिवशील ".  ओले हात पातळाला पुसुन चहा पिण्यासाठी जमिनीवर बसत काशी म्हणाली.

स्वयंपाकघरात कामवाली धरून चार बायकांची लगबग. बाहेरच्या खोलीत बिंदु आणि टुणटुणच्या मिळून चार मुलांची गडबड. जयश्रीला थोडं ऑफिसचं काम करायचं होतं. तिनं आपला लॅपटॉप घेतला आणि बाल्कनीत वडीलांच्या आवडत्या आराम खुर्चीत काम करत बसली.

काम करताना मधूनच एखादी व्हिडीओ बघ, कुठल्यातरी वतर्मान पत्रातले मथळे वाच असं चाललं होतं. एका बातमीनी तिचं लक्ष वेधून घेतलं म्हणून त्यावर क्लिक करून ती बातमी तिनं सविस्तर वाचली. जवळच्या धारावीतली बातमी होती. स्लमडॉग मिल्यनेअर सिनेमात काम केलेली लहान मुलगी धारावीच्या झोपडपट्टीत रहात होती. काही दिवसांपूर्वी सिनेमातील तिच्या कामाबद्दल काही लाख रुपयांचा चेक तिच्या वडिलांना मिळाला. त्या चेकची बातमी त्यांच्या नातेवाईकांमध्ये पसरताच सगळे नातेवाईक मुलीच्या वडिलांभोवती गोळा झाले. प्रत्येक जण त्यांच्याकडे पैशाची मागणी करू लागला. सगळ्यांनी एकच गलका केला. रुबिनाच्या वडिलांना नातेवाईकांच्या मागण्या आणि गोंगाट इतका असह्य झाला कि त्यांनी त्या नातेवाईकांच्या समोर तो चेक फाडून टाकला.

ती बातमी वाचून जयश्रीला खूप विषण्ण वाटलं. दिसतील शीतं तिथं जमतील भूतं हा मथळा असायला हवा होता या बातमीचा- तिच्या मनात आलं. तेवढ्यात टुणटुण आणि बिंदु हातात एक वाडगा घेऊन आल्या. "खीर चाखून बघ जरा गोड बरोबर आहे का", वाटी जयश्रीच्या हातात देत बिंदू म्हणाली. जयश्रीनी वाटीतली चमचाभर खीर संपवली, "गॊड बरोबर आहे पण वेलची पूड घाला ना थोडी",  म्हणून सांगितलं तरी दोघी तिथेच उभ्या राहिल्या.   

निवांत सकाळ होती. ढगाळ पावसाळी वातवरण होतं. इमारती समोरचा रस्ता शांत होता. पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या बारीक पानांचा सडा रस्त्यावर सांडलेला होता. तुरळक वर्दळ होती. मधूनच एखादी गाडी, रिक्षा, सायकल, पायी चालणारे लोक जात होते. सोसायटीच्या लोखंडी प्रवेशद्वारा जवळ चौकीदार मामा उभे होते. रस्त्या पलिकडल्या फुटपाथवर बूट - चप्पला विकणाऱ्या छोट्या खोपटाबाहेर उभं राहून एक जण आपली चप्पल दुरुस्त करून घेत होता. तिकडे बघत टुणटुण म्हणाली. " त्यापेक्षा तू तुमच्या पुण्याच्या ऑफिस मध्ये बदली करून घे ना. आपल्यातली बरीच मुलं आहेत पुण्यात".

क्रमशः

( सर्व ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्रींना अभिवादन करून त्यांची नावं वापरली आहेत.)


पुढील भागात:

 .... १/३ कच्ची, १/३ करपलेली वगळून उरलेली बिर्यानी सगळयांना जेमतेम पुरली. जेवण झाल्यावर टुणटुणनी सिनेमा बघायची टूम काढली. सगळे बाहेरच्या खोलीत टीव्ही समोर बसले....





Sunday, August 4, 2019

खोडियार माता


सलमान गणेश मंदिरात कधी गेले असतील? अशक्य नाही. ते न्यूयॉर्क मध्ये रहातात. गेली अनेक वर्ष ते इथे रहातायत. एकदा आम्हाला मॅनहॅटनच्या डाउनटाऊन मध्ये एका दुकानात दिसले होते. खूप पूर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा त्यांच्यावर तो फतवा लागू होता. आम्ही बेड बाथ अँड बियॉंड नावाच्या दुकानात गेलो होता. नावावरूनच लक्षात येतं कि ते गृहोपयोगी वस्तू मिळण्याचं ठिकाण आहे. बेडरूम साठी लागणाऱ्या- चादरी, उशांचे अभ्रे, रजया, बाथरूम साठी लागणारे - टॉवेल्स, पायपुसणी तिथे मिळतात. तसंच बियॉंडच्या अंतर्गत इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो - स्वयंपाकघरात लागणारी भांडीकुंडी, कचऱ्याच्या टोपल्या, छोटी अप्लायन्सेस, पडदे , मेणबत्त्या, छत्र्या, च्युईंग गम, कुत्र्या -मांजराचं खाद्य वगैरे वगैर काय वाट्टेल ते. इतक्या असंख्य उपयोगी आणि निरुपयोगी वाटाव्यात अशा गोष्टींनी ते मोठ्ठ दुकान खचाखच भरलेलं असतं कि खरोखरच माणसाला जगण्यासाठी एवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे का कि हे जरा अतीच होतंय असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. बहुसंख्य वस्तू अर्थातच चीनोत्पादित (चीन + उत्पादित) असतात. न्यूयॉर्क - न्यूजर्सी मधे त्या दुकानाच्या अनेक शाखा आहेत. इतर राज्यातही असतील.

तेंव्हा अप्पर वेस्ट साईडला बेबाबि नव्हतं. आता आहे. पण तेंव्हा आम्हांला सर्वात जवळच लोकेशन ते डाउनटाऊन मधलं दुकानच होतं. आम्ही तिथे काय घ्यायला गेलो होतो ते आता आठवत नाही. पण घरासाठी आवश्यक काहीतरी असणार. नाहीतर मुद्दामहून तिकडे गेलो नसतो. ऑकटोबर / नोव्हेंबर मधली गोष्ट आहे.  इतक्या वर्षांनंतरही महीना माझ्या का लक्षात राहिला त्याला कारण आहे.

दुकानाच्या बाहेर शॉपिंग कार्टस उभ्या होत्या. मी त्यातली एक घेतली. ढकलत ती दरवाजाजवळ नेली. काचेचा सरकता दरवाजा फाकला आणि समोरच दृश्य बघून मी आश्चर्यचकीत झाले : सरकत्या दरवाजा समोर हँगर विभागात सलमान रश्दी आणि पद्मा लक्ष्मी हँगर घेत होते. पहिला विचार मनात आला तो म्हणजे फतव्याचं काय झालं. लंडन मध्ये ते अज्ञात स्थळी पोलीस संरक्षणात रहात आहेत असं वाचलं होतं. न्यूयॉर्क मध्ये रहायला येणार आहेत, आले आहेत असंही वाचलं होतं. तरीही ते इतक्या उघड फिरत असतील असं वाटलं नव्हतं.

ते खूप उंच नाहीत. पद्मा पेक्षा कदाचित्त कमी असावेत. तरीही ती अंगुली निर्देश करून त्यांना वरच्या फळीवरचे हँगर दाखवीत होती आणि ते त्या उंचावर ठेवलेल्या हँगर पर्यंत हात पोहोचतो का बघत होते. त्यांना त्यांच्या शॉपिंग मध्ये सोडून मी पुढे गेले. सुट्टीचा दिवस होता. दुकानात फारशी गर्दी नव्हती. शॉपिंग संपवून पैसे द्यायला कॅशियरच्या लाईनीत उभी रहायला आले तर परत दोघे रांगेत माझ्या पुढे उभे. खुप वाटलं होतं त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात. दिवाळीचा पहिला दिवस होता (म्हणून महिना लक्षात राहिलाय). पण फतवावाले आजूबाजूला असले तर उगीच पीडा नको या भितीपोटी मी गप्प बसले.

नंतर त्या दोघांचं लग्न झालं. मग काही वर्षांनी घटस्फोट झाला. हे सगळं न्यूयॉर्कमध्येच झालं. न्यूयॉर्कच्या गॉसिप बातम्यांमध्ये दोघेही नियमित असतात. पद्मा लक्ष्मीच्या आत्मकथनात (कि कुठल्यातरी मुलाखतीत) वाचलंय कि ती फ्लशिंगच्या गणेश मंदिरात जाते. तिच्यात आणि माझ्यात ती गोष्ट कॉमन आहे. मी हि गणेश मंदिरात जाते. ती आजवर मला कधी तिथे दिसलेली नाही. ते हि दिसलेले नाहीत. पण जुलै मधल्या न्यूयॉर्कर मासिकात त्यांची गॊष्ट आहे ती वाचल्यावर मनात शंका येतेय कि ते त्या देवळात जात असतील किंवा गेले असतील का? देवळात काय कोणीही जाऊ शकतं. कदाचित लग्न झाल्यावर जोडीनी गेले असतील. कदाचित गोष्ट लिहताना संशोधन म्हणून गेले असतील.

द लिटिल किंग नावाच्या गोष्टीत कथेतल्या प्रमुख व्यक्तिरेखे विषयी लिहिलंय (माझं ढोबळ भाषांतर असं आहे):"तो स्वतः खूप धार्मिक नव्हता, आणि शहरातल्या तीन डझन मशिदीं पैकी एकातही त्यांने कधी पाऊल ठेवलं नव्हतं, चौदाव्या रस्त्यावरच्या अल -फारूक या मोठ्या मशिदीतही नाही. "खरं सांगायचं तर ",  तो अगदी जवळच्या मित्रांना म्हणायचा "अ ) मी प्रार्थना करणाऱ्यातला नाही आणि ब ) खरतर मला स्वामिनारायण मंदिराचा लुक जास्त आवडतो.""

गणेश मंदिर स्वामिनारायण मंदिराहून वेगळं आहे. फ्लशिंग मध्ये दोन्ही आहेत. पण स्वामिनारायण मंदिरात कुठल्या देवी - देवतांच्या मूर्ती आहेत कल्पना नाही. गणेश मंदिरातल्या मूर्ती मला बऱ्यापैकी माहित आहेत. चारपाच पायऱ्या चढून वर गेलं कि मोठा सभामंडप आहे. त्याच्या मध्यभागी मोठ्या गणेश मूर्तीचा गाभारा आहे. मूर्ती काळ्या दगडाची आहे. सभामंडपाच्या चार कोपऱ्यात काळ्या दगडाच्याच पण गणेश मूर्तीहुन थोड्या लहान आकाराच्या चार मूर्तींचे गाभारे आहेत: एका कोपऱ्यात महालक्ष्मी, दुसऱ्या कोपऱ्यात वेंकटेश्वर, तिसऱ्या कोपऱ्यात शिवलिंग आणि चवथ्या कोपऱ्यात एका देवाची मूर्ती आहे ज्याचं नाव आता आठवत नाही. दोन कोपऱ्यांच्या मध्ये समोरासमोरच्या लांब भिंतीना लागून ओळींनी अनेक देव -देवतांच्या दीड दोन फूट उंचीच्य पितळी मूर्तींचे स्वतंत्र देव्हारे आहेत. सर्व मूर्ती जरतारी रेशमी  वस्त्र आणि सोनेरी दागिन्यांनी मढलेल्या असतात. एखादया देवाच्या आवडी नुसार त्याला सुती वस्त्र नेसवलेलं असतं किंवा गळ्यात वेलचीची माळ घातलेली असते. त्यातले काही देव त्या देवळात जाण्याआधी मला माहित नव्हते: पितळी मूर्तींमध्ये खोडियार मातेची मूर्ती आहे. विकिपीडियात असं म्हंटलंय कि तिची देवळं गुजरात, राजस्थान आणि मुंबईत आहेत. पण मुंबईत पाहिल्याचं आठवत नाही.

गणेश मंदिरात संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी गेलं तर फार गर्दी असते. नेहमी कसले तरी सप्ताह चालू असतात. त्यानिमित्तानं भक्तगण जमलेले असतात. एकदा सकाळी गेले तर अभिषेक चालू होता. पांढरं सुती वस्त्र नेसवलेल्या पितळी मूर्तीच्या डोक्यावरून पुजारी दूध आणि इतर द्रव्य ओतत होते. ते बघून मला थंडी वाजली. न्यूयॉर्क मध्ये उन्हाळ्याचे दोन -तीन महिने सोडले तर इतर वेळी बऱ्यापैकी थंडी असते. थंडीत आपले कपडे भिजलेले असताना आपल्या डोक्यावर लोकांनी बाटल्याच्या बाटल्या थंड दूध ओतलं तर आपण गारठणार नाही तर काय होईल. त्यातून अंग धातूंचं असेल तर बघायलाच नको. गर्दीच्या वेळी मृदंगम, नादस्वरम अशी वाद्य कानठळ्या बसतील इतक्या जोरात वाजवली जातात. भक्तगणांना ते आवडत असावं. देवांचं कुणास ठाऊक. इतर दिवशी सकाळी किंवा दुपारी गेलं तर देऊळ शांत असतं.

द लिटिल किंग हि गोष्ट भ्रष्टाचार आणि सध्या भेडसावणारं ओपिऑइड व्यसनाचं संकट या गंभीर विषयांवर आहे पण त्याला रश्दींचा मजेशीर टच आहे. त्यांच्या आगामी कादंबरीवर ती कथा आधारलेली आहे. कथेचा सारांश असा कि र. क. स्माईल नावाचा भारतीय वंशाचा डॉकटर आपल्या औषध निर्मितीच्या व्यवसायामुळे अब्जाधीश झालेला आहे. त्याच्य कंपनीने एक नविन वेदनाशामक औषधी स्प्रे बाजारात आणलेला आहे ज्याच्यामुळे कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधीत अतिवेदनेने तळमळणाऱ्या रुग्णांना तात्पुरता आराम पडू शकतो. परंतु डॉकटर स्माईल हे आपल्या माहितीतील काही डॉकटरां मार्फत ज्यांना कसलीही व्याधी नाही, जे आजरी नाहीत त्या लोकांच्या व्यसनपूर्तीसाठी ते वेदनाशामक (बेकायदेशीररित्या) पुरवण्याची सोय करतात.

"अटलांटा परिसरातील भारतीय समाजात डॉकटर स्माईलना मानाचं स्थान आहे. शहरातील भारतीय वर्तमानपत्राचे ते आधारस्थंभ आहेत तसेच अनेक सामाजिक संस्था, मंडळांना ते देणग्या देतात - मग ती मंडळं भारतातील वेगवेगळ्या राज्यातुन आलेल्या लोकांची असोत, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांची ( बंगाली, गुजराती, हिंदी, तमिळ, तेलगू), वेगवेगळ्या जातींची, उपजातींची, धर्माची आणि वेगवेगळी कुलदैवत मानणाऱ्यांची ( देवी, महादेव, नारायण, आणि लोहासुर - लोखंडाचा देव, खोडीयार - घोड्याचा देव, आणि हार्दूल - कॉलऱ्याचा देव सुद्धा) ."

लोहासुर आणि हर्दूल देवांच्या मूर्ती गणेश मंदिरात बघिल्याचं आठवत नाही (असतील कदाचित पण मला आठवत नाही). खोडियार देवीची मूर्ती तिथे नक्की आहे. वरील तीन चार ठिपके जोडल्यावर असं वाटत - पद्मा म्हणते ती त्या देवळात जाते... पद्मा आणि रश्दी काही वर्षांपूर्वी पतिपत्नी होते... त्या देवळात खोडियार माता आहे म्हणजे मी जसं खोडियार मातेला पहिल्यांदा फ्लशिंगच्या गणेश मंदिरात पाहिलं तसं रश्दीनीही कदाचित तिथेच तिला बघितलं असेल. आणि तिथून ती गोष्टीत अवतरली असेल. अर्थात माझा अंदाज साफ चुकीचाही असू शकतो.


Friday, July 26, 2019

स्वामी


                                      



गिरीश कर्नाड यांचा मी स्वामी सिनेमा बघितला होता. आणि उंबरठा.  उंबरठा पेक्षा स्वामी जास्त आवडला होता आणि तो मी पुन्हा पुन्हा बघितला.  मुंबईत असताना आणि न्यूयॉर्कला आल्यावरही.  उंबरठा आवडला नाही असं नाही पण पुन्हा पुन्हा बघावासा वाटला नाही. स्वामी मधली रंगसंगती चांगली जुळली होती: वेगवेगळ्या रंगांच्या कलकत्ता साड्यांमधली बंगाली वेशभूषेतली शबाना आझमी, पश्चिम बंगाल मधलं पावसात भिजलेलं हिरवागार खेडं ( चित्रपटाचं चित्रीकरण दहिसर गाव आणि दहिसर नदीच्या परिसरात झालंय हा भाग वेगळा). शिवाय स्वामी एका अर्थानी प्रेमाच्या त्रिकोणाची कहाणी आहे. बॉलिवूडच्या भडक स्टाईल मध्ये नाही तर बासु चॅटर्जीनी त्यांच्या शैलीत सांगितलेली. त्यामानाने उंबरठाचा लुक कायम पांढरी खादीची साडी नेसुन समाजकार्य करणाऱ्या सोशल वर्कर सारखा एकरंगी वाटला. स्मिता पाटीलची त्यातली भूमिका त्याच प्रकारची होती. म्हणजे चित्रपटाचा लुक विषयाला अनुसरून होता. पण त्यामुळे व्हिज्युअली तो एवढा अपिलिंग वाटला नाही जेवढा स्वामी वाटतो. स्वामीतली कर्नाड यांची शांत, कुटुंबातील जबाबदार मोठ्या मुलाची भूमिका; मनाविरुद्ध लग्न करावं लागल्यामुळे कायम रुसलेली- फुगलेली असणाऱ्या, शिकलेली असल्यामुळे  न -शिकलेल्या सासू- जाऊ -नणंदे बरोबर मिसळू न शकलेल्या पत्नीला तिच्या कलानी घेऊन, तिची समजूत घालू पहाणाऱ्या समंजस नवऱ्याची भूमिका त्यांच्या पडद्या बाहेरील प्रतिमेला साजेशी होती. 

कर्नाड यांचा जन्म माथेरानला झाला होता. एका मुलाखतीत त्यांनी म्हंटलय कि लहान्पणी ते महाराष्ट्रात रहात होते तेंव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मराठी शाळेत घातलं होतं. पुढे कर्नाटकात रहायला गेल्यावर ते कानडी माध्यमाच्या शाळेत शिकले. त्यांना मराठी आणि कानडी दोन्ही भाषा अवगत होत्या. म्हणूनच कदाचित मराठी लोकांना ते नेहमी आपल्यातले वाटले असावेत. तसे त्यांच्या अभिनयामुळे आणि नाटकांमुळे ते देशभरातल्या चाहत्यांना आपलेसे वाटले असतील. 

कर्नाड गेल्यावर एका इंग्रजी वर्तमानपत्रात त्यांच्या आत्मकथनाबद्दल लेख आला होता. ते आत्मचरित्र कानडीत लिहिलेलं असल्यामुळे जे लोक ते मूळ भाषेत वाचू शकणार नाहीत त्यांच्यासाठी कर्नाड यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचं बालपण याविषयी आत्मचरित्रात असलेली बरीच माहिती त्या लेखातून मिळाली. लेख चांगला विस्तृत होता. पण त्या लेखात एक वाक्य होतं. त्यात म्हंटल होतं -  "Karnad’s family was from a high caste ...  community, the same as Nandan Nilekani, Deepika Padukone, Prakash Padukone, Shyam Benegal, or to pick from a slightly distant past, Guru Dutt." हे वाचल्यावर त्या एरवी माहितीपूर्ण असलेल्या लेखाला त्या एका वाक्यानी गालबोट लागलं असं वाटलं. गालबोट हा फार मवाळ शब्द झाला. त्य लेखाचाच नाही तर त्या वर्तमानपत्राचा दर्जाही त्या वाक्यानी घसरला. 

ते वाक्य जसच्या तसं आत्मचरित्रात आहे की नाही  - जातीच्या नावा आधी लावलेलं " high caste"  हे विशेषण, जातीतील प्रसिद्ध व्यक्तींची नामावली हे मूळ आत्मचरित्रात आहे की नाही मला माहित नाही. जरी असलं तरी वर्तमान पत्रात त्याचा उल्लेख आजच्या काळात खूप धक्कादायक वाटतो. ते वाक्य वाचून किती धक्का बसला याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. वाटलं नव्हतं कि एकविसाव्या शतकांत एखाद्या जातीच्या आधी "उच्च" हे विशेषण लावलेलं बघावं लागेल. मला वाटतं आजच्या काळात एखाद्या जातीच्या "उच्चत्वाचा" उल्लेख अभ्यासपूर्ण लेखात, जातीतील उच्चनीच्चतेच्या भेदभावांचे समाजातील घटकांवर जे दुष्परिणाम झालेले आहेत त्यांचं विवेचन करतानाच फक्त ऍक्सेप्टेबल होऊ शकतो. इतर कुठल्याही कॉन्टेक्स्ट मध्ये कुठल्याही जातीला "उच्चत्वा"चं (किंवा "निच्चत्वा"चं) लेबल लावणं ऍक्सेप्टेबल होऊ शकत नाही. जातीं मधली उच्चनिच्चता हि जुनी पुराणी मोडकळीत काढण्याच्या लायकीची रीत आहे जिला विज्ञानाचा किंवा निसर्गाचा पाया नाही. वर्णद्वेषाहुनही लाजिरवाणी ती प्रथा आहे असं म्हंटलं तरी चालेल. वर्णद्वेषात निदान माणसं आपल्याहुन वेगळ्या दिसणाऱ्या व्यक्तींचा द्वेष करतात. जातींमधली उच्चनिच्चता आपल्या सारख्याचं लोकांपासून स्वतःला उच्च समजण्यासाठी पाळली जाते.  

कर्नाड एका विशिष्ट जातीत जन्माला आले असले तरी त्यांच कार्य बघितलं की असं वाटतं कि त्यांची जन्मजात त्यांनी केंव्हाच ट्रान्सेन्ड केली होती. त्यांच्या बद्दल जे वाचलंय, ज्या मुलाखती पाहिल्यात त्यावरून असं दिसतं की एक  high caste playwirght and actor -  उच्च जातीचे नाटककार आणि अभिनेते अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. 

दुसरं म्हणजे कर्नाड यांचं स्वतःच कर्तृत्व इतकं उत्तुंग होतं की जातीतील इतर कर्तृत्ववान लोकांच्या पंक्तीत त्यांना नेऊन बसविल्याने त्यांच्या कर्तृत्वात भर पडण्याचा प्रश्न नव्हता. त्यांना त्याची काही गरज नव्हती. इतर कोणकोणत्या प्रसिद्ध व्यक्ती त्या जातीत जन्मलेल्या आहेत याचा उल्लेख करून त्या जातीची "उच्चता" वाचकांच्या निदर्शनास आणून द्यायची हा लेखाचा ऊद्देश असेल तर गोष्ट वेगळी.  

अजूनही जातीचा उल्लेख भारतात नेहमी होतो. भारतातच नाही तर अमेरिकेत रहाणाऱ्या भारतीयांमध्येही होतो. काही वर्षांपूर्वी न्यूजसीं मधल्या एका देवळात गेलो होतो. तिथे एक मराठी कुटुंब भेटलं - नवरा, बायको आणि मुलगा.  मुलगा साधारण तीसएक वर्षांचा असेल. अनेक वर्ष अमेरिकेत स्थायिक झालेलं कुटुंब होतं. मुलगा फुल्ल मेकअप मध्ये होता- फाऊंडेशन सकट -भुवया कोरलेल्या, डोळ्यांभोवती आय लाईनर, ओठाला गुलाबी रंगाचं लिपस्टिक. म्हणजे आईवडील अगदीच जुन्या विचारांचे  नसावेत. पण नमस्कार -चमत्कार झाल्यावर पहिला प्रश्न त्यातल्या आईनी मला विचारला तो म्हणजे माझं आडनाव काय. मग आडनावा वरून जात लक्षात आली नसावी म्हणून सरळ जात विचारली. साठीच्या जवळपासचं वय असावं त्यांचं. नंतर थोड्या गप्पा, विचारपूस झाल्यावर त्यांनी आग्रहानी आम्हाला त्यांच्या जवळचं प्रसादाचं केळं दिलं. 

मागल्या उन्हाळ्यात न्यूजर्सी मधल्या एका महाराष्ट्रीयन जेवण मिळणाऱ्या रेस्टोरंट मध्ये गेलो होतो. पुन्हा तेच. यावेळी जोडपं आधीच्या जोडप्यापेक्षा कमी वयाचं होतं. बाईंनी आडनाव विचारलं आणि आडनावावरून जात नक्की समजली नाही म्हणताना जात कुठली ते विचारलं. जात परदेशातही आपला पिच्छा सोडत नाही. 

मराठी लोक निदान नुसतं जात विचारून तरी थांबतात. देवळात भेटलेल्या बाईंनी माझी जात विचारली पण लगेच स्वतःची जात सांगितली नाही. मी ही त्यांची जात विचारली नाही. आणि त्यांची जात न समजल्याची उणीव मला इतक्या वर्षात कधी भासली नाही. त्यानंतर पुन्हा कधी त्यांची भेट झाली नाही पण त्यांनी आग्रहानी दिलेलं प्रसादाचं केळं अजून लक्षात आहे. म्हणजे मराठी लोकांना दुसऱ्यांची जात विचारायला आवडते पण स्वतःची जात सांगायला ते उत्सुक असतात असं नाही. त्याविरुद्ध तामिळ ब्राह्मण - जी भारतातील बहुधा सर्वात उच्चशिक्षित जातीं मधली एक असावी - आपण टॅम ब्रॅम असल्याचा उल्लेख स्वतःहुनच  करत असतात. वर्षानुवर्षे अमेरिकेत रहाणारी मंडळीही फेसबुक सारख्या स्थळावर आपण टॅम ब्रॅम असल्याचं तुणतुणं वाजवतात.  शिक्षणानी जातीचा अभिमान आणि जातीभेद कमी होईल ही आशा त्यामुळे फोल ठरते. 

आपण कुठुन आलोय, आपली पार्श्वभूमी काय आहे, आपली खाण्याची आवडनिवड काय आहे हे लोकांना चटकन समजावं म्हणून कदाचित आपण सगळेच कळत नकळत कधीतरी जातीचा उल्लेख करत असू. भारतातल्या चक्रावून टाकणाऱ्या विविधतेत दर पंधरा -वीस किलोमीटरवर भाषा बदलते तसं वेगवेगळ्या जातींमध्ये खाद्यपदार्थ आणि ते बनवण्याची पद्धत, सणवार - व्रत वैकल्य साजरे करण्याची पद्धत वेगळी असते आणि त्याचा आपसात गप्पा मारताना उल्लेख होऊ शकतो. जी विविधता स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय एकात्मता, युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेत एकता या आदर्श अपेक्षांच्या धाग्यांनी विणलेल्या मोहक गालिचा खाली आपण खूप यशस्वीपणे झाकुन ठेऊ शकलो असं आपल्याला वाटलं ती आता इंटरनेटच्या युगात गारुड्यानी टोपली उघडताच नागानी फणा वर काढावी तशी उफाळून वर येताना दिसते. तरीही वर्तमानपत्रात एखादया जातील "उच्च जात" म्हणून का संबोधण्यात यावं ते समजू शकत नाही.  

काही दिवसांपूर्वी मैत्रिणी बरोबर बोलत होते. ती नात्यातल्या एका लग्नाला जाऊन आली होती. मला तिला विचारायचं होतं कि लग्नातल्या जेवणात काही पारंपरिक पदार्थ होते कि आजकाल सगळ्या बफे मध्ये दिसतात त्या पनीर टिक्का नी मश्रुम मसाला सारख्या आधुनिक पदार्थांची रेलचेल होती. ( मी मश्रुम आणि पनीर विरोधी नाही. चिकनचा अतिरेक झाल्यावर रेस्टोरंट मध्ये आम्ही कधीतरी पनीर टिक्का ऑर्डर केलाय. नाही असं नाही. तसंच पास्ता मध्ये मश्रुम छान लागतात, मश्रुम सूपही चांगलं लागतं, स्टफ्ड मश्रुमही चांगले लागतात. पण मश्रुम आणि मसाल्याला एकत्र आणून केलेला पदार्थ चांगला लागत असेल यावर विश्वास बसत नाही. असो).  मैत्रीण म्हणाली,  "पूर्वी आमच्या (जातीत) लग्नात मसुराची आमटी, वालाचं बिरडं हे पदार्थ हमखास असायचे पण आता ते पदार्थ लग्नाच्या जेवणात नसतात". तर अशा रितीने गप्पांच्या ओघात जातीचा उल्लेख कधीतरी येऊन जातो. पण त्यात एखादया जातीच्या उच्च - नीच्चतेचा प्रश्न नसतो. 

म्हणून ".... high caste  ... community " हा शब्दप्रयोग फार त्रासदायक वाटतो. हे वाक्य किती चुकीचं आहे याची त्या पेपरला कल्पना नसावी? एखाद्या लहान, प्रादेशिक वर्तमानपत्राकडून अशी चूक घडली तर तिकडे दुर्लक्ष करणं एकवेळ शक्य होईल. पण भारताच्या तथाकथित सिलिकॉन व्हॅली मधून प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी वर्तमानपत्रात एखादया जातीच्या पाठीमागे "high" (किंवा "low" ) caste हे विशेषण लावणं बरोबर होऊ शकतं? आपण जग फिरलेल्या, 'हे विश्वची माझे घर' मानणाऱ्या भारतीयांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्या भारतीयां इतकाच आपला दृष्टिकोनही ग्लोबल -विश्वव्यापी आहे असा आव आणणाऱ्या वर्तमान पत्राकडून हि चूक अक्षम्य वाटते. आजवर कुठल्याही मराठी वर्तमानपत्रात एवढं कास्टिस्ट, एखाद्या जातीच्या "उच्चत्वा" संबंधी इतकं उघड विधान वाचल्याचं आठवत नाही. 

विशिष्ट जातींची संमेलनं, खाद्य मेळावे आजही होत असतात. त्यात त्या जातीतील मान्यवर व्यक्तींचा गौरवही केला जातो. पण पहिल्या भेटीत विनाकारण जात विचारणं जसं अनावश्यक आहे तितकंच देशाच्या सांस्कृतिक पटलावर इतकी वर्ष भरीव कामगिरी बजावणाऱ्या नाटककाराच्या गौरवपर लेखात "high caste" या विशेषणा सहीत जातीचा उल्लेख करणं अत्यंत अनावश्यक वाटतं. उद्या समजा अमिताभ बच्चन वरील गौरवपर लेखात कोणीतरी लिहिलं कि ते अमुक एका ("उच्च"?) जातीत जन्मले होते तर समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांतुन, जगाच्या कानाकोपऱ्यातुन त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या मनावर केराचं पाणी ओतल्या सारखं होईल. 

कोणी स्वतःच्या बचावासाठी असं म्हणू नये कि - आम्ही नाही बाबा कुठल्या जातीला खालची जात म्हंटलं. आम्ही फक्त एका "उच्च" जातीत कोणकोण जन्मलं आहे एवढंच फक्त सांगितलं. हे म्हणजे वर्णद्वेष करणाऱ्यांनी - आम्ही नाही बाबा कोणाला कनिष्ठ म्हणत. आम्ही फक्त गोरे सुपिरियर आहेत एवढंच म्हणतो - असं म्हणण्या सारखं आहे. कारण एखाद्याची "उच्चता" दाखवताना दुसऱ्या कोणाची तरी "निच्चता" त्यात नेहमीच अभिप्रेत असते.   

ज्या लोकांना जातिव्यवस्थेची थोडीफार जाण आहे त्यांना कर्नाड यांच्या कुटुंबाची माहिती वाचल्यावर लगेच लक्षात येईल कि ज्या अर्थी त्यांचे वडील स्वातंत्र्य पूर्व काळात डॉकटर झालेले होते, कर्नाड स्वतः ऱ्होड्स शिष्यवृत्तीवर इंग्लंडला जाऊन शिकुन आले होते त्याअर्थी ते उच्च शिक्षित कुटुंबात जन्मलेले असणार. आणि पूर्वीच्या काळी उच्च शिक्षणाची संधी मिळणं किंवा न मिळणं हे बहुतांशी व्यक्तीच्या जन्मजातीवर अवलंबून असायचं. ज्या लोकांना जातीव्यवस्थेबद्दल ही माहिती नाही त्यानां कर्नाड यांची जात काय होती आणि ती "उच्च" होती हे समजलं नसतं तरी त्यांनी काय फरक पडला असता?

होतं काय कि एखाद्या लहान गावात रहाणाऱ्या मुलीनी "खालच्या" जातीच्या मुलाबरोबर लग्न केलं म्हणून तिच्या बापानी तिला मारलं किंवा कुठल्या तरी गावामध्ये जमिनीसाठी "वरच्या" जातीच्या लोकांनी "खालच्या" जातीतल्या दहा जणांची हत्त्या केली - अशा बातम्या पेपरात वाचल्या कि शहरातले लोक आश्चर्य व्यक्त करतात. 'हे अजूनही चालू आहे? काय अडाणी लोक आहेत,'  अशा भावनेने त्या बातम्या आपण वाचतो. पण जातींमधली उच्चनिच्चता चालू ठेवण्यासाठी शहरातली माध्यमं  कशा प्रकारे हातभार लावतात हे आपल्या लक्षातही येत नाही. त्याला आक्षेप घेणं तर लांबच राहिलं. 

बेनेगल, निलेकणी, पदुकोण यांची जात काय आहे हा प्रश्न माझ्यासकट अनेक भारतियांच्या मनात आजपर्यँत कदाचित कधी आलाही नसेल. जरी आला असला तरी तो उघड कोणाला विचारायची गरज वाटली नसेल आणि वर्तमानपत्रातुन जाहीरपणे त्यांची जात समजावी अशी कोणाची अपेक्षा नसेल. 

सगळी माणसं एका रंगाची असु शकत नाहीत आणि रंगावरून माणसांची उंच्चनिच्चता ठरत नाही हे सत्य आता जगातील बहुतेक लोकांनी स्विकारलं आहे. आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर वर्णद्वेष जोपासुन चालणार नाही हे जगभरातली माध्यमं जाणतात. अमेरिकन टीव्ही वर वर्णद्वेषाच्या बाबतीत झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली जाते. तरीही लाईव्ह टीव्ही वर चुका घडतात. नाही असं नाही. पण ज्या व्यक्तीकडून चूक घडली त्या व्यक्तीला लगोलग डच्चू दिला जातो नाहीतर (चूक थोडी कमी गंभीर असेल तर) जाहीर माफी मागावी लागते. वर्तमानपत्रात अशा चुका टाळणं सहज शक्य असतं कारण तिथे लाईव्ह काही नसतं.   

जातींमधले फरक हे वर्णातील वेगळेपणा प्रमाणे नैसर्गिक नसले तरी ते पिढ्यानपिढ्या अंगात मुरलेले आहेत. ते लवकर नाहीशे होतील अशी चिन्ह दिसत नाहीत. पण त्यातली उच्चनिच्चता नाहीशी करणं सहज शक्य आहे - जर माणसांमधली उच्चनिच्चता खरोखर नाहीशी व्हावी असं वाटत असेल तर आणि माध्यमांनी जातीच्या नावाआधी "उच्च"तेची विशेषणं लावायचं थांबवलं तर. नाहीतर वाचकांवर झिरो टॉलरन्सची भूमिका घ्यायची पाळी येईल. काळाची चक्र मागे फिरावीत आणि आपल्या पुढील पिढयांनी जातींच्या उच्चनीच्चतेला पुन्हा नव्याने बळी पडावं असं आपल्या पैकी अनेकांना वाटत नसेल. 











Friday, April 5, 2019

शनिवार सकाळ


समजा माझा मुलगा पुढे कधी कॉमेडियन झाला तर विनोद निर्मिती साठी तो बहुदा माझा वापर करेल असं वाटतं. सगळीच मुलं आपल्या आईवडिलांचा करतात. रसेल पीटर्स त्याच्या वडिलांवर विनोद करतो. पीटर्सचा बरेचदा ऐकलेला विनोद आहे: तो लहान असताना बरोबरच्या कॅनेडियन मुलांच्या नादी लागून आपल्या वडिलांना धमकी देत असे -  "तुम्ही जर मला मारलत तर मी पोलीसला फोन करेन."  त्याचे भारतीय वडील म्हणत, "अगदी खुषाल कर. तू फोन केल्यावर पोलिसांना आपल्या घरी यायला दहा मिनिट तरी लागतील. तेवढ्या वेळात मी तुझी हवी तेवढी धुलाई करू शकतो."  तू नलिकेवरची सुपर वुमन लिली सिंग आपल्या पंजाबी आईवडिलांवर विनोद करते. ती स्वतःच तिच्या आईची आणि वडिलांची भूमिका साकारते आणि छोट्या विनोदी नाट्यछटा तयार करून त्या आपल्या चॅनल वर लावते. भरपूर लोक ते आवडीनं बघतात.

तसं माझ्या मुलाकडे आताच थोडंफार मटिरियल साठलं असावं. ते त्याच्या लक्षात आलं नसेल तर काही गोष्टींची इथे नोंद करून त्याला थोडी मदत करण्याचा विचार आहे जेणे करून त्याच्या लक्षात येईल कि मी त्याच्यासाठी एक चांगला विनोदाचा स्रोत होऊ शकते. माझ्या नेहमीच्या वागण्यात त्याला विनोद आढळेल अशी आशा आहे.

होतं काय की शनिवारी सकाळी त्याला कुठे जायचं असेल तर शुक्रवारी संध्याकाळी मी त्याला म्हणते, "तुला जिथे जायचंय ना तिथे जवळच माझं थोडं काम आहे. आपण बरोबरच जाऊ."  तसं माझं काम वगैरे काही नसतं पण उगीच त्याला एकटं कशाला सोडा म्हणत मी त्याच्या मागे लागते. खुशीत, नाखुषीनं कि नाईलाजास्तव माहित नाही पण तो सहज तयार होतो.

मी वेळेची फार पक्की आहे. कुठेही जायचं असो नेहमी बोर्डाच्या परीक्षेचा पेपर असल्या प्रमाणे वेळेत हजर रहायला मला आवडतं. तीच सवय मुलाला लावायचा मी कसून प्रयत्न करतेय पण अजून तरी मला त्यात बिल्कुल यश आलेलं नाही. "ऊठ, ऊठ", हा नेहमीचा ओरडा करत कसे बसे आम्ही तयार होतो. उबर बोलावतो. उबर मध्ये बसत असताना माझ्या लक्षात येतं कि ड्रायव्हरनी त्याची सीट जरा जास्त मागे केलीय. त्यामुळे पुढच्या आणि मागच्या सीट मधलं अतंर खूप कमी झालंय.

मागच्या शनिवारी तसंच झालं, "मला पाय आखडून बसावं लागतय. त्याला सांगू कि काय सीट थोडी पुढे घे म्हणून,"  मी स्वतःशीच  पुटपुटले. मुलानं तात्काळ मला नको सांगूस म्हणून खुणावलं. आज काल सर्वसाधारणपणे सगळ्याच बाबतीत मी त्या तीन जग प्रसिद्ध माकडांसारखं डोळे, कान, आणी तोंड बंद ठेवावं अशी त्याची अपेक्षा असावी.

पाय आखडून बसावं लागल्यामुळे प्रवासात माझं मन रमेना. गाडीतला आवाज कानांना टोचू लागला. मी ड्रायव्हरला विनंती केली, " जरा रेडिओचा आवाज कमी करता का? किंवा बंद केलात तरी चालेल."  मुलाला ते आवडलं नाही पण  मी तिकडे दुर्लक्ष केलं. त्यानं गाडीत बसल्या बसल्या लगेच फोनच्या कांड्या आपल्या कानात अडकवल्या होत्या त्यामुळे त्याला रेडिओच्या आवाजाचा त्रास व्हायचा प्रश्न नव्हता.

थोडा वेळ शांततेत गेला आणि मला गरम व्हायला लागलं. बाहेर खूप थंडी असेल आणि गाडीत हिट चालू असेल तर मी ड्रायव्हरला म्हणते, " खिडकीची काच थोडी खाली करते हं. पाठीमागे गरम होतय." किंवा बाहेर थंडी नसेल आणि गाडीच्या काचा खाली असतील तर मी ड्रायव्हरला विचारते, " तुमचा ए सी बिघडलाय का? चालू करा ना. मागे फार गरम होतंय." अशावेळी मुलगा नाईलाजाने मान हलवत माझ्याकडे बघतो.

शेवटी एकदाचं आमचं उतरायचं ठिकाण आलं.  मी  मुलाला म्हंटल,  "तुझं झालं कि मला मेसेज कर, मग ठरवूया कुठे भेटायचं  ते." तो त्याच्या कामाला गेला. त्याचं काम होई पर्यंत काय करावं या विचारात मी जवळपास आमच्या सार्वजनिक वाचनालयाची शाखा, एखादं पुस्तकांचं दुकान वगैरे काही दिसतंय का ते बघितलं. काहीच दिसलं नाही. मात्र  कोपऱ्यावरचं स्टारबक्स मला खुणावत होतं. बाहेर थंडीत फिरण्यापेक्षा गरम कॉफीचे कडवट घुटके घेत उबेत बसण्याचा मोह झाला. पण मी तो मोह आवरला. त्यांच्या फ्रुट आणि चीज बॉक्सचं आजकाल मला व्यसन जडलय. बहुदा त्यामुळेच सकाळी वजनाचा काटा चार पौंडांनी वर गेला होता. उगीच तोंडात काही घालायला नको, मग तो काटा खाली येत नाही, त्यापेक्षा थोडं चाललेलं बरं असा विचार करत मी जवळच्या पार्कच्या दिशेनं चालू लागले.

वाटेत एक डिपार्टमेंटल स्टोअर लागलं. तिथे मोठ्ठ्या काचेच्या खिडकीत कपडे, चप्पल- बूट, हॅण्डबॅग्ज, स्कार्फ यांची आकर्षक मांडणी केलेली होत. माझी पावलं क्षणभर ते बघायला थबकली. खिडकीतली मांडणी बघून वाटलं पार्कमध्ये चाललं काय किंवा डिपार्टमेंटल स्टोअरच्या आत चाललं काय एकूण एकच. चालणं हे शेवटी चालणं आहे - आत काय नी बाहेर काय. पार्क मध्ये फिरायचा विचार बदलून मी दुकानातला सरकता जिना चढले .

लवकरच लक्षात आलं की पार्क मध्ये चालताना नक्कीच जास्त प्रसन्न वाटलं असतं. पण थोड्याच वेळात एकटीनं चालण्याचा कदाचित कंटाळा आला असता. एवढ्या मोठ्या दुकानात चालणं बरच तणावपूर्ण आहे - दाटीवाटीनं ठेवलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू, त्यांच्या किंमती, त्यातल्या काहींवर डिस्काउंट आहे तर काहींवर नाही, साईझ, रंग या सगळ्याची सांगड घालताना मनावर ताण पडतोय. पण वेळही पटकन जातोय.

शिवाय डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये चालत असताना आपल्या काही सुप्त इच्छा अनपेक्षितपणे पूर्ण होऊ शकतात जे पार्क मध्ये चालताना संभव नसतं. म्हणजे आपल्याला जर खूप दिवसांपासून वाटत असेल कि आपल्या बाथरूमच्या कपाटात, दात घासण्यासाठी कोळशाची पावडर असावी तर अचानकपणे छोट्याशा नाजूक निळ्या बरणीत पॅक केलेली चारकोल पावडर आपल्या समोर येते आणि आपली ती इच्छा पूर्ण होऊ शकते. किंवा तू नलिकेवरच्या व्हिडिओत जर एखादया मुलीनं अंड्याचं पांढरं चेहऱ्याला लावताना केस मागे सारण्यासाठी विशिष्ट प्रकारचा हेअर बँड वापरला असेल आणि तसा हेअर बँड आपल्याकडे नसल्या कारणानी अंड्याचं पांढरं चेहऱ्याला लावण्याची प्रक्रिया आपल्याला पुढे ढकलावी लागली असेल तर अनपेक्षितपणे तशा प्रकारचा हेअर बँड आपल्या समोर येतो आणि आपली ती इच्छाही पूर्ण होते.

दुकानात मी स्किन केअर, हेअर केअर, फूट स्क्रब, लीप स्क्रब, हेअर मास्क, फेस मास्क, बाथ बॉम्ब, शॉवर ब्लास्ट च्या चक्रव्यूहात अडकलेली होते आणि फोन वाजला. कोण ते माझ्या चालण्यात व्यत्यय आणू पहातंय म्हणून बघितलं तर मुलाचा मेसेज होता  - "माझं झालं, चल जाऊया" तो म्हणाला. त्याचं खूप लवकर आटपलं असं वाटलं म्हणून घडाळ्यात बघितलं तर एक तास होऊन गेला होता. माझं अर्ध दुकानही अजून चालून झालं नव्हतं.

मी त्याला दुकानाचा पत्ता दिला आणि दुसऱ्या मजल्यावर यायला सांगितलं. तो दुकानापाशी आला, पण बाहेरच थांबला.  मी एक -दोनदा सांगून बघितलं - "वर ये, जरा दुकानात फिरून बघ. काहीतरी सापडेल जे तुला पुष्कळ दिवसांपासून हवं आहे."  पण त्यानं नकार दिला.

मग माझा नाईलाज झाला. किती वेळ त्याला खालती उभं रहायला लावणार?  परत त्यानं कटकट केली असती. म्हणून ज्या वस्तू शॉपिंग बास्केट मध्ये होत्या त्यांचे पटकन पैसे दिले आणि मी खाली आले. आम्ही दोघे लंच-ब्रंच साठी डायनरच्या दिशेने चालू लागलो. थोडा वेळ चालल्यावर माझ्या मनात जे सलत होतं ते मी मुलाजवळ व्यक्त केलं. त्याला म्हंटलं,  "अरे, थिअरीच्या कपड्यांवर चांगला डिस्काउंट होता दुकानात, पण तुझं काम इतक्या पट्कन झालं कि मला नीट बघायला वेळच मिळाला नाही." "तू सांगितलंस हे मला दुकानातून बाहेर आल्या आल्या. परत परत तेच कितीदा सांगशील," तो कुरकुरला.

आम्ही डायनर मध्ये पोहचून खुर्चीत स्थानापन्न झाल्यावर वेटरनी कॉफीचा कप माझ्या पुढ्यात आणून ठेवला. त्या बरोबर होतं  कॉफीत घालण्यासाठी नेहमी प्रमाणे फ्रिज मधलं थंडगार दूध. माझ्या मनातली नेहमीची तक्रार नकळत ओठांतून बाहेर पडली, "या लोकांना कधी समजणार कि गरम चहा- कॉफी मध्ये नेहमी गरम दूध घालावं. फ्रिज मधलं थंड दूध घातलं कि कॉफी चटकन थंड होते आणि ती पिण्यामागचा हेतू असफल होतो." मुलानी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आपल्या सेलफोनवर लक्ष केंद्रित केलं.

मग मी स्वतःशीच थोडा संवाद साधला. माझ्या बोलण्यात तसं तथ्य आहे. अमेरिका भारता कडून सध्या बऱ्याच गोष्टी शिकते आहे - योग, ध्यान, चाय, हळदीचा वापर, अश्वगंधा, ब्राम्ही सारख्या जडीबुटींचा वापर (दात चकचकीत करण्यासाठी कोळशाच्या पुडीचा वापर). पण काही गोष्टी अजूनही शिकणं बाकी आहे. त्यातली एक म्हणजे गरम चहा- कॉफीत नेहमी गरम दूध घालायचं असतं आणि दुसरं म्हणजे माशांचे तुकडे नेहमी पातळ कापायचे असतात.  सामन, किंग फिशचे काप एवढे जाड कापुन ठेवतात कि तळताना ते बाहेरून पटकन शिजले जातात पण आतुन कच्चे रहातात. आतून शिजायची वाट बघत बसलं कि बाहेरून जास्त शिजतात. एवढी साधी गोष्ट या लोकांना का समजत नाही माहित नाही. मुंबईतल्या कुठल्याही मासळी बाजारातली कुठलीही कोळीण सहज शिकवू शकेल कि माशांचे काप पातळ कसे कापावेत.

कोळणींवरून आठवलं- मुंबई कितीही बदलली तरी एक गोष्ट कायम म्हणजे कायम...अगदी कायम मुंबईत टिकावीशी वाटते ती म्हणजे आपली आन- बान -शान आणि पहचान असलेल्या आपल्या कोळणी आणि आपले मासळी बाजार. कोळणी आता पूर्वीसारख्या दारावर मासळी विकायला येत नाहीत असं म्हणतात. दारोदार फिरून मासळी विकायची जरूर त्यांना आता भासत नाही हि चांगली गोष्ट आहे. प्रभादेवीतल्या आमच्या इमारतीत फेरीवाल्या विक्रेत्यांना प्रवेश नाही आणि इमारतीतले जे काही थोडे लोक मासेहारी आहेत ते मासळी बाजारात जातातच असं नाही. सुपर मार्केटमधून मासे आणतात. सिध्दीविनायक कृपा करो आणि मुंबईतले मासळी बाजार आणि त्यातलं कोळणींच स्थान अबाधित राहो...  डायनरच्या एग्ज बेनडिक्टचा आस्वाद घेत मी सिटी लाईट पासून सुरवात करून, अगर बझार ते प्रभादेवी अशा सगळ्या मासळी बाजारात एक चक्कर मारून आले.

अर्ध्या वाटेवर आलोच होतो म्हणताना जेवण झाल्यावर डायनर मधून आम्ही चालत घरी आलो. हवा छान होती. स्प्रिंग जवळपास सुरु झालाय. थंडी तर होंती पण ऊन पडलं होतं त्यामुळे जाणवत नव्हती. वाय त्याच्या फॅन्टसी बास्केट बॉल बद्दल काहीतरी सांगत होता. गप्पांच्या ओघात घरी कधी पोहोचलो समजलंच नाही. आणलेल्या वस्तू कपाटात ठेवताना लक्षात आलं एक फार मोठ्ठा घोळ झालाय. शॅम्पू- कंडिशनर-जेल-सिरम- मूस च्या घोटाळ्यात कोरड्या केसांचा कंडिशनर घ्यायच्या ऐवजी चुकून मी तेलकट केसांसाठीचा कंडिशनर आणला...आता परत जाऊन तो बदलून आणण्या शिवाय गत्यंतर नाही. तरी नशीब मुलाला पुढच्या शनिवारी परत तिथे जायचय.  मलाही त्याच्या बरोबर जाता येईल. नाहीतर दहा डॉलर्सचा कंडिशनर बदलून आणायला वीस डॉलर्स उबरचा खर्च असं उलट  गणित झालं असतं.

पुढल्या वेळी मात्र मी अजिबात मास्क, स्क्रब, लोशनच्या भोवऱ्यात अडकणार नाही. दुकानात शिरल्यावर इकडे तिकडे काय मांडून ठेवलंय ते न बघता सरळ जाऊन फक्त कंडिशनर बदलून घेणार आणि गेल्या पावली परत फिरून पार्क मध्ये चालायला जाणार...  किंवा थिअरीचे कपडे काही उरले असतील सेल मध्ये तर तेवढेच फक्त बघीन.. .बस ...  आवडलं तर एखादं- दुसरं काहीतरी घेईन.. बस्स. आणि मग लगेच पार्क मध्ये चालायला जाईन. पाऊस नाही पडला म्हणजे नशीब... नाहीतर परत स्टारबक्स खुणावेल.


yesheeandmommy.blogspot.com 

















वाय जर कॉमेडियन झाला तर त्यानं अत्यंत सट्ल कॉमेडी करावी अशी माझी ईच्छा आहे. अगदी सट्ल,  टंग इन चीक म्हणतात तशी. लाऊड बिल्कुल नाही पण तरीही सभोवतालच्या गोष्टींवर खोल भाष्य करणारी. मींडी कलिंग चा एक जोक वाचला होता. तो मला मजेशीर तरीही खोल वाटला. तीचं पूर्ण आडनाव चोकलिंगम.  ते छाटून तिनं कलिंग केलय. एकदा ती दागिन्यांचं प्रदर्शन बघायला गेली. तिथे एक कानातले डूल तिला खूप आवडले. त्याविषयी ती म्हणाली  - ते डूल फार सुंदर होते. अमल क्लुनी जर विधवा झाली तर तिला भेटायला जाताना घालून जाण्यासारखे होते.  किंवा पुलं चा जोक-  ते सुनिता बाईंना एकदा म्हणाले - आपल्या घरात मी एकटाच देशपांडे आहे, तू उपदेशपांडे आहेस.