Sunday, December 4, 2022

सेलेब्रिटींचे आजार


"ख्रिस हेम्सवर्थला अल्झायमर्स झालाय." मुलानं सनसनाटी बातमी दिली. 

"कोण तो?" मी ते नाव कधी ऐकलं नव्हतं. 

"सिनेमा नट आहे". 

"वय काय असेल त्याचं? " 

"३९."

"एकोणचाळीसाव्या वर्षी अल्झायमर्स? अरली ऑनसेट - लवकर होणाऱ्या अल्झायमर्ससाठी सुद्धा एकोणचाळीस जरा जास्तच तरुण वय वाटतं."

माध्यमांच्या पूर्णपणे आहारी गेलेले असल्यामुळे महामारीच्या काळात त्यांनी पुरतं घाबरवून सोडलेली ही पिढी आहे. मुलाला ती बातमी ऐकुन धक्का बसलेला दिसला. म्हणून मी थोडा गुगल सर्च केला. 

"म्हणजे त्याला अल्झायमर्स अजुन झालेला नाही पण त्याच्या शरीरात तो जीन आढळला आहे ज्यामुळे त्याला तो होऊ शकेल." मुलानं सावकाश खरी बातमी सांगितली. 

"दोन्ही मध्ये खूप फरक आहे, बाबा! एखाद्याला खरोखर एखादा आजरा झालेला असणं आणि तो होऊ शकेल असं दर्शवणारा जीन शरीरात सापडणं यात जमीन -अस्माना इतकं नसलं तरी फार अंतर आहे. दोन्हीची अशी गल्लत करू नकोस. "  या विषयी जे थोडंफार वाचलेलं आहे ते मी त्याला सांगितलं 

कुठल्यातरी मालिकेतील कामाचा भाग म्हणून हेम्सवर्थनी ज्या चाचण्या करून घेतल्या त्यात असं आढळलं कि त्याच्या मध्ये ApoE4 या जीनच्या दोन कॉपी आहेत - एक आई कडून आणि एक वडिलांकडून आलेली -  ज्याच्यामुळे त्याला अल्झायमर्स होण्याची शक्यता तो जीन शरीरात नसलेल्या लोकांपेक्षा आठ ते दहा पटिनी जास्त आहे. 

हेम्सवर्थच्या आजोबांना अल्झायमर्स झाला आहे. त्याच्या दृष्टीने हि बातमी चिंताजनक आहे. त्यानं सध्या कामापासुन थोडी रजा घेतली आहे. तो घरी ऑस्ट्रेलियाला परत जाऊन आपल्या परिवारासोबत वेळ घालवणार आहे. त्याला अल्झायमर्स झालेला नाही. तो होऊ नये म्हणून तो शारीरिक आणि मानसिक विश्रांती, योग्य आहार, आणि व्यायाम यावर लक्ष केंद्रित करणार आहे असं बातमीत म्हंटलं होतं. 

ते वाचल्यावर माझी पहीली प्रतिक्रिया अशी होती कि ... here we go again!  हेमस्वर्थ जर जगभर - खास करून तरुणांच्या मध्ये लोकप्रिय असेल तर जगभरातील जनतेचं लक्ष आता अल्झायमर्स कडे वेधलं जाणार. त्याच्या वयाच्या अनेक तरुणांना वाटणार कि आपणही ती तपासणी करून घ्यायला हवी कि काय? 

या आधी एकदोनदा असं घडलं आहे. कोलनॉस्कपी टेस्ट कशी प्रसिद्ध झाली ते मी बघितलं आहे. न्यूयॉर्क मध्येच त्याची सुरवात झाली. 

केटी कुरिक (Katie Couric) ही NBC टीव्ही च्या The Today show या सकाळच्या कार्यक्रमाची पूर्वीची सह -सूत्रसंचालक. अमेरिकन टीव्ही वरचं मोठं नाव. अनेक महत्वाच्या घटनांच - ऑलिंपिक खेळ, ब्रिटिश राजघराण्यातील महत्वाचे प्रसंग, अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षांचे शपथविधी याचं रिपोर्टींग तिनं Today show साठी तिच्या को - अँकर बरोबर केलं आहे. न्यूयॉर्क मध्ये रहाते. तिचा नवरा वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी कोलन कॅन्सरनी वारला. 

नवरा गेल्यावर केटीनी आतड्याच्या कर्करोगा विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी स्वतःला वाहुन घेतलं. वेगवेगळ्या कार्यक्रमां मध्ये पाहुणी म्हणुन जाऊन त्या विषयी ती बोलू लागली. कोलनॉस्कपी करून घेण्याचं आव्हान लोकांना करू लागली. लोकांची त्या चाचणी बरोबर  - ज्याच्यामुळे आतड्यातील कॅन्सर सुरुवातीलाच सापडू शकतो - ओळख व्हावी म्हणून तिनं स्वतः ती चाचणी करून घेतली आणि ती आपल्या कार्यक्रमात दाखवली. 

लॉस अँजेलिस मध्ये दुसऱ्या एका वाहिनीवर रात्रीचा शो करणाऱ्या एका कमिडियन सोबत त्याच्या कोलनॉस्कपीला गेली. त्यानं त्याचं चित्रिण स्वतःच्या शो मध्ये दाखवलं. अशा प्रकारे आतड्याच्या कर्करोगा पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जागरूक रहाण किती महत्वाचं आहे हे लोकांना पटवुन देण्याचं काम केटीनी गेली वीस वर्ष केलं. 

मागच्या महिन्यात तिनं जाहीर केलं कि तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. पहिली स्टेज आहे. तिचा एक मॅमोग्रॅम - स्तनात कॅन्सरची सुरुवात होत आहे का हे दर्शवणारी चाचणी- हुकला त्यामुळे कॅन्सर झाला असं स्पष्टीकरण तिनं दिलं. 

मॅमोग्रॅमचं प्रस्थ आता फार वाढलं आहे. मनोरंजनाच्या व्यवसायातील खासकरून टेलिव्हिजन वरील कामामुळे घराघरात पोहचलेल्या अनेक प्रसिद्ध महिला ती तपासणी करून घेण्याचं महिलांना आव्हान करतात. ठराविक वयानंतर - मासिक पाळी गेल्या नंतर किंवा जायची वेळ जवळ आल्यावर - महिलांनी नियमित मॅमोग्रॅम करून घ्यावा असा सल्ला डॉक्टर्स देतात. आपल्या आरोग्याविषयी तुम्ही जबाबदारीनं वागत आहात याचं ते एक चिन्ह आहे असं महिलांच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न होतात. 

मॅमोग्रॅम हि एक टेस्ट आहे. ती नेहमी अचूक असतेच असं नाही. ती केल्याने स्तनाचा कर्करोग होत नाही असंही नाही पण नियमित ती चाचणी करत राहिलं तर तुमच्या स्तनाच्या आत काय चाललंय यावर लक्ष ठेवणं डॉक्टरांना शक्य होतं. काही अंतर्गत - सहजासहजी बाहेरून न जाणवणारे - बदल आढळले तर डॉक्टर पुढील चाचण्या किंवा उपचार सुचवु शकतात असं म्हणतात. 

तरीही एक मॅमोग्रॅम करायचा राहीला आणि पुढच्या वेळी केला तर कॅन्सर सापडला हे केटीचं स्पष्टीकरण बुचकळ्यात टाकणारं आहे. त्या चाचणीची एवढी भीती स्तनाच्या कर्करोगाला आहे कि जोपर्यंत नियमित मॅमोग्रॅम करताय तोपर्यंत तो दिसुन येत नाही पण एकदा जरी ती टेस्ट चुकली तर लगेच पुढच्या चाचणीत कॅन्सर झाला आहे असं दिसुन येऊ शकतं असा काहीतरी अर्थ त्या स्पष्टीकरणातुन निघतो कि काय असं वाटतं.  

                                                                                   *****

काही दिवसांपूर्वी हेअर सलॉन मध्ये माझ्या शेजारी एक बाई बसली होती. साधारण साठपासष्ठच्या आसपासचं वय असेल. तिच्या बरोबर तिचा कुत्रा होता. सोनेरी केसांचा, लहानसा. त्याला ती सारखी, "मम्बाय एका जागी बस, मम्बाय इकडेतिकडे फिरू नकोस," असं म्हणत होती. सहाजिकच मी विचारलं, "हे नाव कुठून आलं?" ती म्हणाली, "गेली पंधरा वर्ष मी नियमित भारतात जातेय. त्यातही मम्बायला जायला मला जास्त आवडतं." 

मम्बायचं कोणीतरी भेटल्यामुळे ती फार खूष झाली. कौतुकाने आपल्या एकदोन प्रसिद्ध भारतीय मित्रांची नावं सांगितली  - त्यातला एक डिझायनर, दुसरा शेफ. राजेशाही फेटा घातलेला कुत्र्याचा फोटो दाखवला. 

ती उत्साहानी बोलत होती आणि फोटो दाखवत होती पण मधुनच तिच्या मनातली काळजी बोलण्यातुन व्यक्त होत होती. दुसऱ्या दिवशी तिला कोलनॉस्कपीसाठी जायचं होतं. "ऑगस्ट मध्ये केली होती. खरतर एवढ्या लगेच परत करत नाहीत. मध्ये काही वर्ष जाऊ देतात. पण मागच्या टेस्ट मध्ये डॉक्टरांना काहीतरी शंका आली म्हणून त्यांनी नोव्हेंबर मध्ये परत करायला सांगितली." 

केस आणि नखं रंगवुन घेऊन ती टेस्टसाठी जय्यत तयार होत होती पण काळजीत होती. बुधला भरून काहीतरी द्रव्य टेस्टच्या आधी प्यायला दिलंय म्हणाली. ऑगस्ट मध्ये टेस्ट केलीस ती काही त्रास होत होता म्हणून कि काही होत नसलं तरी चाचण्या करून घ्याव्यात या सल्ल्याचा परिणाम म्हणून हे तिला विचारायचं राहून गेलं.  

                                                               *****

ब्रेस्ट कॅन्सरच्या जीनचं नाव आहे BRCA. त्याला ब्रॅका असंही म्हणतात. त्याचे ब्रॅका १ आणि ब्रॅका २ असे प्रकार आहेत. 

हॉलिवुड मधली नटी अँजलिना जोली मध्ये ब्रॅका १ या जीनचं म्युटेशन आढळलं आहे. तिला असं वाटतं कि त्या जीन मुळे तिला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता ८७ टक्के आहे तर ओव्हेरियन कॅन्सर होण्याची शक्यता ५० टक्के आहे. म्हणून तिनं २०१३ साली डब्बल मॅस्टेक्टमी - दोन्ही  स्तन काढुन टाकण्याची शस्त्रक्रिया करून घेतली. त्या जागी अर्थातच खोटे बसवले असतील. तशा प्रकारची शस्त्रक्रिया झाल्यावर ते बसवतात. 

पण त्या क्षेत्रातील काही तज्ञांना तिचा हा  - कर्करोग झालेला नसतानाही तरुण वयात धडधाकट स्तन काढुन टाकण्याचा निर्णय मुर्खपणाचा वाटला. तिचं बघुन बऱ्याच महिलांनी ब्रॅका जीन आपल्यात आहे का ते जाणुन घेण्यासाठी विनाकारण जेनेटिक टेस्टिंग करून घेतलं असं ब्रिटिश मेडिकल जरनल (BMJ) नी केलेल्या (२०१७) पहाणीत आढळलं. त्याला अँजलिना इफ़ेक्ट म्हणतात. 

जोलीची आई स्तनाच्या कर्करोगाने गेली. माझ्या मुलांसाठी - त्यांना त्यांच्या आईचा सहवास दीर्घकाळ मिळावा यासाठी मी काहीही करीन असं काहीसं कारण तिनं दोन्ही निरोगी स्तन काढुन टाकण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. 

पूर्व युरोपातील अष्कनाझी ज्यू महिलांच्या मध्ये ब्रॅका जीन आढळण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. माझ्या मुलाच्या एका मित्राच्या आईनी काही वर्षांपूर्वी ती जेनेटिक टेस्ट करून घेतली. तिचे पूर्वज अष्कनाझी ज्यू होते म्हणून केली का तिच्या परिवारात कोणाला तरी तो आजार झाला होता म्हणुन केली ते आता मला आठवत नाही.  

तिच्यात ब्रॅका जीन आढळला. त्यानंतर तिनं फेसबुक वर पोस्ट लिहिली कि मला आता खुप कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे कि कॅन्सर झालेला नसताना कदाचित तो होऊ शकेल असे दर्शविणारा जीन शरीरात सापडला आहे या भीतीपोटी दोन्ही स्तन काढून टाकायचे का? काही आठवडे विचार केल्यावर तिनं रॅडिकल मॅस्टेक्टमी न करण्याचा निर्णय तेंव्हा घेतला होता. 

डब्बल मॅस्टेक्टमी, रॅडिकल हिस्टरेक्टमी - महिलांच्या जननेंद्रियांशी निगडीत आजरांवर करण्यात येणारे हे प्रचलित - उपचार असं म्हणता येणार नाही कारण या शस्त्रक्रिया केल्याने ही इंद्रिय आजार- मुक्त होत नाहीत (स्त्री त्या इंद्रियां पासुन मुक्त होते) पण ते आजार वाढू नयेत म्हणून करण्यात येणारी ती टोकाची उपाय योजना असते असं म्हणता येईल. या आजारांचं प्रमाण जगभर वाढत आहे का ते माहीत नाही. पण रॅडिकल हिस्टरेक्टमी - पूर्ण गर्भाशय काढुन टाकण्याची शत्रक्रिया भारतात जितकी सर्रास करण्यात येते तितकी सहज ती अमेरिकेत केली जात नाही. भारतात मूल होण्याचं वय उलटुन गेलेल्या महिलांच्या तोंडून, "पिशवी काढुन टाकली" हे त्यामानाने जास्त ऐकायला मिळतं. 

                                                                                  *****

लहान मुलांच्या कॅन्सरवर उपचार करणारं एक रुग्णालय आहे. कर्करोगग्रस्त मुलांवर तिथे मोफत उपचार होतात असं म्हणतात. त्या रुग्णालयाची जाहिरात वारंवार यु ट्यूब वरच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये येऊन टपकते. जाहिरातींचा ढांचा ठरलेला असतो - कॅन्सर किंवा ट्युमर झालेलं लहान मुलं आणि त्यांचे आईवडील त्या आजराविषयी बोलत असतात. त्या रुग्णालयात किती चांगले उपचार मुलाच्या आजारावर झाले याचं वर्णन करतात.  

रुग्णालयाला छोटीशी देणगी दिली तरी आणखी देणगी मागणाऱ्या पत्रांचा आणि फोनचा पाऊस सुरु होतो. पत्रांचा सुरही जाहिरातीं सारखाच असतो. तान्ह्या बाळा पासुन ते मोठ्या मुलांपर्यंत त्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलांची कहाणी फोटो सहीत छापलेली असते. अशा प्रकारचं अग्रेसिव्ह फ़ंड रेजींग बघुन प्रश्न पडतो कि लहान मुलांना होणाऱ्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे का रुग्णालयाला आपला विस्तार वाढवायचा आहे. हा कोंबडी आधी कि अंडं आधी सारखा प्रश्न आहे. 

तोच प्रश्न मेडिकल devices बनवणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीतही पडतो: कंपनीची वाढ होण्यासाठी नफा कमावायला हवा. तो कमवायचा म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर मात करून आपल्या उत्पादनांचा खप वाढवणं आलं. त्यासाठी मार्केटिंग करणं आलं ...जितक्या जास्त रुग्णांवर ती डिव्हायसेस वापरली जातील तेवढी व्यवसायात वाढ होणार.  

                                                                           ***** 

सलॉन मध्ये गेल्यावर जो तरुण मुलगा माझ्या केसांची देखभाल करतो त्याला नुकतच अनके चाचण्यांमधून जावं लागलं. त्याला पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. सात वर्षांपूर्वी झाला होता. आता पुन्हा झाला. सात वर्षांपूर्वी कोलनॉस्कपी, एन्डोस्कपी सारख्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात काही सापडलं नाही. या वेळीही तसंच झालं. 

शोधा म्हणजे सापडेल - जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत शोधत रहायला हवं या उद्देशाने आता त्याला कॅप्स्यूल एन्डोस्कपी करून घ्यावी लागणार आहे. ज्यात कॅप्स्यूलच्या आकाराचा लहान वायरलेस कॅमरा रुग्णाला गिळावा लागतो. कॅमरा पचन मार्गातुन जात असताना त्या भागाचे हज्जारो फोटो काढतो आणि चुकुन गिळलेली चिकूची बी जशी शरीरातुन बाहेर पडते तसा बाहेर पडतो. जर त्या मार्गाने बाहेर नाही पडला तर काय होतं? जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तर उपलब्ध आहेत तिथेच या प्रश्नाचही उत्तर मिळू शकतं.  

या चाचण्या सर्दी- खोकला-ताप आला आहे म्हणून रक्त तपासणी करून घेतली - इतक्या साध्या अर्थातच नसतात. त्या करताना रुग्णाला पूर्ण भूल द्यावी लागते. 

सात वर्षांपूर्वी या अनुभवातुन गेल्यामुळे रक्तस्रावामागे काय कारण असावं याचा त्याला थोडा अंदाज आहे. तो मुळचा युरोप मधला आहे. तिकडे त्याची आज्जी गंभीर आजारी आहे असं त्याला समजलं. आज्जीनच त्याला लहानाचं मोठं केलं. तिला भेटायला जायची तयारी करत होता तेवढ्यात ती गेल्याची बातमी आली. त्याचवेळी त्याचा रक्तस्त्राव उदभवला. 

तो खूप संयमाने हे सांगत होता. कोलनॉस्कपीसाठी तयार होणारी महीला जितकी चाचणीच्या निदाना बद्दल काळजीत होती (वेगळ्या सलॉन मध्ये, वेगळ्या दिवशी तीची भेट झाली होती) तितकी काळजी तो व्यक्त करत नव्हता. पण मला मात्र वाटलं की त्यानी पथ्यपाणी आणि त्याच्या आहाराव्यवहारात बदल केला नाही, नुसतच टेस्ट आणि डॉक्टरांच्या औषधांवर अवलंबुन राहीला तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या - काही वर्षांनी परत कदाचित याच दिव्व्यातुन जावं लागेल.







Saturday, November 12, 2022

बालदिन

 

हालोवीन 






दरवर्षी ३१ ऑकटोबरला हालोवीन साजरा होतो. तो का साजरा केला जातो आणि त्या दिवशी जी सजावट करतात त्यामागे काय अर्थ असतो हे मला अजूनही नीटसं समजलेलं नाही. चित्रविचित्र पोशाख करून तरुण हालोवीन पार्ट्या साजऱ्या करतात आणि लहान मुलं दारोदारी कँडी मागत फिरतात. मग बास्केटभर कँडी घरी येऊन पडते. तिचं काय करायचं? ती संपवायची कशी? खाल्ली तर आरोग्याला घातक नाही खाल्ली तर एवढी चांगली चॉकलेट्स फेकुन कशी द्यायची या मनाच्या नको त्या दोलायमान अवस्थेत पुढील काही आठवडे त्या बास्केटकडे बघत घालवावे लागतात. एवढंच हालोवीनच स्वरूप मला आजवर न्यूयॉर्क मध्ये दिसलं आहे. 



 


भारतात पूर्वी खरेखुरे भिकारी होते जे घरोघरी जाऊन भीक मागत असंत. तेंव्हा बैठी घरं जास्त आणि बंद दारांची फ्लॅट पद्धत कमी होती. आमच्या कडे जो भिकारी यायचा - कधी तो यायचा तर कधी त्याची बायको आणि लहान मुलं यायची- तो रात्री साधारण नऊसाडेनऊच्या सुमारास लोकांची जेवणं झाली कि त्याची फेरी सुरु करायचा. घरातलं उरलेलं अन्न त्यांना दिलं जायचं. आमच्याकडे ते काम माझं असायचं. त्यातलं पातळ आमटी, भाजी, भात वगैरे तो त्याच्या जवळच्या भांड्यात घेत असे. चपाती सारखे सुक्के पदार्थ खांद्याला लटकणाऱ्या कापडाच्या झोळीत टाकायला सांगायचा. वेगवेगळ्या घरातली भाजी, आमटी आणि कढी तो एकाच पातेल्यात कसा काय घेतो याचं लहानपणी मला फार आश्चर्य वाटायचं.  



                                                


ते दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे झोळी नाही तरी बास्केट घेऊन माझ्या मुलानी दारोदारी कँडी मागत फिरावं हे मला फारसं कधी पटलं नाही. मित्रांच्या संगतीनं त्यानं जे काही ट्रिक ऑर ट्रीटींग केलं असेल तेवढंच. 

भारतातही आता हालोवीन साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे असं दिसतं. तो साजरा करण्यामागचं कारण जाणुन घेऊन हे होत असेल तर बरं नाहीतर केवळ त्याचं बाजरी रूप साजरं होतं- त्याच्याशी निगडीत व्यवसायिकांच्या फायद्यासाठी - चित्रविचित्र पोशाख आणि कँडी विकणारे आणि अति कँडी खाऊन दात खराब झाले कि दंतवैद्य. 






आयुष्यात ज्या गोष्टींची भीती वाटू शकते त्याची खेळीमेळीत लहान मुलांना ओळख करून द्यावी हा उद्देश तर हालोवीन साजरा करण्यामागे नसेल? जसं महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय भयनाट्याचा  -horror show- तेथील सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम झालाय याचं प्रतिबिंब न्यूयॉर्क मधील हालोवीन सजावटीत मला यंदा दिसलं: 



राज्यात जे काही चाललंय त्यावर या दोघांचा अजूनही विश्वास बसलेला नाही.



काही लोक खूप हतबल झाले आहेत.  



हे दोघे एसटीची वाट बघत बाकावर बसले होते. तेवढ्यात
भयनाट्य सुरु झालं. तेंव्हा भीतीने ते इतके गलितगात्र झाले
कि बसमध्ये चढण्याचं त्राण त्यांच्या अंगात उरलं नाही.  



भयनाट्य सुरू झाल्यापासुन चालू झालेला
या महीलेचा आक्रोश अजून थांबलेला नाही 



काही लोक इतके प्रचंड गोंधळात पडले आहेत कि कुंपणाच्या
 या बाजूला उतरावं कि पलिकडे उडी घ्यावी कि कुंपणावरच
बसुन रहावं हे त्यांना समजेनासं झालं आहे.  



ह्याने स्वतःला चक्क दिव्याला टांगून घेतलं आहे. 
"मी सत्याग्रह करतोय, भयनाट्य संपे पर्यंत असाच
लोंबकळत राहीन " असं तो म्हणतो.  



सत्याग्रहाचा आणखी एक प्रकार: भयनाट्य संपल्याशिवाय 
स्वतःला श्रुंखलामुक्त करणार नाही असं याचं म्हणणं आहे. 



या दोघी काय म्हणतायत ते त्यांचं त्यांनाच माहीत. 



बालदिन 


१४ नोव्हेंबरला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदीवस असतो. तो बालदिन म्हणूनही ओळखला जातो. आता माहित नाही पण पूर्वी बालदिन साजरा करण्याची पध्द्त खूप साधी सोज्वळ होती: लहान मुलांच कौतुक होत असे आणि गुलाबाच्या फुलांना महत्व असायचं. दोन्ही पंडीत नेहरूंना आवडायचं असं म्हणतात. चाचा नेहरू या टोपणनावाने ते ओळखले जात. त्यांच्या कुडत्याच्या खिशात गुलाबाचं फुल खोवलेलं असायचं. थडगी, भुतंखेतं, कवट्या, हाडांचे सापळे त्या दिवसाच्या साजरी करणा मध्ये लहान मुलांच्या जवळपास दिसंत नसंत.  






नेहरुंच्या पूर्वजां विषयी निरनिराळी नविन माहिती देणारे संदेश समाज माध्यमां मध्ये बघण्याची आता आपल्याला सवय झाली आहे. काही लोक त्या माहीतीवर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत आणि काहींना वाटतं कि ती माहीती खरी असली काय किंवा नसली काय त्यानं आता काही फरक पडत नाही. पण एका बाबतीत खरतर सर्वांमध्ये सहमती व्हायला हरकत नसावी कि त्या संदेशांमध्ये मध्ये भाषेच्या खूप चुका असतात. लेखनाच्या चुका असतात. व्याकरणाच्या चुका असतात. लेखकाचं नाव नसतं. ती माहीत कुठल्या पुस्तकातुन किंवा लेखातुन घेण्यात आली आहे याचा काही संदर्भ नसतो. लिहिणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता काय आहे, तो संदेश लोकांना पाठवण्या आधी त्यांनी स्वतः एकदा वाचून तरी बघितला होता का कि दुसऱ्या भाषेत लिहिलॆल्या मूळ संदेशाचं ते संगणकांनी केलेलं धेडगुजरी मराठी भाषांतर आहे असा प्रश्न पडतो. तरीही शिकले सवरलेले लोक ते संदेश दुसऱ्यांना पाठवायला कचरत नाहीत. 






लहान मुलांची आवड असणाऱ्या चाचा नेहरुंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यावर देशाला जी दिशा दिली त्याचा देशातील निम्न आर्थिक स्तरातील लहान मुलांना किती फायदा झाला याची पुरेशी उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. नेहरू स्वतः ऍरिस्टोक्रॅटीक श्रीमंत घरात जन्मलेले होते. इंग्लंडच्या महाविद्यालयात शिकले होते. ते भारताला इंग्लड - अमेरिकेच्या मार्गाने नेऊ शकले असते. त्यांनी तसं केलं नाही. 

बहुतेक भारतीय ज्या दोन देशांना आदर्श मानतात, त्यांचा कित्ता गिरवु पहातात त्या इंग्लड आणि अमेरिकेत एखादी व्यक्ती जर त्या देशातील अतिशय महाग विद्यापिठात शिकलेली नसेल तर त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघू शकत नाही. तो विचारही मनात आणू शकत नाही. इंग्लडचे नविन पंतप्रधानही त्याचंच उदाहरण आहेत. ज्या प्रतिष्ठित विद्यापीठातुन मिळवलेल्या पदव्या त्यांच्या नावामागे आहेत त्या जर नसत्या तर ते पंतप्रधान पदाच्या जवळपास पोहचू शकले नसते. 


                                                             
                                                               


भारतात मात्र सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतुन आलेली, शाळाकॉलेजात न शिकलेली व्यक्ती पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनु शकते. हा काही गेल्या दहापंधरा वर्षातील शासकीय धोरणांचा परिणाम नाही. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जे वातावरण देशात निर्माण झालं, लोकशाहीची पाळंमुळं रुजवण्यात आली त्याचा हा परिपाक आहे. 

अजून खूप काही प्रगती करायची बाकी असेल पण जी झाली आहे ती कमी नाही. स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा देशात किती गरिबी होती हे त्या काळातील कृष्णधवल फोटो बघितले की लक्षात येतं. ते फोटो बघवत नाहीत.  

भारतातून उच्च शिक्षण घेऊन गेलेले लोक परदेशात जाऊन स्थायिक होतात असा आरोप पूर्वी केला जात असे. आता तो मुद्दाच उरलेला नाही. जगभर कोणीही कामानिमित्त कोठेही जाऊन राहु लागलं आहे.  

जगातील अनेक मोठ्या अंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुख पदी आज भारतातून शिकून गेलेली, इथल्या मध्यम वर्गातील घरात वाढलेली मुलं आहेत. भारतीय लोकांना त्यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांच्या नावांची लांबलचक यादी समाज माध्यमांमध्ये फिरते. माध्यमांमध्ये त्यांचा उदोउदो होतो. हे ही काही गेल्या दहापंधरा वर्षात घडलेलं नाही. कमीत कमी दोन पिढयांना  - आज उच्च अधिकार पदावर बसलेल्या या व्यक्ती आणि त्यांचे आईवडील - यांना शिक्षणाच्या ज्या संधी उपलब्ध झाल्या, उज्वल भविष्याची स्वप्न बघता आली त्याचं हे फळ आहे.  






परवाच्या बालदिनी सध्याचे माननीय मुख्यमंत्री राज्यातील लहान मुलांना योग्य मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे. त्यांनी आपल्या दिवंगत नेत्यांकडून खूप काही घेतलं आहे. आनंद दिघेंच्या आयुष्यावरील चित्रपटामुळे ते प्रकाशझोतात आले. दिघे आता हयात नाहीत. जर असते तर त्यांनी पक्षाविरुद्ध बंड केलं असतं का? किंवा बंड करायला परवानगी दिली असती का? हे आपल्याला कधी समजणार नाही. नंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचं उपनाव म्हणून बाळासाहेबांचं नाव निवडलं. बाळासाहेबही आज हयात नाही. हयात असते तर अशा प्रकारे आपलं नाव वापरायला त्यांनी परवानगी दिली असती का या प्रश्नाचं उत्तर उघड आहे.  
                                                        
मी तुमच्या कडून काय वाट्टेल ते घेणार, तुम्ही कोण मला अडवणार? हि वागणूक दिवसेंदिवस समाजात वाढताना दिसते. त्यातून लहान मुलांना खूप चुकीची उदाहरणं समोर दिसतात. देशातील आणि समाजातील चांगले नागरिक म्हणून कशा प्रकारे वागावं याचं मार्गदर्शन मोठ्यांकडून लहान मुलांना मिळालं नाही तर कुठून मिळणार?



All photos are from Halloween'22 in New York









Monday, September 26, 2022

गोष्ट एका लग्नाची


हि एका लग्नाची काल्पनिक गोष्ट आहे. याचा वास्तवाशी काही संबंध नाही. या गोष्टीतील व्यक्तिरेखांचं राजकारणातील काही पात्रांशी साधर्म्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा. 

काही वर्षांपूर्वी दोन प्रेमी जीवांनी दादरच्या वनिता समाज मध्ये लग्नगांठ बांधली. त्या लग्नाचा मुहूर्त निवडण्यापासून ते कार्यालय बुक करण्या पर्यंत सगळं माझ्या आईनी केलं. तिचा त्या लग्नाशी काय संबंध होता मला माहित नाही. 

पूर्वी दादर मध्ये दोन मोठी मराठी महिला मंडळं होती (अजूनही असतील कदाचित). : दादर (पूर्व) मध्ये हिंदू कॉलनीत भगिनी समाज होता...जिथे माझी मावशी जायची आणि दादर (पश्चिम) मध्ये शिवाजी पार्क समोर समुद्राच्या बाजूला वनिता समाज होता -जिथे कधी काही चांगले कार्यक्रम असले तर माझी आई आमच्या शेजारच्या इमारतीत रहाणाऱ्या जोशी काकूं बरोबर ते बघायला जायची. 

आईला वनिता समाज मधील लग्नाच्या हॉलचं फार कौतुक होतं. त्या काळात दादर मध्ये रहाणाऱ्या मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीय मराठी घरातील मुलांची लग्न वनिता समाज मध्ये होत असंत. महिनों महिने आधी ते कार्यालय बुक करावं लागायचं. वनिता समाज मध्ये मुलांचं लग्न होणं हे दादर मधल्या पालकांना त्यांच्या प्रतिष्ठेचं चिन्ह वाटायचं. निदान माझ्या आईला तरी वाटायचं. 

त्यामुळे अपूर्व आणि पद्मा यांच्या विवाह समारंभासाठी तिने अर्थातच वनिता समाजातील मंगल कार्यालयाची निवड केली. 

शिवाजी पार्कच्या जवळ रहात असुनही आणि नियमित वनिता समाजात कार्यक्रमांना जात असुनही, पार्क मध्ये दसऱ्याला काय होतं हे तिच्या लक्षात आलं नाही. जर आलं असतं तर एखाद्या सुज्ञ व्यक्तीने दसऱ्याचा मुहुर्त वनिता समाजमधील लग्नासाठी निवडला नसता. तो हॉल रिकामा मिळतोय यांनेच आई हुरळुन गेली असावी. 

दसरा हा साडेतीन मुहूर्तां पैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. त्या दिवशी ते कार्यालय रिकामं मिळालं याचं कारण मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन इतर कोणी त्या दिवसासाठी ते बुक केलं नसावं. आईच्या ते लक्षात आलं नाही. 

तरीही अपूर्व आणि पद्मा यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. मेळाव्यासाठी जमलेल्या गर्दीची अडचण त्यांच्या समारंभाला फारशी भोवली नाही. लग्नासाठी आलेले नातेवाईक आपापल्या गावी परत गेले. नवविवाहीत जोडप्याने त्यांचा संसार सुरु केला. पुढली काही वर्ष दोघे एकत्र नांदले. गुण्यागोविंदाने एकत्र नांदले असं म्हणता येणार नाही.  

अपूर्व संसारात नाखूष होता. तो कायम तक्रार करत राहीला. घटस्फोटाची भाषा करत राहीला. वारंवार आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत राहीला. पद्मानी नवऱ्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं. 

अपूर्व जरी पत्नीवर नाखूष असला आणि वारंवार घटस्फोटाची धमकी देत असला, "घटस्फोटाचा अर्ज नेहमी माझ्या खिशात असतो" असं घरी येणाऱ्याजाणाऱ्या सगळ्यांना सांगत असला तरी त्यानं लग्न संपवण्यासाठी काही पावलं उचलली नाहीत. त्यामुळे शिव आणि पद्मा यांचा संसार काही वर्ष टिकला. 

चारपाच वर्ष नाखुषीत घालवल्या नंतर अपूर्वनी ठाम भूमिका घेण्याचं ठरवलं. त्यानं आपल्या मागण्या पद्माला सांगितल्या. आपण आपल्या मागण्यांवर ठाम रहाणार असल्याचंही सांगितलं. 

ते ऐकल्या बरोबर पद्मा खवळली. "फसवणूक...माझी फसवणूक होतेय," असं म्हणू लागली. 

"लग्नाआधी आपलं ठरलं होतं कि लग्नानंतर तू कायम घर सांभाळणार आणि मी नोकरी करायची आणि आता तू म्हणतोस कि निम्मा वेळ तु नोकरी करणार आणि मी घरी बसायचं? मला हे कदापि मान्य नाही. मी घर सांभाळणार नाही. ही माझी फसवणूक आहे. तुला जर वचन पाळायचं नव्हतं तर लग्नानंतर कायम घर सांभाळण्याचं तू लग्नाआधी का कबूल केलं होतंस ?" पद्मा पुन्हापुन्हा तेचतेच म्हणत राहिली. 

लग्नाआधी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असल्याने दोघांनी एकमेकांना अनेक वचनं दिली होती आणि आणाभाका घेतल्या होत्या हे ती विसरली. पत्नीचा आडमुठेपणा बघुन अपूर्वही मागे हटायला तयार होईना. शेवटी दोघांनी घटस्फोट घ्यायचं ठरवलं. दोघेही हट्टाला पेटल्याने त्यांच्या संसाराच्या विभागणीत कॊणाला काय मिळणार हे ठरवण्यासाठी दोघांनी न्यायालयाकडे धाव घेतली.                                                                           

                                                                            *****

एकदा रात्री आई माझ्या स्वप्नात आली. ती पुणेवासी होती तेंव्हा मी तिला नियमित फोन करत असे पण ती स्वर्गवासी झाल्यापासून तिनं माझ्याशी काहीही संपर्क ठेवलेला नाही. ती गेली ती गेलीच. पण त्यादिवशी स्वप्नांत आली आणि म्हणाली. "अपूर्वनी तडकाफडकी घर का सोडलं? त्यानं असं भावनेच्या भरात घर सोडायला नको होतं". 

मी गाढ झोपेत होते. तरी तिला म्हंटल, "तुला काय माहित त्यानं तडकाफडकी घर सोडलं? आपल्याला वाटतं ते अचानक घडलं याचा अर्थ असा नाही कि त्यानं तो निर्णय भावनेच्या भरात घेतला. तो निर्णय त्यानं त्याच्या वकिलांच्या सल्ल्याने घेतला असेल." 

आईला ते पटलेलं दिसलं नाही म्हणून मी म्हंटल,  " अगं, ज्या तऱ्हेनं अपूर्व आणि पद्माचे वकिल आपापल्या अशिलांची बाजू सध्या न्यायधिशां समोर मांडत आहेत आणि गेली काही वर्ष त्या दोघांची आपसात कशी भांडण चालली होती याच्या बातम्या आता आपल्या कानावर येत आहेत ते ऐकल्यावर असं वाटू लागलय कि गेले कित्यके महिने किंवा वर्ष ते दोघेही आपापल्या वकिलांचा सल्ला घेत असावेत. "

आई थोडी नवऱ्याशी जुळवून घ्यावं या संस्कारातली होती. ती म्हणाली, " पद्मानी जरा जुळवून घ्यायला हवं होतं. एवढी वर्ष तिनं नोकरी केली होती. काय बिघडलं असतं थोडी वर्ष घर सांभाळलं असतं आणि अपूर्वला नोकरी करू दिली असती तर? निदान मुलांसाठी तरी घर सांभाळण्याचं काम वाटून घ्यायचं. आता हि न्यायालयातली लढाई किती दिवस चालणार, त्यात मुलांची किती फरपट होणार? आणि शेवटी कोण जिंकणार?" 

आईच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. 

                                                                       *****

जे खऱ्या आयुष्यात घडतं त्यातुन काल्पनिक गोष्टी सुचतात किंवा उलटही होऊ शकतं. कल्पना आणि वास्तव यांची सरमिसळ होत असते. 

गेल्या काही महिन्यांतल्या राजकीय घडामोडी बघता एक रहस्यमय मालिका दूरदर्शनवर दाखवण्यात येत आहे असं वाटू लागलं आहे. या मालिकेची निर्मिती कधी सुरु झाली, कथानक कसं उलगडत गेलं आणि शेवट काय होणार याचा अंदाज त्या मालिकेतील सगळ्या पात्रांना आणि त्यांच्या सल्लागारांना असावा. फक्त प्रेक्षकच सस्पेन्स मध्ये आहेत असं दिसतंय.  

सत्तेच्या लालसे पोटी राजकीय नेत्यांनी राज्याला अनिश्चितते मध्ये लोटलं आहे, त्यांच्या वागण्यावर आपलं काही नियंत्रण उरलेलं नाही अशी भीती लोकांच्या मनात घर करू लागली आहे. 

जेंव्हा भीती मनात घर करू लागते तेंव्हा आपण काय करतो? 

प्रथम आपण Go भीती Go आणि Go अनिश्चितता Go असे मंत्रजप करतो. दहा कोटी लोकांनी श्रद्धेने हे मंत्रजप केले तर कुमारी भीती आणि कु.अनिश्चितता या जुळ्या बहिणी घाबरून तात्काळ चीनला पलायन करतील असा आपल्याला विश्वास वाटतो.

दुर्दैवाने सगळे लोक ऐकत नाहीत. मनोभावे जप करत नाहीत. त्यापेक्षा ते मनोरंजनाला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे जप निष्प्रभ ठरतात. तसं झालं तर... 

                                                                              *****

... तर जप करायचं सोडून देऊन आपण नुसताच विचार करत बसतो. तेंव्हा या मालिकेतील कथानकाशी समांतर घटना आपल्याला सभोवताली घडलेल्या दिसतात:  

दादरला पोर्तुगीज चर्च आहे. त्याच्या तिरकं समोर रस्त्याच्या पश्चिम बाजूला गोखले रस्त्यावर एक खाणावळ होती. आधी एक होती पण नंतर त्याच्या दोन खाणावळी झाल्या: त्यातल्या एकाचं नाव आहे मालवण किनारा आणि त्याला अगदी लागून असलेल्या दुसऱ्या खाणावळीचं नाव आहे मालवणी किनारा. काही वर्षांपूर्वी त्या खाणावळीचे दोन भाग झाले.   

पक्ष विघटनाशी समांतर अशी हि घटना आहे.  

मालिकेतलं दुसरं महत्वाचं कथानक म्हणजे संस्थापकांना किंवा त्यांच्या वारसदारांना पदच्युत करण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

जगद्विख्यात ऍपल कंपनीचा इतिहास सर्वाना माहित आहे. एकोणीसशे शहात्तर साली स्टिव्ह जॉब्ज याने आपला मित्र स्टिव्ह वॉझनियाक बरोबर ऍपल कंपनीची स्थापना केली. एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी मॅकनटॉश संगणक पहिल्यांदा बाजारात आणला. परंतु जॉब्जनी ज्या व्यक्तीची ऍपलच्या सीईओ पदी नेमणूक केली होती त्याने कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बरोबर मिळून एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जॉब्जला ऍपल सोडायला भाग पाडलं.   

साधारणपणे इथपर्यंतचं कथानक आपण आजवर बघितलं आहे. ही समांतर उदाहरणं सेवाभावी राजकारणातील नसुन स्पर्धात्मक उद्योग क्षेत्रातील आहेत हा भाग वेगळा. मालिकेच्या पुढील भागांमध्ये काय होणार हा प्रेक्षकांसाठी सस्पेन्स आहे. 

खऱ्या आयुष्यात, आपणच सुरु केलेल्या कंपनीतुन उचलबांगडी झाल्यावर स्टिव्ह जॉब्ज ने NeXT नावाची कंप्युटर प्लॅटफॉर्म विकसित करणारी कंपनी स्थापन केली. एकोणीसशे शह्यांणव साली ऍपलने NeXT विकत घेतली. त्या मार्गाने जॉब्ज स्वगृही म्हणजे ऍपल मध्ये परतला आणि कंपनीचा अध्यक्ष बनला. पुढे काही वर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यानं आय फोन सहीत तत्सम अनेक लोकप्रिय उत्पादने बाजरात आणली. त्या काळात त्यानं आपलं आरोग्य गमावलं. पण ऍपलच्या उत्पादनांनी जगाला वेड लावलं. 

                                                                                *****                                                                                  

या मालिकेतली दृश्य बघितली तर असं वाटतं कि काही पुरुष राजकीय नेते मिळून आपसात त्यांचा सत्ते पे सत्ता चा खेळ खेळत आहेत. एकदोन ठळक नावं वगळली तर ते महिलांना आपल्या खेळात समाविष्ट करून घेताना दिसत नाहीत. 

हे चिंताजनक आहे. आजवर मुंबई हे महिलांसाठी खुप सुरक्षित शहर राहिलेलं आहे. राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरांत महिला रात्रीच्या वेळी एकट्यादुकट्या बाहेर जाऊ शकत नाहीत असं म्हणतात. 

भविष्यकाळातही मुंबई महिलांसाठी सुरक्षित राहील याची काळजी महिलांना घ्यावी लागेल. त्यासाठी जागरूक रहावं लागेल. नाहीतर बघता बघता हे शहर महिलांसाठी असुरक्षित होईल आणि ते लक्षात येई पर्यंत काही करण्याची वेळ टळून गेलेली असेल. 

                                                                               *****

गणपती तर गावाला गेले. आपल्याला त्यांच्यावाचून चैन पडो न पडो आता दसरा आणि दिवाळी येईल. शोभा डे यांनी त्यांच्या Selective Memory: Stories from My Life या पुस्तकात दिवाळीशी निगडित एक आठवण सांगितली आहे. त्या लिहितात: 

'मी नेहमी मुलांना घेऊन दिवाळीची खरेदी करायला जुन्या बंगल्याच्या जवळ असलेल्या मध्य मुंबईतील बाजारात जात असे...   नेहमी प्रमाणे बरीच लहान मुलं मला चिकटलेली होती. आम्ही अनेक लहानसहान गोष्टी घ्यायला थांबलो. अवंतिकाच्या हातात आठ छोटे रंगीबेरंगी कंदील होते (ती जेमतेम सहा वर्षांची होती). आदित्य उत्साहाने त्याचे (फटाके) बॉम्ब आणि रॉकेट्स मिरवत होता. तेवढ्यात मला एक म्हातारी आज्जी विशष्ट प्रकारच्या रांगोळीच्या पॅटर्न्सच पुस्तक विकताना दिसली. तिच्याकडून मी ते पुस्तक घेतलं आणि पर्स मध्ये सुट्टे पैसे शोधण्यापुरता मुलांचा हात सोडला. याला तीस  सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला नसेल. तिथुन निघताना जेंव्हा मी परत मुलांची संख्या मोजली तेंव्हा एक मुल कमी भरलं. माझंच. दिवाळीच्या खरेदीत मग्न गर्दीनी खचाखच भरलेल्या त्या अंधाऱ्या गल्लीत अवंतिका कुठे दिसेना. 

मी माझ्या हातातले छोटे हात सोडू शकत नव्हते. गजबजलेल्या कोपऱ्यावर त्यांना एकटही सोडू शकत नव्हते. शोधक नजरेनं आणि धडधडत्या छातीनी मी अक्षरशः त्यांना ओढत प्रत्येक फेरीवाल्याकडे जाऊन विचारलं, "तुम्ही लहान मुलीला बघितलं? तिच्या हातात कंदील होते".  बहुतेकांनी मान हलवून कुठे तरी लांब बोट दाखवत म्हंटलं,  "ती त्या बाजूला गेली". अशक्य. सहा वर्षांची मुलगी काही सेकंदात इतक्या लांब कशी जाईल? तरीही ज्याला ज्याला मी विचारलं त्या प्रत्येकाने अगदी खात्रीने सांगितलं, "त्या दिशेला"  

मी माझ्या नेहमीच्या सराफाच्या दुकानात शिरले. ओरडून तिथल्या विक्रेत्यांना विचारलं, "माझी मुलगी.... तुम्ही माझ्या मुलीला पाहिलंत का? चमचमत्या सोन्याच्या काउंटर मागून ते ही ओरडले, " हो. आली होती ती इथे. पण ती आता इथे नाहीय." ते तर दिसतच होतं. पण ती इथे नाही तर कुठे होती? 

तशीच सगळ्या बच्चे कंपनीला घेऊन मी त्या अरुंद, घाण कचरा विखुरलेल्या छोट्या फुटपाथवरून तिला हाका मारत धावत सुटले. 

ते दृश्य बघण्या सारखं असेल: एक सैरभैर झालेली बाई, तिच्या ओढणीला अर्धा डझन मुलं लटकतायत, "अवंतिका" असं पुकारत सैरावैरा धावतेय. 

पन्नास मीटर अंतरावर दोन पुरुषांनी मला गाठलं. 

"तुम्ही कंदीलवाल्या लहान मुलीला शोधताय का?" 

"हो" मी किंचाळले. 

"ती घरी गेली," ते शांतपणे म्हणाले. 

"तुम्हांला कसं माहीत. तुम्ही कोण?"

"ती रडताना दिसली म्हणून आम्ही तिला थांबवलं. आमची एक महीला स्वयंसेविका तिला इथे घेऊन आली आणि तिला तिचं नाव आणि पत्ता विचारला. तुम्ही जवळच रहाता ना? तिनं त्या बोळातुन बंगल्याकडे जाण्याचा शॉर्ट कट दाखवला. काळजी करू नका. ती सुरक्षित आहे. त्या तिला घरी घेऊन गेल्या."

त्या क्षणी मी तर मेलेच. नक्कीच. छातीतली धडधड थांबली. अवंतिका माझी लाडकी बाळी घरी सुरक्षित होती. मला दुसरं काही सुचत नव्हतं ना कशाची पर्वा होती. माझे ओठ कोरडे पडले होते. त्यावरून जीभ फिरवत मी त्यांना पुन्हा विचारलं, " तुम्ही कोण?'

"आम्ही या भागातल्या शिवसेना शाखेचे आहोत," ते उत्तरले.' 

त्या आठवणीच्या शेवटी शोभा डे लिहितात, " I don't care what anybody thinks of the Sena. I owe them one. A big one. I'm deeply, deeply grateful. And indebted for life (मी त्यांची आजन्म ऋणी आहे)". 






Tuesday, August 2, 2022

दिल ढुंढता है

                                                      
                                                             


जुलै महिन्यात दोन प्रसिद्ध व्यक्ती गेल्या. 

न्यूयॉर्क मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रथम पत्नी ईव्हाना ट्रम्प यांचं निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्या नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असायच्या. ९० च्या दशकात त्यांचा आणि डॉनल्ड ट्रम्प यांचा घटस्फोट न्यूयॉर्कमध्ये खूप गाजला होता कारण दोघेही इथेच रहायचे. त्या मुळच्या चेकोस्लव्हाकियाच्या होत्या.

ईव्हाना गेल्याची बातमी वाचल्यावर त्यांची एक मुलाखत बघत होते. त्यात त्या म्हणतात कि राष्ट्राध्यक्ष झाल्यावर श्रीयुत ट्रम्प यांनी त्यांना चेकोस्लव्हाकिया मध्ये अमेरिकेची राजदूत म्हणून जाण्याबद्दल विचारलं होतं. (घटस्फोट झाला असला तरी ते दोघे दर आठ -पंधरा दिवसांनी फोनवर बोलायचे. त्यांना तीन मुलं आहेत). 


एक अकेला इस शहर में 


चालून आलेलं राजदूत पद ईव्हानानी नाकारलं. त्याचं कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलं कि "मी स्प्रिंग आणि फॉल मध्ये न्यूयॉर्क मध्ये असते, हिंवाळ्यात मायामी मध्ये, आणि उन्हाळ्यात सॅन ट्रोपे मध्ये. हे आयुष्य सोडून कशाला कुठे जाऊ ". 

घटस्फोट झाल्यावर गेल्या पंचवीस वर्षात ईव्हानानी दोनदा लग्न केलं. त्यांच्या लग्नाला श्रीयुत ट्रम्प हजर होते. न्यूयॉर्क मध्ये जशी एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच प्रमाणे ट्रम्प कुटुंब हे ही इथलं एक फिक्सचर आहे. त्यांच्या नावाच्या बऱ्याच इमारती शहरात आहेत.


दिल ढुंडता है 

दुसरं निधन मुंबईत गायक भूपिंदर सिंग यांचं झालं. दुर्दैवानी सध्या तिथे चालू असलेल्या राजकीय गदारोळात ती बातमी कुठे तरी कोपऱ्यात जाऊन पडली. माझ्या आवडीची कित्येक गाणी भूपिंदर सिंग यांच्या आवाजातली आहेत. दुर्दैवाने त्यांच्या निधनाच्या बातमीला जेवढं मिळायला हवं होतं तेवढं महत्व मिळालं नाही. 

एखाद्या व्यक्तीच्या निधनाची बातमी वाचून आपल्याला काय वाटतं या मागची कारणं प्रत्येकासाठी वेगवेगळी असतात. खरतर कोण कुठली ती चेक - अमेरिकन ईव्हाना ट्रम्प. माझा त्यांचा काय संबंध. भारतात असताना त्यांचं नावही कधी ऐकलं नव्हतं. पण जेंव्हा न्यूयॉर्कला आले तेंव्हा ईव्हाना ट्रम्प हे या शहरातलं खूप ठळक नाव होतं. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी वाचून चुटपुट वाटली. 


झिंदगी मेरे घर आना 


तिसरं निधन मुंबईत झालं... की होत आहे (एका राजकीय पक्षाचं)... ते अजून स्पष्ट झालेलं नाही. शहरावर शोककळा पसरली नसेल  बहुतेक पण वादळ वारे वहात आहेत असं दिसतं. या आधी मुंबईत एवढं मोठं राजकीय वादळ कधी आलं होतं का आठवत नाही. आलं असेल कदाचित पण पूर्वी कुठलीही गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला थोडा वेळ लागायचा. आजच्या इतक्या वेगाने काही पोहूच शकत नसे - मग ते विषाणू असोत, वस्तू असोत, नाहीतर बातम्या असोत. 


दो दिवाने शहर में
                                 

भूपिंदर सिंग यांची कित्येक गाणी मी पुन्हा पुन्हा ऐकली आहेत. त्यांचं दो दिवाने शहर में हे घरोंदा सिनेमातलं गाणं जुन्या मुंबईची आठवण करून देतं. मुंबईत जेंव्हा जागेची टंचाई होती, बिल्डर आणि त्यांचे दलाल जागा देतो असं खोटं आश्वासन देऊन लोकां कडून पैसे घेत आणि जागा कधी मिळत नसे त्या काळातला तो चित्रपट आणि ते गाणं आहे. मुंबईतली अनेक कुटुंब तेंव्हा बिल्डर कडुन फसवणूक झाल्याच्या सामुदायिक अनुभवातुन गेली होती. 


होके मजबूर मुझे 


भूपिंदर सिंग यांचा मृत्यु हृदय विकाराच्या झटक्याने म्हणजे नैसर्गिक कारणांमुळे झाला. ईव्हाना ट्रम्प आपल्या घरातील जिन्यावरून पडून गेल्या. तो अपघात होता. 

राजकीय पक्षाचा मृत्यू अजुन झालेला नाही पण त्याचा खात्मा करण्याचे प्रयत्न चालू आहेत असे आरोप होत आहेत. जर ते आरोप खरे ठरले आणि खरोखरच पक्षाचा शेवट झाला तर पक्षाच्या मृत्यूचं कारण नैसर्गिक म्हणता येईल की घातपात किंवा हत्या म्हणावी लागेल?

आजकाल आपण कलेक्टिव्ह consciousness हा शब्द प्रयोग फार ऐकतो. ती संकल्पना थोडी विस्तृत केली तर आपल्या मनावर फक्त आपल्या घरातुन आणि शाळेतुन संस्कार होतात असं नाही. आपण ज्या अनुभवातुन जातो -  एक देश म्हणून, एक राज्य म्हणून, एक शहर म्हणून त्यांनी आपल्या मनाला आणि विचारांना आकार मिळत असतो. 

                           
 बीती ना बिताई रैना 


मुंबईत आजवर झालेल्या अनेक दंगली, दहशतवादी हल्ले, महाभयंकर पूर, दर पावसाळ्यात रस्त्यावर साचणारं पाणी या सगळ्या अनुभवांनी शहरात रहाणाऱ्या लोकांना घडवलं आहे. मुंबईत राजकीय पक्षाची हत्या झाली तर तो ही एक सामुदायिक अनुभव असेल. त्याचे शहरावर आणि राज्यावर काय बरेवाईट दूरगामी परिणाम होतील हे त्या विषयातील जाणकार सांगू शकतील कारण एका प्रादेशिक पक्षा बरोबर अनेक लोकांच आयुष्य आणि आठवणी निगडीत असतात. 

एक आठवण राजीव बजाज यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे. 

 
नाम गुम जायेगा   


आऊटलुक मासिकानी घेतलेली ती मुलाखत यु ट्यूब वर आहे. हा किस्सा दुसऱ्या भागाच्या शेवटी येतो. बजाज जेंव्हा लहान म्हणजे विशीत होते तेंव्हा पुण्याच्या त्यांच्या बजाज कंपनीत संप चालू होता. कित्यके महिने तो संप मिटत नव्हता. एक युनियन नेता अडून बसला होता आणि संप मिटू देत नव्हता. त्यासंबंधी बोलणी करण्यासाठी राजीव बजाज त्यांचे वडील राहुल बजाज यांच्या सोबत बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले. ठाकरेंनी त्यांची बाजू ऐकून घेतली. मग आपल्या सहकाऱ्यांना विचारलं कि खरंच तो युनियनचा नेता त्रास देतोयं का.

बजाज मुलाखतीत म्हणातात की त्या बैठकीत ठाकरेंचे जे सहकारी हजर होते त्यांची नावं मी सांगत नाही कारण त्यातले काही जण आत्ताच्या मंत्रिमंडळात आहेत (एक वर्षापूर्वीची मुलाखत आहे). जेंव्हा सहकाऱ्यांनी सांगितलं कि होय, खरंच तो नेता अडवणूक करतोय तेंव्हा ठाकरे म्हणाले - "काढून टाका त्याला". फक्त त्यांनी राहुल बजाज यांनां सांगितलं कि तुम्ही त्याला एक ऑटो रिक्षा भेट द्या. म्हणजे जरी त्याची नोकरी गेली तरी तो उद्या पासुन रिक्षा चालवून पॆसे मिळवून त्याच्या कुटुंबाचं पोट भरू शकेल. 

          

कभी किसी को मुक्कमल जहाँ नही मिलता

मुलाखतीत बजाज म्हणतात कि ज्या समस्येवर तोडगा शोधणं खूप कठीण जाणार आहे असं त्यांना बैठकीच्या आधी वाटत होतं ती समस्या ठाकरेंनी इतक्या चुटकीसरशी तरीही संवेदनशीलतेने "counterintuitive" (त्यांनी वापरलेला शब्द) पद्धतींने मिटवली ते बघून तरुण वयात ते खूप मोठा धडा शिकले. त्यांच्या आई (राहुल बजाज यांच्या पत्नी) मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातील होत्या असंही ते मुलाखतीत म्हणतात.  





                   

Tuesday, July 19, 2022

आभास सावली हा असतो खरा प्रकाश


राज्यात सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडी बघता निवडणूकीच्या आधी लोकांनी स्वतःला काही प्रश्न विचारणे आवश्यक आहे. त्याची सुरवात म्हणून खाली एक प्रश्नावली दिली आहे. या मागे कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने आणि इतर पक्षांच्या विरोधात बोलणे किंवा कोणावर टीका करणे हा हेतू नाही. तर सर्वसामान्य लोकांनी भावनांच्या आहारी न जाता या घडामोडींकडे डोळस पणे बघावं जेणे करून त्यांचं शहर आणि राज्य भविष्य काळात कुठल्या मार्गानी जाऊ शकतं याची त्यांना कल्पना येईल - गोष्टी घडुन गेल्यावर सावकाश जाग आली असं होऊ नये - एवढाच हेतू आहे. त्या उद्देशा नुसार पहिला प्रश्न:


१) तुम्हाला तुमच्या लायकी प्रमाणे सरकार आणि राजकीय नेते मिळतात असं तुम्हांला वाटतं का? 

    खालील पैकी एक पर्याय निवडा:  

    अ) होय       

    ब) नाही   

    क) हा खूप गहन प्रश्न आहे ज्यावर विचार करायला माझ्याकडे पुरेसा वेळ नाही कारण लग्न -मुंजी, सण -समारंभ, व्हॉट्स 

         ऍप -फेसबुक सारखी माध्यमं यात माझा बराच वेळ खर्च होतो. 


२) राज्यात सरकार चालवणाऱ्या नेत्यांनी कोणाला कमी गांभीर्याने घ्यावं असं तुम्हांला वाटतं? 

    खालील पैकी हवे तेवढे पर्याय निवडा:

  अ ) अरुणाचल, हिमाचल किंवा तत्सम कुठल्यातरी प्रदेशातून आलेल्या नटीच्या चिवचिवाटाला.     

  ब ) दुसऱ्यांच्या घरासमोर उभं राहून मारुती स्तोत्र म्हणणाऱ्यांना.    

  क) एखाद्या व्यक्तीच्या आजारपणाची असंवेदनशील हेटाळणी करणारी कोणा कवीची कविता  -

       बऱ्याच लोकांना खटकेल आणि टीकेस पात्र ठरेल याची जाणीव असल्या कारणाने - आपल्या 

       सोशल मीडियावर चिकटवून प्रसिद्धी मिळवू पहाणाऱ्या माजी नटीला.  

  ड ) या पैकी कोणालाही नाही. 

  इ) या बाबतीत माझं काही ठाम मत नाही. 


३) पुराण काळात ऋषी -मुनींची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरांना त्या कामगिरीवर पाठवण्यात येत असे. प्रसार माध्यमे 

    आणि राजकीय नेते थोड्याफार आकर्षक दिसणाऱ्या (पर्यायाने मनोरंजनाच्या व्यवसायात काम करणाऱ्या) महिलांच्या

    बोलण्याला आणि वागण्याला नको तितकं महत्व देतात असं तुम्हांला वाटतं का? 

    खालील पैकी एक पर्याय निवडा:   

    अ) होय, उगीचच जास्त महत्व देतात असं वाटतं  

    ब ) नाही, योग्य तितकंच महत्व देतात असं वाटतं. 

    क) या बाबतीत माझं काही ठाम मत नाही. टाईम पास म्हणून हे ठीक आहे. 


४) प्रसार माध्यमे हा लोकशाही शासन पद्धतीचा एक प्रमुख आधार स्तंभ मानला जातो. ही माध्यमे आपलं काम चोख 

    पणे पार पाडत असोत किंवा नसोत, राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी दररोज त्यांच्याशी सवांद साधणं गरजेचं आहे असं 

    तुम्हांला वाटतं  का? 

    खालील पैकी एक पर्याय निवडा: 

    अ) होय, कारण तो माझ्या रोजच्या मनोरंजनचा आवडता कार्यक्रम आहे. 

    ब) नाही, उगीच वायफळ बडबड करण्यात वेळ दवडू नये.  

    क) या बद्दल माझं काही ठाम मत नाही. 

  

५) जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी दिवसाचा कुठला प्रहर योग्य आहे असं तुम्हांला वाटतं? 

    खालील पैकी हवे तितके पर्याय निवडा:    

    अ) मध्यरात्रीचा दाट अंधार कारण तेंव्हा बहुसंख्य लोक गाढ झोपलेले असतात. 

    ब)  भली पहाट जेंव्हा बहुतांश लोक साखर झोपेत असतात. 

    क) दिवसा उजेडीचा लख्ख सूर्यप्रकाश जेंव्हा जे काय चाललं आहे ते जनतेला स्पष्ट दिसु शकतं. 

    

६) अंधारात घडणाऱ्या धक्कादायक राजकीय नाट्यांना २१ व्या शतकातील तुमच्या आधुनिक, सुशिक्षित, कायदा 

     आणि सुव्यवस्था प्रिय राज्यात / शहरात / आणि आयुष्यात स्थान आहे असं तुम्हांला वाटतं का?  

     खालील पैकी एक पर्याय निवडा:

    अ) होय, आहे.     

    ब) नाही, कारण रात्री गूढ सावल्यांचा खेळ चालतो

    क) या बद्दल माझी काही ठाम भूमिका नाही परंतु आपण रात्री शांत झोपलेले असताना राज्यात काही राजकीय उलथापालथ 

         घडू शकते हा विचार काळजी वाटायला लावणारा आहे. त्याचा लोकांच्या झोपेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

         त्यांना असुरक्षित वाटू शकतं. 

         

७) एखाद्या नेत्याने पुन्हा पुन्हा तीच चूक केली तर त्या नेत्याला आणखी किती वेळा संधी देण्यात यावी असं तुम्हांला 

     वाटतं?

     खालील पैकी एक पर्याय निवडा.  

     अ) जे दोनदा झालं ते तिसऱ्यांदा होऊ शकतं त्यामुळे दोन पेक्षा जास्त वेळ संधी देण्यात येऊ नये. 

     ब) या बद्दल माझं काही ठाम मत नाही. 

     क) धक्कादायक राजकीय नाट्यांना चूक म्हणणं चूक आहे. या चुका नाहीत तर ऐतिहासिक काळात 

          देशाबाहेरून आलेल्या परकीय शत्रूंविरुद्ध स्थानिक राजांच्या सैन्यांनी वापरलेली युद्धाची तंत्र आहेत. त्या तंत्रांना 

          पुनरुज्जीवित करू पाहणाऱ्यांना पुन्हा पुन्हा संधी द्यायला काही हरकत नाही. 


८) देश स्वतंत्र झाल्या नंतर सुरवातीच्या काळात देशाचं नेतृत्व करणारे नेते हे देशातील किंवा परदेशातील विद्यापीठात 

   शिक्षण घेतलेले होते. सध्या संपूर्ण जगावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं साम्राज्य पसरलेलं असताना आपले राजकीय नेते हे   

   देशातील रस्त्यांवर जे पारंपारिक व्यवसाय केले जातात - वडापाव विकणे, भाजी विकणे वगैरे क्षेत्रातुन आलेले   

   दिसतात. हा बदल देशासाठी चांगला आहे कि वाईट असं तुम्हांला वाटतं? 

   एक पर्याय निवडा:

   अ) नक्कीच ही upward mobility देशासाठी फार चांगली आहे कारण जितके वडापाव किंवा भाजी विकणारे 

       राजकारणात जातील त्यांची जागा दुसऱ्या कोणाला तरी मिळू शकते.  

   ब) हा बदल थोडा चिंताजनक आहे कारण वडापाव आणि भाजी विकणाऱ्यांची पुढची पिढी तयार नसेल तर 

       समाजाला ते घातक ठरू शकतं. 

   क) या बद्दल माझं काही ठाम मत नाही. 


९) येणाऱ्या काळात तुमच्या शहरावर कुठल्या संस्कृतीचा प्रभाव असावा असं तुम्हांला वाटतं?

    खालील पैकी हवे तेवढे पर्याय निवडा: 

    अ) मराठी संस्कृती 

    ब) बॉलिवूड

    क) पाश्चिमात्य संस्कृती 

    ड ) देशाच्या इतर राज्यातुन आलेली संस्कृती 

    इ ) आमच्या शहरातील आणि राज्यातील संस्कृतीची दिशा ठरवण्यास आता आम्ही सर्वस्वी असमर्थ आहोत. जे काही  

         होईल ते गप्प बसुन बघणे आणि येणारे बदल असहाय्यपणे स्विकारणे या खेरीज आमच्या हातात आता काही 

         उरलेलं नाही. 


१०) तुमच्या शहरात किंवा तुम्ही रहाता त्या ईमारतींमध्ये मांसाहारावर आणि मांसाहारी उपाहारगृहांवर बंदी घालण्यात आली  

      तर तुम्हांला आवडेल का?

     अ) अजिबात आवडणार नाही 

     ब) संपूर्ण देश कधी एकदा शाकाहारी होतोय याची आम्ही वाट पहातोय  

     क) हा फार गंभीर प्रश्न आहे ज्याकडे मी आजवर सोयीस्करपणे कानाडोळा केलेला आहे कारण माझा बराचसा वेळ रोज 

          सकाळी बाजारात जाऊन ताजे मासे, मटण, कोंबडी आणणे आणि त्याचे कालवण करून खाण्यात जातो. 

    

११) तुमच्या शहरात आणि राज्यात जास्त महत्व कुठल्या गोष्टीला असावं असं तुम्हांला वाटतं?

     खालील पैकी एक पर्याय निवडा:

     अ) तुमची भाषा 

     ब) तुमचा धर्म 

     क) दोन्ही 

     ड ) दोन्ही नाही 

     इ) या प्रश्नावर विचार करण्याची किंवा दोन्ही पैकी एक निवडण्याची मला आजवर कधी गरज भासलेली नाही. 


१२) घराणेशाही विरोधी बंड जर एका प्रादेशिक पक्षात यशस्वी होऊ शकतं तर त्याची पुनरावृत्ती राष्ट्रीय स्तरावरील    

     पक्षात करता येईल असं तुम्हांला वाटतं का? 

     एक पर्याय निवडा:

     अ) होय 

     ब) नाही 

     क) सांगणं अवघड आहे. 


१३) तुमच्या राज्याचा समृद्ध इतिहास बघता राज्यातील राजकीय नेत्यांनी आजवर राष्ट्रीय पातळी वरील राजकारणात 

      राज्याच्या योग्यते नुसार पुढाकार घेतला आहे असं तुम्हांला वाटत का? 

      एक पर्याय निवडा: 

      अ) होय 

      ब) नाही

      क) या बद्दल मी कधी विचार केलेला नाही.  

 

१४) तुमच्या राज्यातील शिस्तबद्धता, कायदा आणि सुव्यवस्था, कला - खेळ -समाज सुधारणा या सारख्या क्षेत्रात फार मोठी 

      कामगिरी बजावणारी उत्तुंग व्यक्तीमत्व बघता तुमच्या राज्यांनी देशाचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करण्याची वेळ 

     आली आहे असं तुम्हाला वाटतं का? 

      एक पर्याय निवडा:

      अ) होय 

      ब) नाही

      क) या बद्दल मी कधी विचार केलेला नाही. 


१५) एखादी व्यक्ती किती काळ खुर्चीत बसु शकते हे कशावर अवलंबून आहे असं तुम्हाला वाटतं? 

       हवे तितके पर्याय निवडा:

     अ) त्या व्यक्तीच्या खुर्चीत बसण्याच्या क्षमतेवर. 

     ब) त्या व्यक्तीला खुर्चीतुन ढकलून ती खुर्ची बळकावू पहाणाऱ्या व्यक्तीच्या क्षमतेवर.  

     क) खुर्ची किती मऊ किंवा टणक आहे यावर ते अवलंबून आहे.    

     क) कोणी, कुठे, किती वेळ बसायचं हे ठरविणारे आपण कोण. ते ठरविणारा वर बसला आहे. 

     ड ) इतर कारणांवर ( हा पर्याय निवडला तर कारण वीषद करा).  


१६) चोवीस तास चालू असणारे टीव्ही वरील कार्यक्र्म हा मानवजातीला लागलेला शाप आहे. त्या ऐवजी ७० च्या 

      दशकाप्रमाणे दिवसातून फक्त काही तास टीव्ही वर कार्यक्रम दाखवले जावेत आणि इतर वेळी टी व्ही बंद असावा असं 

      तुम्हांला वाटतं का? 

      अ) होय, नक्कीच. माझ्या आवडीच्या मालिका वगळता टी व्ही वरचे इतर कार्यक्रम बकवास असतात.  

           ते बंद व्हायला हवेत.   

      ब) नाही, दिवसरात्र टीव्ही नसेल तर विरंगुळ्या अभावी माझं डोकं फिरण्याची शक्यता संभवते.  

      क) कालचक्र मागे फिरवून टी व्ही चे तास कमी करण आता शक्य होईल असं वाटत नाही.  







Wednesday, April 6, 2022

Go उपचार केंद्र


काही वर्षांपूर्वी एक मुलाखत बघत होते. गायींच्या गोठ्यातुन फिरत मुलाखत चालली होती. एका गायीपाशी थांबून तीच्या पाठीवर हात फिरवत मुलाखत देणारी व्यक्ती टी व्ही वाहिनीच्या वार्ताहाराला म्हणाली,  "गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने रक्तदाब नियंत्रित होतो. कर्करोगावर उपचार करण्यासाठीही गायीचा उपयोग होऊ शकतो." 

ते ऐकल्यावर डोळ्यासमोर एक चित्र उभं राहीलं. चित्रात असं दिसलं कि सरकार तर्फे शहरात जागोजागी Go उपचार केंद्र उभारण्यात आली आहेत. एक- दोन केंद्रांमध्ये तर मी स्वतः जाऊन आले आहे असं वाटलं: प्रभादेवीतील आप्पासाहेब मराठे मार्गावरचं हंडेय आणि हॉंडाच्या शोरूमच्या खांद्याला खांदा लावून उभं असलेलं हम्मा उपचार केंद्र आणी थोडं पुढे पेडर रोडवर लॅम्बर्गिनी आणि बुगाटीच्या शोरूमच्या मध्ये झळकणारं दुसरं. 

गाड्यांच्या शोरूम प्रमाणेच Go उपचार केंद्रांच्या भिंती काचेच्या होत्या. शोरूम मध्ये गाड्या पार्क केल्या होत्या अगदी त्याच प्रमाणे गो उपचार केंद्रात गायी उभ्या होत्या. तिथून पुढे मात्र उपचार केंद्र थोडं वेगळं दिसत होतं. प्रत्येक गायी शेजारी उपचार करून घ्यायला येणाऱ्या व्यक्तीला बसण्यासाठी जागा होती. गोमूत्र आणि शेण या दोन्हीचा उपचार पद्धतीत वापर होत असल्याने एखाद्या गायीने शेण किंवा गोमूत्र दिलं कि तात्काळ ते शास्त्रोक्त पद्धतीने साठवलं जात होतं. 

परंतु गायींच दूध मात्र बऱ्यापैकी बदनाम झालेलं दिसलं. केंद्राच्या बाहेर रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या उंच जाहिरातींच्या फलकांवर वेगवेगळ्या वनस्पतीजन्य दुधांच्या जाहिराती होत्या. एक फलक बाजारात नव्यानेच आलेल्या बदामाच्या दुधाची जाहिरात करत होता. दुसऱ्यावर सोयाबीन पासुन बनवलेल्या दुधाची जाहिरात होती. त्या फलकावर एका बाजूला गायीचं चित्र होतं आणि दुसऱ्या बाजूला सोयाबीनचं चित्र होतं आणि गायीच्या दुधापेक्षा सोयाबीनचं दूध कसं सरस असतं याचं तुलनात्मक वर्णन होतं. तिसऱ्या फलकावर ओट्सच्या दुधाची जाहिरात होती. आणखी एका मोठ्ट्या फलकावर शहरात नव्यानेच सुरु झालेल्या व्हीगन रेस्टोरंटची जाहिरात होती. पनीर टिक्का असो, बटर चिकन असो कि मलाई कोफ्ता, आईस्क्रीम असो कि खीर आमच्या कुठल्याच पदार्थामध्ये गायी -म्हैशींच्या दुधाचा (किंवा खऱ्या कोंबडीचा) लवलेशही तुम्हांला सापडणार नाही असं त्या जाहिरातीत मोठ्या अभिमानानी नमूद केलं होतं. 

साऱखी-सारखी आपल्या दुधाची इतर दुधांशी तुलना करून आपल्या दुधाला निकृष्ट दर्जाचं म्हणून हिणवलं जातंय हे गायींच्या मनाला खूप लागत होतं. पण बिच्चारं मूक जनावर ते. करणार तरी काय. आपल्या मनातली खंत सांगणार तरी कोणाला आणि कशी. या विषयी म्हैशींशी बोलता आलं तर आपल्या दुःखाचा भार थोडा हलका होईल असं त्यांना वाटलं. परंतु उपचार केंद्रात म्हैशी नव्हत्या. मात्र गायींच्या मनातील चलबिचल केंद्रात काम करणाऱ्या एका चाणाक्ष सेविकेनी हेरली होती. गायींच्या मानसोपचारात प्रवीण असलेल्या तज्ञांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी नियमित बोलवावं कि काय असं तिला वाटू लागलं.  

आजकाल आपलं दूध आणि मांस दोन्ही वर्ज्य मानलं जातंय अशी कुणकुण गायींच्या कानावर पूर्वी आली होती पण बाहेर लावलेल्या जाहिरातीं मध्ये त्याचा प्रत्यक्ष पुरावा बघून त्यांच्या दुःखात भर पडली. काचेच्या भिंतींच्या बाहेर नजर टाकण्याची त्यांची हिम्मत होईना. बाहेर बघितलं आणि नवीनच कुठल्यातरी दुधाची किंवा व्हीगन रेस्टोरंटची जाहिरात दिसली तर आपलं आपल्या रक्तदाबावरचं नियंत्रण सुटेल कि काय असा विचार त्यांच्या मनात डोकावला. बाहेर बघणं त्या टाळू लागल्या. 

नाही म्हणायला उपचार केंद्राच्या माध्यमातुन लोकांनां आपला उपयोग होतोय ह्याचा गायींना आनंद झालेला दिसला. आपण अगदीच निरुपयोगी प्राणी नाही, समाजाला आपली गरज आहे ही भावना त्यांना सुखावत होती. नियमित उपचारांसाठी केंद्रात येणाऱ्या लोकांबद्दल त्यांना आत्मीयता वाटू लागली होती. कोण कुठ्ल्या दिवशी कुठल्या वेळी येतं हे ही आता त्यांच्या पैकी काहींच्या लक्षात राहू लागलं होतं. 

इस्त्रीचे शर्ट- पॅन्ट घातलेला एक ईसम हातात ऑफिसची बॅग घेऊन सकाळी खूप लवकर घाई - गडबडीत येतो. कमीत कमी दहा मिनिटांचं सेशन घ्यावच लागतं म्हणून घेतो पण जेमतेम पाच मिनिटं आपल्या पाठीवरून हात फिरवतो. त्यातही सारखं घड्याळाकडे बघत असतो. निघायच्या आधी गडबडीत आपल्याला चारा घालायला मात्र विसरत नाही आणि आला तसाच धावत पळत स्टेशनच्या दिशेने चालू पडतो हे कृष्णा गायीच्या सवयीचं झालं होतं.  

गायींना एका पेक्षा एक सुंदर नावं होती  - कृष्णा, गोदावरी, नर्मदा, सरस्वती वगैरे. केंद्रातील वातावरण प्रसन्न रहावं आणि तिथे शांतता राखली जावी या करणास्तव फोनवर बोलण्यास मनाई होती. 

केंद्रा पासून जवळ असलेल्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांची आई शाळा सुटायच्या थोडी आधी येते; वेळ असेल त्याप्रमाणे कधी दहा तर कधी पंधरा मिनिटांचं सेशन घेते; नियमा नुसार ती आपला फोन सायलेंट ठेवते पण तिचे दोन्ही हात आणि डोळे सतत फोन मध्ये गुंतलेले असतात; गो- सेवक आठवण करून देतात तेवढ्या पुरताच तिचा हात आपल्या पाठीवरून फिरतो आणि सेवकांच लक्ष नसलं कि परत फोन कडे वळतो हे सरस्वती गायीच्या लक्षात आलं होतं. 

काही लोकांनी केंद्राला विंनती केली होती कि त्यांनी पाच मिनिटांचं मिनी सेशन उपलब्ध करून दयावं. दहा मिनिटं गायीच्या पाठीवरून हात फिरवत बसणं त्यांना जड जात होतं. पण इच्छा असुनही आर्थिक दृष्ट्या उपचार केंद्राला ते परवडण्या सारखं नव्हतं. जरी केंद्राचा उद्देश्य नफा कमावणं हा नसला तरी त्यांना त्यांची काही आर्थिक गणितं सांभाळावी लागत होती. गायींची आणि केंद्राची स्वच्छता राखणे हे खूप महत्वाचं काम होतं ज्यासाठी भरपूर सेवकांची गरज होती. सेवकांचे पगार शिवाय जागेचं भाडं हे मोठे खर्च त्यांना होते.   

दुपारी केंद्र शांत असायचं. त्यावेळी संसारातुन निवृत्त होऊ पहाणाऱ्या दोन महिला यायच्या. शेजारी शेजारी उभ्या असलेल्या नर्मदा आणि गोदावरीच्या जवळ बसून त्या प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवायच्या. पण जसे त्यांचे हात चालायचे तितकंच त्यांचं तोंडही चालायचं. खरतर केंद्रात बोलणे आणि खाणे या दोन्ही क्रियांना मनाई होती पण नियमांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत त्या आपसात अखंड बडबड करत बसायच्या. तसंच त्या दिवशी घरी काही विशेष खाद्य पदार्थ केले असतील तर त्यांचीही आपसात देवाण- घेवाण करायच्या. बहुतेक वेळा तरुण गो -सेवक वडीलधाऱ्या महिलांच्या नियमभंगाकडे दुर्लक्ष करायचे. क्वचित कधीतरी त्यांना तंबीही द्यायचे.    

अशा प्रकारे गो उपचार केंद्र त्या परिसराचा एक भाग बनून गेलं. परंतु जितकी उपचार - इच्छुकांची संख्या वाढली तसं केंद्र चालकांना काही समस्या जाणवू लागल्या. पहिली आणि फार महत्वाची अडचण हि होती कि गायींचं आपल्या शरीर स्वच्छतेच्या क्रियांवर काही नियंत्रण नव्हतं. काळवेळ न पहाता, आपल्या शेजारी कोणी बसलं आहे किंवा नाही याचा जराही विचार न करता त्या मलमूत्र विसर्जन करून मोकळ्या होत असत.  

त्यावर तोडगा शोधून काढण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. समितीनी तीन वेगवेगळ्या मार्गानी या समस्येचा विचार करायला सुरवात केली. पहिला उपाय म्हणजे लहान मुलांप्रमाणे गायींसाठी ऑरगॅनिक, डिस्पोजेबल आणि बायो डिग्रेडेबल लंगोट वापरता येतील का? दुसरा उपाय - शहरातील पाळीव कुत्र्यांना जसं त्यांच्या सु -शी साठी ठराविक वेळी घराबाहेर नेलं जातं तसं गायींना नेता येईल का? किंवा दरवेळी त्यांना केंद्राबाहेर नेणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी केंद्रातच शौचालय बांधून दिवसातून ठराविक वेळी त्यांना तिथे नेता येईल का? पहिले दोन्ही उपाय यशस्वी झाले नाहीत तर गायींच्या आहारात बदल करून, त्यांना काही रासायने  देऊन त्यांच्या नैसर्गिक क्रिया नियंत्रणा खाली आणता येतील का? 

खास नेमण्यात आलेली समिती अशा काही उपाय योजनांचा विचार करीत आहे हे गायींच्या गावीही नव्हतं. केंद्रात येणाऱ्या उपचार -इच्छुकांची आवक जावक दिवसागणिक वाढत होती. एक आयुर्वेदाचार्य आता केंद्राचा भाग बनले होते. ते नाडी परीक्षेत निष्णांत होते. लहानां पासुन ते थोरां पर्यंत सर्व वयाचे लोक त्यांच्याकडे आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी येत. आयुर्वेदाचार्य त्यांना काढे किंवा आहारात बदल सुचवुन त्यांच्या समस्यांचं निराकरण करीत. तपासून घ्यायला आलेल्या व्यक्तीची नाडी परीक्षाकरून त्या व्यक्तीनी आपल्या आहारात कुठल्या पदार्थांचा समावेश करावा किंवा करू नये या विषयी सल्ला देत. केंद्राची वाढती लोकप्रियता  बघून गायी समाधानी होत्या. आपलं दैनंदिन आयुष्य खूप सुरळीत आणि सुरक्षित चाललंय असं त्यांना  वाटलं. 

एक दिवस दुसऱ्या कुठल्यातरी भाषेतील एक शब्द गायींच्या कानावर पडला. प्रथमतः त्यांना तो थोडा परिचित वाटला. मग तो शब्द पुन्हा पुन्हा कानावर पडत राहिला. हंडेय आणि हॉंडाच्या शोरूम खूप लोकप्रिय होत्या. तिथे वाहन खरेदीसाठी आलेले नवरा -बायको किंवा मित्र -मैत्रिणी गाड्या बघून झाल्या कि घटकाभर उपचार केंद्रात गायींच्या सान्निध्यात विसावत असत. त्यांच्या बोलण्यातून - "आपली दुसरी (किंवा तिसरी) गाडी हंडेय असावी कि हॉंडा का त्यापेक्षा टोयोटा करोला जास्त चांगली" - अशी चर्चा अधुन मधून गायींच्या कानावर पडत असे. गायींना वाटलं शेजारी करोलाची शोरूम उघडली असावी. 

मग आणखीही बरेच वेगवेगळे आधी कधी न ऐकलेले शब्द त्यांना ऐकू येऊ लागले. तेंव्हा कुठे -हे प्रकरण काहीतीर वेगळं दिसतंय, याचा गाड्यांशी काही संबंध दिसत नाही हे गायींच्या लक्षात आलं. केंद्रा समोरच्या रुग्णालयातील धावपळ दिवसागणिक वाढताना दिसु लागली. उवचार केंद्रातील वर्दळ मात्र हळुहळु कमी होत होती. 

एक दिवस काही लोक केंद्राची पहाणी करायला आले. गायींना दुसरीकडे हलवलं तर अमुक इतक्या रुग्णांची इथे सोय करता येईल आणि रुग्णालयातील रुग्णांची गर्दी थोडी कमी होईल असं ते म्हणाले. आपसात विचार विनिमय करून त्यांनी गायींना हलवण्याचा दिवस ठरविला. 

नेहमी येणारे उपचार - इच्छुक केंद्रात फोन करून गायींना तिथुन न हलवण्या विषयी विनवण्या करू लागले. केंद्रातील सेवक पुन्हा पुन्हा तेच तेच दुसऱ्या भाषेतील शब्द वापरून केंद्र बंद करणं कसं आवश्यक आहे ते पटवून देत होते.

गायी हे सगळं मुकाट्याने बघत होत्या. केंद्रातील सेवकांना ते वापरत असलेल्या शब्दां विषयी फारसं काही माहित नाही, त्यांचा त्या विषयाचा काहीही अभ्यास नसताना केवळ कोणाकडून तरी ऐकलेले शब्द ठासुन ते इतरांना सांगत आहेत हे गायींना ठाऊक होतं. साक्षात मृत्यु सभोवती थैमान घालताना बघितल्यावर लोकांची मन सैरावैरा पळू लागली आणि स्थानिक, पारंपारिक उपचार पद्धतीचा निषेध करत दुसऱ्या भाषेच्या वेष्टणात गुंडाळून आलेल्या उपचार पद्धतीचा त्यांनी निव्वळ अवलंबच नाही तर त्वेषाने प्रचार आणि प्रसार जराही न कचरता कसा डोळे झाकून केला हे गायींनी बघितलं. जे कोणी आपल्याला जिकडे कुठे नेतील त्यांच्या बरोबर जाण्याची त्यांनी मनाची तयारी केली. 

ज्या दिवशी गायींना घेऊन जाणार होते त्या दिवशी त्यांच्या विषयी कळकळ वाटणारे काही तुरळक लोक धावत पळत केंद्रा बाहेर जमले. गायींना नेऊ नका म्हणून पुन्हा पुन्हा विनवण्या करू लागले. पण रुग्णालया बाहेर जमलेल्या जमावानी गो-उपचार इच्छुकांना तिथुन हकलून लावलं. जास्त आग्रह धरला तर आपल्यावर दगडफेक होईल कि काय या भीतीनी गोप्रेमींनी आपापल्या गायीचा लांबून निरोप घेत तिथुन काढता पाय घेतला. 

हम्मा उपचार केंद्राच्या जागी आता बहुतेक करोलाची शोरूम येईल आणि लॅम्बर्गिनी आणि बुगातीच्या शेजारी फरारीची.