Tuesday, November 2, 2021

स्वर आले दुरुनी







 


कवी यशवंत देव यांचे सुरेख बोल:

स्वर आले दुरुनी                                 

जुळल्या सगळ्या त्या आठवणी            

निर्जिव उसासे वाऱ्यांचे                        

आकाश फिकटल्या ताऱ्यांचे                \

कुजबुजही नव्हती वेलींची                   

हितगुजही नव्हते पर्णांचे                    

ऐशा थकलेल्या उद्यानी                       

स्वर आले दुरुनी                                

जुळल्या सगळ्या त्या आठवणी            

पडसाद कसा आला न कळे                 

अवसेत कधी का तम उजळे                   

संजीवन मिळता आशेचे                      

निमिषात पुन्हा जग सावरले               

किमया असली का केली कुणी            

स्वर आले जुळुनी                              

जुळल्या सगळ्या त्या आठवणी           


त्यांचा कसाबसा अनुवाद: 

A song came from far

connecting the memories 

lifeless sighs of the wind

dimmed stars in the sky

vines were quiet

leaves weren't rustling

in such a weary garden 

a song came from far

connecting the memories

what echoed inside is unknown

a dark night will not brighten 

without the moon

hope brought to life

in a moment the world was saved

what wrought this miracle

a song came from far

connecting the memories


विवेचन: 

कवीला उदास मन थकलेल्या उद्याना प्रमाणे भासत होतं जिथे ना पानांची सळसळ होती ना वेलींची कुजबुज होती. अचानक दूर कुठून तरी गाण्याचे स्वर ऐकू आले. गाण्याशी जुळलेल्या आठवणी जाग्या झाल्या. अंधारी रात्र चंद्र किरणांनी उजळावी त्याप्रमाणे अंधारलेलं मन त्या आठवणींनी उजळून निघालं. अवसेत कधी का तम उजळे -  अमावस्येच्या रात्रीचा अंधार उजळत नाही जोपर्यंत चंद्राचं आकाशात पुनरागमन होत नाही. गाण्याच्या स्वरांनी उदासीनतेचा अंधःकार दुरु झाला. निमिषात पुन्हा जग सावरले -- क्षणात मनाला पुन्हा उभारी आली.  




Sunday, October 31, 2021

बजबजपुरी


काही दशकांपूर्वी 

भारत एक खोज होता 

मग परदेशी पर्यटकांना 

आकर्षित करण्यासाठी  

त्याला Shining India  

म्हणण्यात आलं     

आज भारत एक बजबजपुरी 

झालाय असं वाटतं

काही वर्षांपूर्वी एका लेखकानी 

मुंबईला मॅक्सिमम सिटी म्हंटलं होतं 

आज त्या शहराची malignant city 

महारोगी महानगरी झाली आहे 

असं वाटतं  

एवढं कसं बदललं?

लोकांचा आपल्या शहरावरचा

तोंडावरचा, वागण्यावरचा  

ताबा कसा सुटला

संस्कार-हीनता  

इतकी कशी बळावली   

परवा मला फोनवर 

अचानक धडाधड 

मेसेज यायला लागले 

"तू तुझ्या आईचा जीव घेतलास 

वडिलांचा जीव घेतलास

त्यांचं सगळं हडप केलस"

नंबर अनोळखी होता 

मी विचारलं, "कोण तुम्ही, नाव सांगा" 

उत्तर आलं, "खराब मालिका"

नाव पट्कन डिलिटही करण्यात आलं 

त्यांनी माझा नंबर कुठून कसा मिळवला 

कुणास ठाऊक 

मी म्हंटल, "नाही हो खराब मालिका 

तुम्ही असं कसं म्हणता 

आईवडिलांचं काहीच 

माझ्याकडे नाही  

मी कशाला त्यांचा जीव घेईन  

ते नैसर्गिक कारणांमुळे गेले 

हवं तर त्यांच्या मृत्युदाखल्याची 

प्रत पाठवते तुम्हांला "

"अगं, भिकार बाई तु

फुटक्या कवडी इतकीही किंमत नाही तूला 

तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार" 

मालिका कडाडल्या 

त्यांनी लावलेल्या कु-विशेषणांकडे 

मी दुर्लक्ष केलं  

उलट डोकं शांत ठेऊन म्हंटलं 

"अहो खराब 

मी आईवडिलांचा जीव घेतला असता  

तर पोलिसांनी पकडलं नसतं का मला?" 

"पकडणारच आहेत, पकडणारच आहेत 

तुला काय वाटलं सोडतील तुला 

तू येऊन तर बघ इथे 

पाऊल तर ठेव  

हातात बेड्या ठोकुन  

तुरुंगात नाही टाकलं तुला तर 

नावाची खराब मालिका नाही मी 

सगळ्यांची आयुष्य उध्वस्त केलीस तू

भरपूर पुरावा आहे तुझ्या विरूद्ध"  

त्यांनी धमकी दिली  

"पण खराब

तुम्ही म्हणता 

मी फुटक्या कवडी इतकीही किंमत नसलेली 

भिकार बाई मग 

मी कसं कोणाचं आयुष्य उध्वस्त करू शकते"

मी मनातली शंका व्यक्त केली 

"अगं तुझी काय बिशाद तू कोणाच्या केसालाही धक्का लावशील  

आम्ही काय हातात बांगड्या भरल्यात असं वाटलं कि काय तुला"

खराब मालिका आपलंच आधीचं बोलणं खोडत म्हणाल्या 

"खराब, माझा- तुमचा काही संबंध नाही 

मी तुमचं काही घोडं मारलेलं नाही 

मग तुम्ही उगीचच 

माझ्यावर आग का पाखडताय 

का तुम्हांला कोणीतरी 

भाड्याने घेतलय 

मला ट्रोल करण्यासाठी" 

मी संभ्रमात पडले होते

"अगं, कैदाशीणी

तुझे दिवस संपलेत आता  

तुला असा धडा शिकवते 

कि तु दयेची भीक मागत 

माझ्या दारात येशील"   

खराबनी परत धमकी दिली 

आणखी बरच काही बरळलय 

हे संभाषण मुर्खांच्या मार्गानी 

चाललंय असं वाटलं 

म्हणून मी त्यांना म्हंटलं 

"खराब, मला वाटतं तुम्हांला कोणीतरी 

चुकीची माहिती दिली आहे  

मी आता तुम्हांला ब्लॉक करते 

म्हणजे परत कधी तुम्हांला 

माझ्याशी चॅट करण्याची  

इच्छा व्हायला नको" 

"कर गं, तुला किती ब्लॉक करायचंय तेवढं कर 

माझ्या जवळ तुझ्या विरुद्ध 

भरमसाट पुरावा आहे 

तो कसा ब्लॉक करशील?

मी पत्रकार परिषद बोलावली आहे 

लहान -मोठ्या वाहिन्यांचे 

वर्तमानपत्रांचे वार्ताहर,

ब्लॉगर्स आणि व्हलॉगर्स 

यू ट्युबर्स, इन्फ्लुएन्सर्स 

कन्टेन्ट क्रिएटर्स 

सगळे पत्रकार परिषदेला हजर रहाणार आहेत 

त्यांना मी तुझ्या विरुद्धचा पुरावा दाखवणार आहे 

मग बघते कशी रडत भेकत 

माझे पाय धरायला येशील ते " .... 

मी खराब मालिकांना ब्लॉक केलं 

कोणीतरी आपल्याकडे 

दयेची भीक मागत यावं 

"come begging 

and crawling 

for mercy"

अशी इच्छा 

एखाद्याच्या मनात 

का

उत्पन्न होत असेल  



 



Saturday, October 23, 2021

Sunrise

Photos of Sunrise captured from my New York City apartment. 



































                                     
 
































































                                                    












































                                                   




                                                   
















    





































yesheeandmommy@gmail..com  


      

















Monday, September 6, 2021

घटस्फोटाची रोपं


मलिंडा आणि बिल गेट्स आणि मकेंझी आणि जेफ बेझोज या जगप्रसिद्ध अतिश्रीमंत जोडप्यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकल्यावर किती जणांना वाटलं असेल - ते घेतात तर मी का नको? जगभरात कोट्ट्यावधी लोक ज्यांना आदर्श मानत असतील अशी दोन जोडपी आपली २५-३० वर्ष जुनी लग्न संपवताना बघून किती जणांच्या मनातील घटस्फोटाच्या बीजाला अंकुर फुटले असतील.   

काहींना मुळातच दुसऱ्यांकडे जे आहे ते स्वतःला हवं असतं. दुसरे जे करतात ते करावंसं वाटतं. 

मैत्रिण फेसबुकवर आपले प्रवासाचे फोटो टाकते. लगेच एखाद्या बायकोला वाटतं, "शी, कसलं निरस आयुष्य जगतेय मी. माझी मैत्रीण जगभर फिरतेय. शाळेत दहा वर्ष एकत्र शिकलो आम्ही. आज ती कुठे आहे आणि मी कुठे आहे. मी घरात बसून रांधा - वाढा- उष्टी काढा करतेय आणि ती कुठेतरी जमैका - फिमैकात बीच वर उभी राहून सेल्फी काढतेय" 

खरंतर पाचच मिनिटांपूर्वी तिनं दुसऱ्या एका मैत्रिणीला फोनवर सांगितलेलं असतं, " मला ना आजकाल स्टेकेशनच बरी वाटते. कोणी सांगितलंय ते महिनोन महिने आधी तिकिटं काढा. बॅगा घेऊन विमानतळावर जा. नेमकं निघायच्या दिवशी हवामान खराब होतं. कधी विमान उशिरा सुटतं. कधी सुटतच नाही. सुटलं तरी विमानात खायला काही देत नाहीत. सकाळी लवकर फ्लाईट असेल तर आदल्या रात्री सँडविच करून, अंडी उकडून फ्रीज मध्ये ठेवावी लागतात. खायचे पदार्थ विमानात नेऊ देतात पण घरचं पाणी नेऊ देत नाहीत. एवढ्या लोकांच्या बरोबर विमानतळावर आणि विमानात बसायचं, तिथली बाथरूम्स वापरायची म्हणजे व्हायरसची टांगती तलवार डोक्यावर असते. कशाला हवाय तो जीवाला त्रास. त्यापेक्षा घरात बसावं. फिरण्याचे पैसे शॉपिंगवर आणि बाहेर जेवण्यावर उधळावेत. व्हेकेशन पेक्षा स्टेकेशनच बरी". 

पण मैत्रिणीचे प्रवासाचे फोटो बघितले कि तिचं डोकं फिरतं. ते किती वर्षां पूर्वीचे आहेत ते न बघताच ती नवरा आणि मुलांच्यावर खेकसते, "चला, फुटा सगळे जण इथुन. कुठे जायला नको नि यायला नको. दिवसभर आपले नुसते फोनमध्ये डोकं खुपसुन बसलेले असता" 

तसं रांधा -वाढा आणि उष्टी काढा एवढंच माझं आयुष्य झालंय हे म्हणायला खूप नाट्यमय वाटत असलं तरी ते पूर्णपणे खरं नसतं. दुपारची जेवणं - आज सॅलड मागव, उद्या सॅंडविच मागव अशी असतात. रात्री वरण-भात-भाजी खायचा कंटाळा आलाय - चला पिझ्झा मागवूया, टर्कीश, चिनी नाहीतर जपानी मागवूया असं होतं. त्यात रांधायचं काही नसतं. वाढायचही फारसं नसतं. उष्टी काढणे म्हणजे ज्यातून जेवण आलं आहे ते प्लॅस्टिकचे डब्बे धुऊन रिसायकल करणे आणि उरलेलं खरकटं, जेवण आलेल्या पिशवीत टाकून ते कचऱ्याच्या टोपलीत टाकणे इथ पर्यंतच मर्यादीत असतं. पण रांधा - वाढा - उष्टी  करते असं म्हंटलं कि आपण खूप कष्ट करतो असं वाटतं. 

त्यातच बेझोज आणि गेट्स यांच्या घटस्फोटाच्या बातमीची भर पडते. घरातल्या कुंडीत एक बीज रोवलं जातं. 

लॉकडाऊन मुळे नेहमीच्या काही गोष्टी करता न आल्याने आधीच कंटाळा आलेला असतो. नवऱ्याला रेस्टोरंट मध्ये जेवायला जायची आवड असते. बराच काळ ते शक्य होत नाही. नंतर काही प्रमाणात शक्य झालं तरी व्हॅक्सीन घेतली की नाही,  टेस्ट केली कि नाही अशा प्रश्नांची उत्तरे दिली तरच आत प्रवेश मिळतो. काहींना त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आवडत नाही. मग कंटाळा अधिक राग अशी बेरीज होते. 

कुंडीतल्या बीजाला खतपाणी मिळतं. 

थोडे दिवस घ्यावा कि घेऊ नये अशी घालमेल होते. घेतला तर काय होईल, नाही घेतला तर काय होईल यावर चर्चा होते. घ्यायचाच असेल तर वकील हवेत -दोघांचे वेगवेगळे - एक त्याचा आणि एक तिचा. ओळखीच्या वकिलाला फोन लावला जातो - "बाबा रे, घटस्फोट वाल्या वकिलांची नावं माहिती असली तर दे". तो म्हणतो, "नक्कीच, मला बरीच नावं माहीत आहेत. चार वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी वेगळे झालो तेंव्हा आम्ही त्यापैकी काही जणांशी बोललो होतो." 

"अरे व्वा! तुझा पण घटस्फोट झालाय. फारच छान." 

हे ऐकल्यावर कुंडीत झारी भर पाणी पडतं. 

आपसात अजिबात न पटणाऱ्या कित्यके जोडप्यांना आयुष्यभर भांडत एका घरात राहावं लागतं कारण दोन वेगवेगळी घरं घेणं परवडत नाही. दोन घरं परवडतील कि नाही हे ठरवण्यासाठी आर्थिक बाबीं मधल्या तज्ञाची मदत लागते. 

त्याला फोन लावला जातो. तो म्हणतो, "अर्रे, त्यात काहीच कठीण नाही. चार वर्षांपूर्वी माझा आणि माझ्या पत्नीचा घटस्फोट झाला. आम्ही एका मध्यस्ताची मदत घेतली. त्याने सगळी विभागणी एकदम छान करून दिली. " 

"अरे वा! तुझाही घटस्फोट झाला? चार वर्षांपूर्वी ? घटस्फोटाची साथ आली होती कि काय तेंव्हा? "  

हे ऐकलं कि कुंडीत एक चमचा खत पडतं. 

What Women Want  नावाचा सिनेमा वीस वर्षांपूर्वी येऊन गेला. मी तो पाहिला नाही. त्यामुळे बायकांना काय हवं असतं ते मला माहीत नाही. पण मलिंडा गेट्स आणि मकेंझी बेझोज यांना काय हवं आहे हे माध्यमांमध्ये त्यांच्या विषयी जे वाचायला मिळतं त्यावरून समजतं.  

बेझोज यांचा घटस्फोट आधी झाला. त्यातून मकेंझी बेझोजना भरपूर पैसे मिळाले. शिवाय ऍमेझॉन मध्ये छोट्टासा हिस्सा. त्यांच्या प्रचंड संपत्तीतील बरचसे पैसे त्या दान करतात. त्या स्वतः लेखिका आहेत. त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. जेफ बेझोज पासुन घटस्फोट झाल्यावर आता त्यांनी त्यांच्या मुलांच्या शाळेतील शिक्षकाशी लग्न केलं आहे. 

गेट्स घटस्फोट आत्ता होतोय. सिऍटल जवळ गेट्स कुटुंबाचं ६०००० स्क्वेअर फूटाच घर आहे. परंतु मलिंडा गेट्सनी मागे एका मुलाखतीत म्हंटल होतं - "मी वाट बघतेय कधी एकदा आमची मुलं आपापल्या मार्गाने जातील आणि मी आणि बिल १५०० स्क्वेअर फुटाच्या घरात रहायला जाऊ." 

दोघींचेही नवरे अमर्याद संपत्ती मिळवण्याच्या आणि केवळ ह्या ग्रहावरच नाही तर परग्रहांवरही आपलं वर्चस्व स्थापन करण्याच्या मागे असताना, जोडीदार म्हणून शाळा शिक्षकाची निवड करणं - ज्याची मिळकत आणि कार्यक्षेत्र (महत्वाचं असलं तरी) मर्यादित असणार किंवा १५०० स्क्वेअर फुटाच्या लहानशा घरात रहाण्याची स्वप्न बघणं - यातुन दोन्ही बायकांनी दाखवून दिलय कि त्यांना यापूढे काय हवंय. 

भारतापेक्षा अमेरिकेत घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे. काही आकडेवारी नुसार जवळपास ५० % अमेरिकन लग्नांच पर्यवसन घटस्फोटात होत. याचं  कारण इथली समाजव्यवस्था, आर्थिक सुब्बत्ता, त्याचे फायदे आणि त्याच्या अनुषंगाने येणारे ताणतणाव हे असावं. शिवाय एकात एक असे अनेक व्यवसाय त्यामुळे तयार होतात  - कौटुंबिक कायद्यात प्रवीण असलेले वकिल, त्यांच्याशी संलग्न अनेक प्रकारचे सल्लगार, आईवडिलांचा घटस्फोट झाला आणि त्यांनी दुसरी लग्न केली कि बदलत्या कुटुंबाशी मुलांना जुळवुन घ्यावं लागतं म्हणून मुलांसाठी वेगवेगळे समुपदेशक वगैरे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत जितके जास्त व्यवसाय तयार होतील तितकं चागलं. 

पूर्वी भारतात घटस्फोट हा प्रकार फारसा नव्हता. लग्नातुन बाहेर पडावंसं वाटलं तर पुरुष पहिली बायको असतानाही दुसरं लग्न करायचे. मुलं लहान असतील तर नवऱ्या बरोबर रहाणे आणि तो जे देईल त्यात संसार चालवणे याशिवाय बायकांना गत्यंतर नसायचं. माहेरची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर मुलं मोठी झाली कि बायका माहेर जाऊन रहायच्या. 

कोल्हापूर- सांगली परिसरातील इनामदारांच्या वाड्यात अशा परत आलेल्या आत्त्या असायच्या. लहानपणी नातेवाईकांच्या गप्पात ऐकलेलं मला आठवतंय- बडोद्याची आत्या आता इथेच असते, इंदूरची आत्या आली ती परत कधी घरी गेलीच नाही. फारसा गाजावाजा न करता बायका आपली घर सोडून माहेरच्या घरात शिरायच्या. आधीच पन्नास माणसं असलेल्या एकत्र कुटुंबात ते खपून जायचं. त्या घरात त्यांना काही महत्व मिळत नसे. आईच्या भोवती राहून तिला मिळ्णाऱ्यातलं थोडंसं महत्व त्या स्वतःकडे घेऊ पहातायत असं वाटायचं.   

बहिणाबाईंच्या चार ओळी त्यांच्या काळातील परिस्थितीचं वर्णन करतात. त्यांच्या आज माहेराले जाणं या कवितेत बहिणाबाई म्हणतात: 

देते देरे योग्या ध्यान 

ऐक काय मी सांगते 

लेकीच्या माहेरासाठी

माय सासरी नांदते. 

आपल्या मुलीला माहेर मिळावं म्हणून आई प्रसंगी कठीण परिस्थिती सहन करूनही सासरी नांदत असे. अशा प्रकारे विचार करण्याची तेंव्हा आपल्याकडे पद्धत होती. भारतातही जशी आर्थिक प्रगती होतेय तसं घटस्फोटाच प्रमाण वाढतंय. 

गेट्स आणि बेझोज यांच्या व्यवसायाच्या व्यापकतेमुळे त्यांच्या घटस्फोटाची "बातमी " होण अपरिहार्य होतं. तरीही या दोन्ही कुटुंबांनी आपले घटस्फोट खूप भारदस्त पणे हाताळले. त्या विरुद्ध ९० च्या दशकात न्यूयॉर्क सिटीमध्ये तेंव्हाचे महापौर रुडी ज्युलियानी यांचा घटस्फोट आणि ट्रम्प साहेबांचा त्यांची पहिली पत्नी ईव्हाना ट्रम्प पासूनचा घटस्फोट यांचं जवळपास तमाशात रूपांतर झालं होतं. 

ज्या आईवडिलांचा घटस्फोट झालेला आहे त्यांच्या मुलांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्त असतं असं म्हणतात. सहाजिक आहे. आईबाबांनी जो मार्ग दाखवून दिला त्यावरून चालणं मुलांना सोप्प जात असेल. आईनी क्षुल्लक कारणा वरून घर सोडलं तर मुलगीही तसं का नाही करणार? ज्योत से ज्योत जगाते चलो तसं रोप से रोप लगाते चलो अशी घटस्फोटाची रोपं अशा प्रकारे पसरत असावती. 

हे म्हणजे वृद्धाश्रमांसारखं झालं. अमेरिकेत वृद्धाश्रम हि मूलभूत गरज आहे. फार पूर्वीपासून आईवडिल आणि मुलांनी एकत्र रहायची इथे पद्धत नाही. भारतात केवळ दोनतीन दशकांपूर्वी वृद्धाश्रम फारसे प्रचलित नव्हते. पण आता खेडेगावातही त्यांची गरज भासू लागलेली दिसते. बघता बघता घटस्फोटाची रोपं भारतात पसरून त्यांचं प्रमाणही अमेरिके इतकंच होण्याची शक्यता आहे. 






Saturday, September 4, 2021

Oprah's Mantra 3



















 

Monday, August 23, 2021

ऊर्जा शोषक


ऊर्जा शोषक -  energy vampires हा शब्द आजकाल फार ऐकू येतो. 

Vampires ही संकल्पना युरोपियन लोककथां मधून आलेली आहे. त्यांच्या वर अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमा येऊन गेलेत. Vampires हे जीव स्वतःहून जगू शकत नाहीत. ते दुसऱ्यांच्या जीवनाचं सत्व शोषून -  दुसऱ्यांचं रक्त पिऊन जगतात. त्याप्रमाणे ऊर्जा शोषक लोक स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्यांच्या ऊर्जेचं शोषण करतात.  

डॉकटर ख्रिसचीऍन नॉर्थरूप (Christiane Northrup M.D.) यांनी ऊर्जा शोषकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा यावर पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे Dodging the Energy Vampires. डॉ नॉर्थरूप पेशाने स्त्री रोग तज्ञ आहेत. अनेक वर्षे तो व्यवसाय केल्यावर आता त्या सर्व समावेशक (प्राचीन + अर्वाचीन ) उपचार पद्धतींचा प्रचार आणि प्रसार करतात. त्यांच्या पुस्तकाचा भर स्त्रीया किंवा पुरुषांनी ऊर्जा शोषक जोडीदारां पासून आपला बचाव कसा करावा यावर आहे.

ऊर्जा शोषक जोडीदार मिळाला किंवा मिळाली तर त्यांच्या पासून लांब जाणं, त्यांना आपल्या आयुष्यातुन वगळण हा त्यावरचा एकमेव उपाय असतो कारण त्या लोकांचं वागणं कधी बदलत नाही. पराकोटीच्या आत्मकेंद्रित वृत्तीने जोडीदाराला कसं दुखवायचं ते ऊर्जा शोषकांना चांगलं जमतं.

ऊर्जा शोषक हे केवळ जोडीदारच नाही तर वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटू शकतात. त्यात आपले आईवडील, भाऊबहीण, जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजारी, ऑफिस मधले सहकारी, अनोळखी लोक कोणीही असू शकतं. त्यांना वेळीच ओळखून त्यांच्या पासुन आपला बचाव केला नाही तर आपलं शारिरीक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकतं.

आईवडील मुलांच्या ऊर्जेचं शोषण कसं करतील असा प्रश्न पडू शकतो. पण दोन मुलं असली तर एका मुलाची कायम काळ्जी आणि लाड करायचे आणि दुसऱ्य मुलावर कायम अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांचं ओझं टाकायचं असं करणारे आई किंवा वडील असू शकतात. 

जोडीदार हे मनानी किंवा कायद्यानी जोडलेलं नातं असतं. ते बऱ्याच मोठेपणी आपल्या आयुष्यात येतं. सोप्प नसलं तरी प्रयत्न केल्यावर ते तोडता येऊ शकतं. जास्त त्रासदायक असतं ते रक्ताचं नातं ज्या नात्यामुळे भरपूर मानसिक छळ होत असला तरी ते सहजासहजी लक्षात येतं नाही. लहानपणापासून त्याची सवय झालेली असते. तो छळ अंगात भिनलेला असतो. 

नातं मनाचं असो किंवा रक्ताचं - ऊर्जा शोषकांच्या वागण्याचा वारंवार त्रास होऊ लागला तर डोळसपणे त्यांचं वागणं तपासुन निग्रहाने त्यांना लांब ठेवण्याचा कठोरपणा करायला शिकावं लागतं. मुळातच ते तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊ शकतात याचं कारण तुम्ही empath असता. कठोरपणा तुमच्या स्वभावात नसतो. (empath - from empathy - दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची, दुसऱ्यांबद्दल कणव वाटण्याची कुवत)

ऊर्जा शोषकां पासून वेगळं होणं जमलं नाही तर self- care - स्वतःची काळजी घेणे, स्वतःवर लक्ष केंद्रित करणे हाच एक उपाय उरतो. ऊर्जा शोषक दुसऱ्यांची पर्वा करत नाहीत. त्यांचं आयुष्यच दुसऱ्यांची ऊर्जा शोषण्यावर अवलंबून असत. अंतर्गत अस्वस्थता बऱ्याच लोकांमध्ये असते. काही लोक त्याचा स्वतःला त्रास करून घेतात. ऊर्जा शोषक दुसऱ्यांना त्रास देतात.

एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा आपल्याला इतका त्रास होतो कि आपण म्हणतो - ती नेहमी माझं डोकं खाते. हे क्वचित कधितरी घडलं तर सहन करता येतं. पण वारंवार झालं तर त्याचा नकळत आपल्यावर खोल परिणाम होतो. काही लोकांचा स्वभाव खूप नकारात्मक, विषारी असतो. त्यांच्या संगतीत जास्त वेळ घालवला तर ती नकारात्मकता, ते वीष कायमच आपल्यात उतरतं. काही लोक उगीचच आपला वेळ खातात. काहींना नेहमी तुमच्या समोर स्वतःच्या दुःख्खाचा पाढा वाचायला आवडतं. नसलेल्या दुःख्खाचं अवडंबर माजवून दुसऱ्यांच्या कडून सहानुभूती मिळवणे ह्यात ऊर्जा शोषकांचा हातखंडा असतो. 

एनर्जी व्हॅम्पायर हा शब्द समोर आला कि त्याबरोबरच दुसरा शब्द समोर येतो तो म्हणजे empath . हे दोन शब्द हातात हात घालून येतात. Empaths कायम सहानुभूतीने डबडबलेले असतात. त्यांना सगळ्यांच्या बद्दल सहानुभूती वाटते. कोण सहानुभूती, दयामाया दाखवण्याच्या लायकीचं आहे, कोण नाही असा भेदाभेद empaths करू शकत नाहीत. त्यांच्या मनात कोणाबद्दल काळंबेरं नसतं. त्यामुळे आपल्या बद्दल कोणाच्या मनात काळंबेरं असू शकेल हे त्यांच्या लक्षात येत नाही. ऊर्जा शोषक अशा लोकांना बरोबर हेरतात आणि त्यांच्यावर झडप घालून त्यांची ऊर्जा शोषतात. Empath हे ऊर्जा शोषकांचं सावज असतं. 

रोजच्या आयुष्यात आपल्या भोवती वावरणाऱ्या ऊर्जा शोषकांना ओळखणं सोप्प नसतं. पण त्यांना ओळखून त्यांच्या पासून स्वतःचा बचाव करणं फार गरजेचं असतं. तसं केलं नाही तर आपलं मानसिक,शारीरिक किंवा आर्थिक आरोग्य बिघडू शकतं. एखादी व्यक्ती खूप सरळमार्गी असेल, नाका समोर बघून चालण्याच्या वृत्तीची असेल तर तिच्या लक्षातही येत नाही कि तिच्या भोवतीच्या वर्तुळात कोणतरी तिच्या ऊर्जेचं शोषण करण्यासाठी टपून बसलेलं आहे. पण तसे टपून बसलेले लोक असू शकतात. 

एका घरात भावंडांच्या मध्ये प्रचंड सिबलिंग रायव्हरली - आपसातली चढाओढ असते. कुटुंबाची एकी, भावंडांचं प्रेम या गोंडस पांघरूणा खाली ती झाकायचा प्रयत्न केला जातो. तरी आपसातली चुरस लपत नाही. एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन भावंडं असतात. त्यातील मुलीचं लग्न होतं. तिची मुलं मोठी होतात. तिचा संसार सुरु असतो. मग बऱ्याच वर्षांनी भावाचं लग्न होतं. त्याला मुलं होतात. भावाची व्यवसायातली प्रगती, त्याच्या मुलांचं आपल्या माहेरी होत असलेलं कौतुन बहिणीला सहन होत नाही. ती मुलांसह माहेरी येऊन रहाते. यापुढे मग *मीमीमी, माझी मुलं आणि त्यांचं कल्याण ह्याकडे माहेरी सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं. शेअर कर, शेअर कर, तुझ्याकडे आहे ते शेअर कर, तुला तरी आमच्या शिवाय कोण आहे असा सतत पाठपुरावा करून भावाची ऊर्जा शोषली जाते. 

एका व्यक्तीच्या हट्टापायी इतरांना त्रास होऊ शकतो. बायको आणि मुलं सोडून गेल्यावर बहिणीच्या नवऱ्याचा मृत्यू होतो. शेअर कर, शेअर कर, शेअर कर चा सारखा तगादा भावाच्या मागे लावल्यामुळे त्याच्यावर जीवघेणं आजारपण कोसळतं. त्याला आपल्या व्यवसातलं लक्ष कमी करावं लागतं. त्याची प्रगती थांबते. तरुण वयात भावावर ओढवलेल्या आजारपणाचे खोल परिणाम त्याच्या बायको - मुलांना भोगावे  लागतात. काळाच्या पडद्यावर हे सगळे ठिपके वेगवेगळे आणि लांबलांब दिसतत. पण जर ते ठिपके जोडता आले तर चित्र स्पष्ट होत जातं. मधल्या काळात बहिणीच्या मह्त्वाकांक्षेची घोडदौड न थांबता अव्याहत चालू असते. पण म्हणून भावाची ऊर्जा शोषण्याचं काम ती थांबवते असं नाही. ते चालूच रहातं. 

तुम्ही नाका समोर बघून चालत असताना कधी कोण ऊर्जा शोषक तुम्हाला येऊन चिकटेल सांगता येत नाही. 

मंदा आणि कुंदा दोघी बहीणी असतात. मंदाला मंद रिकामटेकडेपण सतावत असतं. आई आणि भावंडांच्या आयुष्यात मनसोक्त ढवळाढवळ करून ती वेळ घालवण्याचा प्रयत्न करते. पण मुलं जशी मोठी होतात तसं रिकामटेकडेपण वाढत जातं. बहीण आपल्या जवळ असेल तर वेळ चांगला जाईल असं तिला वाटतं. परंतु बहीण जवळ हवी असली तरी स्वतःच्या घरात नको असते.

कुंदाची सोय दुसऱ्या कोणाच्या तरी घरात करण्यात येते. ते घर तुमचं असू शकतं. तुम्ही कुरबुर केली तर - एक तीळ सात जणांनी वाटून खावा अशी आपल्या संस्कृतीत म्हण आहे याची तुम्हांला आठवण करून दिली जाते. कुंदा तुमच्या घरात येऊन राहिल्यावर तुमच्या घरातलं वातावरण कुंद होतं. 

बहीण जवळ रहायला आल्यावर मंदाचं रिकामटेकडेपण थोडं कमी होतं. त्यातच कुंदाच्या मुलीचं लग्ना ठरतं. मग तर काय मज्जाच मज्जा. लग्न हा कोणाच्याही रिकामटेकडेपणावर रामबाण उपाय असतो. भाचीच्या लग्नात पुढाकार घेण्याची संधी मंदा दवडत नाही. लग्न झाल्यावर भाची आणि तिचा नवरा रहाणार कुठे याची काळजी करण्याची तिला काही गरज वाटत नाही. तिला ते स्वतःच्या घरात नको असतात ... बस्स. एवढीच तिची माफक अपेक्षा असते. आई काय किंवा मुलगी काय आपल्या घरात कोणी नको यावर मंदा ठाम असते. लग्न झालेली भाची नवऱ्या सकट तुमच्याच घरात रहायला येते. या दोघांना तरी तुमच्या घरात ठेऊन घ्या असं तुम्ही पुटपुटलात तर एक तीळ सात जणांत वाटून घ्यायची म्हण फक्त तुम्हांलाचं लागू हॊते, आम्हांला नाही असं तुम्हांला सुनावण्यात येतं. 

या ऊर्जा शोषकां पासुन स्वतःची सुटका करून घेण्यासाठी एखादी जादूची कांडी सापडते का ते शोधायला म्हणूत तुम्ही ऍमेझॉनच्या जंगलात तपासाला निघता . 


*मीमीमीमीमी करणारे नार्सिसिस्ट (आत्मपूजक - स्वतःची पूजा करणारे) असू शकतात. नार्सिसिस्ट फक्त स्वतःचाच विचार करतात. दुसऱ्यांचा विचार करण्याची, दुसऱ्यांबद्दल सहानुभूति वाटण्याची क्षमता त्यांच्या मध्ये नसते. सगळे नार्सिसिस्ट ऊर्जा शोषक असतात. पण सगळे ऊर्जा शोषक नार्सिसिस्ट असतात का? एखादी व्यक्ती नार्सिसिस्ट आहे कि नाही याचं निदान करणं मानसशास्त्राच्या अखत्यारीत येतं. इंटरनेटवर वर एनर्जी व्हॅम्पायर्स आणि नार्सिसिझम या विषयावर भरपूर माहिती उपलब्ध आहे जेणेकरून आपल्या भोवतालच्या ऊर्जा शोषकांना कसं ओळखायचं याबाबतीत आपण जागरूक होऊ शकतो. 




Thursday, June 24, 2021

कानावर पडलेलं (Overheard)


लॉकडाऊनचा एक अनपेक्षित परिणाम असा झालाय की सार्वजनिक ठिकाणी कानावर पडणारं अनोळखी लोकांचं संभाषण ऐकण्याची सोय तात्पुरती का होईना बंद पडली आहे. एरवी कॉफी शॉप मध्ये बसलं की लोकनिरीक्षण करण्याची चांगली संधी मिळते. आजूबाजूला बसलेले लोक आपसात किंवा फोनवर काय बोलतात ते आपसूक ऐकू येतं. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. फक्त कान उघडे ठेवले कि भागतं. आपोआप मनोरंजन होतं. टीव्ही वरील लघु मालिकेतील एखादं दृश्य पडद्यावर बघतोय असं वाटतं. दुसऱ्यांच्या आयुष्यातलं तेवढंच नाट्य मला आता झेपतं. 

एकदा माझ्या समोर बसलेली ऐंशीच्या जवळपासची आज्जी फोनवर कोणाशी तरी बोलत होती. पलीकडची व्यक्ती तरुण असावी असा मी संभाषणावरून अंदाज बांधला. आश्चर्य वाटलं कि त्या वयातही कोणाला तरी आज्जीचा सल्ला महत्वाचा वाटत होता. कदाचित तिला ऑडिशन्सचा अनुभव असावा. आज्जी त्या व्यक्तीला म्हणाली, " मला खूप आश्चर्य वाटलं कि ऑडिशन झाल्यावर लगेच तू फिरायला कशी गेलीस (किंवा गेलास - इंग्रजीत "तू" पुल्लीगी आहे कि स्त्री लिंगी हे कळत नाही) . 

आज्जी पुढे म्हणाली "तू पोस्ट केलेले फोटो बघून मला प्रश्न पडला की तुला जास्त महत्वाचं काय आहे. फिरायला जाणं कि ऑडिशन. मी काही बोलले नाही कारण परत तू म्हणशील कि मी तुझ्यावर टीका करते. या सारख्या मोठ्या ऑडिशन्स तुला पुन्हा पुन्हा मिळणार नाहीत. फार कमी मिळतील. तू ऑडिशन झाल्यावर फिरायला गेली असलीस तरी प्रवासाचं प्लॅनींग ऑडीशनच्या आधी केलं असणार. ऑडिशनच्या आधी तुझं सगळं लक्ष फक्त ऑडिशनवरच केंद्रित असायला हवं होतं. 

आज्जी अगदी हळुवार बोलत होती. अधून मधून पलीकडची व्यक्ती काहीतरी बोलत असावी. शेवटी ती म्हणाली. " पुढच्या वेळी कोणाला तरी बरोबर घेऊन जा. व्हॉइस कोच, ऍक्टिंग कोच असं कोणतरी. म्हणजे ते तुला तु ऑडिशन कशी दिलीस ते सांगतील." 

एवढं बोलून तिनं फोन बंद केला आणि कॉफी बरोबर जेवणाचा जो काय छोटासा ट्रे घेतला होता तो उघडुन जेवू लागली.  

अमेरिकेची नाट्यसृष्टी मॅनहॅटन मध्ये आहे तसेच NBC, CBS,ABC सारख्या मोठ्या टीव्ही कंपन्यांचे स्टुडिओ ही इथे आहेत. कॉफी शॉप जवळ एक स्टुडिओ आहे तिंथे डॉकटर ऑझ  (Dr. Oz) या शोचं चित्रीकरण होतं. ऑझ नावाचे वैद्यकीय डॉकटर तज्ञ पाहुण्यांना आपल्या कार्यक्रमात बोलावून वेगवेगळ्या विषयांवर प्रेक्षकांना सल्ला देतात. या टीव्ही शोजची तिकीट बहुतेक फुकट असतात पण ती आधी मागवावी लागतात. नाहीतर रांगेत उभं रहावं लागतं आणि प्रवेश मिळेलच अशी खात्री नसते. स्टुडिओ बाहेरील रांगेत प्रामुख्याने महिला उभ्या असतात आणि त्यांनी ओढून बरोबर आणलेले बॉयफ्रेंड किंवा नवरा. 

मी कॉफी शॉप मध्ये बसले होते. समोरची खुर्ची रिकामी होती. एक बाई आली आणि म्हणाली - "मी इथे बसू?'. बसल्यावर म्हणाली कि ती डॉ. ऑझच्या दोन शोज च टेपिंग बघून आली होती. आपली बॅग उघडुन तिनं शो तर्फे मिळालेल्या भेटवस्तू मला दाखवल्या. शॅम्पू , कंडिशनर, लोशन, ग्रनोला बार असं बरच तिला भेट मिळालं होतं. 

मग तिनं थोड्या इथल्या तिथल्या गप्पा मारल्या. तिच्या घरातला कपडे सुकवायचा ड्रायर बिघडला होता. कपडे ड्रायर मध्ये चांगले वाळतात कि दोरीवर या विषयावर आम्ही थोडी चर्चा केली. भारतात सर्वसाधारण असा समज आहे कि कपडे ड्रायर मध्ये वाळवले तर लवकर खराव होतात. त्यापेक्षा दोरी बरी पडते. ते मी तिला सांगितलं. तर तिचं असं मत पडलं कि दोरीवर टॉवेल्स खूप ताठ वाळतात. त्यापेक्षा ड्रायर मध्ये मऊ वाळून निघतात. या तिच्या मताशी मी सहमत होते. पुढे ती म्हणाली की तिच्या बहीणीनी की भाचीनी - कोणीतरी हिंदू धर्म स्विकारलाय. त्यांच्या बरोबर ती नियमित फ्लशिंगच्या गणेश मंदिरात जाते. 

आमची दोघींचीही कॉफी पिऊन झाली होती म्हणून दोघी एकदमच कॉफी शॉपच्या बाहेर पडलो. जवळ पिझ्झा कुठे चांगला मिळतो असं विचारून ती पिझ्झाच्या शोधात गेली. जाताना म्हणाली की वेगवेगळ्या कार्यक्रमांचं चित्रिकरण बघण्यासाठी ती या भागात नेहमी येते, "भेटू आपण कधीतरी असेच कॉफी शॉप मध्ये". पण मग लॉकडाऊन आला. 

अमेरिकन लोकांची गप्पा मारण्याची ही पद्धत मला खूप कौतुकास्पद वाटते. इथल्या बऱ्याच लोकांना ते अगदी सहज जमतं. कॉफी शॉप, वेटिंगरूम, बस स्टॉप किंवा प्रवासात सर्वस्वी अनोळखी व्यक्ती तुमच्याशी मित्रत्वाचा स्मॉल टॉक करते. यातला महत्वाचा भाग म्हणजे ते तुम्हाला तुमच्याबद्दल काही प्रश्न विचारत माहीत. उगीचच लोकांना खाजगी प्रश्न विचारायचे नाहीत हा इथल्या सामाजिक एटीकेटचा भाग आहे. 

स्वतःबद्दल सांगावसं वाटेल ते तुम्हांला सांगतात. तुम्ही जे काही सांगाल ते ऐकून घेतात. स्वतःच्या दुःखाचा पाढा तुमच्यासमोर वाचत नाहीत. राजकारणा सारख्या वादग्रस्त विषयांवर बोलत नाहीत. तुमचं नावगाव विचारत नाहीत. स्वतःच सांगतात असही नाही. प्रसंगानुसार इथलं तिथलं बोलतात. आपली वेळ झाली कि बाय, was nice talking to you म्हणतात आणि निघून जातात. 

काही वर्षांपूर्वी आम्ही ट्रेननी फ्लॉरिडाला चाललो होतो. वॉशिंग्टन डीसी जवळच्या बाल्टिमोर स्टेशनवरून मायामीला एक ट्रेन जाते ज्यात तुम्ही आपली गाडी बरोबर नेऊ शकता. न्यूयॉर्क, न्यूजर्सी सह अमेरिकेच्या ईशान्य (पूर्वोत्तर) भागात रहाणारे बरेच निवृत्त लोक हिंवाळ्यात फ्लॉरिडाला रहायला जातात. आपली गाडी बरोबर घेऊन जाण्यासाठी त्यांना त्या ट्रेनचा उपयोग होता. शिवाय मायामीच्या कॉलेज मध्ये शिकणारी मुलं सुट्टीत घरी येतात तेंव्हा आपली गाडी बरोबर घेऊन येतात आणि सुट्टी संपली कि गाडी ट्रेन मध्ये चढवून कॉलेजला परत जातात. आम्ही सहज गंमत म्हणून गाडी बरोबर घेऊन चाललो होतो. 

ट्रेन एकूण चांगली आहे. आपल्याला स्वतंत्र केबिन घेता येते. त्यात अगदी छोट्या सिंक, शॉवर सहित बाथरूम आतच असते. बाहेरचं स्वच्छतागृह वापरावं लागत नाही. पण परत कधी जायचं झालं तर मी आपले खाद्यपदार्थ बरोबर घेऊन जाईन. म्हणजे ग्रिल केलेला थंडगार मासा आणि जेमतेम कोमट भातावर समाधान मानायची पाळी येणार नाही. ट्रेन संध्याकाळी बाल्टिमोरहुन सुटते. दुसऱ्या दिवशी दुपारी मायामीला पोहोचते. 

मी सकाळी लवकर उठते. उठल्यावर लगेच मला चहा लागतो. मला वाटलं एवढ्या सकाळी डायनिंग कारमध्ये कोणी नसेल. म्हणून मी एकटीच चहा प्यायला गेले. बघितलं तर सगळी टेबलं भरलेली होती. एक टेबल रिकामं होतं तिथे मी बसले. लगेचच माझ्या समोरच्या बाकावर एक वडील आणि मुलगा येऊन बसले. थोड्याच वेळात माझ्या शेजारी एक बाई येऊन बसली आणि अगदी सहज ते तिघे आपसात गप्पा मारू लागले. दोघेही आपापल्या मुलांना कॉलेजला सोडायला चालले होते. 

बाईनी सुरवात केली कि नेहमी ते गाडी चालवत फ्लॉरिडाला जातात पण अखंड हायवेवरचा तो प्रवास जॉर्जियाच्या पुढे फार कंटाळवाणा होतो म्हणून यावेळी ट्रेननी जायचं ठरवलं. सवयीनुसार चहा पिता पिता मी कान देऊन त्यांचं संभाषण ऐकत होते. दोघेही स्वतःबद्दल काही बोलले नाहीत. आपल्या नवऱ्याचा किंवा बायकोचा उल्लेख केला नाही. नवरा किंवा बायको बरोबर का नाही याचं स्पष्टीकरण द्यायची त्यांना गरज भासली नाही. मी त्यांच्या गप्पात भाग घेत नव्हते तरी त्यांनी मला ऑकवर्ड वाटू दिलं नाही. प्रवास आणि कॉलेज असं विषयातून विषयात त्यांच्या गप्पा फिरत राहिल्या. 

या उलट भारतात बाई एकटी किंवा मुलांसह प्रवास करत असेल तर तिला, "तुझा नवरा/ मुलांचे वडील कुठे आहेत?" असं अगदी सरळ रोखठोक शब्दात अनोळखी लोकांनी सगळ्यांच्या समोर विचारलेलं मी ऐकलं आहे. 

मलाही एका बाईंनी विचारलं होतं. कोणाच्या समोर नाही.आम्ही दोघीच होतो. न्यूयॉर्कहुन मी मुंबईला येत होते. ती शेजारच्या सीटवर येऊन बसली. पहिल्या दोन मिनिटात तिनं स्वतः बद्दल सगळी माहिती सांगितली : पस्तीस वर्ष न्यूजर्सी मध्ये रहात होती. त्यांचं कँडी स्टोअर होतं. नवरा गेल्यावर दरवर्षी हिंवाळ्यात सहा महिने घाटकोपरला, उन्हाळ्यात न्यूजर्सीत मुलाकडे रहाते. नवरात्र लवकरच सुरु होतय म्हणून घरी चालली आहे. मुलगाही बरोबर आहे. तो डॉकटर आहे. तो दुसऱ्या केबिन मध्ये बसलाय. आईला त्याने अपग्रेडेड सीटवर बसवलंय. तरीही दोनदा येऊन तो आईची विचारपूस करून, तिला काही हवं नको ते बघून गेला... वगैरे. 

आपलं सांगून झाल्यावर - आता तुझी पाळी, वीज देते टाळी अशी तिची अपेक्षा असावी. पण माझी विचारपूस करायला येईल असं दुसऱ्या केबिनमध्ये कोणी बसलेलं नव्हतं. मग मी काय सांगणार. शिवाय विमानात बसल्यावर सर्वप्रथम मेन्यू वाचून जेवायला काय मागवायचं ते ठरवणे, टीव्ही वर कुठले चित्रपट आणि मालिका बघण्यासारख्या आहेत - त्यातलं झोपायच्या आधी काय बघायचं, झोपून उठल्यावर काय बघायचं हे ठरवणे, विमान कंपनीने प्रेमाने दिलेले पायमोजे पायावर चढवणे ही कामे आधी उरकून घेणं फार महत्वाचं असतं असं मला वाटतं. ते मी करत होते. थोडा वेळ वाट पाहुन शेवटी तिनंच विचारल, " नवरा, मुलं कोणीच नाही तुला?' 

दुसऱ्यांच्या गप्पांमध्ये फक्त मलाच रस असतो असं नाही तर इतरांनाही असु शकतो असा अनुभव एकदा आला. भारतीय रेस्टोरंट मध्ये जवळच्या टेबलावर एक भारतीय तरुण बसला होता. बरोबर सुंदर अमेरिकन तरुणी होती. पहिली वहिली डेट असावी असं चित्र दिसत होतं. मुलगी छान तयार होऊन आली होती. टवटवीत निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. आकर्षक मेकअप, केशरचना केली होती. त्याच्यावर छाप पाडण्याचा ती आपल्या परीने प्रयत्न करत होती. पण तो तिच्यात फारसा इंटरेस्ट दाखवत नव्हता. तिच्या बोलण्याला तो कंटाळलाय कि काय अशी मला काळजी वाटायला लागली. त्याचं सगळं लक्ष आमच्या टेबलवर चाललेल्या अस्सल देशी गप्पांकडे होत. 

कॉफी शॉप मध्ये एक रागीट संभाषणही ऐकलं. खरंच ऐकलं कि लॉकडाऊन मुळे तिथे जाता न आल्याने जे ऐकलं होतं ते स्वप्नात आलं हे नक्की सांगता येणार नाही..आईस्ड कॉफीनी भरलेला प्लॅस्टिकचा मोठ्ठा कप हातात घेऊन लांब काळा कोट घातलेली बाई समोरच्या टेबलवर येऊन बसली. बाहेर कडक थंडी असूनही बर्फानी वरपर्यंत भरलेल्या, दूध - साखर विरहीत कडवट पाणचट कॉफीचा तिनं  स्ट्रॉनी एक घुटका घेतला, धडाधड सेल फोनची बटण दाबली आणि पलिकडल्या व्यक्तिवर आग पाखडायला सुरवात केली.    

"हाय... तुझा मेसेज मिळाला. Are you out of your mind?  माझ्या घरात फुकट राहिल्याबद्दल मी तुला पैसे दयावेत अशी ग्रेट आयडिया आता तुझ्या हुशार डोक्यातून निघाली आहे? इतकी वर्ष तू एक पेनी सुद्धा भाडं दिलं नाहीस. त्या साईझच घर, त्या भागात भाड्यानी घ्यावं लागलं असतं तर तुझे किती पैसे खर्च झाले असते याचा हिशोब केलायस का कधी? Do the math.  

तुला कोणीही इथे रहायला बोलावलं नव्हतं. तू स्वतःहुन आलीस. तुला सोयीचं होतं म्हणून राहीलीस. जनरली सून सासुशी वाईट वागणारच अस लोक धरून चालतात. मॉम एक दुर्मिळ उदाहरण आहे जिथे तिच्या मुलींनीच स्वतःच्या स्वर्थी फायद्यासाठी तिचा आणि तिच्या घरांचा पुरेपूर वापर करून घेतलाय आणि मॉमला बिच्चारील ते कळतही नाही. 

तू आणि जॉनीनी डॅडच्या मृत्युपत्रातून मिळालं ते सगळं घेतलं. जे मृत्युपत्रात नव्हतं ते हि आपसात संगनमत करून मॉम कडून काढून घेतलत. वर सगळ्यांना सांगता मॉमनी स्वतःहून तुम्हाला दिल. डॅड होते तोपर्यंत मॉम त्यांच्या कंट्रोल खाली होती. ते गेल्यावर आता तुझ्या वर्चस्वाखाली आहे. स्वतःचा कुठलाच निर्णय ती घेऊ शकत नाही. तु सांगशील तिथे तिला राहावं लागतं. तू सांगशील ते बोलावं लागतं. 

मी मॉमला भेटू सुध्दा शकत नाही कारण तुमच्या तावडीत सापडले कि तुम्ही काहींतरी कारण सांगून माझ्याकडून पैसे घ्यायला बघता. मी वेळोवेळी मॉम आणि डॅडला भरपूर आर्थिक मदत केली होती. म्हणून डॅडनी हे घर मला दिलं. ते अजून मला मिळालेलं नाही. पण कधीतरी हे घर तुला मिळेल असं सांगत तुम्ही लोकांनी आजवर माझ्याकडून भरपूर पैसे घेतलेत. मी कायम पैसे देण्याचं काम केलंय आणि तुम्ही फक्त घेण्याचं काम केलंय. 

मॉम आणि डॅडला देण्या ऐवजी ते पैसे कुठेतरी गुंतवले असते तर आज या घरा सारखी आणखी घरं माझ्याकडे असती. त्यांना पैसे देताना मी कधी तो विचार केला नाही पण माझ्याकडून पैसे काढून घेताना तुम्ही ते सोयीस्कर पणे विसरता. 

मी यापुढे तुला एक पेनीही देणार नही. मी फॅमिली निटिंगला येणार नाही. ती आशा तू सोडून दे. तुमची फॅमिली मिटिंग म्हणजे मला जाळ्यात पकडून माझ्याकडून पैसे काढून घेण्याची ट्रिक आहे हे उशिरा का होईना आता माझ्या लक्षात आलंय. करप्ट फॅमिली म्हणजे काय ते तुमच्याकडे बघितलं कि समजतं.  

पाहिजे तर जॉनीकडून घे. माझे पन्नास हज्जार डॉलर्स त्याच्याकडे आहेत. इतके वर्षात त्याने ते परत केलेले नाहीत. व्याजासकट ते आता भरपूर वाढले असतील. त्यातले बघ तुला काही मिळतात का. आणि आता माझं घर सोड. पुष्कळ वर्ष राहिलीस. खूप त्रास दिलास. माझा मानसिक छळ केल्याबद्दल खरंतर तू मला नुकसान भरपाई द्यायला हवी." 

एवढं बोलून तिनं फोन बंद केला. कपच्या तळाशी उरलेली बर्फातली कॉफी संपवत बसली. 





Tuesday, April 27, 2021

कर्मयोगिनी







काही दिवसांपूर्वी पुण्यात रहाणाऱ्या माझ्या आत्तेबहिणीने एका व्हॉट्स ऍप ग्रुप साठी "मला प्रभावित करणारी व्यक्ती" या विषयावर खालील उतारा लिहिला. त्यावरून मलाही आमच्या आज्जीबद्दल (तिच्या आईची आई /माझ्या वडिलांची आई ) काही माहिती नव्याने समजली आणि या पोस्टचं संकलन करण्याची प्रेरणा मिळाली: 

माझ्या आयुष्यात मला सर्वप्रथम प्रभावीत करणारी व्यक्ती म्हणजे माझी आज्जी लक्ष्मीबाई देशमुख  - पूर्वाश्रमीची द्वारका मोरे. मालवणच्या प्रतिष्ठित मोरे घराण्यात जन्मलेली आज्जी त्या काळात शालांत परीक्षा पास झालेली होती. तिचे भाऊ बॅरिस्टर, कलेक्टर असे उच्च शिक्षित होते. लग्नाआधी आज्जीने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, विदेशी कपड्यांची होळी केली होती . 
  
लग्न होऊन ती ठाणे जिल्ह्यातील वरले या गावातील देशमुखांची सून झाली. लहान गाव, एकत्र कुटुंब पण आजोबा कोऑपरेटिव्ह मध्ये नोकरी करीत होते त्यामुळे ते कुटुंबासह पुणे, ठाणे, शहापूर इत्यादी ठिकाणी वास्तव्य करून होते. आज्जीने स्वतःच्या मुलांबरोबर दोन पुतण्यांनाही शिक्षणासाठी शहरात नेले. शेवटी आजोबा वाडा येथील कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर होते तिथेच निवृत्त झाले. 

वरले गावात देशमुखांची मोठी शेती होती. आजोबांनी खुप सुंदर बंगला बांधला होता. निवृत्त झाल्यानंतर ते शेती करत. आज्जीआजोबांना समाजकार्याची आवड होती. दोघांनी भरपूर समाजकार्य केले. आजोबा वाड्याच्या पी. जे. हायस्कूलच्या कमिटीवर होते तर आज्जी वाड्याच्या सरकारी हॉस्पिटलच्या कमिटीवर चेअरपर्सन होती. आज्जी त्या काळातली खुपच तडफदार स्त्री होती. ती उत्तम भाषण करीत असे. तिला वाचनाची आवड होती. वाड्याच्या थिएटर मध्ये मी तिच्याबरोबर अनेक सिनेमा पाहिले. निर्णयसागर प्रेसच्या मालकीणबाई आज्जीची खास मैत्रीण. 

आज्जी दिसायला देखणी  - उंच, गोरीपान, किंचित कुरळे केस, कानात मोत्याच्या कुड्या, अंतरा अंतरावर मोठा काळा मणी असलेलं घसघशीत सोन्याचे मंगळसूत्र आणि डायमंड घाटाच्या चार सोन्याच्या बांगड्या आणि त्यात दोन- दोनच लाल काचेच्या बांगड्या. नऊवारी इंदूरी साडी आणि नेहमी कुठल्याही साडीवर पांढरंच ब्लाऊज. नेहमी प्युअर लेदरची पर्स वापरत असे. 

आज्जी स्वच्छ, शुद्ध मराठी बोलायची. इंग्लिशही ब-यापैकी लिहू- वाचू शकायची. तिचं व्यक्तीमत्व प्रभावी होतं. मला आई पेक्षा आज्जी जवळची वाटायची. आजोळी मी खुप राहिले आहे. आज्जीने खुप माया केली. सामाजिक कार्यकर्ती असुनही ती निगुतीने संसार करणारी सुगृहिणी होती. तिच्या हाताला चव होती. खुप सुंदर स्वयंपाक करायची. मला लग्नाच्या आधी थोडा फार स्वयंपाक मुख्य म्हणजे भाकरी आज्जीने शिकवली. 

मला दोन मामा आणि एक मावशी. माझी आई सगळ्यात मोठी. एक मामा सिव्हिल इंजिनियर आणि दुसरे सरकारी अधिकारी होते. दोन्ही मामा मुंबईत रहायला होते. गावाकडे फक्त आज्जीआजोबा रहात. पण दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सर्व मावस, मामेभावंडं, मावशी, मामामामी गावाला एकत्र येत असू. 
  
आज्जी आम्हाला मसाले, पापड, मिरगुंड, हातसडीचे पोहे, कडवे वाल आणि काय काय पदार्थ, वस्तू  अनेक वर्षे देत होती. माहेरपण करावं तर माझ्या आज्जीनंच!

तिच्या हाताखाली दिवसभर एक मोलकरीण असे. बंगल्या भोवती आंबा, पेरू, चिक्कू, जांभळ ,सुपारी, नारळ अशी अनेक फळझाडे आणि फुलझाडे होती. तो खुपच सुंदर परिसर होता. गाई, म्हशी, कोंबड्या, कुत्रा, मांजरी या सगळ्यांवर आज्जीची माया होती. भातशेती आणि स्वतंत्र आमराई होती. 

त्या काळातल्या बायकांपेक्षा ती वेगळी होती. मासिकपाळी आल्यावर तिने कधीही बाजूला बसायला सांगितले नाही. ती उपास, व्रतवैकल्ये कधीच करत नसे. ती खरोखरच कर्मयोगिनी होती. खुप समृद्ध जीवन जगली. लहानपणी कोणी विचारलं, "तू देशमुखबाईंची नात का ?" ते खुप छान वाटायचं. 


लेखिका: राणी जगताप (प्रभा सोनवणे) 

                                                                                ***


माझ्या आत्या मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात रहातात. काही वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या आठवणी 'रानजाई' या नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध केल्या (प्रकाशक : तारा एज्युकेशनल आणि चॅरिटेबल ट्रस्ट,  मुंबई).  त्या पुस्तकातील आज्जीवरचा लेख आत्यांच्या परवानगीनी (थोडी काटछाट करून) खाली लावला आहे:

मोठी आई 

आई हा शब्द उच्चारताच आईची अनेक रूपं दृष्टीसमोर तरळून जातात. प्रेमळ, करारी, जिद्दी , सतत काहीं ना काही काम करत रहाणारी. विणकाम भरतकाम करणारी. आम्हा दोघी बहिणींसाठी सुंदर सुंदर फ्रॉक स्वतः मशीनवर शिवणारी. शाकाहारी, मांसाहारी दोन्ही पदार्थ करण्यात तरबेज आणि तेवढ्याच प्रेमाने सर्वांना खाऊ घालणारी. दिवाळीचे पदार्थ ती फार निगुतीने करायची. हे सर्व पदार्थ फार मोठ्या प्रमाणात करायला लागायचे. आत्ता सारखी बारा महिने दिवाळी त्यावेळी नव्हती आणि आत्ता सारखे दिवाळीच्या फराळाचे जिन्नस दुकानातही मिळत नसत. पहाटे उठून शेगडीवर छोट्या परातीत संक्रांतीचा पांढराशुभ्र हलवा करणारी आई मला अजूनही आठवते. बालपणी खाणं आणि खेळणं एवढंच माहित होतं. जसजस वय वाढत गेलं तसं तीचं मोठेपण जाणवायला लागलं. 

देशमुखांचा एवढा मोठा चौसोपी वाडा. त्यात रहाणारी अनेक माणसं  - जवळची, दूरची.  १९३० साली आईचं लग्न झालं आणि इनामदारांची थोरली सून म्हणून तिने वाड्यात प्रवेश केला. त्यावेळी ती अठरा वर्षांची होती. त्यावेळी आईचं लग्न जरा उशिराच झालं असं म्हणायला हवं. आईवडील लहानपणीच वारल्याने सगळी जबाबदारी मोठ्या भावावरच होती. त्यातून तळकोकणातलं मालवण सारखं गाव. मुंबईला यायचं म्हणजे बोटीशिवाय दुसरं साधन नाही. तसं घाटावरून कोल्हापूर - पुणे मार्गे मुंबईला येता येत होतं. पण लांबचा पल्ला. वाहतुकीची साधनं मर्यादित. एवढ्या प्रवासाला दोन-तीन दिवस सहज लागत. त्यापेक्षा बोट सोयिस्कर होती. एक भाऊ बोटीवर कॅप्टन होते. चुलत भाऊ ठाण्याला कस्टम्स कलेक्टर होते. ठाण्याच्या खाडीवरचा त्यांचा प्रशस्त बंगला अजुनपर्यंत जातायेता दिसत होता. लहानपणी बंगल्यात आणि बंगल्याच्या बागेत घातलेला धुमाकूळ अजूनही आठवतो. त्यांच्यामुळेच हे लग्न जमलं. मालवण सारख्या सुशिक्षीत गावातून ठाणे जिल्ह्यातील वाडे तालुक्यातील  'वरले'  नावाच्या अतिशय लहान खेड्यात ती कशी राहीली हेच आम्हांला नवल वाटतं.  

गावात देशमुखांची फक्त चार घरं, बाकीचे सगळे आदिवासी. जमेची बाजू एवढीच कि गांव मुंबई - अहमदाबाद या राजरस्त्यावर होतं. त्यामुळे हा आदिवासी मागासलेला भाग असला तरी रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असायची. स्वातंत्र्यपूर्व काळात गोऱ्या लोकांच्या गाड्या ह्याच रस्तयाने धावत. देशमुखांचं घर धनधान्याने समृद्ध होतं. कोठारं भरलेली होती. 

माझी आई अतिशय देखणी होती. उंच गोरीपान सडपातळ बांधा असं तिचं रूप होतं. साहित्याची अतिशय आवड असणारी विशेषतः काव्याची. त्याकाळी तिच्याकडे भा. रा. तांबे, कवी यशवंत, बालकवी यांचे काव्यसंग्रह होते. त्यातील बहुतेक कविता तिला तोंडपाठ होत्या. तिचा आवाजही गोड सुरेल होता. मिराबाईची भजनं ती फार सुरेख गायची. तिच्यामुळे मला साहित्याची आवड फार लहानपणीच लागली. वयाच्या नवव्या वर्षी पर्ल बकची 'गुड अर्थ' हि कादंबरी वाचल्याचं आठवतं. 

वाड्यात घरची माणसं होती तसेच गडी, त्यांच्या बायका याही होत्या. गोठा गाई-म्हशींनी भरलेला होता. सत्तर ऐंशी गुरं दावणीला होती. घोडेहो होते. कुत्री, मांजरं, कोंबड्या होत्या. आईला माणसांप्रमाणेच प्राणीही आवडत. ससे, मोर तिने पाळले होते. एवढं सारं असूनही वाड्यला शिस्त अशी नव्हती. आठ-नऊ वाजेपर्यंत पाहुणे मंडळी अंथरुणावर लोळत पडलेली असायची. अकरा - बारा वाजेपर्यंत पाहुण्यांचा चहा - न्याहरीच चाललेली असायची. त्याच्या पुढे जेवणं. दिवसभर सुनांना स्वयंपाकघरातच अडकून पडायला व्हायचं. इतर कामाला गडी -बाया होत्या पण स्वयंपाकाचं काम सुनानांच करावं लागायचं. 

आईला हे सगळं असह्य वाटायचं. हे सगळं बदलायला पाहिजे असं तिला वाटत होतं. तिने वडिलांना हे सगळं सांगितलं. त्यांनाही हा बदल हवाच होता. पण घरातील मोठा मुलगा असल्यामुळे कुणाला दुखावणं शक्य नव्हतं. पण आई फार करारी होती. तशीच मृदूही होती. हळूहळू प्रेमाने तिने सगळा बदल घडवून आणला. वडिलांची साथ होतीच. पुण्याच्या नू.म.वि मधून ते मॅट्रीक पर्यंत शिकले होते. सुशिक्षीत विचारांचे होते. इनामदारांच्या घराण्यात जन्मून देखील त्यांना कसलंही व्यसन नव्हतं. साधी सुपारीही ते कधी खात नसत. "मेड फॉर इच आदर " अशी त्यांची जोडी होती. 

गावात शाळा नव्हती. मुलांना शाळेत पाठवायचं म्हणजे दोन मैलावर तालुक्याच्या गावी. आईने वडिलांना सांगून ठाण्याच्या शिक्षण खात्याकडून (लोकल बोर्ड) शाळा मंजूर करून घेतली. इथली अडचण शिक्षण खात्यानेही जाणून घेतली. इंग्रजांचं राज्य होतं त्यामुळे गरजे प्रमाणे कामं होत होती. शाळा मंजूर झाली पण शाळेला इमारत पाहिजे. त्याकाळी लहान गावात एक शिक्षकी शाळा असत. एक मोठा हॉल, त्यामध्ये वेगवेगळे बाक टाकून पहिली पासून चवथी पर्यंतची शाळा भरे. एकेका वर्गात पाचसहा मुले असत. मास्तर आलटून पालटून एकेका यत्तेचा अभ्यास घेत. वडिलांनी आपल्या देखरेखी खाली शाळा बांधून घेतली. मास्तरांना रहायला घर हवं म्हणून वाड्या शेजारीच दोन खोल्यांचं टुमदार घर बांधलं. अशा तऱ्हेने गावात चवथी पर्यंतची शाळा झाली. पंचक्रोशीतील गावातील मुलांची तसेच आजूबाजूच्या पाड्यावरच्या मुलांची शिक्षणाची सोया झाली. आदिवासी, हरिजन यांची मुलं शाळेत शिकून पुढे जिल्ह्यात नोकऱ्याही करू लागली. 

तालुक्याच्या गावी मराठी सातवी पर्यँतची सोय होती पण हायस्कुल नव्हतं. मुलांना पालघर, भिवंडी, ठाण्याला हायस्कुलसाठी जावं लागायचं. सगळ्यांनाच काही ते शक्य नव्हतं. तेंव्हा तालुक्यातील मान्यवरांनी एकत्र येऊन वाड्याला हायस्कुल काढण्याचे ठरविले.  त्यात आईचा सहभाग मोठा होता. मुंबईच्या निर्णयसागर प्रेसच्या मालकीणबाई श्रीमती भागिरथीबाई चौधरी यांनी आईच्या शब्दाला मान देऊन आपले पती कै. पांडुरंग जावजी चौधरी यांचे नाव हायस्कुलला देणार या आश्वासनावर विश्वास ठेऊन रू, दहा हजाराची (रक्कम) देणगी शाळेसाठी दिली. हायस्कुलचे "पी. जे. हायस्कुल" असे नामकरण करण्यात आले. गावोगावच्या लोकांनी पैशाच्या, धान्याच्या रूपाने शाळेसाठी मदत केली. १९४५ पासून वाड्याला हायस्कुल सुरु झाले. पण माझ्या भावांना त्याचा उपयोग नव्हता कारण ते पुढच्या इयत्तेत गेले होते. आईला आमच्या भावंडांना आणि काकांच्या हायस्कुल मध्ये जाणाऱ्या मुलांसाठी ठाण्याला बिऱ्हाड करावं लागलं. वडिलांनीही शेतीचा कारभार धाकट्या भावांवर सोपवून सरकारी खात्यात नोकरी धरली. त्यांची ठाण्याला सहकारी खात्यात नेमणूक झाली. 
 
                                                                                  ***

आईवडिलांनी घर सोडल्यापासून घरात भावाभावांच्या कुरबुरी सुरु झाल्या. शेवटी इस्टेटीच्या वाटण्या करून विभक्त व्हायचं ठरवलं. वडिलांची ठाण्याहून वाड्याला सहकारी बँकेचे मॅनेजर म्हणून बदली झाली. ठाण्याचं बिऱ्हाड सोडून आम्ही सर्व वरल्याला परत आलो. दोन्ही भाऊ, चुलत भाऊ बोर्डीच्या आचार्य भिसे यांच्या बोर्डिंग स्कुल मध्ये रुजू झाले. साने गरुजींचे भाऊच हायस्कुलचे हेड मास्तर होते. त्यामुळे शाळेवर सेवादलाचा प्रभाव होता. 

भावांनी पुढचे कॉलेजचे शिक्षण पुण्याला एस.पी. कॉलेज मध्ये हॉस्टेलला राहून पूर्ण केले. मोठा भाऊ पूना इंजिनिअरिंग कॉलेज मधून इंजिनिअर झाला आणि धाकटा भाऊ सहकारी खात्यात वरच्या पदावर पोहचून निवृत्त झाला. आईला मुलांच्या शिक्षणाची जी चिंता वाटत होती ती मुलांनी दूर केली. मुलीही चांगल्या घरी पडल्या. त्यांची मुलंही व्यवसायाला लागली. आईने मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागले. 

मोठा वाडा काकांच्या वाटणीला गेल्यामुळे वडिलांनी अमराईत स्वतंत्र बांगला बांधला. आम्ही तिथे राहू लागलो. वरल्याला आल्यावर आईचं सामाजिक कार्य पुन्हा सुरु झालं. साऱ्या गावचीच ती आई झाली. काही वर्ष ती सरकारी तालुका रुग्णालयाच्या कमिटीवर चेअरमन होती. जिल्हा परिषदा होण्यापूर्वी म्हणजे साधारण पन्नास -पंचावन्न वर्षांपूर्वी तालुका विकासगट समितीची सदस्य होती. या माध्यमातून तिने अनेक जणांना मदत केली. आदिवासींची तर ती आईच होती. आम्ही चौघ भावंडं सोडून घरातली आमची चुलत भावंडं, गावातली मुलं -माणसं तिला मोठी आई म्हणून हाक मारीत. घरातल्या थोरल्या काकीला मोठी आई म्हणायची त्यावेळी पद्धत होती. 

                                                                                ***


गावातल्या कुठल्याही आदिवासी स्त्रीचे दिवस भरत आले कि ती आईकडे यायची. "आई, माझ्या पोटात दुखायला लागलं कि मी कोणाबरोबर तरी निरोप पाठवीन. तू फक्त माझ्या जवळ येऊन बस" असं म्हणायची. आदिवासी बायका बाळंतपणासाठी कधीच दवाखान्यात जात नाहीत. त्यांची बाळंतपण करणाऱ्या सुईणी असत. बाई अडली कि सुईणी जे काही अघोरी उपाय करीत त्याचा बायकांनी धसकाच घेतलेला असे. असा निरोप आला कि आई हातातली कामं तशीच ठेऊन, तांब्याभर चहा घेऊन त्या बाईच्या घरी दाखल होत असे. जाताना बाळाची नाळ कापण्यासाठी उकळलेली कात्री, दोरा, कापूस एका डब्यात घालून बरोबर एखादं जुनेरं घेऊन जात असे. सगळं बाळंतपण सुखरूप झालं कि मगच ती घरी येत असे. आल्यावर आंघोळ करून शेराचा भात शिजवून त्यावर वरण आणि लोणचं असं छोट्या परातीत घालून बरोबर दूधाचा तांब्या पान्हेरी काकू कडून तिच्या घरी पोहोचतं व्हायचं. असे पाच दिवस तिच्या घरी जेवण पोहचतं व्हायचं. पाचव्या दिवशी पाचवी झाली कि बाई उठून कामाला लागत असे. 

एखादी बाई अडली तर तिला घरच्या बैलगाडीत झोपवून, बरोबर सुईणीला देऊन वाड्याच्या सुतिकागृहात पाठवत असे. आपणही एस.टी. बसमधून, बस नसली तर चालतही दवाखान्यात जाऊन डॉकटर, नर्सबाईंना भेटून बाईचं बाळंतपण होई पर्यंत तिथे थांबत असे. घरून जेवण पाठवण्याची सोय नसली तर समोरच्या मावशीबाईंकडे जेवणाची सोय आगाऊ पैसे देऊन करत असे. अशी कितीतरी बाळंतपणं आईने केली. आईच्या हाताला काय गुण होता कोण जाणे पण तिने तापावर दिलेलं काढे, चाटणं आजारपण घालवत असे. आदिवासींचा डॉकटर पेक्षा आईच्या औषधांवर जास्त विश्वास होता. 

                                                                                    ***

एकदा अशीच दुपारच्या वेळी एक बाई फाटका बाहेर उभी राहून आईला हाक मारू लागली. आई बाहेर आली. बाई सारं अंग डोक्यापासून गुडघ्या पर्यंत झाकून उभी होती. माशांचा मोठा घोळका तिच्या भोवती फिरत होता. ती जिथे उभी होती तिथे तिच्या सर्वांगातुन झिरपणाऱ्या लशीतून खालची जमीन ओली झाली होती. त्यावरही माशा घोंघावत होत्या. कुठल्यातरी बऱ्या न  होणाऱ्या चर्मरोगानं तिला ग्रासलं होत. ती गंगी होती. कातकरी जमातीतील (कातोडी) होती. तिच्या लोकांनी तिला कातोडी बाहेर हकलून दिली होती. सरकारी दवाखान्यातही तिला कोणी ठेऊन घेतलं नसत. तशी सोयच तिथे नव्हती.  

"आई, दोन दिस उपाशी आहे गं. साऱ्या अंगाला ठणका लागलाय. काय करू," रडण्याचे आणि बोलण्याचेही कष्ट ती सहन करू शकत नव्हती. आईला ते एक आव्हान होतं. आणि आईने ते स्विकारलं. 

थंडीचे दिवस होते. आईने तिला रस्त्यापलीकडे वडाच्या झाडाच्या आडोशाला जाऊन बसायला सांगितलं. पान्हेरी काकू बरोबर पत्रावळीवर भात कालवण वाढून पाण्यासाठी एक मडकही दिलं. आप्पाला दोन मोठे लाकडाचे ओंडके नेऊन टाकायला सांगून तिला शेकोटी पेटवून दिली. दोन पोती, एक जुनं लुगडं तिला पांघरायला दिलं. आणि मग तिने चर्मरोगांवरच तिचं पेटंट औषध तयार करायला घेतलं. आदिवासींना चर्मरोग हा सर्रास असायचा. कातकरी जमात मासे पकडायला नाहीतर पाणकंद काढायला पाण्यात उतरतील तेंव्हाच त्यांच्या अंगाला पाणी लागणार.

घरात गंधकाच्या पिवळ्या कांड्या नेहमी आणलेल्या असायच्या...

... पोटभर अन्न, वस्त्र, निवारा आणि योग्य औषधोपचार यांनी गंगी दोन महिन्यात टुणटुणीत झाली. अंगावरच्या साऱ्या जखमा बऱ्या होऊन कातडी गुळगुळीत झाली. डोक्यावर केस उगवले. हिंडू फिरू लागली. एका जागी राहून तिला कंटाळा आला. रानचं पाखरू रानात जायला उत्सुक झालं. जमातीनेही आता तिला स्विकारलं. या सर्व औषधोपचारांसाठी आईला दोन किलो पेक्षा जास्त गंधक कुटावा लागला. या साऱ्या कामात वडिलांची साथ होती म्हणूनच ती हे करू शकली. 

                                                                                       ***
                   
एक दिवस सकाळीच समोरच्या झोपडीत रहाणारी लक्ष्मी रडत ओरडतच आईला हाका मारत आली, "आई, बघ हे काय झालं". हातावर आडवी धरलेली चारपाच महिन्यांची  'मटो' होती. पोटाला भाजली होती. भाजलेले फोड फुटून कातडी लोंबत होती. त्या चिमण्या जीवात रडण्याचंही त्राण नव्हतं. 

"काय झालं ग लक्ष्मी?"

लक्ष्मी मटोला झोळीत झोपवून पाणी आणायला विहिरीवर गेली होती. मटो पेक्षा मोठ्या असलेल्या दोन-तीन वर्षांच्या चंद्याला रडली तर जरा झोळीला झोका दे म्हणून सांगितलं होतं. झोळीत झोपलेली मटो थोड्यावेळाने रडायला लागली म्हणून चंद्या झोळीला झोका द्यायला लागला. झोका थोडा मोठा झाला असावा. झोळी उलटी झाली आणि मटो जवळच असलेल्या झगडीत पोटावर पडली. झगडी विझलेली होती पण आतले निखारे आणि गरम राख यानं पोर भाजून निघाली होती. आईनं खोबरेल तेलाची बाटली आणली आणि हळुवारपणे कापसाने पोटाला खोबऱ्याचं तेल लावलं. दुपारी येऊन मलम घेऊन जा म्हणून सांगितलं. 

आईने चुन्याचा डबा शोधून काढला. चुन्याची निवळी आणि खोबऱ्याचं तेल यांचं मलम हे भाजण्यावरचं आईचं पेटंट औषध होतं.

...पंधरा वीस दिवसांनंतर जखमांवर नवीन कातडं दिसायला लागलं. पूर्ण बरं व्हायला महिना लागला.जखमा खोलवर नव्हत्या पण जखमांच्या खुणा राहिल्याच. पण जीव वाचला हेच समाधान. काही वर्षांपूर्वी गावी गेले होते. मटो भेटली होती. मटो आता दोन नातवंडांची आजी झालेय. पोटावरच्या भाजलेल्या खुणा अजून आहेतच. 

                                                                                   ***

आता वडिलांच्या विषयी थोडं. माझे वडील, आम्ही त्यांना अण्णा म्हणत असू, साऱ्या गावचेच अण्णा. अतिशय कलाप्रिय. त्यांची निरिक्षण शक्ती जबरदस्त होती.  

गोठ्यातील गुरांची देखभाल करणे, दूध काढणे, घरात आणि घराभोवती स्वच्छता राखणे या सर्व कामात आईला त्यांची अमोल मदत होई. दोघेही समविचाराचे असल्यानेच संसारातील अनेक समस्यांचा मुकाबला दोघांनीही मिळून समर्थपणे केला. पूजाअर्चा, व्रतवैकल्ये, उपासतापास यापेक्षा नीतिमत्ता, सदाचरण, सत प्रवृत्ती यावर दोघांचाही अढळ विश्वास. अशी ही एकमेकांना पूरक व्यक्तिमत्वे होती. 

आमच्या आमराईत सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं होती. आंबे, पेरू, चिक्कु, काजू, सिताफळ, रामफळ, बोरं, चिंचा, जांभळं, मोसंबी , फणस , हापूसची चाळीस -पन्नास कलमं. त्यातही अनेक प्रकार - पायरी, तोतापुरी, नारळी आंबा.  तसेच वेगवेगळ्या चवीच्या रायवळ आंब्यांची विशाल झाडं होती. त्याचे आंबे काढायला वेळच नसे. आईनं सगळ्या गावाला, आदिवासींना सांगून ठेवलं होतं ज्याला आंबे पाहिजे असतील त्याने रायवळ आंबे काढावे, निम्मे इथे ठेऊन निम्मे घेऊन जायचे. दोन पोती काढली तर एक पोतं त्यांचं एक आमचं.  

वडिलांप्रमाणे आईलाही बागकामाची आवड होती. त्यावेळी भाज्या विकत आणायची पद्धत नव्हती. भाज्यांची दुकानही कुठं नव्हती. आपल्या आवारात असतील तेवढ्याच भाज्या. पावसाळ्यात येणाऱ्या गवार, वांगी, भेंडी, पडवळ, दोडकं, दुधी, लाल भोपळा, काकड्या, करादे ,कोनी यांचे वेल अशा भाज्या असायच्या. वडिलांनी रानातून करटोल्याचे कंद बागेत आणून लावले होते. पावसाची चाहूल लागली कि जमिनीतून करटोल्याचे वेल बाहेर पडत. पावसाळ्याचे पाच-सहा महिने भरपूर करटोली मिळत. उन्हाळ्यासाठी तोंडल्याचा मांडव, घेवड्याचा मांडव, शेवग्याची, हादग्याची साताआठ झाडे, कांचन, तांबड्या माठाचे उंच उसासारखे देठ, अळू प्रत्यके घरी असायचाच. वर्षभर पुरेल इतकी पोतंभर मिरची, हळद आई घरीच लावत असे. मोठमोठे सुरणाचे गड्डे सोप्यात रचून ठवलेले असत. आमची आमराई बारा महिने फुलाफळांनी बहरलेली असायची. 

आईने गायीम्हशींच्या धारा काढण्याचे कामही शिकून घेतले होते. आमच्याकडे मातीच्या चुली असायच्या. आई मातीच्या चुली करण्यात पटाईत. दरवर्षी शेतातली माती आणून भिजत घालायची. आम्ही मुली देखील भातुकली साठी लहान चुली बनवायचो. चूल उंच ओट्यावर असायची पण वडिलांनी तिला धुरांडं बसवून बिन धुराची चूल केली होती. 

आई नेहमी म्हणायची, आयुष्यात सचोटीनं वागा. लांडीलबाडी, फसवणूक कधी कुणाची करू नका.  दुसऱ्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करा. मनाने  देखील कुणाचं वाईट चिंतू नका. परमेश्वर सर्व बघत असतो. आईने कधी उपासतापास, व्रतंवैकल्य, पूजेची कर्मकांडं केली नाहीत. ते करायला तिच्याकडे वेळच नव्हता. अखंड कर्मयोग हाच तिचा परमेश्वर होता. 

कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा तिचा जीवनमंत्र होता. अजूनही तिची नुसती आठवण आली तरी तिचा सर्व जीवनपट डोळ्यासमोर उभा रहातो. 

या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता 
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः: 



लेखिका: तारा देशमुख (सुमन चव्हाण)














 ***
                                                                               

आज्जी बद्दलच्या माझ्या आठवणी आत्त्यांच्या आणि राणीआक्काच्या नंतरच्या आहेत. मला आठवतं तेंव्हा आज्जी तिच्या सामाजिक कामातुन निवृत्त झाली होती. घर - शेत - तिथे काम करणारे कामगार या सगळ्या व्यापाची प्रेमाने देखभाल करत होती. तिच्या समाजकार्याबद्दल ती स्वतः कधी बोलत नसे पण माझी आई सांगायची. कौतुकान म्हणायची, "वरल्याची सीट आदिवासींसाठी राखीव आहे म्हणून नाहीतर तुझी आज्जी कधीच निवडणुकीला उभी राहिली असती." 

आज्जी प्रमाणेच माझ्या वडिलांनाही भूतकाळात बागडण्याची फारशी आवड नाव्हती. त्यामुळे आमच्या कुटुंबाचा इतिहास आजच्या पिढ्यांना जास्त माहित नाही. थोडंफार कानावर पडलं ते असं कि वरल्याचे देशमुख हे मुळचे मध्य प्रदेशातील धार चे पवार. चवदाव्या शतकात अदिलशहाने देशमुखी द्यायला सुरवात केली तेंव्हा वरले हे गाव आमच्या पूर्वजांना इनाम मिळालं. धार चे पवार वरल्याचे इनामदार देशमुख झाले. आमचं कुलदैवत धारलाच आहे. कित्येक पिढ्यात तिथे कोणी गेलं नाही. माझ्या आईने तुळजापूरच्या भवानीवर कसबसं समाधान मानलं पण ती कायम कुरबुरत राहिली कि हि आपली कुलदेवता नाही. आपली कुलदेवता व्याघ्राम्बरी आहे - वाघावर बसलेली दुर्गा आहे.

लग्न होऊन आज्जी मालवणहून वरल्याला आल्यावर प्रथम मोठ्या घरात राहिली. एकत्र कुटुंबातुन बाहेर पडल्यावर आज्जीआजोबांनी जुन्या घराच्या जवळच स्वतंत्र घर बांधलं.  ७० -८० वर्षांपूर्वी खेडेगावात बंगला पद्धतीची घरं नसायची. वाडा पद्धतीची असायची. छोटा दरवाजा.. त्यातून आत गेलं की चौक आणि त्याभोवती खोल्या अशी रचना असायची. पण आई सांगायची कि आज्जीनी आबांना निक्षून सांगितलं होतं - बंगला बांधायचा... त्यापुढे मोठ्ठ अंगण हवं... त्याला कंपाउंड - आणि कंपाउंडला मोठ द्वार हवंच. एक ना एक दिवस माझा मुलगा मोठी गाडी घेईल ती त्याला गेट मधून आत आणून अंगणात उभी करता आली पाहिजे." 

१९९० च्या दशका आधी परदेशी मोठ्य गाड्या भारतात सहजासहजी मिळत नसत. फियाट आणि अँबेसेडर या भारतीय गाड्या असायच्या. पण बाबा तेंव्हा हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरीला होते आणि HCC ची एक अमेरिकन डॉज गाडी होती - काळ्या रंगाची. फियाट आणि अँबेसेडर च्या तुलनेत तेंव्हा ती इतकी प्रचंड पसरलेली दिसायची कि आम्ही तिला रणगाडा म्हणायचो. आम्ही आणि काका मिळून वरल्याला जाणार असलो कि बाबा रणगाडा घेऊन यायचे. 

मला रणगाड्याचं खूप कौतुक होतं. वरल्याला जायला बाबांनी डॉज आणलीय म्हंटल कि माझा उत्साह नुसता ओसंडून वहायचा. मोठ्यांच्या आधीच भावांबरोबर गाडीत जाऊन बसायचं, तिच्या मऊ काळ्या चामड्याच्या सीट वरून हात फिरवायचा, त्या दाबून किती मऊ आहेत ते बघायचं अशा प्रकारे तो व्यक्त व्हायचा. रणगाडयातून आम्ही बरेचदा वरल्याला गेलो - शेजारी, मित्र यांना घेऊन. मुलाची मोठी गाडी अंगणात उभी असावी हि आजीची ईच्छा त्या डॉज मुळे पूर्ण झाली. पुढे बाबांनी स्वतःची मोठी गाडी घेतली पण ते बघायला आज्जी नव्हती आणि ती पार्क करायला वरल्याचं घर आणि ते अंगण नव्हतं. 

या ठिकाणी काकांचा उल्लेख आला आहे तर त्यांच्या विषयी थोडं लिहायलाच हवं. माझ्या काकाकाकींनी माझ्यावर आपल्या मुलीसारखी माया केली. माझे वडिल आणि त्यांच्या भावंडांनी आपसात आणि आम्हां मुलांवर निर्व्याज प्रेम केलं. त्या काळी घरातील मोठ्या मुलावर काही जबाबदाऱ्या असायच्या. त्यांच्या पासुन वडिल कधी मागे हटले नाहीत. पण भावंडांनी त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्या नाहीत. ते आज्जीचे संस्कार होते. 

आज्जीचं सगळंच नेटकं असायचं. ज्या नीटसपणे तिन आपलं घर आणि परसदार जपलं होतं त्याचं नेटकेपणाने ती स्वयंपाक करायची. तिला स्वयंपाकाची आवड होती. शुक्रवारी तिचा ठरलेला मेन्यू होता - हरभऱ्याची उसळ आणि ताकाची कढी. ताकाची कढी ती आठवड्यतून दोन - तीनदा तरी करायचीच- कधी उसळी बरोबर तर कधी सुकटीच्या चटणी बरोबर तर कधी मटणा बरोबर. खास कोणाला दुपारच्या चहाला घरी बोलावलं तर नारळी भात आणि हरभऱ्याची उसळ करायची. शिरा, नारळी भात, बेसन लाडू ती अगदी नेहमी करत असे. तिच्या बरोबर लाडू वळायला मला खूप आवडायचं. प्रत्येक लाडवाला एक बेदाणा आणि एक काजू लावत आम्ही जमिनीवर बसून लाडू वळायचो. 

आज्जीनं मातीची चूल ओट्यावर बसवून घेतली होती. सुंदर स्वयंपाकघर होतं ते: चौकोनी, लाल फरशीचं. ओट्याला लागून मोठी खिडकी होती. त्यातून बाहेरची बाग दिसायची. स्वयंपाकघराच्या समोर कोठीची खोली होती. त्यात साठवणीच्या धान्याची पोती असायची. आम्ही वरल्याहून मुंबईला यायला निघालो कि आज्जी आम्हा नातवंडांना कोंबड्यांच्या खुराड्यात अंडी आणायला पाठवायची. आम्ही अंडी गोळा करून आणली कि ती ब्रुक बॉण्ड चहाच्या रिकाम्या लाल खोक्यात बेसनाचा एक जाड थर  - त्यामध्ये अंडी खोचायची- परत त्यावर बेसनाचा दुसरा थर अशी थरावर थर घालून अंडी पॅक करून देत असे. ते पॅकिंग इतकं पक्क असायचं कि एकही अंड फुटुन बेसनात मिसळलंय असं कधी झालं नाही. बेसन घरच्या शेतातल्या हरभऱ्याच्या डाळीचं असायचं. 

वरल्याला तेंव्हा गिरणी नव्हती. आज तरी आहे कि नाही कुणास ठाऊक. मुंबईच्या इतकं जवळ असुनही वरलं अजुनही छोटं खेडंच आहे -  फारशी लोकवस्ती नसलेलं. एक दिवस ठरवून आज्जी सगळी दळणं घेऊन तालुक्याच्या गावी वाड्याला जायची. दुपारचं जेवण, थोडी झोप झाली कि आप्पा गड्याला बैलगाडी जुंपायला सांगायची. तो दळणाचे डबे गाडीत नेऊन ठेवायचा. जी काही आम्ही नातवंड तिथे हजर असू ती गाडीत चढून बसायचो. मग सगळ्यांच्या शेवटी आज्जी यायची - उंच, ताठ, काठ पदराच्या पांढऱ्या सुती नऊवारीचा डोक्यावर पदर आणि हातात लाल चुटक रंगाची पर्स. लाल रंग आज्जीचा आवडता असावा. तिची पर्स लाल होती- कायम ती एकच पर्स तिनं वापरली, हातातल्या बांगड्या लाल असायच्या आणि घरातल्या फरशीचा रंगही लालच होता. 

आज्जीच्या स्वभावात शांतपणा होता. असमाधानता नव्हती. चिडचिड नव्हती. भांडखोरपणा नव्हता. तिचा स्वभाव लोभी- लालची नव्हता. कोणाकडून काही ओरबाडून घ्यायची वृत्ती नव्हती. ती सहज विचलित होत नसे. आज्जी - आबांचं आपसातल नातं खुप प्रेमाचं आणि सन्मानाचं होतं. तेच संस्कार माझ्या वडिलांवर झाले आणि पुढे माझ्या भावावर. देशमुखांच्या घरात असताना मी हे गृहीत धरून चालले. सगळे पुरुष आपल्या बायकांशी असेच सन्मानानं वागत असावेत असा माझा समज झाला. लग्नानंतर लक्षात आलं कि सगळ्या घरातले संस्कार सारखे नसतात. आज्जी -आबांच्या नात्याचं मोल मला तेंव्हा पासुन जास्त जाणवलं. सुसंस्कार ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द कऱण्यात येणारी बहुमूल्य ठेव आहे असं वाटायला लागलं. 
















Yesheeandmommy@gmail.com