Thursday, October 19, 2017

युगुल गीत - a duet



 लक्ष्मी पूजन - आईला जाऊन आठ वर्ष झाली. 
         आई -वडिलांच्या स्मरणार्थ हे सुंदर युगुल गीत (कि द्वंद्व गीत?)               
 नक्कीच युगुल गीत. 



             



yesheeandmommy@gmail.com

Monday, October 9, 2017


Friday, August 4, 2017

काचकाम




एकदा सुट्टी सुरु व्हायच्या आधी मी मुलाला म्हंटलं, "आता दोन आठवडे घरी आहेस तर तुला माझ्याकडून काही शिकायला आवडेल का? आजकाल सगळं भीत भीतच विचारावं लागतं.  

डोळे हातातल्या स्क्रीनवर खिळलेले ठेऊन  कंटाळा, नाईलाज, संशयानी भरलेल्या - आता हि काय नविन पिडा माझ्या पाठीमागे लावतेय कुणास ठाऊक अशा आवाजात त्यानं विचारलं, "काय ?" 

म्हंटल, "थोडासा स्वयंपाक, शर्टाचं बटण तुटलं तर तुझं तुला शिवता येईल इतपत शिवणकाम.

त्यानं स्क्रीन वरचे डोळे न हटवता नुसतीच मान हलवली - नंदीबैलासारखी. त्या मान हलवण्याचा अर्थ स्पष्ट नव्हता.

मी माझं घोडं आणखी थोडं पुढे दामटलं. त्याला म्हंटलं, " अरे, आजकाल बऱ्याच आयांना शिवणकाम तर सोडूनच द्या साधा सुईत दोरा कसा ओवायचा ते माहित नसतं. पण, तू फार भाग्यवान आहेस. तुझी आई तुला ते शिकवू शकते. "

स्वयंपाक शिकायला तो तयार झाला पण शिवणकाम त्याच्या गळी उतरवायला जास्त प्रयत्न करावे लागणार असं दिसलं म्हणून त्याला लहानपणीची आठवण सांगितली. सांगितली म्हणजे मी बोलायला सुरवात केली तो ऐकत होता कि नाही देव जाणे. 

माझे आजोबा खूप अभिमानानी सांगायचे कि आज्जीला सुईत दोरा ओवण्याच्या स्पर्धेत पहिलं बक्षिस मिळालं होतं. "पहिलं बक्षिस, पहिलं बक्षिस!"  ते दोन- तीनदा त्यावर जोर द्यायचे. मुलाला म्हंटलं देशमुख घराण्याची हि उज्वल परंपरा तू पुढे चालवावीस अशी माझी फार इच्छा आहे असं काही मी तुला म्हणत नाही. आज काळ खूप बदललाय. घरात शिवणकाम करणं जवळपास कालबाह्य झालं आहे. सुदोओ स्पर्धा आता होतात का आणि त्याचे चॅम्पियन असतात का ते हि मला माहित नाही. तरीही चार टाके घालायला शिकलास तर त्याचा तुला पुढे उपयोगच होईल. म्हणतात ना अ स्टिच इन टाईम वील सेव्ह यू नाईन तसं.

त्यान बहुतेक ते सगळं एका कानानी ऐकलं आणि दुसऱ्या कानानी सोडून दिलं. त्याच्या सुदैवानी स्प्रिंग ब्रेक असाच संपला थोडासा प्रवास, थोडंसं इथे तिथे करण्यात. स्वयंपाक आणि शिवणकाम दोन्ही शिकायचं राहीलं.
               



बोका म्युझियम ऑफ आर्ट मधल्या ग्लासस्ट्रेस (Glasstress) प्रदर्शनात जगभरातील कलाकारांनी उभारलेल्या काचेच्या तीसएक कलाकृती होत्या.

वरील फोटोतील कलाकृतीचं नाव आहे ऍशेस टू ऍशेस. एखाद्या पुस्तकातील मजकूर आक्षेपार्ह वाटला म्हणून त्याच्या निषेधार्थ त्या पुस्तकाचं सार्वजनिक दहन करण्यात आल्याची उदाहरणं जगभरच्या इतिहासात आढळतात. इटलीत जन्मलेले अंटोनीयो रिएल्लो प्रेमापोटी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांचं दहन करतात आणि त्या रक्षा पवित्र भस्म किंवा अंगारा असल्या प्रमाणे काचेच्या पेल्यात जतन करतात. त्या प्याल्यांच डिझाईन १६ आणि १७ व्या शतकात प्रचलित असलेल्या  व्हनिशियन प्याल्यांच्या डिझाईनवर आधारित असतं. २०१० मध्ये त्यांनी हा प्रकल्प सुरु केला.

रिएल्लो यांना पुस्तकांचा ध्यास आहे. An obsessive bibliophile असं त्यांचं वर्णन प्रदर्शनात केलंय. त्यांच्या आईनी जमवलेल्या विपुल ग्रंथसंग्रहामध्ये रिएल्लो वाढले. प्रदर्शनासोबतच्या माहितीत म्हंटल्याप्रमाणे त्यांच्या कलाकृतीत ऐतिहासिक डिझाईनच्या मद्याच्या प्याल्यांचं संकलन पहायला मिळतं आणि त्याबरोबरच ज्ञान -प्राशनाच रूपकही.

प्रत्येक प्याल्यावर त्यामध्ये ज्या पुस्तकाच्या रक्षा आहेत त्या पुस्तकाचं नाव, पुस्तकाच्या लेखकाचं नाव, पुस्तक कधी प्रसिद्ध झालं ती तारीख आणि कधी आणि कुठे ते दहन करण्यात आलं त्या तारखेची आणि स्थळाची नोंद आहे. आजकाल जगात  कुठे अचानक एखादा भारतीय संदर्भ सापडेल सांगता येत नाही. वरील कलाकृतीत तिसऱ्या फळीवरील सर्वात उजवीकडच्या प्याल्यात अमिताव घोष ह्यांच्या The Shadow Line पुस्तकाच्या रक्षा आहेत. त्याचं दहन दिल्लीत करण्यात आलं होतं. 
                                                                     



डोसन्ट हा शब्द मी पहिल्यांदा सेक्स अँड द सिटी ह्या टीव्ही मालिकेत ऐकला. त्याआधी डोसन्ट म्हणजे काय हे कोणाला माहित होतं. बोका रटोन म्युझियम मध्ये काचेच्या कलाकृतींचं हे प्रदर्शन मी दोन वेगवेगळ्या डोसन्ट बरोबर बघितलं - वेळ भरपूर होता आणि दुसरा काही उद्योग नव्हता. आणि एक गोष्ट खरी की दोन्ही डोसन्टनी अवांतर माहिती खूप सांगितली जी प्रदर्शनात उपलब्ध नव्हती किंवा असली तरी मी लक्षपूर्वक ती वाचली नसती.

Glassstress हे काय प्रकरण आहे, त्याचा व्हेनिस बीएनालेशी काय संबंध, मुररानो ग्लास, पेग्गी गुगनहाइम वगैरे शब्द कानावर पडत होते. माझ्या बरोबर प्रदर्शन बघणाऱ्या अमेरिकन महिला होत्या त्यांच्या ते सगळे शब्द ओळखीचे आहेत असं वाटत होतं. डोसन्टच्या ग्रुप बरोबर प्रदर्शन बघण्यात तीही एक मजा होती - विशिष्ट वयाच्या बिनधास्त मत प्रदर्शन आणि चर्चा करणाऱ्या महिलांच्या कॉमेंटस. दोन्ही वेळा ग्रुप मध्ये एखाद दुसरा नवरा सोडला तर बहुतेक सगळ्या महिला होत्या. बहुतेक जणी - दोन्ही डोसन्ट प्रमाणे- साधारण साठी-सत्तरीच्या आणि उत्साही. एखादी कलाकृती आवडली नाही कि सरळ  "It's not doing anything for me" असं म्हणत त्या पुढे सरकत होत्या.

स्पॅनिश आर्टिस्ट हावीए पेरेझ ह्यांच्या लाल झुंबराच्या कलाकृतीचं नाव करोना आहे. क्षणभंगुरत्व (impermanance) आणि सरत्या काळाचे शरीरावर होणारे परिणाम हे पेरेझ ह्यांच्या कलाकृतींचे विषय असतात. मृत्यू आणि आजारपण ह्याचं सूचक म्हणून ते आपल्या कलाकृतींमध्ये बरेचदा रक्तवर्णी लाल रंग वापरतात. हे झुंबर अठराव्या शतकात प्रचलित असणाऱ्या रेझ्झोनिको पद्धतीच्या झुंबरांवर आधारित आहे. श्रीमंती चैन, विलासी जीवनशैलीच प्रतीक वाटणारं हे किमती झुंबर मुद्दाम खाली पाडून फोडण्यात आलं. ते जिथे प्रदर्शित केलं जातं त्या त्या ठिकाणी ते काचेचे  तुकडे तस्सेच्या तसे विखुरले जातात.

ते फुटलेलं झुंबर आणि त्यावर बसलेले कावळे बघून का कोण जाणे मला जुन्या हिंदी सिनेमात बघितलेली भुताटकीची दृश्य आठवली : ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातलं गावा बाहेरच्या ओसाड माळरानातलं रिकामं- पण जुन्या ऐशवर्यच्या काही खुणा अजूनही शिल्लक असलेलं एकाकी घरं, काळी पावसाळी रात्र, बाहेर विजा चमकतायत, ढगांचा गडगडाट चालू आहे, घरात सगळं जुनं- पुराण भयाण वाटतंय, वाऱ्यामुळे मधूनच खिडक्यांची तावदानं किरकिरतायत.....तेवढ्यात कसला तरी आवाज येतो... कोणाच्या तरी पायल ची छमछम ऐकू येते... वगैरे.




पुढच्या कलाकृतींनी लगेच मूड बदलला. डोसन्ट हे मुख्यत्वे हौशी काम असतं. आणि मला वाटतं तोच त्यातला महत्वाचा शब्द - key word असावा - हौस. बरेचदा निवृत्त महिला आणि पुरुष हे काम करतात. ज्या हौसेनं हि मंडळी आपल्याला प्रदर्शन दाखवतात, सगळी सविस्तर माहिती सांगतात - विनावेतन किंवा विनामानधनाचं - त्याचं कौतुक वाटतं. 

मुलाच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या निमित्तानं आम्ही न्यूयॉर्क परिसरातल्या काही ऐतिहासिक वास्तू बघितल्या. खरतर ती न्यूयॉर्क शहराच्या इतिहासातील महत्वाच्या व्यक्तींची घरंच होती. सतराव्या - अठराव्या शतकात बांधलेली आणि आता म्युझियम बनवून जशीच्या तशी जतन केलेली. एक होतं ब्रॉंक्स मधली सर्वात जुनी इमारत - १७४८ साली बांधलेलं फ्रेडरिक व्हॅन कोर्टलंड हाऊस आणि दुसरं लेखक वॉशिंग्टन अर्व्हिंग ह्यांचं सनिसाईड हे स्लीपी हॉलो मधलं हडसन नदीच्या काठावरचं टुमदार पण खूप सुंदर घर. तिथल्या ज्येष्ठ  मार्गदर्शकांनी ज्या सहजतेनी मुलांना त्या घरातल्या प्रत्येक गोष्टी मागची सविस्तर माहिती सांगितली, त्यांना अभ्यासासाठी फोटो काढायला मदत केली त्यावरून त्यांची आपल्या कामा विषयीची कळकळ आणि विषयाचा सविस्तर अभ्यास जाणवत होता.

माध्यमिक शाळेत मुलाला दोन वर्ष फक्त न्यूयॉर्क शहराचा इतिहास शिकवण्यात आला. इतकं त्यांच्या दृष्टींनी ह्या शहराच्या इतिहासाला महत्व आहे. मला नेहमी वाटतं कि मुंबई हा महाराष्ट्राच्या राजमुगुटातला शिरोमणी - jewel in the crown आहे. तिचा इतिहास महाराष्ट्रातल्या पुढील पिढ्यांना शिकवणं आणि तो त्यांच्यासाठी जतन करणं हि आपली जबाबदारी आहे.

वरील कलाकृती बघितल्याबरोबर आपल्या लक्षात येतं कि ती आफ्रिकेशी संबंधित असावी. त्यातल्या माणसांच्या प्रतिकृती काचेच्या आहेत. दिसायला ते लोकं आफ्रिकन दिसले तरी त्यांचे पोशाख पूर्णपणे पाश्चिमात्य आहेत. मधोमध जो पंधरा फूट उंच मनोरा आहे तो युरोपियन पद्धतीच्या स्वयंपाकाच्या भांड्यांचा आहे. युरोपियन वसाहत वादासमोर किंवा त्याच्यामुळे आफ्रिकन लोक किती खुजे पडले, त्यांचे पोशाख- बाह्यांग त्यामुळे बदललं असं तर कलाकाराला ह्या कलाकृतीतून दाखवायचं नसेल.

पस्काल मार्टिन तायु हे मूळचे कॅमरुनचे. वसाहतवादानंतरच्या काळातील आफ्रिकेचं पुनर्चित्रण करायचा प्रयत्न ते त्यांच्या कलेद्वारे करतात. जागतिकीकरण, देशांतर, राष्ट्रीयत्व, राजकीय सत्तेचा गैर वापर आणि एड्स सारख्या विषयाला आपल्या कलेद्वारे वाचा फोडायचा त्यांचा प्रयत्न असतो.




टेबलवर ठेवलेल्या वस्तूंची स्थिरचित्र बरेचदा बघायला मिळतात. ती बहुतांशी रंगीत असतात. अशा प्रकारच्या १७ व्या शतकातील डच चित्रांमध्ये (vanitas) टेबलवर कवटी, घड्याळ, कुजलेली फळं, जळणारी मेणबत्ती (सर्व गोष्टी मृत्यू आणि अंताच्या द्योतक) आणि नेहमीच्या वापरातल्या पर्स, खेळातले पत्ते अशा ऐहिक उपभोगाच्या गोष्टी ठेवलेल्या असत. हान्स ऑप डी बीक ह्यांच्या The Frozen Vanitas नावाच्या वरील कलाकृतीत अर्थातच सगळं काचेचं आहे आणि vanita ची हि एकविसाव्या शतकातील आवृत्ती असल्यामुळे त्यात कवटी आणि मेणबत्ती बरोबरच मोबाईल फोन, पेपर कप, स्ट्रॉ आणि उंच टाचांच्या चपला वगैर तत्कालिक गोष्टीहि आहेत.



एवढा सुंदर मासा बघिततल्यावर मला आईची आठवण झाली नसती तरच नवल. तिच्या नावात मासा आणि नेहमी जेवणातही. सुरणाच्या कापाच्या आकाराची  पातळ काचेची कापं खवलांसारखी खोवून हा मासा बनवलेला आहे. स्पष्टवक्त्या महिलांच्या मते ह्या कलाकृतीत जितक कौतुक कलाकाराच आहे तितकच कौतुक ते धारदार काचेचे काप हाताळून हि कलाकृती बनवणाऱ्या कारागिरांचही व्हायला हवं. कारण ह्या सगळ्या कलाकृतींमध्ये मूळ संकल्पना कलाकाराची असली तरी तिला आकार द्यायचं, मूर्त स्वरूप द्यायच कठीण काम कारागिरांनीं केलेलं आहे. काचकाम केलेल्या कारागिरांच्या नावाचा उल्लेख प्रदर्शनात नव्हता.  


                                                       

हि कलाकृती दोन भागात सादर करण्यात आलेली आहे. भिंतीवर एक जपानी चित्र आहे. त्या चित्रात जो छोटा लाल मासा आहे त्याचं काचेचं शिल्प त्या चित्रासमोर आहे. जणू काचेचा मासा चित्रातील आपलं प्रतिबिंब न्याहाळतोय. पोलंड मध्ये जन्मलेल्या मार्टा क्लनोवस्का ह्यांच्या शिल्पकलेचं हे वैशिष्ट्य आहे. त्यांची शिल्प हि मूळ सपाट पृष्ठभावरील कलाकृतीतली एखाद्या छोट्याशा प्राण्याची त्या चित्राच्या बाहेर वाढवुन मोठी केलेली आवृत्ती असते.

Cardiac Arrest (top): दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या केंडेल गिअर्स ह्यांची हि कलाकृती आहे - Cardiac Arrest नावाची. वयाच्या १५व्या वर्षापासून गिअर्स वर्णद्वेष विरोधी चळवळीत सक्रीय सहभागी झाले होते. वरील कलाकृती पोलिसांच्या लाठीची (batons) काचेची प्रतिकृती वापरून बनवलेली आहे. गिअर्स फुटलेल्या काचा, काटेरी तारा, सायरन वगैरे धोका निदर्शक माध्यमं आपल्या कलाकृतीत वापरतात. त्यांच्या मते लाठ्या मोडू शकतात - पण सामाजिक बदलासाठी लढा देणाऱ्या लोकांवर जोरदार वार केल्या मुळेच.      

yesheeandmommy@gmail.com 











Tuesday, July 18, 2017

मुंबई पुराण



                                     




जून मध्ये मुंबईत दोन नविन सिनेमा लागले. त्यांच्याविषयी वाचल्यावर दोन्ही बघावेसे वाटले. मुरांबा मिळाला बघायला - वांद्र्याच्या एका छोट्या थिएटर मध्ये - इंग्रजी सबटायटल सहीत. मुलालाही तो आवडला. चि. व चि. सौ. का. बघायचा राहिला. पण त्या निमित्तानं चि. म्हणजे काय आणि चि. सौ. कां. म्हणजे काय ह्याचा अर्थ तरी चिरंजीवांना जाणून घ्यावासा वाटला.   

जगात फक्त एकच ठिकाण आहे जिथला वडा-पाव मला आवडतो. दुसरीकडे कुठेही मी वडा-पाव खात नाही. अगदी मुंबईतही इतरत्र कुठेही नाही. पण त्या एका ठिकाणचा - खुप पूर्वी आम्ही दादरला किर्ती कॉलेजच्या जवळ राहायचो त्या गल्लीतला वडा-पाव मला आवडतो. मुंबईला गेल्यावर एकदा तरी मी तो खाते. तो वडेवालाही मला ओळखतो. म्हणजे मला नाही ओळखत. तेंव्हा मी कधी त्याच्या दुकानात जात नसे. कुठल्या दुकानात मुलींनी जायचं आणि कुठल्या दुकानात नाही ह्याविषयी आमच्या आईचे काही मालवणी/मराठा जुने -पुराणे, तिच्या बालपणापासून चालत आलेले कडक नियम होते. त्यानुसार संध्याकाळी कधीतरी वडा-पाव घरी घेऊन यायचं काम भावाचं होतं. तर त्याची बहीण म्हणून तो वडेवाला आजही इतक्या वर्षांनंतर मला ओळखतो आणि विचारतो,  "तू देशमुखची बहीण ना".  

हे आणि अशीच काही कारणं आहेत - नेमेचि येतो पावसाळा तशी नेमेचि मी मुंबईला जाण्याची. 

एप्रिल मधल्या "त्या" प्रकरणानंतर युनायटेड मध्ये अपण जरा भीतभीतच चढतो. आत काय वाढून ठेवलय कोण जाणे अशी धास्ती मनात असते. पण जातानाचं त्यांचं लॅम्ब रोगन जोश कुठल्याही चांगल्या भारतीय रेस्टोरंट मधल्या रोगन जोशच्या तोडीचं होतं. (येतानाचे लॅम्ब चॉप्स खास नव्हते). पूर्वी त्यांच मटण - मासे संपायला आले कि एखादी हवाई सुंदरी लगबगीनं येऊन मला विचारायची, "चिकन संपायला आलंय. त्या ऐवजी तु शाकाहारी घेतेस का?" (संपायला आलंय म्हणजे काय? अजून संपलं तर नाही ना - असा प्रश्न तेंव्हा माझ्या मनात यायचा). ह्यावेळी मला कोणी तसं विचारलं नाही. प्रवाशांशी थोडं सौजन्यानी वागायचं ठरवलंय कि काय त्यांनी कुणास ठाऊक. 

परत येताना विमानात ऐ दिल है मुश्किल बघितला. बघावासा वाटत नव्हता तरी बघितला. सिनेमा वाईट नाही. चांगला आहे असही नाही. पण हॅलो जिंदगी इतका बेकार तर नक्कीच नाही. हॅलो जिंदगी मध्ये अलिया भट्टला मुंबई कि दिल्लीतील सुपर मार्केट च्या शेल्फ वर रागू ह्या अमेरिकन ब्रॅण्डच्या पास्ता सॉसच्या बाटल्या बघून कामासाठी न्यूयॉर्कला गेलेला तिचा मित्र रघुची आठवण होते. आणि ती रागू रागू म्हणत रहाते. सुरवाती पासून तो सिनेमा जो घसरत जातो तो शाहरुख खान पडदयावर आल्यावर थेट गोव्यातल्या समुद्राच्या लाटांशी कबड्डी खेळायला जाऊन पोहोचतो. ऐ दिल है मुश्किलची परस्थिती तेवढी वाईट नाही. मी करणं जोहरचे सगळे सिनेमा बघितलेले नाहीत. पण त्याचे जे दोन -चार सिनेमे बघितलेत- कभी ख़ुशी कभी ग़म, कभी अलविदा ना कहना - त्यावरून त्याचा फॉर्म्युला माझ्या लक्षात आलाय असं वाटतं. 

एकदा कुठल्यातरी कार्यक्रमात फराह खान त्याला म्हणाली होती कि  - तू  एन आर आय लोकांसाठी- भारताबाहेर रहाणाऱ्या भारतीयांसाठी सिनेमा बनवतोस". ते अर्थातच त्यानं पूर्णपणे नाकारलं नाही. त्यात तो वेगळं काही करतोय असंही नाही. हिंदी सिनेमाला पुढच्या पिढीत नेतोय एवढंच. जुन्या हिंदी सिनेमात व्हिलन असायचे. सिनेमाच्या शेवटी इंपोर्टेड गाड्यांमधून व्हिलनचा पाठलाग व्हायचा. गावाबाहेर हिरो आणि व्हिलन मध्ये खोट खोट ढिश्यूम ढिश्यूम व्हायचं आणि शेवट गोड व्हायचा. हल्लीच्या सिनेमात व्हिलन नसतो. त्याऐवजी डी जे असतात. ते क्लब मध्ये गाणी लावतात. आणि ते डीजेवालेबाबू क्लबमध्ये गाणी लावत म्हणे जगभर फिरु शकतात. ते सगळं जगच आपल्याला अपिरिचित वाटतं. पूर्वीपासूनच हिंदी सिनेमात नेहमी सभोवतालच्या समाजाचं अवास्तव, काल्पनिक चित्रण असायचं. हिंदी सिनेमा बघितलेल्या एका तरुण आफ्रिकन टॅक्सी
ड्रायव्हरनी न्यूयॉर्कमध्ये एकदा मला विचारलं होतं -"सिनेमात दाखवतात तसं तुमच्याकडे छान छान कपडे घालून लोक सारखे नाचत असतात का? ज्या काळात आलिशान बंगले, लांबच्या लांब परदेशी गाड्या भारतातल्या सर्वसामान्य जनतेला स्वप्नातही बघण शक्य नव्हतं तेंव्हा हिंदी सिनेमावाले नियमितपणे त्यांना ते जग पडद्यावर दाखवायचे. भारतीय मंडळी मोठ्या प्रमाणात परदेशात जाऊन रहायला लागली तेंव्हा आता तोच फॉर्म्युला जोहर सारख्यांनी परदेशात नेलाय.  



                                      



ऐ दिल है मुश्किल हा त्यापैकीच एक. चित्रपटाचं कथानक लंडन मध्ये घडतं. सुरवातीलाच स्पष्ट करण्यात येतं कि हिरो आणि हिरॉईन बऱ्यापैकी श्रीमंत घरातून आलेले आहेत. तू फर्स्ट क्लास श्रीमंत आहेस कि प्रायव्हेट जेट श्रीमंत असा प्रश्न अनुष्का शर्मा पहिल्या भेटीतच रणबीर कपूरला विचारते आणि तो म्हणतो कि प्रायव्हेट जेट श्रीमंत. त्यामुळे लंडन मध्ये ते दोघं काही काम धंदा न करता नुसतीच मजा कशी काय करू शकतात अशी शंका प्रेक्षकांच्या मनात यायच्या आधीच तिचं निरसन होतं. थोड्या वेळानी ऐश्वर्या राय पडद्यावर येते. ती व्हिएन्नात रहात असते. तिथे ती फॅशनेबल लांब /तोकडे कपडे आणि उंच बूट घालून उर्दू शायरी करते (जणू उमराव जानची करण जोहर आवृत्ती). तिच्या शायरीच्या वाचनाला खोली भरून तिच्या सारख्याच बायका उपस्थित असतात. मी कधी व्हिएन्नात शायरी वाचन ऐकायला गेले नाही त्यामुळे खरोखर तसं घडू शकतं का ह्याची मला कल्पना नाही. 

चित्रपटाचा शेवट दुसऱ्या कुठल्यातरी कादंबरीतून किंवा सिनेमातून आणून ह्या सिनेमाला जोडलाय असं वाटतं. कथानक कितीही अवास्तव वाटलं तरी ते पडद्यावर आकर्षक रित्या मांडण्यात जोहरची हातोटी आहे. त्याच्या सिनेमात बरेचदा गाणीही  चांगली असतात. सढळ बजेट मुळे हे संभव होत असेल.  

ऐ दिल है मुश्किल बघायची माझी फारशी इच्छा नव्हती कारण त्याच्या रिलीज वरून मुंबईत बरंच वादळ उठलं होतं. ते नंतर शमलं. पण शहरात खाली भासणाऱ्या शांतेतेच्या वरती वादळाचे अदृश्य ढग तर जमलेले नाहीत ना असं मला ह्यावेळी उगीचच वाटलं. पावसाळ्यात नैऋत्य मोसमी वारे घेऊन येतात त्या वादळाकडे माझा रोख अर्थातच नाही.  

एकतर मेट्रोचं काम चालू आहे. अनेक ठिकाणी खोदून ठेवलंय. जरा पाय घसरला तर खड्ड्यात पडू हे रोजच्या दुकानात जातानाही सतत लक्षात ठेवावं लागतंय. अनेक प्रमुख रस्त्यांची एक लेन त्या कामासाठी बंद आहे. त्याचा ट्रॅफिकवर परिणाम नाही झाला तरच नवल. न्यूयॉर्क मधलं सेकंड ऍव्हेन्यूच्या सबवेचं काम ज्यांनी नुकतंच अनुभवलय त्यांना हि बांधकामाची अडचण किती वर्ष चालू शकते ह्याची कल्पना आहे. त्यात अनेक ठिकाणी उंचच उंच इमारती बांधायचं काम चालू आहे. त्यामुळे शहरातली मोकळी जागा आटली आहे आणि माणसांची गर्दी तेवढीच आहे किंवा कदाचित वाढते आहे. आणि ह्या आटलेल्या, आखडलेल्या जागेत मुंबईच्या मूळच्या आणि वाढत्या गर्दीची मग काळजी वाटायला लागते. 

तशी काही जुनी आश्रयस्थानं अजून टिकून आहेत. त्यातलच एक - शिवाजी पार्क. अजून तरी त्याची घडी विस्कटलेली नाही. जसं ते वीस वर्षांपूर्वी होतं त्याचीच सुधारलेली आवृत्ती आजही आहे. वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांचं संध्याकाळी जमण्याचं ते आवडीचं ठिकाणं आहे. तिथे नेहमी जमणारे ग्रुप पावसातही पार्क पासून लांब राहू शकत नाहीत. मुंबईचा पाऊस हातोडीनी खिळे ठोकावेत तसा धरतीला ठोकतो. पावसाळ्यात अचानक कधीही तो ठोकायला सुरुवात करतो. तरीही दोन सरींच्या मध्ये संधी साधून, छत्र्या बित्र्यांच्या तयारीनिशी नेहमीचे ग्रुप तिथे जमतच असतात. वयोगट काहीही असो बायकांचे ग्रुप वेगळे, पुरुषांचे वेगळे. त्यातही काही बदल नाही. फक्त गप्पांचे विषय बदलले असावेत. आपण जर पार्क भोवती फेऱ्या मारल्या तर - मी आत्ताच तिथून परत आले, मुलगा आता डिसेंबरमध्ये येईल, तुम्ही पुढच्या आठवड्यात चाललाय का असली वाक्य कानावर पडतात.  






प्रभादेवीत मात्र काय चाललंय समजत नाही. एकीकडे जुन्या चाळी पाडून नवीन उंच इमारती बांधण्याचं काम चालू आहे. तर नवीन येणाऱ्या अत्याधुनिक इमारतींच्या जवळच भर रस्त्यात मध्येच एखादा गोठा उभा आहे. आमच्या घराकडे जायच्या नेहमीच्या रस्त्यावर मध्येच भर रस्त्यातच पाच- दहा गायी आणि त्यांची बछडी बांधलेली असतात. शेणाची घाण असते, वास येत असतो. रस्त्यातल्या गोठयाजवळच थोड्याशा अंतरावर रोज दुपारी पाच- सात  फेरीवाले खाद्यपदार्थ विकायला जमतात. त्यांच्या भोवती ते चटक मटक पदार्थ आवडीनं खाणाऱ्या मंडळींची कोंडाळी उभी रहातात. ज्या ठिकाणी नगरपालिकेने किंवा स्थानिक उद्योजकांनी निगा राखून छोट्याशा त्रिकोणात सुंदर बाग करायला हवी, तो त्रिकोण ह्या अतिक्रमणामुळे कुरूप दिसू लागतो.  

म्हणजे दीपिका पदुकोण जिथे राहते तो रस्ता चांगला रुंद, स्वच्छ. त्या ररस्त्यावर परदेशी गाड्यांच्या शोरूम्स, फुटपाथवर कोणाचं अतिक्रमण नाही. आणि त्या रस्त्यावरून थोडंसं उजवीकडे वळलं कि गल्लीत लगेच गोठा आणि फेरीवाले. असं का? पूर्वी आमच्या घराजवळ एखाद दुसरी गाय फिरताना दिसायची. पण भर रस्त्यात गोठा मी आत्ताच बघितला. शहरात ह्याविषयी काही नविन कायदे-कानून झालेत का? परवानगी मिळत असेल तर प्रभादेवीत आपापल्या दारात स्वतःच्या एक -दोन गायी  किंवा कोंबड्या पाळायला कोणाला आवडणार नाही. मलाही आवडेल. 



    


ऐ दिल है मुश्किल जितका अवास्तव आहे तितकाच मसाण वास्तववादी वाटला. त्यातलं रिचा छ्ड्डाचं काम चांगलं आहे. मसाण बघण्याआधी तिचं नावं मी बॉलिवूड संबंधी बातम्यांमध्ये वाचलं होतं. हिंदी सिनेमात ज्या अनेक शोभेच्या बाहुल्या आहेत त्यातलीच तीही एक असेल अशी माझी समजूत होती. पण मसाण मधल्या तिच्या कामात स्मिता पाटीलचा भास झाला. 

काही सिनेमा चांगले आहेत असं ऐकूनही घरी किंवा थिएटर मध्ये जाऊन बघावेसे वाटत नाहीत. त्यातल्या विषयाचं खूप ओझं होईल असं वाटतं. पण पंधरा तासांच्या प्रवासात, तीस हज्जार फूट उंचीवर, सहप्रवाशांच्या संगतीत- जेवत, झोपत बघताना ते ओझं तेवढं जाणवत नाही. मँचेस्टर बाय द सी मध्ये एका तरुण बापाचं घर आगीत जळून भस्मसात होतं. घराबरोबरच त्याची तीन लहान मुलंही. ती आग त्याच्या निष्काळजीपणा मुळे लागली असावी असं त्याला वाटतं. त्या अपराधी भावनेचं ओझं घेऊन जगण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्या भावाचं निधन होतं आणि हायस्कुल मध्ये शिकणाऱ्या पुतण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते. २०१६ च्या सर्वोतृष्ट सिनेमात ह्या सिनेमाची गणना का झाली असावी हे सिनेमा बघितल्यावर कळतं. त्यातल्या मुख्य अभिनेत्याचा अभिनय आणि सिनेमाचं दिग्दर्शन कथेत एवढं दुःख भरलेलं असुनही सिनेमा दुःखी किंवा भडक होऊ देत नाही.  
  


                                          



शिवाजी पार्क वीस -तीस वर्षांपूर्वी जसं होतं बहुतांशी तसंच आजही असलं तरी बाकीची मुंबई बरीच बदलेली आहे. न्यूयॉर्कला पहिल्यांदा आले तेंव्हा मला मुंबई आणि न्यूयॉर्क मध्ये खूप साम्य आहे असं वाटलं होतं. अनेक बाबतीत दोघांमध्ये जमिन- अस्मानाचा फरक असला तरी शेवटी दोन्ही शहरं आपापल्या देशांच्या आर्थिक राजधान्या आहेत. त्यांच्यातल्या ऊर्जेत काहीतरी साधर्म्य भासण तसं अपरिहार्य आहे. 

आता शहरात वाढलेली गर्दी आणि गडबड बघितली कि असं वाटतं - मुंबईला कधी प्रश्न पडत असेल का कि आपण कोण आहोत. देशातील दोन मोठ्या इंडस्ट्रीजनी - फायनॅन्स आणि फिल्म - तिच्या लहानशा बेटात घर केलंय. हे म्हणजे मॅनहॅटनच्या डाऊन टाऊन मध्ये वॉल स्ट्रीट आणि अपटाऊन मध्ये हॉलिवूड कोंबण्यासारखं झालं. सर्वसाधारणपणे सारख्याच महत्वाची असली तरी न्यूयॉर्क आणि लॉस अँजेलिस ह्या दोन शहरात काही साम्य आहे असा दावा कोणीच करणार नाही. हि दोन्ही शहरं एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत. मुंबईला कधी प्रश्न पडत असेल कि आपण न्यूयॉर्क आहोत कि लॉस अँजेलिस. आपली संस्कृती, शहराचे ethos हे उत्तरेला वर्चस्व असलेल्या मनोरंजनाच्या दुनियेचे आहेत कि दक्षिणेवर राज्य करणाऱ्या अर्थकारणाच्या दुनियेचे. कि झपाट्यानी बदलणाऱ्या ह्या दोन बलशाही टोकांच्या मध्ये नेटानी शहराचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मध्यम वर्गीय दादर -शिवाजी पार्कच्या दुनियेचे. 

गेली काही दशकं - बहुदा फाळणी पासुन - ह्या दोन इंडस्ट्री ह्या शहरात एकत्र नांदल्यात तसंच भविष्यातही चालू राहू शकेल का? का बदलत्या मुंबईतला गोंधळ कमी करण्यासाठी काही पावलं उचलावी लागतील. काही उपाय योजना करावी लागेल. बॉलीवूडला मुंबईच्या बाहेर हलवणे हा मुंबईतली वाढती गर्दी कमी करण्यावर तोडगा होऊ शकेल का? 

बॉलिवूडमध्ये हिंदी सिनेमे बनतात. तसं बघायला गेलं तर मुंबईत किती लोक चांगलं हिंदी बोलतात? गगनचुंबी इमारतीतले शेजारी, मॉल मधल्या दुकानातले विक्रेते, कोपऱ्यावरच्या कॉफी शॉप्स मधले कर्मचारी आणि ग्राहक आपसात इंग्रजी बोलताना ऐकले कि इंग्रजीच आता मुंबईची बोलीभाषा - lingua franca झालीय असं वाटू लागतं. काही ठिकाणी थोडंफार मराठी शिल्लक असेल तेवढच.  वांद्रा - जुहू ह्या बॉलिवूडच्या परिसरातहि हिंदी कितपत बोललं जातं कुणास ठाऊक. 

आपसात मिळून मिसळून रहाणं ही आपली परंपरा असेलही - मग ते माणसं आणि जनावरांचं एकाच ठिकाणी वावरणं असो, किंवा मर्यादित जागेत दोन मोठ्या इंडस्ट्रीज ना एकत्र ठेवणं असो - गर्दी, गडबड, गोंधळाची आपल्याला सवय होऊन बसलीय. पण मुंबईत आता जे बदल होतायत ते तर सगळे परदेशातून आलेले आहेत. चाळीस - पन्नास मजली इमारती, मोठ्ठे मॉल्स, त्यातली दुकानं - त्यात भारतीय काहीच नाही. त्या बदलांच्या अनुषंगाने शहरातील इतर जुन्या परंपरा पूर्वी सारख्याच चालू राहू शकतील? कि गर्दी, गोंधळ कमी करण्यासाठी काही बदल करावे लागण्याची शक्यता आहे. आज अनेक गोष्टींमध्ये मध्ये आपण सर्रास अमेरिकेचं अनुकरण करतो. अमेरिकेत हॉलिवूड देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर लॉस अँजेलिस मध्ये आणि वॉल स्ट्रीट विरुद्ध दिशेला पूर्व किनाऱ्यावर न्यूयॉर्कमध्ये आहे. मग ह्या बाबतीत आपण त्यांचं अनुकरण का करू नये.

अर्थात हे बदल काही एक -दोन वर्षात घडून येऊ शकणार नाहीत. पण त्या दृष्टीने विचार करायला सुरवात करण्याची वेळ आली असेल का? उदाहरणार्थ शहरातील अर्थव्यवथा आणि नोकऱ्या किती प्रमाणात बॉलिवूडवर अवलंबून आहेत. समजा जर बॉलिवूड नसेल तर तिथून मिळणाऱ्या उत्पन्नाला आणि नोकऱ्यांना पर्याय म्हणून शहरात पर्यटनाचा विकास होऊ शकेल का. दरवर्षी साधारण ६० मिलियन पर्यटक न्यूयॉर्क शहराला भेट देतात - देशातून आणि परदेशातून. जगातील सगळ्या पर्यटकांच्या मध्ये एक गुण फार चांगला असतो तो म्हणजे ते येतात,मौज - मजा करतात, पैसे खर्च करतात आणि आपापल्या गावी परत जातात. शहरात कायमचं रहात नाहीत.   

आणि ज्या तऱ्हेने हिंदी सिनेमावाले हल्ली परदेशी जायला लागलेत (IIFA in NY?) कुणी सांगावं बॉलिवूडकर मंडळी खुषीत बॉलीवूडला मुंबईच्या बाहेर न्यायला तयार असतील. कुठे बरं जाऊ शकतील ते - How about कतार? किंवा दुबई. नावातही किती साम्य दोन्ही शहरांच्या. फक्त पहिलं अक्षरच तेवढं वेगळं. नावामुळे मुंबई -दुबई बहिणी बहिणीचं वाटतात.   




yesheeandmommy@gmail.com 
















Sunday, April 9, 2017

Awagha Rang Ek Jahla





What a beautiful film this is! When our cultural icons pass away, we feel lost. This film takes us back  to the 80's to shows like प्रतिभा आणि प्रतिमा when Mumbai Doordarshan brought artists, writers, poets and other culturati into our homes on Sunday morning. 





From the time before I was mature enough to appreciate her singing, I always thought Kishori Amonkar was very beautiful. Her look was that of an intense thinker and scholar and style was similar to other maharashtrian artists of her time like Lata Mangeshkar and the poet Shanta Shelke -  traditional (काठ - पदराची) sadi draped snug over the shoulders (Amonkar and Mangeshkar preferred silks, Shelke stuck to cottons) and prominent kunku on the forehead. 





In her interviews as in the above film whether she is talking about the language of music or explaining the intricacies of Indian classical singing, her mastery of the language is unmistakable.  She said when she speaks from the heart, it comes out in marathi but she didn't hesitate to answer questions in fluent hindi or english when required.  





Famously reclusive and moody, she said the aim of classical music is to bring peace to the listeners not to excite them (which she believed today's music tends to do). In the film she explains how she prepares before a concert, saying the mood she tries to get into is so fragile that it can shatter with the slightest bit of intrusion hence she prefers not to see anyone in the green room. 

आयुष्यभर एकचित्तानि सांगिताची साधना करत राहिलेल्या किशोरी अमोणकरना मानाचा मुजरा. 


Sunday, February 26, 2017

मिले सूर मेरा तुम्हारा







योगायोगाने मागे मी दोन पुस्तकं साधारण एकाच वेळी वाचली. पुस्तकांचे विषय तसे अगदी वेगवेगळे होते. तरीही त्यांच्यात काही बाबतीत साम्य आहे असं मला वाटलं.  

त्यातलं एक पुस्तक होतं,  My Journey हे डॉना कॅरनच आत्मकथन आणि दुसरं म्हणजे ग्लोरिया स्टायनमच My Life on the Road. 

पुस्तकांत पहिली सारखी गोष्ट म्हणजे दोघीही स्त्रिया न्यूयॉर्कच्या आहेत. डॉना कॅरन मूळच्या न्यूयॉर्कच्या. त्यांचा जन्म, बालपण क्वीन्स आणि लॉंग आयलंड मधलं आणि फॅशन डिझाईनर झाल्या नंतरच सगळं आयुष्य आणि काम न्यूयॉर्क सिटी मध्ये. ग्लोरिया स्टायनम मूळच्या न्यूयॉर्कच्या नसल्या तरी गेली कित्येक वर्ष त्या इथे रहातात. 

दुसरं म्हणजे दोन्ही स्त्रिया आपापल्या क्षेत्रात उच्चतम पदावर पोहोचल्या. ग्लोरिया स्टायनम यांनी केवळ अमेरिकेतल्याच नाही तर जगभरच्या स्त्रीयांच्या जागृतीचं - महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचं आणि ते हक्क मिळवायला मदत करण्याचं काम केलं आणि अजूनही करतायत. 

तर सुंदर दिसणं हा हि स्त्री चा एक मूलभूत हक्क आहे या प्रेरणेतून कि काय बायकांच्या नैसर्गिक शरीरयष्टीला उठाव मिळेल असे कपडे डिझाईन करत डॉना कॅरन यशस्वी फॅशन डिझाईनर झाल्या.  

दोघीहि स्त्रीया अतिशय भाग्यवान.  त्यांना अगदी तरुण वयात आपला मार्ग गवसला आणि त्या मार्गावर आयुष्यभर प्रवास करण्याचं सुखही लाभलं. त्या भाग्यवान म्हणून त्यांना हे सुख लाभलं का त्यांनी आपलं भाग्य स्वतः घडवलं म्हणून? 

माय जर्नी मध्ये डॉना कॅरन म्हणतात, 

Later that night, Richard said, "Donna, today was the perfect metaphor for how you live your life. You gun it without knowing where the fxxx you're going and hope for the best." 

He's right. Nothing turns me on like a leap of faith. When I get an idea into my head, I go for it. I put menswear on a runway without a business to support it. I tried crazy designs that were successful and many that flopped, including my now -iconic cold shoulder. If I'd stopped and thought about half the things I wanted to do, they never would have happened. 

तिसरी आणि मला खूप महत्वाची वाटली ती सामाईक गोष्ट म्हणजे दोघीही आपल्या पुस्तकात म्हणतात कि त्यांनी आयुष्यात जे काम केलं त्याचं मूळ त्यांच्या वडिलांनी जे केलं त्यात होतं. 

डॉना कॅरनचे वडील त्या तीन वर्षांच्या असताना वारले. त्यांचा पुरुषांचे सूट शिवायचा व्यवसाय होता. कॅरन  लिहितात,
I became a tailor, just like my father. He was an amazing one. I like to think he passed that baton, that talent, that gene on to me, because that's where I feel the most connected to him. 

तर ग्लोरिया स्टायनम ह्यांचे वडील भटक्या आणि विमुक्त समजाचे सभासद होते असं म्हणता येईल. ते कधीच एका गावात फार काळ राहू शकेल नाहीत. उन्हाळ्यात काही महिने ते कुटुंबासह ग्रामिण मिशिगन मधल्या त्यांच्या लहानशा घरात रहायचे आणि उन्हाळा संपायला आला कि विचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन - ट्रेलर मध्ये घालून -  पत्नी आणि दोन मुलींसह गावोगाव फिरायचे. दहा वर्षांच्या होईपर्यंत स्टायनम नियमित शाळेतही गेल्या नाहीत आणि गेल्या चाळीस वर्षात वीस वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी प्रवासात व्यतित केलाय. 

माय लाईफ ऑन द रोड मध्ये त्यांनी लिहिलंय: 

...Until that moment, I would have sworn that I had rebelled against my father's way of life. I created a home that I love and can retreat to, though he wanted no home at all.  I've never borrowed a penny, though he was constantly in debt. I take planes and trains to group adventures, though he would spend a week driving cross- country alone rather than board a plane. Yet in the way that we rebel, only to find ourselves in the midst of the familiar, I realized there was a reason why the road felt like home. It had been exactly that for the evocative first decade of my life. I was my father's daughter...


                                                                              ***


हि दोन पुस्तकं वाचल्यापासून मलाही आशा वाटायला लागली कि माझ्या वडिलांचे काही गुण - त्यांची कामातली सचोटी, मेहनती स्वभाव आणि सरळमार्गी वृत्ती  -  काही प्रमाणात तरी माझ्यात उतरले असतील. 

माझ्या वडिलांचं सगळं आयुष्य म्हणजे त्यांचं काम होतं. त्यामुळे माझ्यावर त्यांचा प्रभाव पडला असेल तर तो त्यांच्या कामातूनच. 

सिडकोनी जेंव्हा नवी मुंबई बांधायला सुरवात केली तेंव्हा माझे वडील सिडकोचे चीफ इंजिनियर होते. सहाजिकच त्यांचा कॉन्ट्रॅक्टर लोकांशी संबंध यायचा. 

एकदा आज्जीच्या ओळखीचे एक कॉन्ट्रॅक्टर घरी आले आणि तीला म्हणाले, "अहो, मी कामासाठी तुमच्या मुलाला भेटायला गेलो तर त्यांनी माझं काही ऐकून न घेता नाझी फाईल माझ्या अंगावर भिरकावली आणि मला ऑफिसच्या बाहेर काढलं." 

यावर आज्जी काय बोलणार. तिनं सारवासारव केली, "त्याच्यावर कामाचा ताण असेल म्हणून झालं असेलं तसं."

तुम्ही अवैध मार्गानी काम मागायला गेलात म्हणून माझ्या मुलाचं रक्त खवळून उठलं असेल - हे ती मनातून जाणत असली तरी ते पाहुण्यांना कसं सांगणार. 

शहरांमध्ये, शहरांच्या रचनेत, बांधणीत - टाऊन प्लॅनिंग - मध्ये मला रस वाटतो तो वडिलांच्या नवी मुंबईतील कामामुळे असेल कदाचित. मध्य पूर्वेतील देश, तिथे घडणाऱ्या घडामोडीं बद्दल मला जिव्हाळा वाटतो तो त्यांनी त्या भागात काही वर्ष इन्फ्रास्ट्रक्चर बांधणीचं काम केलं म्हणून असेल. आणि सचोटीनं न वागणं तर मला जमतच नाही. ते हि बाळकडू त्यांच्या कडूनच आलं असावं. 

वडिलांनी माझ्यावर कधी हात उगारला नाही. लहानपणी त्यांनी कधी मला मारल्याचं आठवत नाही. तरीही आम्हांला त्यांचा धाक वाटायचा. रागावले तर नाराजी दाखवायला ते फक्त डोळे मोठे करायचे आणि तेवढं पुरेसं असायचं. 

खूप वर्षांपूर्वी नात्यातल्या एका साखरपुड्याला कि हळदीला मी नवऱ्या मुलीच्या आईशी बोलत होते. चंदेरी साडीचा पदर डोक्यावरुन सारखा करत बाई मला आपल्या चिरंजीवांचं कौतुक (?) सांगत होत्या.  

"पूण्याहून सकाळी निघालो. भाड्याची गाडी केली. राजानं सुरवातीलाच ड्रायव्हरला सांगितलं, " गाडी मी चालवणार. तू शेजारी बसायचं."

ड्रायव्हर नको म्हणत होता पण राजानं अजिबात ऐकलं नाही.   

हायवेवर त्यानं गाडीचा स्पीड एकदम वाढवला. ८० -१०० पर्यंत नेला. 

ड्रायव्हर घाबरला. गयावया करु  लागला. नका साहेब, इतक्या जोरात गाडी चालवू नका. अपघात झाला तर माझी नोकरी  जाईल. साहेब, वेग कमी करा. 

शेवटी राजानं गाडी थांबवली. ड्रायव्हरला म्हणाला, "ह्यापुढे तोंडातून एक शब्द जरी काढलास तर मी तिथल्या तिथे तुला गाडीतून खाली उतरवून टाकीन. अजिबात आवाज करायचा नाही. तोंड एकदम बंद." 

त्यानंतर मग ड्रायव्हर गप्प बसला. राजानं इतकं फास्ट आणलं आम्हाला. "

मी अवाक होऊन ऐकत होते. तसलं आचरट बोलणं त्यापूर्वी मी कधी ऐकलं नव्हतं. त्या बाईचा मुलगा ड्रायव्हरशी उद्दामपणे वागला आणि ते ती मला कौतुकानं सांगत होती. एकदा वाटलं तिला सांगावं, आम्ही जर तिच्या मुलासारखे वागलो असतो तर आमच्या आईवडिलांनी काय केलं असतं ते. पण उगीच लहान तोंडी मोठा घास नको म्हणून गप्प बसले.  

आता कळतंय, गप्प बसलं कि चुकीच्या लोकांना वाव मिळतो आणि त्याचे दुष्परिणाम मग सगळ्यांना भोगावे लागतात.

आमच्या घरातले संस्कार ह्यापेक्षा किती वेगळे होते! 

एकतर आम्ही कोणाशीही - लहान असो कि मोठा, गरीब असो कि श्रीमंत - असे मुर्खासारखे उद्धट कधी वागलोच नसतो. आमच्या घरातली शिकवणच तशी होती. पण समजा कधी बालिशपणामुळे चुकून असं काही आमच्या कडून घडलं असतं तर आमच्या वडिलांनी तिथल्या तिथे त्या ड्रायव्हरच्या समोर आमच्यावर डोळे वटारले असते. 

हात तर त्यांनी आमच्यावर कधी उगारला नाही. ते आमच्यावर कधी ओरडलेही नाहीत. पण कष्ट करून पोट भरणाऱ्या माणसाशी - मग तो कितीही गरीब, साधा असो - आम्ही उद्धट, उर्मटपणे वागलो असतो तर ते त्यांनी कधीच सहन केलं नसतं. त्याची गाडी आम्हाला चालवू देण्याचा तर प्रश्नच उदभवला नसता.

                                                                    
                                                                                 ***


माय जर्नी मध्ये फॅशन व्यवसायाबद्दल बरीच पडद्या मागची माहिती आहे. 

डॉना कॅरन ह्यांचं अख्ख आयुष्य न्यूयॉर्क परिसरात गेलं असल्यामुळे पुस्तकात उल्लेख असलेल्या सगळ्या जागा - क्यू गार्डन -क्वीन्स, लॉंग आयलंड पासून ते मॅनहॅटन मधील घर, वर्क शॉप, शो रूम - ओळखीच्या वाटतात. काही ठिकाणी त्यांच्या खाजगी आयुष्याचं वर्णन माझ्या भारतीय - म्हणजे मध्यम वर्गीय महाराष्ट्रीय मनाला थिल्लर वाटलं. पण ते सोडलं तर पुस्तकात जाणवते ती त्यांची सकारात्मक वृत्ती आणि त्यांची ऊर्जा-  एनर्जी.  

आयुष्यातील कठीण प्रसंगांकडेही त्या नकारात्मक दृष्टीने बघत नाहीत. मागे वळून बघतांना त्यांच्या सुरात कुठल्याच प्रकारचं नैराश्य किंवा संदेह नाही. आणि त्यांनी त्यांच्या कामाबद्दल  - त्यांची डिझाईनींगची प्रॉसेस, फॅशन शोजच्या तयारी साठी रात्रं- दिवस करावी लागणारी मेहनत आणि फॅशनच्या दुनियेत त्यांनी निर्माण केलेलं स्वतःच स्थान ह्याबद्दल जे लिहिलंय त्यात अर्थातच कसलाच थिल्लरपणा नाही.

माय लाईफ ऑन द रोड मध्ये Talking Circles नावाच्या दुसऱ्या प्रकरणात स्टायनम यांनी भारतातील दोन वर्षांच्या वास्तव्याचा त्यांच्या पुढील आयुष्यातील कामावर कसा परिणाम झाला त्याच वर्णन केलंय.  

कॉलेजच शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच त्या भारतात गेल्या. तिथे काही दिवस त्या विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत सहभागी झाल्या. जमिनदारांनी आपल्या जमिनीचा काही हिस्सा गरिब, जमिन नसलेल्या लोंकांना द्यावा ह्यासाठी विनोबा आणि त्यांचे अनुयायी खेडोपाड्यातून पायी फिरून प्रचार करीत असत. 

भूदान चळवळीतील कार्यकर्त्यांबरोबर गावोगाव फिरताना आलेल्या अनुभवाविषयी स्टायनम लिहितात:

It was the first time I witnessed the ancient and modern magic of groups in which anyone may speak in turn, everyone must listen, and consensus is more important than time. I had no idea that such talking circles had been a common form of governance for most of human history...

I certainly didn't guess that, a decade later, I would see consciousness-raising groups, women's talking circle, giving birth to the feminist movement. All I knew was that some deep part of me was being nourished and transformed right along with the villagers. 

I could see that, because the Gandhians listened, they were listened to. Because they depended on generosity, they created generosity. Because they walked a nonviolent path, they made one seem possible. This was the practical organizing wisdom they taught me:

If you want people to listen to you, you have to listen to them. 
If you hope people will change how they live, you have to know how they live. 
If you want people to see you, you have to sit down with them eye-to -eye. 

I certainly didn't know that a decade or so after I returned home, on- the- road organizing would take up most of my life.  
                                                                                                                                                 
तसं आपल्याला अधून मधून कोणतरी भेटतं  - मग ती शाळेतल्या एखादया मुलाची आईहि असु शकते. न्यूयॉर्कमध्ये मला दोघीजणी भेटल्यात ज्यांनी सांगितलं कि हायस्कुल संपल्यावर त्यांनी काही दिवस कलकत्त्यात मदर टिरीसांच्या आश्रमात काम केलं होतं.  (तो काळ भारतासाठी फारसा अभिमानास्पद नव्हता, म्हणून त्यांनी ते कौतुकानी सांगितलं असलं तरी ते ऐकताना मला भयंकर लाज वाटली. दोन्ही वेळा मी ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्यांचे तिथले अनुभव जाणून घेतले नाहीत. ती चूक झाली असं आता वाटतं) . 

पण स्टीव्ह जॉब्ज आणि ग्लोरिया स्टायनम ह्या दोघांनीही आपल्या कारकिर्दीची सुरवात करण्या आधी भारतात भ्रमंती केली हे वाचल्यावर वाटतं -- त्यांच्या अमेरिकन व्यक्तिमत्वावर तरुण वयात भारतीय विचारांचा प्रभाव पडल्यानंतर अशी काय रासायनिक प्रक्रिया त्यांच्यात घडली  - कि ज्याच्यामुळे त्यांच्या हातून पुढील आयुष्यात इतकं भरघोस, प्रभावशाली काम घडलं ज्याचा संपूर्ण जगाला फायदा झाला.


                                                                              ***         
                                           

माझ्या वडिलांच्या स्वभावातला आणखी एक विशेष मला आत्ता जाणवतो तो म्हणजे त्यांचा sense of responsibility. कुटुंबातील कर्ता, मोठा मुलगा असल्यामुळे कि काय त्यांच्यात जबाबदारीची जाणीव खूप होती - मग ती त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकां विषयी असो,  त्यांच्या मित्रांच्याबाबतीत किंवा घरातल्यां विषयी.

वडिलांच्या त्या गुणानं माझ्यात बहुतेक जरा वेगळं रूप धारण केलंय. काही गोष्टी उगीचच, कारण नसताना किंवा कुठल्या ना कुठल्या तरी कारणांनी - माझी जबाबदारी आहेत असं मला वाटतं. उदाहरणार्थ: मुंबईला जगातील एक सुंदर शहर बनविण्यासाठी सरकारला उत्तेजन देण;  मुंबई आणि न्यूयॉर्क मधल्या व्हर्च्युअल पूलाच्या बांधकामात खारीचा वाटा उचलणं; मुंबईत रहाणाऱ्या तमाम रहिवाशांना मराठी बोलायला शिकवणं वगैरे.  

ह्या तीन मूळ जबाबदाऱ्यात आता चवथ्या जबादारीची भर पडलीय. 

अलीकडेच यू ट्यूबवर बघितलेल्या एका मुलाखतीत रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नरना जेंव्हा भारतातील भ्रष्टाचाराविषयी प्रश्न विचारण्यात आला तेंव्हा आपल्या उत्तरात ते पुन्हा पुन्हा म्हणातात कि आपण काही स्कँडनेव्हिया नाही. आपल्या परिस्थिती नुसार भ्रष्टाचार निर्मूलन आपल्याला करावं लागेल. 

त्यांना कदाचित असं म्हणायचं असेल कि स्कँडनेव्हियन देशांइतकया स्वच्छ, साफ सुथऱ्या कारभाराची भारतात अपेक्षा करणं बरोबर नाही. 

परंतु ती मुलाखत ऐकल्यापासून मला उगीचच वाटायला लागलंय कि संपूर्ण भारताचा नाही तरी निदान मुंबईसह महाराष्ट्राचा तरी स्कँडेनेव्हीया करणं हि आता माझी जबाबदारी आहे . 
                                                     
                                                                               ***


माझ्या पिढीनं दोन राष्ट्रव्यापी सरकारी प्रचार यशस्वी झालेले पहिले आणि एक प्रकारे ते यशस्वी करायला हातभारही लावला. 

एक म्हणजे हम दो हमारे दो आणि दुसरा म्हणजे एक चूल एक मूल - ज्याची कल्पना बहुतेक चीन वरून आयात करण्यात आली. दोन्ही ऐच्छिक होते. त्यांनी लोकसंख्या वाढीला कितपत आळा बसला माहित नाही. पण माझ्या आईवडिलां सकट त्यांच्या पिढीतील कित्येक जोडप्यांना - मग ती पूण्या -मुंबई सारख्या शहरात रहाणारी असोत किंवा छोट्या गावात - दोनच मुलं आहेत असं दिसतं आणि माझ्या पिढीत कितीतरी जोडप्यांना एकच मूल आहे. म्हणजे काही प्रमाणात तरी हे दोन्ही प्रचार  देशभर नक्कीच यशस्वी झाले. 

आशा हि कि एखादा भ्रष्टाचार विरोधी प्रचारही असाच यशस्वी होईल.   

आणखी एक अविस्मरणिय सरकारी प्रचार आठवतो तो राष्ट्रीय एकात्मतेचा  - सुरात सूर मिळवण्याचा. 

ती सकाळ मला आजही चांगली आठवते.  त्यादिवशी सुट्टी होती ते आठवत होतं पण नक्की कसली सुट्टी होती ती माहिती विकिपीडिया मध्ये सापडली. 

१५ ऑगस्ट १९८८ ला पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरचं भाषण संपल्यानंतर दूरदर्शननी हे गाणं पहिल्यांदा दाखवलं. सुरवात भीमसेन बुवांनी आपल्या धीरगंभीर आवाजात केली. मग ताजमहालच्या पार्श्वभूमीवर श्वेतवस्त्र परिधान केलेली शबाना आझमी आली. मग मोठ्ठ कुंकू लावलेली गुर्जर कन्या मल्लिका साराभाई. तिच्या नंतर मराठमोळ्या कोळणींच्या पुढे चालणारी बिन बाह्यांचं पोलकं घातलेली तनुजा मराठीत म्हणाली:  
                                                          
                                                            तुमच्या माझ्या जुळता तारा 
                                                            मधुर सुरांच्या बरसती धारा 


(बिन बाह्यांच्या पोलक्याचा मुद्दाम उल्लेख करायचं कारण कि एकेकाळी मराठमोळ्या स्त्रियांच्या मध्ये स्लिव्हलेस ब्लाऊज  घालणं आणि लिपस्टिक - ओठांना लाली लावणं म्हणजे फारच फ्याशनेबल असल्याचं चिन्ह - अर्थात फक्त दिल्लीवाल्या स्त्रियांची मक्तेदारी मानलं जायचं. नूतन आणि तनुजा - दोघी बहिणी नेहमीच खूप आधुनिक पोशाख करायच्या पण त्या मराठी असल्या तरी सिनेमातल्या. महाराष्ट्रीय मंडळींना सिनेमातल्या लोकांचं फारसं कौतुक नसतं. कोणी नटनट्या राज्यातुन कधी निवडणूक लढवत नाहीत त्याच हे एक कारण असेल बहुतेक...  हे थोडं विषयांतर झालं).    

मिले सुर मेरा तुम्हारा जेंव्हा पहिल्यांदा रिलीज झालं तेंव्हा टीव्ही वर आजच्या सारखा आवाजाचा गदारोळ नव्हता. एकच दृश्य दहा वेळा दणादण स्क्रीन वर आपटणाऱ्या मालिका नव्हत्या.  त्या काळाला साजेश्या शांत पद्धतीनं तेरा प्रमुख भारतीय भाषांमध्ये गायलेल्या एकाच अर्थाच्या दोन ओळींच्या ह्या गाण्यानं तेंव्हा मनात जे घर केलं ते आजही कायम आहे. 








yesheeandmommy@gmail.com