Friday, October 12, 2018

माझं सुध्दा


काल पुन्हा ती स्वप्नात आली.

असंबध्द काहीतरी बरळत होती;  "एखादं सिनेमा / नाटक  आपलं निखळ मनोरंजन करतं ,  तर एखादं  आपल्याला खूप विचार करायला लावततं.  श्रेष्ठ कलाकृती कुठली जी निव्वळ मनोरंजन करते ती,  जी खूप हसवते ती,  जी खूप रडवते ती,  जी खूप घाबरवते ती,   कि जी खूप विचार करायला लावते ती.  आणि जर एखाद्य कलाकृतीनी या सगळ्या भावना आपल्या मनात एकाच वेळी जागृत केल्या तर... तर त्या कलाकृतीला काय म्हणायचं?"

वाटलं,  हिला काय झालं असलं विचित्र काहीतरी बडबडायला.  तिला विचारलं काय झालं तर ती एकदम रडायला लागली. ओक्सबोक्शी रडली, रड रड रडली बिचारी.  मी ही रडू दिलं.  दुसरं करणार तरी काय.  अधून  मधून येते ती स्वप्नात.  मनात काहीतरी सलत असेल तर मन मोकळं करायला येते.  वाटलं त्यातलाच काहीतरी प्रकार असावा. मी गप्प बसून राहिले.

थोडी शांत झाल्यावर नाक,  डोळे पुसत म्हणाली,  "इज्जत लुटली माझी,  बरबाद केलं मला".

"कोणी?"

"त्या नाटकानं."

"कुठलं नाटक?"

"तेच सध्या चालू आहे ते.  ब्युटी अँड द बीस्ट."

"म्हणजे"?

"एवढं सुद्धा इंग्रजी समजत नाही तुला?  ब्युटी अँड द बीस्ट म्हणजे सुंदरी आणि श्वापद.  प्रयोग चालू आहेत सध्या त्याचे माझ्या इथे?"

"पण त्यावरून तुला एवढं रडायला काय झालं"?

तिच्या आवाजात दुःख, वेदना, क्रोध, काळजी, भीती सगळंच होतं.   म्हणाली,  "त्या नाटकाचं काही नाही गं.  तुला माहित आहे मी पहिल्या पासून किती मोकळ्या मनाची आहे ते.  पण त्यावरून जे वादळ उठलंय ना त्याचा फार त्रास होतोय बघ.  पूर्वी कसं होतं,  एखादी गोष्ट आक्षेपार्ह वाटली की जा कोर्टात आणि मग कोर्टाला ठरवू दे कोणाला शिक्षा करायची कि नाही, कोणावर बंदी आणायची कि नाही ते.  आता कोर्ट राहिलं बाजूला आणि टीव्हीवाल्यांचाच आरडा ओरडा फार झालाय."

मला शांत झोपायचं होतं.  तिनं लवकर जावं म्हणून म्हंटलं,  "करू दे ना त्यांना किती आरडाओरडा करायचा ते.  तू कशाला तिकडे लक्ष देतेस.  तू आपली मजेत रहा.  नवरात्र सुरु झालंय . दसरा जवळ आलाय.  थोड्याच दिवसांनी दिवाळी येईल.  त्या नंतर नाताळ.  सणांचा काही तोटा नाही आपल्याकडे.  सगळे सण मस्त एन्जॉय कर.  काळजी सोड.  हल्लीची मुलं म्हणतात तसं, तू चील्ल मार ".

"चील्ल मारू म्हणतेस?   चिल्लम आणून दे त्यापेक्षा.  त्यानी तरी बरं वाटतं का बघते.  एकतर इथे गर्दीनी माझा उर फाटायची वेळ आलीय.  कुठूनही कोणीही येतं.  इथे झोपड्या काय बांधतं.  बंगले काय बांधतं.  आणि वरून असली घाणेरडी भाषा आणि आरडा ओरडा.  वैताग आलाय नुसता.  पूर्वी नव्हतं बाई असं.  तुम्ही लोकांनी मला वाऱ्यावर सोडून दिलं म्हणून हे सगळं सहन करायची पाळी आली माझ्यावर. "



                                        



"आता उगीच आमच्यावर कशाला घसरतेस?  आम्ही काय केलं?" तिचा आरोप झटकून टाकायच्या आशेनी मी म्हंटलं.

"तुमच्यावर नाही तर मग कोणावर घसरू.   तुम्हीच जबाबदार आहात याला.  कसली ती रागीट, भांडखोर भाषा आणि तो आरडाओरडा.  कॅमेऱ्यासमोर असले शब्द वापरून बोलतात?   टीव्हीवाल्यांनी नियंत्रण नको का ठेवायला कोण त्यांच्या कार्यक्रमात येऊन काय,  कसं बोलतं त्यावर.  पण टीव्हीवाले स्वतःच जोरजोरात बोंबलत असतात आणि पाहुण्यांनाही ओरडायला लावतात.  तुम्ही चालवून घेता म्हणूनच चाललय ना सगळं.'

"जाऊ दे गं.  आजकाल प्रेक्षकांना सनसनाटी आरडाओरडा आवडतो त्याला आपण काय करणार.  प्रेक्षकांनी जर बघितला   नाही तर टीव्हीवाले आरडाओरडा करतील का?  प्रेक्षक मोठ्या संख्येने बघतात म्हणून टीव्हीवाले ओरडत रहातात.  कबूल कि गर्दीचा तुला नक्कीच त्रास होत असणार.  तो तर सगळ्यानांच होतोय. पण त्यावर उपाय काय?  आणि तुला खरंतर खूप अभिमान वाटायला पाहिजे कि देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तुझ्या दारात येतात - आपली मोठमोठी स्वप्न घेऊन ती पुरी करायला."

तिनं एक दीर्घ उसासा टाकला आणि उदास वाणीने म्हणाली, "काटेरी मुगुट आहे बाई हा.  आता नाही झेपत मला.  भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी असे वागतात सगळे.  वर जाणिव नाही ठेवत कसलीच.  मीच किती दिवस सगळ्यांचा भार वाहू.  सुरवातीला वाटलं होतं गावोगावहून लोक येतील,  माझ्या इथली सुव्यवस्था बघून काहीतरी  शिकतील आणि आपापली गावं सुधारतील.  पण यांनी तर उलटच करायला घेतलंय.  या लोकांनी तर माझीच  दुर्दशा करायला घेतलीय त्यांच्या गावांप्रमाणे.  तुम्हा लोकांना ना काळजीच नाही कसली म्हणून आज माझी हि अवस्था झालीय. "

"परत आमच्यावर घसरलीस?"

"नाहीतर काय करू.  तुम्हीच म्हणत असाल सगळ्यांना, आओ जाओ घर तुम्हारा.  म्हणून येतात सगळे इथे गर्दी करायला. देशात इतर मोठी शहरंच नाहीत कि काय? तिथे का नाही जात कोणी?"

"जात असतील गं.  तिथे सुद्धा जात असतील.  आपल्याला काय माहित.  बरं मला सांग,  मगाशी बरळत का होतीस झोपेत बडबडल्या सारखी?"

"झोपेत मी नाही,  तू आहेस.  मी चांगली खडखडीत जागी आहे.  भविष्याच्या काळजीनी झोप उडाली आहे माझी.  जरा डोळा लागेल तर शप्पथ. "

"कोणाच्या भविष्याची काळजी करते आहेस एवढी - आमच्या कि तुझ्या स्वतःच्या?" मी सहज गमतीनं विचारलं.

पण ती गम्मत ऐकायच्या मूडमध्ये नसावी.  उखडून म्हणाली,  " हेच तर माझं दुर्दैव आहे.  तुम्हा लोकांना वाटतंय तूमचं  भवितव्य आणि माझं भवितव्य वेगळं आहे.  भ्रमात आहात तुम्ही सगळे.  माझं काहीही होऊ दे तुम्ही आपले कायम असहाय्य, हतबल, आम्ही काय करू शकतो,  आमच्या हातात काही उरलेलच नाही अशा प्रकारे वागणार.  मग माझी काळजी मलाच करायला हवी.

"तू पुन्हा पुन्हा सारखी आमच्यावर का घसरतेस?  एवढी काही परिस्थिती वाईट दिसत नाही.  तू उगीच अतिरेक करते आहेस."

हे ऐकून तर ती खवळलीच माझ्यावर,  "तुला इथे बसून बोलायला काय जातं.  मला तिथे काय ऐकून घ्यावं लागतं ते बघ जरा.  एकतर सगळे जोरजोरात इंग्रजीत बोलत असतात.  त्यातलं निम्म मला समजत नाही.   त्यांना तरी समजतं का कुणास ठाऊक. म्हणतात - बिल कॉस्बीला जशी शिक्षा झाली तशी इथे व्हायला हवी.  हार्वी वाईनस्टाईनला जे  केलं ते  इथे करायला हवं.   मी 2 ला भारतात आणायची वेळ आली आहे.  ह्यांचे सगळे संदर्भ परदेशी कसे ग?  हे इंग्रजीत भांडणारे लोक स्वतःहून विचार करायची कुवतच हरवून बसलेत कि मनानी कायम परदेशात रहात असतात?  यांना कायम सगळं मार्गदर्शन पाश्चात्य देशातूनच का लागतं.  तिथे नविन काय सुरु होतं आणि आम्ही कधी त्याचं इथे अनुकरण करतो त्यासाठी टपून बसलेले असतात जणू.

"ब्यूटी अँड द बीस्ट हे परदेशी नाटक आहे ना म्हणून बाहेरचे संदर्भ वापरत असतील."  त्या नावाचा ब्रॉडवे शो आहे असं ऐकल्याचं मला आठवत होतं.

"तुला हे सगळं हसण्यावारी न्यायचं असेल तर खुश्शाल ने.  पण सिनेमा आणि टीव्हीवाल्यांच्या या भागिदारीत मधल्या मध्ये मी  आणि माझी संस्कृती भरडली जातेय हे विसरू नकोस".

मला वरमल्यासारखं झालं.  सारवासारव करत तिला म्हंटल,  " तुझा आरोप मी मान्य करते.  आजच्या या परिस्थितीला आम्ही जबाबदार आहोत हे खरं.  तुझ्या इथे मराठीची किंमत कमी करायला,  मराठी माणसांची, संस्कृतीची तुझ्यावरची पकड ढिली करायला आम्हीच जबाबदार आहोत.  त्या अर्थानी म्हणत असशील तर तुझं म्हणणं खरं आहे.  आम्ही सोडलंय तुला वाऱ्यावर.

मी बघते ना मुंबईत रहाणारी कुटुंब - आईवडील मराठी बोलणारे;  मंत्रालय, पोलीस अशा कुठल्यातरी सरकारी खात्यात नोकरी करणारे.  सगळे नातेवाईक मराठी.  पण पोरं कोपऱ्यावरच्या इंग्रजी शाळेत शिकणार आणि म्हणणार, 'माझं मराठी फार खराब आहे.'   बरं या मुलांचं हिंदी आणि इंग्रजी फार उच्च दर्जाचं असतं असंही नाही.  त्या भाषा दामटून बोलतील.  पण मराठी खराब असल्याचाच अभिमान फार.  आणि गम्मत म्हणजे मराठी खराब नसतं त्यांचं.  चांगलं बोलतात.  पण ते कबूल करायला लाजतात.   त्यांना वाटतं कि मराठी येतं म्हंटल तर आपण फार बावळट  दिसू आणि मराठी येत नाही म्हंटलं कि सॉफिस्टिकेटेड - असंलं काहीतरी विचित्र त्रांगडं असतं बघ बिचाऱ्यांच्या डोक्यात.

एखादी म्हणते,  'येतं मला मराठी बोलता.  पण माझ्या वडिलांची बदलीची नोकरी होती.  बदलीच्या नोकरीत मराठी बोलून चालत नाही.  आणि माझ्या नवऱ्याला मराठी येत नाही.  आम्ही घरात त्याची भाषा बोलतो.  त्यामुळे मला मराठीचा सरावच उरलेला नाही.'  इतका उबग येतो कि नाही असल्या लोकांचा.  वाटतं तिला सांगावं, '' बाई,  मग इथे काय करतेयस?  नवरा- मुलांना घे आणि जाऊन रहा त्याच्या गावी आणि बोल त्याची भाषा किती बोलायची तेवढी.  त्याच्या सकट मुंबईला का चिकटून बसली आहेस'."


                                   
                                          



मी एवढं सगळं तिच्या बाजूनी बोलल्यामुळे ती खुष झालेली दिसली.  कानात बोलावं तसं हळूच म्हणाली, "पटलं ना आता मी काय म्हणते ते.   तुला म्हणून सांगते,  या दृकश्राव्य माध्यमांच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करू नका.  पस्तावाल.  फार प्रभावी माध्यमं आहेत ही.  हिंदी सिनेमाची लोकप्रियता तर तुम्हांला आधीच माहीत आहे.  सगळे सिनेमा, त्यातली गाणी वाईट असतात असं मी म्हणत नाही पण मध्येच एखादं अश्लिल अंगविक्षेप असलेलं आयटेम सॉंग घुसडायचं,  परदेशातल्या पॉर्न स्टारला इथे हिरॉईन बनवायचं असले प्रकारही ह्या सिनेसृष्टीत चालतात.  त्याचा तुमच्या मुलांवर वाईट परिणाम होत नसेल असं गृहीत धरू नका.  सिनेसृष्टीचं एवढं स्तोम माजू देऊ नका.  तिथे कुठलीच संस्कृती नाही.  नटनट्यांना एवढं डोक्यावर चढवून ठेऊ नका.  हे असंच चालू राहिलं तर एक दिवस तुमचंच  शहर तुम्हांला परकं वाटायला लागेल.  परवा मराठी पेपरच्या वेब साईटवर बातमी काय होती माहित आहे?  कुठल्याशा द्वितीय- तृतीय श्रेणीच्या माजी सुंदरीचं म्हणे बेबी शॉवर झालं.  डोहाळे जेवण म्हणतात त्याला.   मराठी वर्तमानपत्रवाले सुध्दा डोहाळे जेवण म्हणायला लागले तर भाषेचं काय होणार?  आणि हि नविन परदेशी माध्यमं - त्यांचा प्रभाव तर सिनेमा पेक्षाही जास्त.  सगळी तरुण मंडळी कायम तिथेच वावरत असते.  तिथल्या इंग्रजी पोस्ट पलिकडे बहुतेकांचं वाचन नसेल.  प्रादेशिक भाषेतलं एक पान तरी त्यांना वाचता येईल का कुणास ठाऊक.  कधिकधी माझी फार काळजी वाटते  बघ.  काय होणार आहे माझं पुढे समजत नाही."

तिनं गाडी फिरवून परत स्वतःच्या काळजीवर आणली.  तिचं सांत्वन कसं करावं,  तिला दिलासा कसा द्यावा ते समजेना. स्वतःशीच बोलत असल्या सारखी ती बोलत राहिली,  " तुम्ही सगळे जाल गं एक ना एक दिवस निघून पण मला कायम इथेच रहायला हवं.  माझ्या पुढच्या पिढ्या कशा असतील?  फक्त इंग्रजी बोलणाऱ्या असतील?  जी भाषा मराठीची जागा घेईल ती आपली संस्कृती बरोबर घेऊन येईल.  महाराष्ट्राची इंग्रजी राजधानी अशी माझी अवस्था होईल का गं एक दिवस?"

हे फारच गंभीर होतं.  माझं डोकं काम करेनासं झालं.  सुन्न होऊन मी बसून राहिले.  तिला काय सांगावं काही सुचेना.  तिची काळजी मला समजत नव्हती असं नाही पण मी खूप विचारात पडले.  तशात माझी उठायची वेळ झाली होती.  ती आणखी बराच वेळ बोलत राहिली असती पण तिला मध्येच थांबवत मी म्हंटल,  "ये आता तू.  मला ऊठायला हवं.  माझ्या झोपेचं खोबरं केलंस आज."

मी जा म्हंटल्याचा तिला राग आला नाही आणि रागावून ती तडकाफडकी निघूनही गेली नाही.  उलट शांतपणे हसून म्हणाली, " ते तर कधितरी होणारच होतं - तुझ्या झोपेचं खोबरं गं.  तुझी वेळ झाली असेल तर ऊठ तू.  मी जाते.  पण सवड मिळेल तेंव्हा जरा माझं नाव टाक त्या मी 2 मध्ये."

"मी कसं तुझं नाव टाकू त्यात?

"ते मला काही माहीत नाही.  पण मी 2 जर भारतात येणार असेल तर त्यात पहिलं नाव माझं पाहिजे.  वर्षानुवर्षं लोक माझ्या इच्छे विरुध्द माझ्यावर बळजबरी, अत्याचार,  जबरदस्ती करतायत.  माझ्याशी गैरवर्तणूक, करतायत.  भारतातल्या मी 2 मध्ये पहिलं नाव माझंच हवं."

ती गेल्यावर मी उठले आणि सकाळचा पहिला चहा केला.  गरम चहाचे घुटके घेत कम्प्युटर उघडून बसले.  वाटलं बघावं तरी ती म्हणते त्यात काही तथ्य आहे का.  वेगवेगळ्या क्लिप्स बघितल्या.  त्यात बरच काही होतं.  आगीत तेल ओतू पहाणारा तो टीव्ही वरचा गोंधळ फारच लांच्छनास्पद  होता.  इतके वर्षात अमेरिकन टीव्हीवर मी इतकी असभ्य भाषा आणि आरडाओरडा कधीच पहिला नाही.  कॅमेऱ्यासमोर काय बोलायचं आणि काय नाही ह्याच भान इथल्या टीव्हीवर पाळलं  जातं. कार्यक्रमातील वादविवादाचं संतुलन संचालक स्वतः पाळतात आणि पाहुणेही पाळतील याची दक्षता घेतली जाते.  इथे तर संचलक स्वतःच जोरजोरात एकतर्फी ओरडत होते.

वादळाच्या व्हिडीओज बघून डोकं गरगरायला लागलं म्हणून आणखी एक कप चहा केला. चहाचा दुसरा कप संपवत असताना, आजकाल मुंबईला गेल्यावर जे वाटतं ते आठवलं - हिंदी सिनेमा सृष्टीला मुंबई बाहेर हलवलं तर मुंबई स्वच्छ,  सुंदर आणि गर्दी विरहीत होऊ शकेल का?



Saturday, September 15, 2018

गोमातांचं गाऱ्हाणं


मागल्या रविवारी पोळा होता.  खरतर तो बैलांचा सण.  पण बैल नाही तर नाही निदान सणानिमित्त काही गोमातांशी तरी थोडा संवाद साधावा असं वाटलं.  फार दूर नाही जावं लागत त्यांना भेटायला.  देवळाच्या गल्लीत असतात त्या.  पुष्कळ वर्ष त्यांचा मुक्काम आहे तिथे.  माझ्या घरी जायच्या वाटेवर आहे ते ठिकाण. 

दुपारी घरी जाताना थांबले त्यांच्यापाशी घटकाभर.  त्या जेवत होत्या.  






थोडावेळ त्यांच्या जवळ घुटमळले.  त्यांचं जेवण कधी होतंय याची वाट पहात तिथे उभी राहिले.  पण समजेना कि त्या जेवतायत अजून कि त्यांच जेवून झालंय.  पुढ्यत वाढलेलं तसंच दिसत होतं - चपाती, भाजी, भात बरच काही होतं कागदावर ठेवलेलं. 

शेवटी हळूच विचारलं  - "जेवताय का? "

एकूण एक सगळया जणींनी माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि भात -भाजी हुंगत बसल्या.

पुन्हा हळूच म्हंटल - "जरा बोलायचं होतं. "

पुन्हा दुर्लक्ष.

आता मला जरा ऑकवर्ड वाटायला लागलं होतं.  किती वेळ तिथे नुसतं घुटमळत उभं रहायचं.  दरवेळी सिग्नल लाल झाला कि गाडयांची लांब रांग समोर थांबत होती.  त्यातल्या कोणी पाहिलं तर.. एखादी गाडी नेमकी आपल्या बिल्डिंग मधली निघाली तर.. उदया लगेच विचारतील  - काय करत होतीस तिकडे?

गोमातांशी बोलायचा नाद सोडून देऊन तिथून काढता पाय घ्यायचा विचार करत होते तेवढ्यात त्यातली एक बुजुर्ग माता मान खाली घालून तिरप्या नजरेनं माझ्याकडे बघतेय असं वाटलं.  तिचा विचार बदलायच्या आत पटकन तिच्या जवळ जात म्हंटल - "पोळ्यानिमित्त लोकांना काही सांगायचंय का?".

तिनं नाही अशी मान हलवली.

"काहीतरी सांग ना.  लोक एवढे तुझी पूजा करतात, तुझ्या रक्षणासाठी झटतात.  त्यांच्यासाठी आशिर्वादपर चार शब्द सांग. नाहीतर संदेश तरी दे.

तिनं परत मान हलवत नाही म्हंटलं.  एव्हाना बाकीच्या माता जरा चुळबुळ करायला लागल्या होत्या:  हिला कोणी कधी लिडर नेमलं.  हि एकटीच का म्हणून हो - नाही करत मान हलवत बसणार.  आम्हीहि बोलू शकतो - असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसले.

ती संधी साधून त्यांना म्हंटल,  "मग तुमच्या काही तक्रारी असतील तर सांगा.  तुमच्या रहाणीमानात सुधारणा हवी असेल, काही सुखसोयी हव्या असतील तर तसं सांगा."

परत सगळयांनी नकारार्थी मान हलवली.

"काहीच तक्रारी नाहीत?   सगळं छान चाललंय तुमचं?"

त्या होय म्हणाल्या.

"हे असं कागदावर जेवण वाढलेल चालतं तुम्हाला?   पावसाचे दिवस आहेत.   फुटपाथ ओला आहे.   चिखल आहे.   त्यातच कागद ठेवून त्यावर चपात्या वाढल्यात ते आवडतं?"

"मग आम्हांला काय रोज केळीच्या पानावर जेवायला वाढणार?" बुजुर्ग माता वैतागून म्हणाली.

"तसं नाही.  पण माझे आज्जी - आजोबा आपल्या गुरांना कित्ती छान ठेवायचे.  त्यांच्यासाठी खळ्यात गोठा होता. गोठ्याजवळ चाऱ्यासाठी गवताचा मोठ्ठा टेकडीएवढा भारा रचलेला असायचा.   आम्ही लहान होतो तेंव्हा त्यावर चढुन खेळायला काय मजा यायची.   पौष्टिक खाद्य द्यायचं असेल तेंव्हा आज्जी ते घमेल्यात मिक्स करायची आणि ती घमेली गुरांच्या पुढ्यात ठेवायची.   हे असं चिखलात कागद ठेऊन त्यावर गुरांनां चपात्या घालायची पद्धत नव्हती बघितली मी."

"पुरे तुझ्या आज्जीच्या गोठया -  घमेल्यांचं कौतुक.  आलीय आम्हाला फुकटचा मोठेपणा सांगायला.  जा आता,"  घोळक्यातली एक मध्यम वयीन माता धुसफुसली.

माताच ती तिचं बोलणं काय मनावर घ्यायच म्हणून मी प्रश्न विचारणं चालू ठेवलं.

"ऊन -पावसात कायम उघड्यावर उभ्या असता.  उघड्यावरच जेवता.  डोकयावर छप्पर असावं असं नाही वाटत तुम्हांला?".

"तू काय चंद्रावरून टपकलीस का गं?  का मंगळावरून?  दिसत नाही तुला शहरात किती माणसं उघड्यावर रहातात, जेवतात, झोपतात ते.  आमचं काय मोठं घेऊन बसलीस.  जा आता".

मी त्यांना नको ते प्रश्न विचारत होते हे उघड होतं.  पण मला हि संधी दवडायची नव्हती.  कितीतरी वर्ष त्या माझ्या शेजारी रहातायत पण त्यांच्याशी गप्पा मारायचा योग कधी आला नव्हता.

"तरीपण, ह्या इमारतीत रहाणाऱ्या लॊकांनी, दुकानदारांनी त्यांच्या समोरचा फुटपाथ स्वच्छ ठेवायला हवा असं नाही वाटत तुम्हाला?

"ते का म्हणून फुटपाथ स्वच्छ करतील.  ते त्यांचं काम थोडंच आहे."

न्यूयॉर्क मध्ये असतं.  बिल्डिंग समोरचा फुटपाथ स्वच्छ ठेवणं हे त्या बिल्डिंगच काम असतं.  नाहीतर दंड भरावा लागतो -  हे मनात आलेलं मी मनातच ठेवलं.  मातांना बोलले असते तर त्या पुन्हा भडकल्या असत्या  - फुकटचा मोठेपणा सांगते म्हणून.

"बरं मग रस्ते, सिग्नल त्याबद्दल काही तक्रार?"

"त्याबद्दल काय तक्रार असणार आमची?"

"तुम्ही सिग्नल क्रॉस करून पलीकडे समुद्रावर जाता ते बघते मी.  रस्त्यावर खूप ट्रॅफीक असतो.   तुम्हाला रस्ता ओलांडताना भिती नाही वाटत?"

"अगं बाई,  शहरातले सिग्नल कधी चालू असतात, तर कधी बंद असतात.  रात्री तर नेहमीच बंद असतात.  रात्री गाड्या नसतात का रस्त्यावर?  तसही नाही.  पण सगळे सिग्नल मात्र बंद.   का ते ती मुंबादेवीच जाणे.   पण रस्ता क्रॉस करायची काळजी आमच्यापेक्षा तू जास्त कर.  आम्हांला रस्ता ओलांडताना बघून गाड्या आपला वेग तरी कमी करतात.  तुम्हां लोकांना बघून नाही कोणी वेग कमी करत.  जा आता.  उद्यापासून नीट धावत पळत रस्ता क्रॉस करायला शिक.  नाहीतर दोन्ही बाजूचा ट्रॅफिक चालू होईल आणि तू बसशील मध्येच अडकून".  एकीनं असं म्हणताच सगळ्या गोमाता फिदीफिदी हसल्या.

माझी चेष्टा करण्यात त्यांना आता गम्मत वाटतेय असं दिसत होतं.  पण त्यांच्या तोंडून एखादी तक्रार तरी ऐकायचीच असा मी चंग बांधला.

"बरं, त्या सबवेच्या कामाचं काय"?   सगळ्या मातांनी ऐकून न ऐकल्या सारखं केलं कि त्यांना खरंच ऐकू गेलं नाही कुणास ठाऊक.

मी पुन्हा विचारलं,  "ते मेट्रोचं काम चालू आहे त्याच काय"?

"काय त्याचं"?

"तुमचं रहाणीमान त्यामुळे सुधारेल असं तुम्हाला वाटतं का"?

"आमचं रहाणीमान कशाला सुधारेल मेट्रोमुळे?  आम्हांला थोडंच कोणी तिथे सोडणार आहे.  अगं, त्या बैलांना सी लिंक वर सोडत नाहीत.  ठळक अक्षरात पाटी लावली आहे सुरवातीलाच, वाचली नाहीस?  - बैलगाड्यांना प्रवेश नाही.   मग आम्हांला मेट्रोत जाऊ देतील होय?   मी सांगते बघ तुला, स्टेशनच्या बाहेर ठळक पाटी लावतील - गोमातांना प्रवेश नाही. "

"तेच तर म्हणते आहे ना मी.  ह्या शहराचे रहिवासी म्हणून तुम्हांला काही अधिकार आहेत कि नाही?  आणि ते तुम्हांला मिळतायत का ? "

"आमच्या अधिकारांच आंम्ही बघून घेऊ.  तुम्ही नका त्याची काळजी करू."  एक तरुणशी, यंगीश माता अधिकारवाणीने बोलली.

"ते ठिक आहे.  पण सगळीकडे बोर्ड लावलेत ना कि "मुंबई इज अपग्रेडींग',  म्हणून विचारलं कि शहरात चांगल्या सुधारणा होतायत असं तुम्हाला वाटतं का"?

"कुठे बोर्ड लावलेत"?

"जिथे जिथे मेट्रोचं काम चालू आहे ना, तिथे बोर्ड लावलेत - "मुंबई इज अपग्रेडींग'' असे.  तुम्ही नाही पाहिले? "






"अपग्रेडींग म्हणजे?   अगं आम्हाला मराठी धड वाचता येत नाही तर इंग्रजी काय कप्पाळ समजणार".

"बरं ते जाऊ दे.   ती थोडी लांबची गोष्ट झाली.  आपण तुमच्या सभोवताली म्हणजे इमिजिएट सराउंडिग मध्ये काय चाललंय त्या विषयी बोलूया.  इथे आता तुमच्या शेजारी गणेश उत्सवासाठी स्टेज उभारलय त्याचा तुम्हांला काही त्रास होतो का?"

"त्याचा आम्हाला कसला त्रास होणार?" गोमाता आता थोड्या आक्रमक होतायत असं वाटलं.  पण माझ्याकडेही कारणांची कमतरता नव्हती.

"म्हणजे एकतर रस्ता अरुंद आहे.  त्यावर सतत ट्रॅफिक चालू  असतो.  तुमच्या अवती भोवती किती गाड्या, स्कुटर पार्क केल्यात.  गिचमिड आहे नुसती.  त्यातच आता मांडव उभारलाय,  लाउड्स्पिकरचा आवाज,  झगमगीत लाईट  - कसलाच त्रास होत नाही तुम्हाला?"

"अगं,  त्रास कसला त्यात?   रोज आम्हांला उभ्या जागी दिवसभर गणरायाचं दर्शन होतं हे आम्ही आमचं मोठं भाग्य समजतो.   त्यासाठी दहा -पंधरा दिवस थोडा त्रास सहन करावा लागला तर त्यात काय मोठंसं.   शेवटी सगळ्यांनी आपसात मिळूनमिसळून नको का रहायला?  आणि तुला जिकडे तिकडे त्रासच कसा दिसतो गं?  म्हणे ह्याचा काही त्रास होतो का?  त्याविषयी काही तक्रार आहे का?  त्याची काही अडचण होते का ? - सारखा आपला एकच सूर.  तुझी हि नकारात्मक वृत्ती सोड आता आणि शहराकडे थोड्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिक."

"ते तर झालंच.  पण ते फेरीवाले.  ते तर कायमच असतात ना.  त्यांचा नाही त्रास होत"?

"कुठले फेरीवाले?"  माझ्या न संपणाऱ्या प्रश्नांनी  माता आता चिडू लागल्यात असं वाटलं.

"ते कोपऱ्यावर, सिग्नल जवळ असतात ते.  भेळपुरी, पाणीपुरी विकणारे.  ते तर कायमच असतात ना."  मी चाचरत म्हंटल.

"ते कायम कुठे असतात?  ते रोज दुपारी दोन - तीन नंतर येतात बिचारे.  आणि रात्री अकरा -बाराच्या सुमारास निघून जातात. आणि ते पाणीपुरी नाही काही विकत.  ते दाबेली विकतात".

"तीन - चार जण असतात ना.  त्यातला एक मला वाटतं भेळपुरी विकतो".

मी असं म्हंटल्यावर संभाषणाचा रोखच बदलला.  सगळ्या माता आवेशात बोलू लागल्या.  काहींच्या मते तिथे फक्त दाबेली विकली जाते.  काहींना माझ्याप्रमाणेच वाटत होतं कि भेळपुरी, पाणीपुरीही विकली जात असावी.

शेवटी ती पहिल्यांदा बोललेली जुनी -जाणती बुजुर्ग माता म्हणाली,  "थांब थोडावेळ इथे.  येतीलच ते इतक्यात.  मग आपल्याला दिसेलच ते दाबेली विकतात कि भेळपुरी ते.

पण मला तिथे थांबवेना.  हवा चांगली होती.  डोक्यावर ऊन रणरणत नव्हतं.  पण पायाखाली ओलं होतं - अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे आणि शेण - गोमूत्रामुळे झालेलं.  तिथेच मातांच जेवणही होतं रद्दी पेपरवर ठेवलेलं.  जास्त वेळ त्या ओल्यात थांबलं तर डास चावून उगीच डेंग्यू बिंग्यु व्हायची भीती.  तेवढ्यात एक माणूस आला आणि एका गोमातेच्या पायाशी बसून तिचं दूध काढू लागला.  मातांना त्याची सवय असावी - भर रहदारीच्या रस्त्यावर कोणीतरी येऊन त्यांचं दूध काढायची.  त्यांची त्याबद्दल काही हरकत दिसली नाही.  मलाच वाटलं त्यांना थोडी प्रायव्हसी द्यावी.  मी  निघाले तिथून.






yesheeandmommy@gmail.com


Sunday, July 22, 2018

Summer Fun - उन्हाळ्यातली गम्मत







आपली एखादी वस्तू हरवली की मला फार चुटपुट लागुन रहाते.  मग ती कितीही महत्वाची/ बिन महत्वाची, साधी, क्षुल्लक गोष्ट असो... ती शोधल्या शिवाय चैन पडत नाही.

एकदा माझी पर्स  ब्रॉडवे आणि ७० स्ट्रीटच्या कोपऱ्यावर विसरून राहिली होती ती कशी सापडली त्याचा किस्सा आधीच्या एका पोस्ट मध्ये मी सविस्तर लिहिलाय.

दुसरं म्हणजे मुलगा लहान होता तेंव्हा त्याचा एक सॅन्डल कुठे तरी पडला. मुंबईत. चालत्या गाडीतून तो कसा बाहेर पडला माहीत नाही. घरी पोहोचल्यावर गाडीतून उतरताना लक्षात आलं कि त्याच्या एकाच पायात सॅन्डल आहे.

खरतर हरवलेला सॅन्डल शोधायला जाण तसं  वेडेपणाचं होतं. पण मी गेले. आम्ही जिथून आलो होतो त्या रस्त्यावर परत चक्कर मारली तर प्रभादेवीत व्होडाफोनच ऑफिस आहे - जिथे आम्ही आमच्या घराकडे जायला वळतो - त्या ऑफिसच्या अगदी समोर भर रस्त्यात तो सॅन्डल मला दिसला. त्या रस्त्यावर सतत खूप ट्रॅफिक असतो. तरीही सॅन्डल सापडला खरा.

परवा नेहमी प्रमाणे कामवाली वॉशिंग मशिन मध्ये काहीतरी विसरली.  घरातलं मशिन बिघडलंय म्हणताना ती बेसमेंट मध्ये बिल्डिंगची लॉंड्री आहे तिथे कपडे धुवायला नेते.

मशिन मध्ये कपडे विसरायची तिची हि पहिली वेळ नाही. साफसफाईच्या कामत ती नीट आहे. कामाचा उरक चांगला आहे. मी स्वयंपाकाचा ओटा दहा वेळा पुसला तरी कोपऱ्यात कुठेतरी काही बारीक कचरा लपून बसतो, एखाद दोन डाग तसेच रहातात.  पण ती खूप कमी वेळात अख्ख स्वयंपाकघर लख्ख करते.

जेंव्हा धुणं खालती घेऊन जायची वेळ येते तेंव्हा मात्र तिची जरा गडबड होते. कधी कपडे परत घेऊन येताना एखादा सॉक बास्केट मधून पडतो. तिच्या ते लक्षातही येत नाही.  मी बाहेरून येते तेंव्हा मला लिफ्टच्या बाहेर पडलेला सॉक सापडतो.

तर कधी काही कपडे मशिन मध्येच विसरून येते. संध्याकाळी कपडे कपाटात ठेवताना माझ्या लक्षात आलं कि मी खालती जाऊन ते घेऊन येते. बिल्डिंगची लॉंड्री कोणी जास्त वापरत नाही - मोठी मशिन्स कम्फर्टर, ब्लँकेट्स धुण्यासाठी वापरतात. मागल्या वेळी माझे कपडे मला एका वॉशिंग मशिनच्या आतल्या भिंतीला ओल्या अवस्थेत चिकटलेले सापडले होते.

परवा माझा झोपताना घालायचा कुडता धुतलेल्या कपड्यात नव्हता.  घरभर शोधल्यावर आठवलं कि बाई बहुतेक मशिनमध्ये  विसरली असणार. रात्रीचे दहा -साडेदहा वाजले होते. तरी मी खालती गेले. लॉंड्री रूम मध्ये कोणी नव्हतं पण सगळी मशिन्स - बरेच वॉशर -ड्रायर्स आहेत - धडाधडा चालू होती.  कोणाचं तरी महिन्याचं नाहीतर काही आठवड्यांचं साठलेलं धुणं चालू असावं.

मी गेल्या पावली परत फिरले; उगीच दुसऱ्यांच्या लॉंड्रीत ढवळाढवळ नको.

घरी परत येताना लिफ्ट मध्ये स्वतःला बजावलं - कुडता सापडला नाही ह्या गोष्टीचा झोपेवर परिणाम होऊ द्यायचा नाही.  उशीर पर्यंत जागं राहून किंवा मध्यरात्री उठून कुडता शोधायला लॉंड्री रुम मध्ये पुन्हा चक्कर मारायची जरूर नाही. ज्यांची  लॉंड्री चालू आहे त्यांना कुडता सापडला तर ते तो तिथेच ठेवतील आणि सकाळी तो मला मिळेल. त्याची मला खात्री होती.



                 


दुसऱ्या दिवशी सकाळी लॉंड्रीरूम मध्ये जाऊन बघितलं तर समोर माझा कुडता होता.  ते अनपेक्षित नव्हतं. ज्या स्थितीत तो होता ते फार अनेपक्षित होतं.

मला वाटलं होतं कि लॉंड्री रूम मध्ये धुतलेल्या कपडयांच्या घड्या घालण्यासाठी जे मोठं टेबल आहे त्यावर चुरगळलेल्या स्थितीत कुडता मला सापडेल. त्याऐवजी ज्यांना तो सापडला त्यंनी चक्क झटकून बिटकून लॉंड्री बास्केटला हँगर अडकवण्यासाठी जी दांडी असते त्या दांडीवर तो ताठ वाळत घातला होता.

मी फार आश्चर्यचकीत झाले.  मागून पुढून तपासून खात्री करून घेतली कि नक्की माझाच आहे. कामवालीला दाखवण्यासाठी फोटो काढला. तिला विचारलं कि पहिल्यांदा ती नाहीच म्हणते - मी नाही कपडे विसरले,  मी नाही मायक्रोवेव्ह तारेनी घासुन त्यावर चरे पाडले. त्यातून तिचं इंग्रजी फार जुजबी आहे. कुडता कुठे, कसा सापडला हे मी सांगुन तिला समजलं नाही तर फोटोवरून जास्त चांगल कळेल असं वाटलं.

मनात आलं मला जर कोणाचे ओले कपडे मशिन मध्ये सापडले असते तर मी ते झटकून वाळत टाकायचे कष्ट घेतले असते? आता ह्यापुढे घेईन.  Pay it forward या न्यायानी ह्यापुढे नक्कीच घेईन. पण ह्या आधी बहुदा नसते घेतले. कोणाचे आहेत कुणास ठाऊक म्हणत बाजूला ठेऊन दिले असते. फारतर तात्पुरते बाहेर काढून माझं धुणं धुऊन झाल्यावर ज्या मशिन मध्ये सापडले त्याचं मशिन मध्ये पून्हा ठेऊन दिले असते. पण झटकून वाळत घातले असते असं वाटत नाही.

न्यूयॉर्क रहायला फार टफ, कठीण, कठोर शहर आहे असं म्हणतात. सगळे आपल्या महत्वाकांक्षेत इतके गुरफ़टलेले असतात कि चांगुलपणा हा ह्या शहराचा स्थायिभाव आहे असा आरोप करायला कोणी धजावणार नाही. तरीही असे- रँडम ऍक्ट ऑफ काईन्डनेस - कधितरी अनुभवास येतात.

एकदा आम्ही ७२ स्ट्रीट वर गाडी पार्क करत होतो तर एका बाईंनी खिडकीच्या काचेवर ठोठावलं. काच खाली केल्यावर तिचं पार्किंग तिकीट आम्हांला दिलं आणि म्हणाली, "माझं काम झालंय, मी चाललेय पण ह्या तिकिटात अजून तासाभराचं पार्किंग उरलंय. तुम्ही ते वापरू शकता".

मुलगा एकदा ट्रेननी कुठेतरी चालला होता तर डब्यात एका लहान मुलानी उलटी केली. म्हणताना त्या मुलाची आई ते पुसून घेऊ लागली. तिच्या जवळचे वाईप्स संपले तेंव्हा डब्यातल्या इतर प्रवाशांनी आपल्या जवळचे वाईप्स तिला देऊ केले.
 
जिनं आम्हाला तिचं पार्किंग तिकिट दिलं त्या बाईचे आम्ही लगेच तिथल्या तिथे आभार मानू शकलो . चुटपुट या गोष्टीची वाटते की ज्यांनी माझा कुडता इतका व्यवस्थित वाळत घातला ती व्यक्ती कोण होती ते मला माहित नाही. त्यांचे आभार मानणं तर दूरच राहिलं.
                                                                     
                                                                              ***
                 

                                             



न्यूयॉर्कच्या ट्रेन मध्ये एखादी कविता नेहमी असते. एकाच डब्यात दोन कविता त्यादिवशी पहिल्यांदा बघितल्या.

शेवटी संजू नाही बघितला. दोन - तीन वीकएंड बघायचा कि नाही बघायचा असं चालू होतं.  संजूबाबाची कहाणी पूर्ण परिचित असल्यामुळे फारशी इच्छा नव्हती. पण मुंबईतल्या माध्यमांत त्या सिनेमाचं भरपूर कौतुक होत होतं.  चित्रपटांनी किती कोटींचा बिझनेस केल, तो बॉक्स ऑफिस वर कसा यशस्वी झाला त्याच्या बातम्या येत होत्या. केवळ एक चांगलं मनोरंजन म्हणून बघावं कि काय असं वाटत होतं.

चित्रपट प्रदर्शनाच्या मागे जे अर्थकारण असतं ते मला माहीत नाही. नविन सिनेमा रिलीज होताना त्यामागे काय प्रणाली असते कल्पना नाही. मागे कुठलातरी हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला तेंव्हा मी मुंबईत होते. बहुतेक सुलतान असावा. नक्की आठवत नाही.  कुठल्यातरी बड्या ताऱ्याचा होता. तो बघावसं वाटत नव्हतं. पण पेपरात बघितलं तर त्या वीकएंडला अख्ख्या मुंबईत एकूण एक सगळ्या चित्रपटगृहात सगळ्या पडदयावर फक्त तोच सिनेमा दाखवत होते. ज्यांना तो सिनेमा बघायचा नसेल त्यांच्या साठी दुसरा काही चॉईस नव्हता. म्हणजे ज्या लोकांचा त्या वीकएंडला चित्रपट बघायचा प्लॅन असेल त्यांना झक्कत तो सिनेमा बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. हि काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नेहमीच असं होतं का मला माहीत नाही.

न्यूयॉर्कमध्ये असं कधी होत नाही. चित्रपट कितीही मोठा असूदेत - मोठं बजेट, मोठ्या दिगदर्शकाचा. वीकएंडला सगळेच्या सगळे स्क्रीन एका सिनेमानी व्यापलेत असं होत नाही. दर्शकांनां दुसरे सिनेमा बघण्याचे ऑप्शन्स असतात.

न्यूयॉर्क मध्ये दुसरी एक चांगली पध्द्त आहे:  माझा मुलगा प्री स्कुल मध्ये होता तेंव्हा त्याच्या शाळेच्या समोर जी बाग आहे ती त्या खाजगी शाळेनी स्वतःच्या खर्चानी विकसित केलेली होती  - त्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनां खेळण्यायोग्य होईल या दृष्टीने.  पण ते प्लेग्राऊंड अर्थातच त्या भागात रहाणाऱ्या सर्व मुलांसाठी खुलं होतं  - मग ती  मुलं त्या शाळेत जाणारी असोत किँवा नसोत.

बॉलिवूड मधील बड्या मंडळींनी अशा प्रकारची सामाजिक जाणीव ठेवायला हरकत नाही.  मुंबईत नवा सिनेमा रिलीज करताना सगळ्या मल्टिप्लेक्स मध्ये किमान एक स्क्रीन जुन्या/नव्या चांगल्या मराठी सिनेमासाठी राखून ठेवावा. त्या मराठी सिनेमाची फारशी तिकीट विक्री झाली नाही, तोटा झाला तर तो त्यांनी सहन करावा. महाराष्ट्रानी त्यांना भरभरून दिलंय. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी पूण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मधून शिक्षण घेतलंय. व्यवसायासाठी वर्षन वर्ष मुंबईत रहातायत. महाराष्ट्राचं आणि मराठी संस्कृतीचं तेवढं देणं ते नक्कीच लागतात.

मुंबईच्या माध्यमात संजू जे कौतुक चाललय ते खरं आहे कि केवळ बॉलिवूडला खूष करण्यासाठी स्तुतिसुमने उधळली जातायत ते समजत नव्हतं. शेवटी एक अमेरिकन परिक्षण वाचून निर्णया पक्का केला. त्या परिक्षणाचा मथळा पुरेसा बोलका होता: संजु - अ ग्लोरिफाइड इन्फोमर्शियल अबाऊट अ बॉलिवूड बॅड बॉय.

मी इन्फोमर्शियल बघत नाही. एका बॅड बॉयच्या आयुष्याबद्दलच इन्फोमर्शियल बघाण्यात काही अर्थ नव्हता.






सध्या आमच्या नदीवर समर अवतरलाय. उन्हाळा म्हंटलं कि कसं रखरखित, घामट वाटतं.  तसं या उन्हळ्यात काही नसतं. ऑकटोबर ते एप्रिल नदीवर कोणी जास्त फिरकु शकत नाही. बोचरा वारा आणि थंडी असते. मे च्या मध्यावर किनाऱ्यावरचा कॅफे उघडला की नदीवरची वर्दळ वाढते. कि उलट होतं - वर्दळ वाढते म्हणून कॅफे उघडतो कि काय कुणास ठाऊक.  

संगीत, सिनेमा असे मनोरंजनाचे कार्यक्रम चालू होतात. लोकं जॉगिंग, सायकलिंग, योग करायला खाली उतरतातकिनाऱ्यावरच्या बाकावर बसलं कि नदीचा संथ प्रवाह बघताना मनही शांत होऊ शकतं.



                                             



ज्या आठवड्यात न्यूयॉर्क मध्ये अतिशय आल्हाददायक हवामान होतं तेंव्हा मुंबई पावसात झोडपून निघत होती.  पावसातल्या मुंबईचं जितकं छान चित्रण वरील गाण्यात आहे तसं दुसऱ्या कुठल्या गाण्यात मी पाहिलेलं नाही.




yesheeandmommy@gmail.com